Tag Archive for: पूर्णयोग

आत्मसाक्षात्कार – २१

खालील चार गोष्टींवर साक्षात्कार आधारित केला गेला पाहिजे.

१) मनाच्या वर असणाऱ्या केंद्रामध्ये उन्नत होणे
२) वैश्विक चेतनेप्रत खुले होणे
३) चैत्य खुलेपण
४) उच्चतर चेतनेचे तिच्या शांती, प्रकाश, शक्ती, ज्ञान, आनंद इत्यादीसहित अस्तित्वाच्या अगदी भौतिक स्तरापर्यंतच्या सर्व स्तरांमध्ये अवतरण होणे.

श्रीमाताजींच्या शक्ती-कार्याला तुमच्या अभीप्सेची, श्रद्धेची आणि समर्पणाची जोड देऊन, उपरोक्त साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. हाच मार्ग आहे. बाकी साऱ्या गोष्टी म्हणजे या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत, आणि त्यासाठी श्रीमाताजी तुमच्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – २०

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

ज्या विशालतेमध्ये, नितांत अशा स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निश्चल-नीरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये निवास करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु आपल्या योगामधील (पूर्णयोगामधील) ईश्वराच्या साक्षात्काराची आणि रूपांतरणाची ही केवळ पहिली पायरी आहे. जीव उच्चतर किंवा दिव्य चेतनेमध्ये वृद्धिंगत होत जाणे यालाच आम्ही ‘रूपांतरण’ असे संबोधतो.

*

एखादा साधक, ‘अवैयक्तिक, निर्गुण ब्रह्मा’पाशीच थांबला आणि त्याने पुढे वाटचालच केली नाही तर मग, तो ‘पूर्णयोगाचा साधक’ आहे, असे म्हणता येणार नाही. ‘निर्गुण साक्षात्कार’ हा स्वयमेव शांत-‘आत्म्याचा’, विशुद्ध ‘सत्‌-चित्‌-आनंदा’चा साक्षात्कार असतो, पण त्यामध्ये ‘सत्यमया’ची, ‘चैतन्यमया’ची, ‘आनंदमया’ची कोणतीही जाणीव नसते. (म्हणजे हे सगुण-साकार विश्व सत्यमय, चैतन्यमय आणि आनंदमय असल्याची जाणीव नसते.) त्यामुळे हा साक्षात्कार ‘निर्वाणा’कडे घेऊन जातो.

आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी असली किंवा समग्र ज्ञानाचा तो एक महत्त्वाचा भाग असला तरी, समग्र ज्ञानामधील ती केवळ एक पायरी असते. सर्वोच्च साक्षात्काराचे ते अंतिम साध्य नसते, तर तो केवळ प्रारंभ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

आत्मसाक्षात्कार – १९

ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि एखादी गोष्ट जर त्याकडे घेऊन जाणारी असेल किंवा त्यासाठी साहाय्यक ठरत असेल किंवा जर ती गोष्ट प्रत्यक्षात आणल्याने तो साक्षात्कार अधिक व्यापक होणार असेल किंवा त्या साक्षात्काराचे आविष्करण होणार असेल, तरच ती गोष्ट इष्ट असते.

साक्षात्कारासाठी वैयक्तिक व सामूहिक साधना आणि ईश्वराचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तींचे सामुदायिक जीवन ही, ईश्वरी कार्यासाठी समग्र जीवनाचे सुसंघटन किंवा आविष्करण करण्यासाठी आवश्यक असणारी पहिली आवश्यक गोष्ट आहे. आणि यासाठी आवश्यक असणारी दुसरी गोष्ट म्हणजे, ‘प्रकाशा’प्रत वळण्यासाठी आणि त्यामध्ये जीवन जगता यावे यासाठी जगाला मदत करणे. हे माझ्या योगाचे (पूर्णयोगाचे) प्रयोजन आहे आणि तोच त्याचा सर्वार्थ आहे.

परंतु साक्षात्कार ही पहिली आवश्यक गोष्ट आहे आणि त्या भोवतीच सारे काही फिरत असते; अन्यथा, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीला काही अर्थ नाही.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 784)

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

आत्मसाक्षात्कार – ०२

आपल्यासाठी ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.

१) सर्व वस्तुंच्या व व्यक्तींच्या अंतरंगामध्ये व पाठीमागे असणारे ‘चैतन्य’ आणि ‘विश्वात्मा’ म्हणजे ‘ईश्वर’. ज्याच्यापासून आणि ज्याच्यामध्ये विश्वातील सर्वाचे आविष्करण झाले आहे तो म्हणजे ईश्वर. सद्यस्थितीत हे आविष्करण अज्ञानगत असले तरीसुद्धा ते ईश्वराचेच आविष्करण आहे.

२) आपल्या अंतरंगातील, आपल्या अस्तित्वाचा ‘स्वामी’ व ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. आपण त्याची सेवा केली पाहिजे; आपण आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला शिकले पाहिजे, तसे केल्यामुळे आपल्याला अज्ञानामधून प्रकाशाकडे उन्नत होता येईल.

३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान आणि शक्ती आहे. त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या प्रकाशाकडे आपण उन्नत झाले पाहिजे; तसेच त्याची सत्यता आपण आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक उतरविली पाहिजे.

सर्वसाधारण जीवनात आपण अज्ञानामध्ये जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती (undivine forces) असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना व अचेतनेचा एक पडदा विणतात आणि त्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ म्हणजे काय हे जाणते आणि त्यामध्ये जाणिवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर व सखोल चेतनेमध्ये प्रविष्ट व्हायचे असेल तर, आपण कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या क्रियेसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे. तसे केल्याने ती दिव्य शक्ती, आपल्या चेतनेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर घडवून आणेल.

ही आहे ‘ईश्वरा’ची, ‘दिव्यत्वा’ची संकल्पना आणि तिच्यापासून आपण प्रारंभ केला पाहिजे. दिव्यत्वाच्या सत्याचा साक्षात्कार, चेतना खुली होण्याने आणि तिच्या परिवर्तनामुळेच होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – २७४

शरीराचे रूपांतरण

व्यक्तिगत अडचणीप्रमाणेच जडभौतिक पृथ्वी-प्रकृतीमध्येही (physical earth-nature) एक सर्वसाधारण अडचण असते. जडभौतिक प्रकृती ही संथ, सुस्त आणि परिवर्तनासाठी अनिच्छुक असते. ढिम्म राहणे आणि अल्पशा प्रगतीसाठी दीर्घ काळ लावणे ही तिची प्रवृत्ती असते. अतिशय दृढ मानसिक किंवा प्राणिक किंवा आंतरात्मिक संकल्पालासुद्धा या जडतेवर मात करणे अतिशय अवघड जाते. वरून सातत्याने चेतना, शक्ती आणि प्रकाश खाली उतरवीत राहिल्यानेच या जडतेवर मात करता येणे शक्य असते. त्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीकडे सातत्यपूर्ण संकल्प व आस असणे आवश्यक असते. आणि शारीर-प्रकृतीने अतीव प्रतिकार केला तरी त्या प्रतिकारामुळे थकून जाणार नाही असा स्थिर आणि चिवट संकल्प असणे आवश्यक असते.

*

गहनतर शांती इत्यादीचा अभाव हे जडभौतिक नकाराचे मूळ स्वरूपच आहे आणि हा जडभौतिक नकारच जगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे अस्तित्व नाकारण्याचा समग्र पाया असतो. जडभौतिकामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या सर्व गोष्टी चिवट, हटवादी असतात आणि त्यांच्यामध्ये जडत्व आणि नकाराची प्रचंड ताकद असते. त्या गोष्टी जर तशा नसत्या तर साधना अतिशय लवकर पूर्ण झाली असती. शारीर-प्रतिकाराच्या या स्वभावधर्माला तुम्हाला सामोरे जावेच लागते आणि तो प्रतिकार कितीही वेळा उफाळून आला तरी त्याच्यावर पुन्हा पुन्हा मात करावीच लागते. पृथ्वी-चेतनच्या रूपांतरणासाठी ही किंमत मोजावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359, 360)

साधना, योग आणि रूपांतरण – २७२

शरीराचे रूपांतरण

व्यक्तीला जेव्हा भौतिक जीवनामध्ये काही परिवर्तन करण्याची इच्छा असते, म्हणजे तिला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करायचा असो किंवा स्वतःच्या अवयवांच्या कार्यपद्धतीमध्ये किंवा सवयींमध्ये बदल करायचा असो, व्यक्तीकडे अविचल अशी चिकाटी असणे आवश्यक असते. अमुक एखादी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा ज्या उत्कटतेने केली होती त्याच तीव्रतेने तीच गोष्ट शंभर वेळा पुन्हा पुन्हा सुरू करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि ती गोष्ट यापूर्वी तुम्ही जणू कधी केलेलीच नव्हती अशा प्रकारे ती पुन्हा पुन्हा करत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. जी माणसं लवकर अस्वस्थ, विचलित होतात त्यांना हे जमत नाही. परंतु तुम्हाला जर हे करता आले नाही तर तुम्ही योगसाधना करू शकणार नाही. किमान ‘पूर्णयोग’ तर नाहीच नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन करता येणार नाही.

व्यक्तीला स्वतःच्या शरीरामध्ये परिवर्तन करायचे असेल तर तीच तीच गोष्ट लाखो वेळा करता आली पाहिजे, कारण शरीर हे सवयी आणि नित्यक्रमाच्या (routine) कृतींनी बनलेले असते आणि हा नित्यक्रम नाहीसा करायचा असेल तर त्यासाठी अनेक वर्षे चिकाटी बाळगावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 07 : 104)

साधना, योग आणि रूपांतरण – २४४

मनाचे रूपांतरण

मनाच्या निश्चल-नीरव अशा अवस्थेमध्ये अतिशय प्रभावी आणि मुक्त कृती घडून येऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या ग्रंथाचे लेखन, काव्य, अंतःप्रेरणेतून दिलेले एखादे व्याख्यान इत्यादी. मन सक्रिय झाले की ते अंतःस्फूर्तीमध्ये ढवळाढवळ करते, स्वतःच्या किरकोळ कल्पनांची त्यात भर घालते आणि त्यामुळे अंतःस्फूर्तीमधून स्फुरलेल्या गोष्टीमध्ये त्या कल्पनांची सरमिसळ होते. अन्यथा मग ती स्फूर्ती निम्न पातळीवरून काम करू लागते किंवा मग निव्वळ मनाकडून आलेल्या सूचनांच्या बुडबुड्यांमुळे ती अंतःस्फूर्ती पूर्णपणे थांबून जाण्याची शक्यता असते. अगदी त्याप्रमाणे, जेव्हा मनाच्या सामान्य कनिष्ठ स्तरावरील गतिविधी सक्रिय नसतात तेव्हा अंतःसूचना किंवा (आंतरिक किंवा उच्चस्तरीय) कृती या अधिक सहजपणे घडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे मनाच्या निश्चल-नीरव अवस्थेमध्ये असताना अंतरंगामधून किंवा वरून येणारे, म्हणजे आंतरात्मिक किंवा उच्चतर चेतनेकडून येणारे ज्ञानदेखील सर्वाधिक सहजतेने येऊ शकते.

*

अविरत चालणारी कृती ही मनाची एक नेहमीचीच अडचण असते. त्याने निश्चल-नीरव होण्यास शिकण्याची आवश्यकता असते आणि स्वतःच्या उपयोगासाठी ज्ञानावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न न करता, त्याने ज्ञानोदय होण्यास वाव दिला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 55-56, 54)

साधना, योग आणि रूपांतरण – २४३

मनाचे रूपांतरण

मनाची ग्रहणशील निश्चल-नीरवता (silence), मानसिक अहंकाराचा निरास आणि मनोमय पुरुष साक्षीभावाच्या भूमिकेत उतरणे, ‘दिव्य शक्ती’बरोबर असलेला घनिष्ठ संपर्क आणि अन्य कोणाप्रत नव्हे तर, त्या दिव्य शक्तीच्या ‘प्रभावा’प्रत खुलेपणा या गोष्टी ‘ईश्वरा’चे साधन बनण्यासाठी, आणि केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’द्वारेच संचालित होण्यासाठी आवश्यक अटी असतात. केवळ मनाच्या निश्चल-नीरवतेमुळे अतिमानसिक चेतना अवतरित होते असे नाही. मानवी मन आणि अतिमानस (supermind) यांच्या दरम्यान चेतनेच्या बऱ्याच अवस्था, बऱ्याच पातळ्या, बरेच स्तर असतात.

निश्चल-नीरवतेमुळे मन आणि उर्वरित अस्तित्व हे महत्तर गोष्टींप्रत खुले होते, कधीकधी ते ब्रह्मांडगत चेतनेप्रत खुले होते, कधीकधी शांत ‘आत्म्या’च्या अनुभवाप्रत खुले होते. तर कधी ते ‘ईश्वरा’च्या शक्तीप्रत किंवा उपस्थितीप्रत खुले होते; कधीकधी ते मानवी मनापेक्षा अधिक उच्च असणाऱ्या चेतनेप्रत खुले होते. या पैकी कोणतीही गोष्ट घडण्यासाठी मनाची निश्चल-नीरवता ही सर्वाधिक अनुकूल परिस्थिती असते.

‘दिव्य-शक्ती’ सर्वप्रथम व्यक्तिगत चेतनेवर आणि नंतर त्या चेतनेमध्ये अवतरित होण्यासाठी आणि ती चेतना रूपांतरित करण्याचे तिचे कार्य करण्यासाठी, तसेच आवश्यक असे अनुभव प्रदान करण्यासाठी, आणि व्यक्तीचा दृष्टिकोन व तिच्या वृत्तीप्रवृत्ती पूर्णतः बदलून टाकण्यासाठी आणि व्यक्ती जोवर अंतिम अतिमानसिक परिवर्तनसाठी तयार होत नाही तोपर्यंत तिला टप्प्याटप्याने पुढे घेऊन जाण्यासाठी, मनाची निश्चल-नीरवता ही पूर्णयोगामधील सर्वात अनुकूल परिस्थिती असते. अर्थात हीच केवळ एकमेव अनुकूल परिस्थिती असते असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 266-267)

साधना, योग आणि रूपांतरण – २४२

नमस्कार वाचकहो,

मानवी प्रकृतीचे रूपांतरण हे पूर्णयोगाचे एक वैशिष्ट्य आहे.

‘रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार’ या निकषावर आधारित असलेले, आंतरात्मिक रूपांतरण, आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक रूपांतरण हे तीन प्रकार आपण आजवर पाहिले. अगदी सारांशरूपाने सांगायचे तर, चैत्य पुरुषाद्वारे होणारे रूपांतरण हे आंतरात्मिक रूपांतरण, उच्चतर चेतनेद्वारे होणारे रूपांतरण हे आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक शक्तीद्वारे होणारे रूपांतरण हे अतिमानसिक रूपांतरण असते हे आता आपल्याला ज्ञात झाले आहे.

आता ‘रूपांतरण कोणाचे’ या निकषावर आधारित असलेले मानसिक, प्राणिक व शारीरिक रूपांतरण हे तीन प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. या रूपांतरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्या रूपांतरणाचा समावेश होतो. तसेच पुढे जाऊन, आपल्यामधील अवचेतन, आणि अचेतनाचे रूपांतरणही पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते.

मनुष्य देहरूपात आला तेव्हा त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचे, आणि स्वत:च्या अंतरीच्या दिव्यत्वाचे विस्मरण झाले. आणि त्याच्या मन, प्राण व शरीर या साधनांमध्ये विकार निर्माण झाले. आणि त्यामुळेच दिव्य जीवनाकडे चालणाऱ्या मार्गक्रमणामध्ये, साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हे साधकासाठी आवश्यक ठरते. त्यावर मात करायची झाली तर त्याचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे, त्याची गुणवैशिष्ट्ये व मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे, मन, प्राण, शरीर यांचे स्वरूप काय आहे, त्यांची बलस्थानं कोणती व त्यांच्या मर्यादा कोणत्या याचा सारासार आणि सांगोपांग विचार श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केला आहे. हा विचार इतका विस्तृत व सखोल आहे की, त्या सगळ्याचा येथे समावेश करायचा ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. त्यामुळे इतक्या तपशिलात न जाता, परंतु तरीही त्यातील गाभाभूत विचार वाचकांच्या हाती लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. आता आपण क्रमशः मन, प्राण व शरीर यांच्या रूपांतरणासाठी साहाय्यक होतील असे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. उद्यापासून ‘मानसिक रूपांतरण’ हा भाग सुरू करत आहोत.

धन्यवाद.
संपादक, अभीप्सा मराठी मासिक