Tag Archive for: पूर्णयोग

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

(पूर्वार्ध)

श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.

अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प आणि अभीप्सेला स्थान आहे, मात्र इच्छेला थारा नाही. जर इच्छा असेल तर तेथे आसक्ती, अपेक्षा, लालसा, समत्वाचा अभाव, ईश्वरप्राप्ती झाली नाही तर होणारे दुःख यासारख्या, योगाशी विसंगत असणाऱ्या सर्व गोष्टी आढळून येतील.

*

व्यक्तीला जे काही प्राप्त होते त्याबाबत तिने समाधानी असले पाहिजे आणि तरीही सर्वत्व (all) साध्य होत नाही तोपर्यंत व्यक्तीने, अधिकासाठी कोणताही संघर्ष न करता, शांतपणे आस बाळगली पाहिजे. तेथे इच्छा असता कामा नये, संघर्षसुद्धा असता कामा नये तर अभीप्सा, श्रद्धा, खुलेपणा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) ईश्वरी कृपा असली पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 61, 60)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे (व्यक्तीमध्ये) बदल घडून येतो.

*

अभीप्सेमध्ये शब्दांची आवश्यकता नसते. अभीप्सा शब्दांद्वारे किंवा शब्दांवाचूनही व्यक्त होऊ शकते.

*

अभीप्सा ही विचारांच्या रूपातच असली पाहिजे असे काही गरजेचे नसते. ती आंतरिक भावनेच्या रूपातदेखील असू शकते. मन कामामध्ये गुंतलेले असतानासुद्धा ती टिकून राहू शकते.

*

स्वतःसाठी काही मिळविण्याच्या इच्छेमधून सहसा (दिव्य शक्ती) खेचून घेणे (Pulling) ही प्रक्रिया घडू लागते; पण अभीप्सेमध्ये मात्र, उच्चतर चेतना अवतरित व्हावी आणि तिने आपल्या अस्तित्वाचा ताबा घ्यावा म्हणून, तिच्याप्रत केलेले आत्मदान (self-giving) असते. जेवढी साद उत्कट असते, तेवढे हे आत्मदान अधिक असते.

श्रीअरविंद (CWSA 29 : 59-60, 58, 58, 61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३३

अभीप्सा अधिक एक-लक्ष्यी असेल तर साहजिकच प्रगती अधिक वेगाने होते. पण त्यामध्ये जर प्राणाचा, त्याच्या इच्छावासनांसहित आणि शरीराचा, त्याच्या गतकालीन सवयीच्या वृत्तींसहित शिरकाव झाला तर मात्र अडचण येते आणि तसा तो शिरकाव बहुतेक सर्वांमध्येच होतो. असा शिरकाव होतो तेव्हा अभीप्सेमध्ये अस्वाभाविकता येते आणि साधनेमध्ये एक प्रकारची निरसता येते. अशी निरसता हा साधनेतील सर्वश्रुत अडथळा असतो. परंतु व्यक्तीने निराश होता कामा नये; चिकाटी बाळगली पाहिजे. या शुष्क कालावधीमध्येही व्यक्तीने संकल्प दृढ ठेवला तर (अस्वाभाविकता आणि निरसता) या गोष्टी निघून जातात आणि त्यानंतर अभीप्सेची एक महत्तर शक्ती व अनुभूती शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३२

अभीप्सा (aspiration) जशी असेल अगदी तंतोतंत त्यानुसारच उच्चतर चेतना अवतरित होईल असे नाही; पण म्हणून अभीप्सा काही निष्फल ठरत नाही. अभीप्सेमुळे चेतना खुली ठेवली जाते; तसेच येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मूकसंमती देण्याची साधकामध्ये जी एक निष्क्रिय अवस्था असू शकते त्या अवस्थेला अभीप्सेमुळे एक प्रकारचा आळा बसतो. आणि उच्चतर चेतनेच्या स्रोतांप्रति एक प्रकारची ओढ निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३१

कोणतेही साहाय्य नसताना, केवळ स्वतःच्या अभीप्सेच्या आणि संकल्पशक्तीच्या आधारे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर मात करता येईल असे बळ क्वचितच एखाद्याकडे असते. आणि अगदी कोणी जरी अशी मात केलीच तरी त्याला या कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर केवळ एका विशिष्ट प्रकारचेच नियंत्रण मिळविता येते, त्यांच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळविता येत नाही.

कनिष्ठ शक्तींशी सामना करत असताना, आपण ईश्वरी शक्ती‌च्या बाजूचे असावे यासाठी आणि ईश्वरी शक्ती‌चे साहाय्य मिळविता यावे यासाठी (साधकाकडे) संकल्पशक्ती व अभीप्सा असणे आवश्यक असते. आध्यात्मिक संकल्पाची आणि हृदयाच्या आंतरात्मिक अभीप्सेची परिपूर्ती करणारी ईश्वरी शक्तीच केवळ (कनिष्ठ प्रकृतीवर) विजय मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३०

साधक एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तरी त्याने वैयक्तिकरित्या अभीप्सा बाळगणे आवश्यकच असते. सारे काही आपोआप घडून येत आहे आणि विकासासाठी विशिष्ट ज्ञान व सहमतीचीच तेवढी आवश्यकता आहे अशी अवस्था येत नाही तोपर्यंत तरी, ही वैयक्तिक अभीप्सा आवश्यक असते.

*

ईश्वराला केलेले आवाहन म्हणजे ‘अभीप्सा’ आणि चेतना-शक्तीने प्रकृतीवर टाकलेला दबाव म्हणजे ‘संकल्पशक्ती’.

*

‘अभीप्सा’ म्हणजे शक्तींना केलेले आवाहन. शक्तींकडून जेव्हा त्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो तेव्हा साधकामध्ये अविचल ग्रहणशीलतेची एक केंद्रिभूत झालेली पण सहजस्फूर्त अशी स्वाभाविक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58, 57, 57)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २९

‘ईश्वरी शक्ती’ नेहमीच अस्तित्वात असते, तुम्हाला तिची जाणीवही झाली होती आणि तुमच्या चेतनेतून जरी ती तुम्हाला काही काळ हरवल्यासारखी किंवा दूरस्थ झाल्यासारखी भासली तरीदेखील, ती तिथेच आहे आणि तीच प्रबळ ठरणार हे निश्चित, याची तुम्ही स्वतःला सतत आठवण करून देत जा. कारण ती ‘ईश्वरी शक्ती’ ज्या कोणाला स्पर्श करते आणि जवळ घेते, ते सारे जण तेव्हापासून त्या ‘ईश्वरी शक्ती’चेच होऊन जातात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २८

(इच्छावासनांचा किंवा रागलोभादी विकारांचा आघात झाल्यास काय करावे असा प्रश्न एका साधकाने विचारलेला आहे. त्यावर उपाय म्हणून आधी साधकाने स्वत:ची संकल्पशक्ती उपयोगात आणावी, असे श्रीअरविंद यांनी त्याला सांगितले असावे. पण तसे करता नाही आले तर काय करावे, हे श्रीअरविंद त्या साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही तुमची संकल्पशक्ती उपयोगात आणू शकत नसाल तर मग एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करणे. एखाद्या आघातापुढे हार पत्करणे आणि काहीच न करणे यापेक्षा, त्या शक्तीला आवाहन करणे अधिक बरे. मग ते आवाहन केवळ मनाने केलेले असो किंवा मानसिक शब्दांनी केलेले असो! या आवाहनाचा अगदी त्वरित परिणाम घडून आला नाही तरी, चेतना पुन्हा एकदा (चैत्य पुरुषाप्रत) खुली होण्यामध्ये आणि ‘दिव्य शक्ती’चे आगमन होण्यामध्ये त्याची परिणती होऊ शकते. कारण प्रत्येक गोष्ट त्यावरच अवलंबून असते.

बहिर्मुख झालेल्या चेतनेमध्ये (externalised consciousness) नेहमीच अंधकार आणि दुःखभोग असू शकतात; मात्र (तुमच्यामध्ये) आंतरिक चेतनेची सत्ता जितकी वाढत जाईल तेवढ्या प्रमाणात दुःखभोगादी गोष्टी मागे सारल्या जातील आणि (कालांतराने) त्या निघून जातील. कारण पूर्णतया आंतरिकीकरण झालेल्या चेतनेपुढे (internalised consciousness) त्यांचा टिकाव लागू शकत नाही. आणि समजा दुःखभोगादी गोष्टी अगदी आल्याच तर, त्या गोष्टी बाह्यवर्ती स्पर्शाप्रमाणे (वरवरच्या) असतात, त्या तुमच्या अस्तित्वामध्ये घर करू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721-722)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २७

ज्या ऊर्जेमुळे व्यक्तीला सत्कृत्य करण्याची प्रेरणा मिळते आणि जी ऊर्जा व्यक्तीला दुष्कृत्य करण्यापासून रोखते ती ऊर्जा म्हणजे ‘संकल्पशक्ती’ होय.

*

संकल्प हा चेतनेचाच एक भाग असतो आणि मनुष्यामध्ये तो (कनिष्ठ) प्रकृतीच्या गतीविधींचे नियंत्रण करणारा मुख्य घटक असलाच पाहिजे.

*

आपण जर सातत्याने संकल्पाचा उपयोग करत राहिलो तर आपल्या अस्तित्वाचे इतर घटकदेखील हळूहळू त्या संकल्पाची आज्ञा प्रमाण मानू लागतात आणि मग आपल्या कृतीदेखील प्राणिक भावना वा इच्छावासनांनुसार न होता, त्या संकल्पाच्या बरहुकूम होऊ लागतात. उर्वरित सर्व गोष्टी (भावना, इच्छा इ. स्वयमेव) जर कल्पनेमध्ये किंवा कृतीमध्ये आणल्या गेल्या नाहीत आणि त्यांना जर संकल्पाची जोड दिली गेली नाही आणि त्या मनात उमटतील तेव्हा नुसते त्यांचे अवलोकन केले आणि त्यांना नकार दिला तर, थोड्याशा संघर्षानंतर त्या गोष्टी क्षीण होत जातात आणि कालांतराने नाहीशा होतात.

*

साधकामध्ये जोवर ध्येय साध्य करून घेण्याची इच्छा आणि दृढ संकल्प नसतो तोवर ती ‘दिव्य शक्ती’सुद्धा निश्चित आणि चिरस्थायी परिणाम निर्माण करू शकत नाही.

*

साधकामध्ये जोपर्यंत वरून होणारे ‘दिव्य शक्ती’चे कार्य किंवा अंतरंगातील गहनतर ‘दिव्य संकल्पा’चे कार्य सातत्यपूर्ण रितीने घडून येत नाही तोपर्यंत मानसिक इच्छेची आवश्यकता असतेच.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 718, 716, 716, 720, 720)