Tag Archive for: पूर्णयोग

आंतरिक आध्यात्मिक प्रगती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर बाह्य परिस्थितीला आपण अंतरंगातून कशी प्रतिक्रिया देतो यावर ती अवलंबून असते. आध्यात्मिक अनुभवाचा तो नेहमीच अंतिम निष्कर्ष राहिलेला आहे. आणि म्हणूनच योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही इतका भर देत असतो; बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणाऱ्या आंतरिक स्थितीवर म्हणजे समतेच्या आणि स्थिरतेच्या स्थितीवर आम्ही भर देत असतो. आंतरिक आनंदाची स्थिती एकाएकी येऊ शकणार नाही पण, जीवनातील धक्के व आघात यांच्या नेहमीच अधीन असणाऱ्या पृष्ठवर्ती मनामध्ये राहण्यापेक्षा, अंतरंगात अधिकाधिक प्रवेश करून, तेथून जीवनाकडे पाहण्यावर आमचा भर असतो. या आंतरिक स्थितीमुळेच व्यक्ती जीवन आणि त्याच्या अस्वस्थकारी शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली बनू शकते आणि विजय प्राप्त करण्याची थोडीफार तरी आशा बाळगू शकते.

अंतरंगामध्ये अविचल (quiet) राहणे, अडीअडचणी किंवा चढउतार यांमुळे अस्वस्थ किंवा नाउमेद होण्यास नकार देऊन, त्यामधून सहीसलामत पार होण्याचा दृढ संकल्प बाळगणे, या योगमार्गावरील शिकण्यायोग्य गोष्टींपैकी काही प्रारंभिक गोष्टी आहेत.

या व्यतिरिक्त अन्य काही करणे म्हणजे चेतनेच्या अस्थिरतेस प्रोत्साहन देण्यासारखे आहे, परंतु तुम्ही अंतरंगामध्ये स्थिर आणि अविचल राहू शकलात तर मग, अनुभवांचा प्रवाह काहीशा स्थिरपणाने वाहू लागेल. अर्थात या वाटचालीमध्ये व्यत्यय आणि चढउतार येणारच नाहीत, असे नाही. परंतु या गोष्टी योग्य रितीने हाताळल्या गेल्या तर, या कालावधीमध्ये साधनाच झाली नाही, असे होत नाही. तर हाच कालावधी अडचणी संपुष्टात येऊन, आधी आलेले अनुभव पचवण्यासाठीचा कालावधी ठरू शकतो.

बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण हे नेहमीच अधिक महत्त्वाचे असते. साधकाला जर ते प्राप्त होऊ शकले आणि तो स्वतः ज्यामध्ये श्वास घेऊ शकेल व ज्यामध्ये जीवन जगू शकेल असे स्वतःचे आध्यात्मिक वातावरण साधक स्वत: तयार करू शकेल तर, ती परिस्थिती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 140)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी संकल्पाकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही मनुष्याला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही.

त्यासाठी व्यक्तीकडे प्रारंभी कोणती गोष्ट असली पाहिजे? तर, ईश्वर जो संकल्प करेल तो भल्यासाठीच असतो, अशी नित्य धारणा व्यक्तीकडे असली पाहिजे. हे असे कसे काय, हे जरी मनाला उमगले नाही तरीही, व्यक्तीने तशी धारणा बाळगली पाहिजे. तसेच, जी गोष्ट तिला अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येत नाहीये ती गोष्ट तिने सहिष्णू वृत्तीने स्वीकारली पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या गतीविधी कदाचित असू शकतील परंतु तेव्हासुद्धा व्यक्तीने स्थिर समत्वापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. एकदा हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले की मग बाकी सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 134)

अहंकाराचा अभाव म्हणजे समता नव्हे, तर इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समता. म्हणजे मी असे म्हटले आहे की, ‘समता‌’ या शब्दामधून इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव यांचा निर्देश होतो; अहंकाराची जाणीव नाहीशी होईल का, ती सूक्ष्म आणि व्यापक रूपामध्ये टिकून राहील, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 133)

सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व (equality).

*

समत्वाशिवाय साधनेचा भरभक्कम पाया रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य स्थिरतेने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारण्यास शिकले पाहिजे. या गोष्टी हीच समत्वाची कसोटी असते. सर्व गोष्टी सुरळीत असताना, माणसं आणि परिस्थिती सुखकारक असताना समत्व बाळगणे आणि स्थिरता राखणे सहजसोपे असते; पण जेव्हा परिस्थिती विपरित असते तेव्हाच स्थिरता, शांती, समत्व यांच्या परिपूर्णत्वाचा कस लागतो आणि अशा परिस्थितीमध्येच त्या अधिक दृढ, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130, 129)

कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे, हर्ष किंवा शोक यामुळे, किंवा सुख-दु:खामुळे विचलित न होणे, तसेच लोकं काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे विचलित न होणे, याला योगमार्गामध्ये समतेची अवस्था म्हणतात किंवा व्यक्तीमध्ये सर्व गोष्टींबाबत समभाव आहे, असे म्हटले जाते. या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचणे हे साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे मन तसेच प्राणामध्ये, अविचलता (quietude) आणि निश्चल-निरवता (silence) येण्यास मदत होते. याचा अर्थ असा की, आता खरोखरच प्राण व प्राणिक मन स्वयमेव अविचल आणि निश्चल-निरव होऊ लागले आहे. त्या पाठोपाठ बुद्धीदेखील अविचल आणि निश्चल-निरव होणार हे निश्चित.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

सत्त्वगुणाच्या माध्यमातून प्रगत होणे, ही पारंपरिक योगमार्गातील एक सर्वसाधारण संकल्पना आहे. पतंजलीप्रणीत योगामध्ये सांगितल्याप्रमाणे यमनियमाद्वारे असेल, किंवा बौद्धमतातील अष्टांगमार्गाद्वारे असेल किंवा भक्तिपंथातील साधुता यांसारख्या साधनांचा अवलंब करून, त्याद्वारे शुद्धीकरण आणि पूर्वतयारी करणे, या साऱ्या पारंपरिक योगाच्या संकल्पना आहेत.

पूर्णयोगामध्ये सत्त्वाच्या माध्यमातून विकसन होत नाही, तर येथे सत्त्वाची जागा समतेच्या जोपासनेद्वारा आणि आंतरात्मिक रूपांतरणाद्वारे (psychic transformation) घेतली जाते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 424)

सर्व परिस्थितीमध्ये, अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये समता आणि शांती असणे हा योगस्थितीचा पहिला मुख्य आधार आहे. (तो दृढ झाला की मग) व्यक्तीचा कल जसा असेल त्यानुसार मग एकतर (ज्ञानासहित) प्रकाश येईल किंवा (सामर्थ्य आणि अनेक प्रकारची गतिमानता घेऊन) शक्ती अवतरेल किंवा (प्रेम आणि अस्तित्वाचा मोद घेऊन) आनंद येईल. परंतु पहिली आवश्यक स्थिती म्हणजे शांती! तिच्याविना (उपरोक्त) कोणतीच गोष्ट स्थिर होऊ शकत नाही.

श्रीअरविंद (CWSA 29 : 123)

व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये जेव्हा सर्वत्र पूर्णतः शांती प्रस्थापित झालेली असते तेव्हा, कनिष्ठ प्राणाच्या प्रतिक्रिया त्या शांतीला विचलित करू शकत नाहीत. सुरुवातीला त्या प्रतिक्रिया, पृष्ठभागावर तरंग असावेत त्याप्रमाणे येऊ शकतात, नंतर त्या फक्त सूचनांच्या स्वरूपात येऊ शकतात. त्यांच्याकडे व्यक्ती लक्ष देईल किंवा देणारही नाही, परंतु काहीही असले तरी त्या आत शिरकाव करणार नाहीत, त्या अंतरंगातील शांतीवर परिणाम करणार नाहीत किंवा यत्किंचितही अस्वस्थता निर्माण करणार नाहीत.

या अवस्थेचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे, पण तरीही सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, एखाद्या पर्वतावर कोणी दगड फेकून मारावेत आणि त्या पर्वताला जाणीव असेलच तर, फार फार त्याला त्या दगडांचा स्पर्श जाणवेल. पण तो स्पर्श इतका किरकोळ आणि वरवरचा असेल की, त्याचा त्या पर्वतावर काहीच परिणाम होणार नाही, तशी ही अवस्था असते. सरतेशेवटी ही प्रतिक्रियासुद्धा नाहीशी होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 150-151)

शांतीमध्ये स्थिरतेच्या जाणिवेबरोबरच एक सुसंवादाची जाणीवदेखील असते आणि या जाणिवेमुळे मुक्तीची आणि परिपूर्ण तृप्तीची भावना निर्माण होते.

*

पृष्ठभागावर अशांतता असतानासुद्धा, आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित शांतीचा अनुभव येणे ही नित्याची गोष्ट आहे. वास्तविक, समग्र अस्तित्वामध्ये परिपूर्ण समता साध्य होण्यापूर्वीची कोणत्याही योग्याची ती नित्याची अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148 & 153)

(श्रीअरविंद येथे सकारात्मक आणि अभावात्मक स्थिरता म्हणजे काय ते सांगत आहेत. तसेच स्थिरता आणि शांती यामधील फरक देखील ते उलगडवून दाखवत आहेत.)

स्थिरतेपेक्षा (calm) शांती (peace) अधिक सकारात्मक असते. जिथे अस्वस्थता, अशांतता किंवा त्रास नाही अशी एक अभावात्मक (negative) स्थिरतासुद्धा असू शकते. परंतु शांतीमध्ये नेहमीच काहीतरी सकारात्मक असते. स्थिरतेप्रमाणे शांतीमध्ये केवळ सुटकाच नसते तर; शांती येताना स्वतःसोबत एक विशिष्ट आनंद किंवा स्वतःचा आनंद घेऊन येत असते.

(अभावात्मक स्थिरतेप्रमाणेच) एक सकारात्मक स्थिरतादेखील असते; त्रास देऊ पाहणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरोधात ती ठामपणाने उभी राहते, ती अभावात्मक स्थिरतेसारखी क्षीण आणि तटस्थ नसते तर ती सशक्त आणि भव्य असते.

बरेचदा शांती आणि स्थिरता हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात पण वर सांगितल्यानुसार, दोन्हीच्या खऱ्या अर्थाच्या आधारे, व्यक्तीला त्या दोन्हीमधील फरक लक्षात येऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148)