Tag Archive for: परिसरीय चेतना

साधना, योग आणि रूपांतरण – २९४

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(एका साधकाला अवचेतनामधून वर उफाळून येणाऱ्या गोष्टींमुळे, साधनेमध्ये व्यत्यय येत आहे. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी केलेले हे मार्गदर्शन…)

हे खरं आहे की, अजून काहीतरी अवचेतनामधून (subconscient) उफाळून वर येईल, पण जे तिथे अजूनही शिल्लक राहिलेले आहे तेच वर येईल. आत्ता ज्यास नकार दिला जात आहे, ते जर नष्ट न होता इतरत्र कोठे गेले, तर ते आता अवचेतनामध्ये जाणार नाही; तर ते व्यक्ती स्वतःभोवती जी चेतना वागवत असते त्या परिसरीय चेतनेमध्ये (surrounding consciousness) जाईल. एकदा का ते तेथे गेले की ते कोणत्याही प्रकारे स्वतःचे असे राहत नाही आणि जरी त्याने परत येण्याचा प्रयत्न केला तरी ते आता एखाद्या परक्या गोष्टीसारखे असते, तेव्हा व्यक्तीने त्याचा स्वीकार करता कामा नये किंवा त्याला वाव देता कामा नये.

व्यक्ती नकाराच्या ज्या दोन अंतिम टप्प्यांद्वारे, प्रकृतीच्या जुन्या गोष्टींपासून सुटका करून घेऊ शकते ते दोन टप्पे असे : जुन्या गोष्टी एकतर अवचेतनामध्ये जाऊन बसतात आणि तेथून त्या काढून टाकाव्या लागतात किंवा मग त्या परिसरीय चेतनेमध्ये जाऊन बसतात आणि मग त्या आपल्या राहत नाहीत. (त्या सार्वत्रिक प्रकृतीचा भाग बनलेल्या असतात.)

अवचेतनामधून जे पृष्ठभागावर येत आहे ते जोवर पूर्णपणे नाहीसे होत नाही तोपर्यंत व्यक्तीने त्यांची पुनरावृत्ती होण्यास मुभा द्यावी, हा विचार योग्य नाही. कारण त्यामुळे ही त्रासदायक अवस्था विनाकारणच लांबेल आणि ती घातकसुद्धा ठरू शकते. जेव्हा या गोष्टी उफाळून येतात तेव्हा त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्या तशाच कायम न ठेवता, त्या फेकून दिल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 602)

साधना, योग आणि रूपांतरण – २९०

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते.

जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा ज्याला ‘परिसरीय चेतना’ (environmental consciousness) असे म्हणता येईल, त्यामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेथून त्या काही काळपर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतात किंवा तेथून ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत, चेतनेवर दबाव टाकतात.

त्या (इच्छावासना) परिसरीय चेतनेमधून येत असतील तर त्या विचार-सूचनांचे किंवा आवेगांचे रूप घेतात किंवा मग त्यांचा अस्वस्थ करणारा एक अंधुकसा दबाव व्यक्तीला जाणवतो. त्या जर अवचेतनामध्ये गेल्या असतील तर तेथून त्या बरेचदा स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात, परंतु त्या जागृतावस्थेत सुद्धा पृष्ठभागावर येऊ शकतात.

जेव्हा शरीर नव-चेतनामय झालेले असते आणि त्याच वेळी त्याच्या ठायी ‘दिव्य शांती’ आणि ‘दिव्य शक्ती’ असते तेव्हा, व्यक्तीला बाह्यवर्ती दबावाची जाणीव होते परंतु त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होत नाही आणि मग (शारीर-मनावर किंवा शरीरावर तत्काळ दबाव न टाकता) तो दबाव सरतेशेवटी (व्यक्तीपासून) दूर निघून जातो किंवा मग तो हळूहळू किंवा त्वरेने नाहीसा होतो.

मी ज्याला ‘परिसरीय चेतना’ असे संबोधतो ती चेतना प्रत्येक मनुष्य, त्याच्या नकळत, स्वतःच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूस, सभोवार वागवत असतो आणि या परिसरीय चेतनेच्या माध्यमातून तो इतरांच्या आणि वैश्विक शक्तींच्या संपर्कात असतो. या चेतनेद्वारेच इतरांच्या भावना, विचार इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. याच चेतनेद्वारे वैश्विक शक्तींच्या लहरी म्हणजे इच्छावासना, लैंगिकता इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. आणि व्यक्तीच्या मन, प्राण व शरीराचा ताबा घेतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 601)