Tag Archive for: निष्ठा

साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का?

श्रीमाताजी : हो, या दोन गोष्टी भिन्न आहेत. अर्थात, मला वाटतं की, प्रामाणिक नसताना निष्ठावान असणे आणि निष्ठावान नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या निष्ठावान होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही निष्ठा नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा दुसरा येतोच असे नाही. पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

साधक : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी निष्ठा ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे. निष्ठेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधाचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी निष्ठा असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत आहे. व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती परिपूर्ण प्रामाणिकपणाचे आचरण करू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. अर्थात, एखादी व्यक्ती ईश्वरी उपस्थितीप्रत आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे समर्पित असेल तर ती त्या उपस्थितीशी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 299-300)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग हा एक प्रयत्न असतो, ती तपस्या असते. व्यक्ती जेव्हा अतीव प्रामाणिकपणाने उच्चतर शक्तीच्या कार्याप्रत स्वतःचे समर्पण करते; ते समर्पण सतत जागते ठेवते आणि ते परिपूर्ण करत राहते तेव्हाच मग योगाचे तपस्यापण (म्हणजे त्यातील खडतरता) संपुष्टात येते.

योग म्हणजे सुसंगती नसलेली, तर्कहीन अशी काही एक कविकल्पना नाही किंवा योग म्हणजे निव्वळ चमत्कारही नाही. योगाचे स्वतःचे असे काही नियम असतात, काही अटी असतात आणि असे असताना, (स्वत: काहीही प्रयत्न न करता) कोणत्यातरी एखाद्या जबरदस्त चमत्काराद्वारे ईश्वरानेच सारे काही घडवून आणावे अशी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा कशी काय करू शकता, हेच मला समजत नाही.

‘पूर्णयोग’ निर्धोक आहे असे मी कधीही म्हटलेले नाही, कोणताच योग निर्धोक नसतो. मानवी जीवनातील कोणत्याही महान उद्यमामध्ये असतात त्याप्रमाणेच, प्रत्येक योगमार्गाचे त्याचे त्याचे स्वतःचे असे काही धोके असतात. मात्र व्यक्तीमध्ये केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा असेल तर त्या धोक्यांमधून सहीसलामत पार पडता येते. (केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा) या दोन आवश्यक अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 81, 43)

सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक

आमच्या AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

 

विचारशलाका १३

केवळ सद्यकालीन मानवी सभ्यतेचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे असे नाही तर, या जगाचेच रक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि ते निश्चितपणे केले जाईल. परंतु काही जणांची जशी इच्छा आहे किंवा ते कल्पना करतात तितक्या सहजतेने किंवा तितक्या लवकर किंवा ते कल्पना करतात तशा पद्धतीनेच ते होईल असे मात्र नाही. सद्यकालीन सभ्यतेमध्ये निश्चितपणे परिवर्तन झालेच पाहिजे पण ते परिवर्तन विध्वंसानंतर होईल का अधिक महान सत्याच्या पायावर आधारित एका नवीन रचनेद्वारे ते परिवर्तन होईल, एवढाच काय तो प्रश्न आहे. …आशावाद किंवा निराशावाद हे काही सत्य नसते, तर या गोष्टी म्हणजे मनाच्या प्रवृत्ती असतात किंवा स्वभावाच्या भावावस्था असतात. आणि म्हणूनच आपण सारेजण, अतिआशावादी किंवा अतिनिराशावादी न राहता, “थोडे थांबूया आणि बघूया काय होते ते.”

*

तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच हा काळ मोठ्या कष्टाचा आहे हे मला माहीत आहे. संपूर्ण जगासाठीच तो तसा कष्टप्रद आहे; सर्वत्र गोंधळ, त्रास, विस्कळीतपणा आणि अव्यवस्था ही सर्वसाधारणपणे सगळ्यांचीच स्थिती आहे. भावी काळात येऊ घातलेल्या चांगल्या गोष्टींची ही तयारी चाललेली आहे किंवा त्या गोष्टी एका पडद्याआड विकसित होत आहेत आणि जागोजागी सर्वत्र वाईट गोष्टी मात्र ठळकपणाने दिसून येत आहेत. एकच गोष्ट करायला हवी आणि ती म्हणजे तग धरून राहायचे. प्रकाशाची घटिका येत नाही तोपर्यंत तग धरून राहायचे.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 221 & 222]

*

जगाच्या सद्यकालीन परिस्थितीमध्ये ‘ईश्वरा’प्रति निरपवाद निष्ठा ही एक अपरिहार्य आवश्यकता बनली आहे.

– श्रीमाताजी [CWM 14 : 156]