Tag Archive for: निश्चय

लोक तुमच्याविषयी द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही; तर उलट दिव्य चेतने‌ने व दिव्य कृपे‌ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही खंबीर आहात का, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य चेतनेकडून व दिव्य कृपेकडून वापर केला जात असतो, हे त्यामागचे खरे कारण असते.

म्हणून जर कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर, तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्नही होता कामा नये. उलट, अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, तुमच्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे तुमच्याविषयी तसे उद्गार काढले गेले ते तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर, तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपे‌विषयी कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी झाले पाहिजे आणि तुमचे अहित व्हावे असा जो तुमच्या निंदकांचा हेतू होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282)

मानसिक परिपूर्णत्व – २०

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)

तुमच्यासाठी या पृथ्वीवर करण्याजोगी हीच एकमेव गोष्ट शिल्लक राहिली आहे, अमुक अमुक गोष्ट करावयाची आहे हे एकदाच कायमचे ठरवून टाका ; मग बाकी भूकंप, ढासळती सभ्यता… इ. इ. बाह्य गोष्टी आहेतच. आणखी असे की, जी गोष्ट तुम्ही करणे आवश्यक आहे, ती तुम्हाला करता यावी म्हणून तुमच्या साहाय्यासाठी एक गोष्टदेखील पाठविलेली आहे. तुम्ही म्हणता, तुम्ही ठरविलेली ती गोष्ट अवघड आहे, मार्ग दूरवरचा आहे आणि त्यामानाने देण्यात आलेले प्रोत्साहन अल्प आहे पण म्हणून काय झाले? एवढी मोठी गोष्ट एवढ्या सहजासहजी मिळावी किंवा एकतर त्यात अगदी वेगाने यश प्राप्त व्हावे, नाहीतर नकोच, अशी अपेक्षा तुम्ही का बाळगता? अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्यास सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्या अडचणींवर मात करू शकाल.

…यशाचा मूलमंत्र, विजयाचा निर्धार, दृढ संकल्प कायम राखणे हीच एक गोष्ट केली पाहिजे. अशक्यता अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नाही. हां, अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काही नाही. व्यक्तीने एकदा का अमुक एक गोष्ट करण्याचा दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 115-116)