Tag Archive for: ध्यान

साधना, योग आणि रूपांतरण – १०

(ध्यानामध्ये, निद्रेमध्ये किंवा जागेपणी जी सूक्ष्म पातळीवरील दृश्यं दिसतात, विविध देवदेवतादींची दर्शनं होतात ती खरी असतात की खोटी असा प्रश्न कोणी साधकाने विचारलेला दिसतो, त्यासंबंधी श्रीअरविंद येथे खुलासेवार लिहीत आहेत….)

वस्तुनिष्ठ (objective) दृश्यांइतकीच व्यक्तिनिष्ठ (Subjective) अंतर्दर्शनेदेखील खरी असू शकतात – फरक इतकाच की, वस्तुनिष्ठ दृश्य हे स्थूल, भौतिक अवकाशातील वास्तव गोष्टींबाबतचे असते, तर अंतर्दर्शने ही अन्य स्तरांवरील वास्तव गोष्टींची असतात; जे स्तर सूक्ष्म भौतिक पातळीपर्यंत उतरत आलेले असतात. अगदी प्रतीकात्मक दर्शनंसुद्धा, जर ती वास्तविकतेची (reality) प्रतीकं असतील तर ती खरी असतात. एवढेच काय तर, स्वप्नांनासुद्धा सूक्ष्म क्षेत्रामध्ये एक वास्तविकता असू शकते. जे सत्य आहे किंवा सत्य होते किंवा जे सत्य असणार आहे अशा गोष्टींचे प्रतिनिधित्व जर ही दर्शनं करत नसतील आणि ती दर्शनं म्हणजे नुसत्या काल्पनिक मनोमय रचना असतील तर मात्र ती दर्शनं अ-सत्य, मिथ्या असतात. तुम्हाला ‘कृष्णा’चे जे दर्शन झाले आहे (चंदेरी निळसर रंगातील, बासरी वाजविणारा आणि नृत्यमुद्रेमध्ये उभा असणारा ‘कृष्ण’ हे जे दर्शन झाले आहे) ते खरे असू शकते….

कधीकधी विकसनासाठी कोणतेही प्रयत्न न करतादेखील ही सूक्ष्मदृष्टी जन्मजात आणि सवयीची अशी असू शकते; काहीवेळा ती स्वतःहून जागृत होते आणि मग तिचा अनुभव पुष्कळ वेळा येतो किंवा तिच्या विकसनासाठी अगदी थोडीशी साधनादेखील पुरेशी असते. (अर्थात) अशी दृश्यं दिसणे हे अनिवार्यपणे आध्यात्मिक उपलब्धीचे लक्षण असतेच असे नाही; परंतु सहसा व्यक्ती ‘योगसाधने’च्या माध्यमातून जसजशी अंतरंगात प्रवेश करू लागते, ती अंतरंगात राहून जीवन जगू लागते तसतशी ही सूक्ष्मदृष्टीची शक्ती कमीअधिक प्रमाणात जागृत होऊ लागते. परंतु ही गोष्ट नेहमीच अगदी सहजपणे घडते असेही नाही, विशेषतः व्यक्तीला जर प्रामुख्याने बुद्धिप्रधान जीवन जगण्याची सवय असेल किंवा तिला बाह्यवर्ती प्राणिक चेतनेमध्येच जीवन जगण्याची सवय असेल तर ही गोष्ट तितकीशी सहजपणे घडत नाही.

मला वाटते, तुम्ही ‘दर्शना’चा, म्हणजे ‘देवतेने आपल्या भक्तासमोर स्वतःला प्रकट करणे’ या गोष्टीचा विचार करत आहात, परंतु ती गोष्ट निराळी असते. तिथे त्या ‘देवते’च्या अस्तित्वावरील आवरण दूर होते, मग ते अनावरण तात्पुरते असेल किंवा स्थायी स्वरूपाचे असेल, आणि मग ते दर्शन म्हणून घडेल किंवा त्या देवतेच्या सान्निध्याची अगदी आत्मीय भावना या स्वरूपात अनुभवास येईल. ही अस्तित्वाची जाणीव दृश्यापेक्षा अधिक सघन असते आणि त्या देवतेबरोबर वारंवार किंवा नित्य होणाऱ्या संवादाच्या स्वरूपात ती अनुभवास येते. व्यक्ती जेव्हा आपल्या अंतरात्म्यामध्ये खोलखोल जाऊ लागते आणि चेतनेचा विकास घडू लागतो किंवा भक्तीच्या उत्कटतेमध्ये वाढ होते तेव्हा त्या देवतेच्या अस्तित्वाची जाणीव होते. चढत्यावाढत्या आणि तल्लीन भक्तीच्या भारामुळे (pressure) जेव्हा बाह्यवर्ती चेतनेचे कवच पुरेसे मोडून पडते, तेव्हा अशा प्रकारचा संपर्क अनुभवास येतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 103-104)

साधना, योग आणि रूपांतरण – ०९

(एका साधकाला त्याच्या मिटल्या डोळ्यांसमोर जी दृश्यं दिसली त्याचे वर्णन त्याने श्रीअरविंदांना लिहून पाठविले आहे, असे दिसते. त्यावर श्री अरविंदांनी त्याला दिलेले हे उत्तर… )

तुम्ही ज्या दृश्यांचे वर्णन केले आहे ती दृश्यं साधनेच्या प्रारंभिक टप्प्यांवर दिसतात. येथे दिसणारी बहुतांशी दृश्यं म्हणजे मानसिक स्तरावरील रचना असतात आणि (त्यामुळे) प्रत्येक वेळी त्यांना नेमका अर्थ देता येतोच असे नाही. कारण ती दृश्यं साधकाच्या व्यक्तिगत मनावर अवलंबून असतात.

साधनेच्या नंतरच्या एका टप्प्यावर सूक्ष्मदृष्टीची शक्ती साधनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते; परंतु सुरुवातीला, साधकाने त्याच्या तपशीलांना अतिरिक्त महत्त्व न देता, चेतना अधिक विकसित होईपर्यंत, मार्गक्रमण करत राहिले पाहिजे. ‘दिव्य प्रकाश’, ‘दिव्य सत्य’ आणि ‘ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव’ यांच्याप्रति असलेली चेतनेची उन्मुखता ही नेहमीच ‘योगसाधने’मधील एक महत्त्वाची गोष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 100)

साधना, योग आणि रूपांतरण – ०८

व्यक्ती जेव्हा ध्यान करायचा प्रयत्न करू लागते तेव्हा सुरुवातीला येणारा पहिला अडथळा म्हणजे झोप येणे. तुम्ही हा अडथळा ओलांडून पलीकडे जाता तेव्हा अशी एक अवस्था येते की, तुमचे डोळे मिटलेले असतात पण तुम्हाला विविध गोष्टी, माणसं आणि अनेक प्रकारची दृश्यं दिसायला लागतात. ही काही वाईट गोष्ट नाही तर, ते एक चांगले लक्षण आहे. तुम्ही योगसाधनेमध्ये प्रगती करत असल्याचे ते द्योतक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

बाह्यवर्ती वस्तू पाहणाऱ्या बाह्य चर्मचक्षूंशिवाय, आपल्यामध्ये एक आंतरिक दृष्टीदेखील असते; ही आंतरिक दृष्टी आजवर न पाहिलेल्या आणि आजवर अज्ञात असलेल्या गोष्टी पाहू शकते; ती दूर अंतरावरील गोष्टी पाहू शकते; अन्य स्थळकाळातील किंवा अन्य जगतांमधील गोष्टीसुद्धा ती पाहू शकते; ही आंतरिक दृष्टी तुमच्यामध्ये आता खुली होऊ लागली आहे. श्रीमाताजींच्या शक्तिकार्यामुळे ती तुमच्यामध्ये खुली होऊ लागली आहे आणि तुम्ही तिला अटकाव करण्याचा प्रयत्न करता कामा नये. श्रीमाताजींचे नित्य स्मरण करत राहा, त्यांना आवाहन करत राहा आणि त्यांची उपस्थिती तुम्हाला जाणवावी आणि त्यांच्या शक्तीचे कार्य तुमच्यामध्ये सुरू असल्याचे तुम्हाला जाणवावे अशी आस बाळगा. परंतु त्यासाठी, इथूनपुढे श्रीमाताजींच्या शक्ति-कार्यामुळे, तुमच्यामध्ये या किंवा यांसारख्या ज्या घडामोडी घडून येतील, जे बदल घडून येतील, त्यांना नकार देण्याची आवश्यकता नाही; फक्त इच्छावासना, अहंकार, अस्वस्थता आणि इतर चुकीच्या घडामोडी या गोष्टींना मात्र नकार दिलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 99)

साधना, योग आणि रूपांतरण – ०७

‘ईश्वरा’कडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जर (‘ईश्वर शक्ती’चे) अवरोहण (descent) घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

‘कर्म’ हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ‘ईश्वरा’ऐवजी, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ‘ईश्वर’ हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

प्रेम, भक्ती, …या गोष्टी ‘ईश्वरा’कडे पोहोचण्याचे जवळचे मार्ग असतात किंवा असू शकतात. (असू शकतात असे म्हणण्याचे कारण की) प्रेम आणि भक्ती या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान, नैराश्य या गोष्टींमध्ये (सी-सॉ सारखी) दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम व भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ‘ईश्वरा’कडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, व्यक्ती स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवतीच घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)

साधना, योग आणि रूपांतरण – ०६

योग म्हणजे ‘ईश्वरा’शी ऐक्य, आणि ‘ईश्वरा’शी ऐक्य साधण्यासाठी तुम्ही जे काही करता ती म्हणजे ‘साधना’.

तुम्ही सामान्य चेतनेपासून दूर झाले पाहिजे आणि ईश्वरी ‘चेतने’च्या संपर्कात आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही नेहमी श्रीमाताजींना आवाहन करा, त्यांच्याप्रति खुले, उन्मुख व्हा; त्यांच्या ‘शक्ती’ने तुमच्यामध्ये कार्य करून, तुम्हाला सुपात्र बनवावे यासाठी त्यांच्याजवळ प्रार्थना करा, तशी आस बाळगा; इच्छा-वासना, अस्वस्थता, मन आणि प्राणाचे अडथळे यांना नकार द्या.

मन व प्राण स्वस्थ, शांत करणे आणि श्रीमाताजींची ‘शांती’, श्रीमाताजींची ‘उपस्थिती’, त्यांचा ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांसाठी अभीप्सापूर्वक एकाग्रता करणे म्हणजे ‘ध्यान’.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 135)

साधना, योग आणि रूपांतरण – ०२

‘साधना’ म्हणजे योगाचा सराव करणे, योगाभ्यास करणे.

साधनेचे परिणाम साध्य करण्यासाठीच्या आणि कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवण्यासाठीच्या संकल्पावर एकाग्रता करणे म्हणजे ‘तपस्या’.

‘ईश्वरा’ची पूजा करणे, त्याच्यावर प्रेम करणे, त्याच्याप्रति आत्मसमर्पण करणे, त्याच्याप्रति अभीप्सा बाळगणे, त्याची प्रार्थना आणि नामस्मरण करणे या सर्व गोष्टींचा समवेश ‘आराधने’मध्ये होतो.

चेतना अंतरंगात एकाग्र करणे, चिंतन-मनन करणे, समाधी अवस्थेत शिरणे म्हणजे ‘ध्यान’.

“ध्यान, तपस्या आणि आराधना’’ ही सर्व साधनेची विविध अंग आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 215)

अमृतवर्षा ०३

 

जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि मग अशा स्थितीत तुम्ही ध्यान करू शकाल – असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यात काही तथ्य नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही खरी आवश्यक गोष्ट आहे. आणि ‘डोकं रिकामं करणे’ याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वराच्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे’ याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल – त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यत: ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता बदललेली असेल.

 

जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले आहात असे तुम्हाला जाणवेल; एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, कधीच हार न मानणारी, अढळ अशी अपरिवर्तनीय शक्ती तुम्हाला जाणवेल.

 

अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. विविध शक्ती त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात… पण त्यामध्ये त्या काही अंशीच यशस्वी होतात; फक्त त्या शक्ती तुम्हाला नवीन प्रगती करण्यास भाग पाडण्यासाठी आवश्यक असते तेवढ्याच प्रमाणात यशस्वी होतात.

 

जीवनाकडून तुमच्यावर जेव्हा कधी आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केली पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही मान वर करून आनंदाने म्हणता, ”मी काय शिकले पाहिजे? ते मला जाणून घ्यायचे आहे. मी माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला जाणून घ्यायचे आहे.” तर, तुम्ही असे केले पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 121-122]

विचारशलाका ०८

‘ईश्वरी प्रभावा’प्रत स्वत:ला खुले करणे, उन्मुख करणे हे ‘पूर्णयोगा’चे समग्रतत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या उर्ध्वस्थित असतो आणि तुम्ही जर त्याबाबत सचेत झालात तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही त्यास आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या रूपाने, ‘प्रकाशा’च्या रूपाने, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरतो; ‘आनंद’रूपाने अवतरतो; तो साकार किंवा निराकार रूपातील ‘ईश्वरी उपस्थिती’ म्हणून अवतरतो.

व्यक्तीला जोपर्यंत ही चेतना लाभत नाही तोपर्यंत तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाचीच विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते – जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतीशील तयारी चालू होते. परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 106]

विचारशलाका – ०३

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’चे नाम, प्रतिमा किंवा संकल्पना, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी आणि त्यांनी मन, प्राण आणि कृती यांचे नियंत्रण करावे यासाठी आस बाळगणे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 225]

आध्यात्मिकता ३६

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य-चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे. सत्य-चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे केवळ एक साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

*

(बडोदा येथील वास्तव्यामध्ये महाराष्ट्रातील योगी विष्णु भास्कर लेले यांनी श्री. अरविंद घोष यांना मन कसे निःस्तब्ध करावे यासंबंधी मार्गदर्शन केले होते. आणि तीन दिवसांच्या साधनेने श्री. अरविंद घोष ‘शांत-ब्रह्मा’च्या साक्षात्काराप्रत जाऊन पोहोचले होते. पुढे त्याच अवस्थेमध्ये ते लेले यांच्यासमवेत (इ. स. १९०८ मध्ये) मुंबई येथे राजकीय दौऱ्यावर गेले होते. लेले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उपस्थित जनसमुदायाला ईश्वर समजून अभिवादन केले आणि भाषणास सुरूवात केली होती. या सर्व अनुभवमालिकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या, आपल्या साधनेबाबत श्रीअरविंद १९३८ साली सांगत आहेत…)

कलकत्त्याला जाण्यासाठी मी मुंबईहून निघालो होतो, तेव्हा मी लेले यांना विचारले की, “मी माझ्या साधनेबाबत काय केले पाहिजे?”

ते काही काळ शांत राहिले, कदाचित त्यांच्या अंतरंगातून येणाऱ्या आवाजाची ते प्रतीक्षा करत असावेत. आणि मग त्यांनी उत्तर दिले, “दिवसातील एका ठरावीक वेळी ध्यान करत जा आणि अंतःकरणातून येणारा आतला आवाज ऐकत जा.”

मला अंतःकरणातून कोणताही आवाज ऐकू आला नाही पण मस्तकाच्या वरच्या बाजूने एक काहीसा निराळा असा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर मी एका ठरावीक वेळी ध्यान करणे सोडून दिले – कारण माझे ध्यान सदासर्वकाळ चालू असे.

(Talks with Sri Aurobindo – Vol 01 by Nirodbaran : 03)