Tag Archive for: ध्यान

साधना, योग आणि रूपांतरण – ०९

(एका साधकाला त्याच्या मिटल्या डोळ्यांसमोर जी दृश्यं दिसली त्याचे वर्णन त्याने श्रीअरविंदांना लिहून पाठविले आहे, असे दिसते. त्यावर श्री अरविंदांनी त्याला दिलेले हे उत्तर… )

तुम्ही ज्या दृश्यांचे वर्णन केले आहे ती दृश्यं साधनेच्या प्रारंभिक टप्प्यांवर दिसतात. येथे दिसणारी बहुतांशी दृश्यं म्हणजे मानसिक स्तरावरील रचना असतात आणि (त्यामुळे) प्रत्येक वेळी त्यांना नेमका अर्थ देता येतोच असे नाही. कारण ती दृश्यं साधकाच्या व्यक्तिगत मनावर अवलंबून असतात.

साधनेच्या नंतरच्या एका टप्प्यावर सूक्ष्मदृष्टीची शक्ती साधनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते; परंतु सुरुवातीला, साधकाने त्याच्या तपशीलांना अतिरिक्त महत्त्व न देता, चेतना अधिक विकसित होईपर्यंत, मार्गक्रमण करत राहिले पाहिजे. ‘दिव्य प्रकाश’, ‘दिव्य सत्य’ आणि ‘ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव’ यांच्याप्रति असलेली चेतनेची उन्मुखता ही नेहमीच ‘योगसाधने’मधील एक महत्त्वाची गोष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 100)

साधना, योग आणि रूपांतरण – ०८

व्यक्ती जेव्हा ध्यान करायचा प्रयत्न करू लागते तेव्हा सुरुवातीला येणारा पहिला अडथळा म्हणजे झोप येणे. तुम्ही हा अडथळा ओलांडून पलीकडे जाता तेव्हा अशी एक अवस्था येते की, तुमचे डोळे मिटलेले असतात पण तुम्हाला विविध गोष्टी, माणसं आणि अनेक प्रकारची दृश्यं दिसायला लागतात. ही काही वाईट गोष्ट नाही तर, ते एक चांगले लक्षण आहे. तुम्ही योगसाधनेमध्ये प्रगती करत असल्याचे ते द्योतक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

बाह्यवर्ती वस्तू पाहणाऱ्या बाह्य चर्मचक्षूंशिवाय, आपल्यामध्ये एक आंतरिक दृष्टीदेखील असते; ही आंतरिक दृष्टी आजवर न पाहिलेल्या आणि आजवर अज्ञात असलेल्या गोष्टी पाहू शकते; ती दूर अंतरावरील गोष्टी पाहू शकते; अन्य स्थळकाळातील किंवा अन्य जगतांमधील गोष्टीसुद्धा ती पाहू शकते; ही आंतरिक दृष्टी तुमच्यामध्ये आता खुली होऊ लागली आहे. श्रीमाताजींच्या शक्तिकार्यामुळे ती तुमच्यामध्ये खुली होऊ लागली आहे आणि तुम्ही तिला अटकाव करण्याचा प्रयत्न करता कामा नये. श्रीमाताजींचे नित्य स्मरण करत राहा, त्यांना आवाहन करत राहा आणि त्यांची उपस्थिती तुम्हाला जाणवावी आणि त्यांच्या शक्तीचे कार्य तुमच्यामध्ये सुरू असल्याचे तुम्हाला जाणवावे अशी आस बाळगा. परंतु त्यासाठी, इथूनपुढे श्रीमाताजींच्या शक्ति-कार्यामुळे, तुमच्यामध्ये या किंवा यांसारख्या ज्या घडामोडी घडून येतील, जे बदल घडून येतील, त्यांना नकार देण्याची आवश्यकता नाही; फक्त इच्छावासना, अहंकार, अस्वस्थता आणि इतर चुकीच्या घडामोडी या गोष्टींना मात्र नकार दिलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 99)

साधना, योग आणि रूपांतरण – ०७

‘ईश्वरा’कडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जर (‘ईश्वर शक्ती’चे) अवरोहण (descent) घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

‘कर्म’ हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ‘ईश्वरा’ऐवजी, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ‘ईश्वर’ हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

प्रेम, भक्ती, …या गोष्टी ‘ईश्वरा’कडे पोहोचण्याचे जवळचे मार्ग असतात किंवा असू शकतात. (असू शकतात असे म्हणण्याचे कारण की) प्रेम आणि भक्ती या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान, नैराश्य या गोष्टींमध्ये (सी-सॉ सारखी) दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम व भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ‘ईश्वरा’कडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, व्यक्ती स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवतीच घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)

साधना, योग आणि रूपांतरण – ०६

योग म्हणजे ‘ईश्वरा’शी ऐक्य, आणि ‘ईश्वरा’शी ऐक्य साधण्यासाठी तुम्ही जे काही करता ती म्हणजे ‘साधना’.

तुम्ही सामान्य चेतनेपासून दूर झाले पाहिजे आणि ईश्वरी ‘चेतने’च्या संपर्कात आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही नेहमी श्रीमाताजींना आवाहन करा, त्यांच्याप्रति खुले, उन्मुख व्हा; त्यांच्या ‘शक्ती’ने तुमच्यामध्ये कार्य करून, तुम्हाला सुपात्र बनवावे यासाठी त्यांच्याजवळ प्रार्थना करा, तशी आस बाळगा; इच्छा-वासना, अस्वस्थता, मन आणि प्राणाचे अडथळे यांना नकार द्या.

मन व प्राण स्वस्थ, शांत करणे आणि श्रीमाताजींची ‘शांती’, श्रीमाताजींची ‘उपस्थिती’, त्यांचा ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांसाठी अभीप्सापूर्वक एकाग्रता करणे म्हणजे ‘ध्यान’.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 135)

साधना, योग आणि रूपांतरण – ०२

‘साधना’ म्हणजे योगाचा सराव करणे, योगाभ्यास करणे.

साधनेचे परिणाम साध्य करण्यासाठीच्या आणि कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवण्यासाठीच्या संकल्पावर एकाग्रता करणे म्हणजे ‘तपस्या’.

‘ईश्वरा’ची पूजा करणे, त्याच्यावर प्रेम करणे, त्याच्याप्रति आत्मसमर्पण करणे, त्याच्याप्रति अभीप्सा बाळगणे, त्याची प्रार्थना आणि नामस्मरण करणे या सर्व गोष्टींचा समवेश ‘आराधने’मध्ये होतो.

चेतना अंतरंगात एकाग्र करणे, चिंतन-मनन करणे, समाधी अवस्थेत शिरणे म्हणजे ‘ध्यान’.

“ध्यान, तपस्या आणि आराधना’’ ही सर्व साधनेची विविध अंग आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 215)

अमृतवर्षा ०३

 

जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि मग अशा स्थितीत तुम्ही ध्यान करू शकाल – असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यात काही तथ्य नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही खरी आवश्यक गोष्ट आहे. आणि ‘डोकं रिकामं करणे’ याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वराच्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे’ याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल – त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यत: ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता बदललेली असेल.

 

जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले आहात असे तुम्हाला जाणवेल; एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, कधीच हार न मानणारी, अढळ अशी अपरिवर्तनीय शक्ती तुम्हाला जाणवेल.

 

अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. विविध शक्ती त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात… पण त्यामध्ये त्या काही अंशीच यशस्वी होतात; फक्त त्या शक्ती तुम्हाला नवीन प्रगती करण्यास भाग पाडण्यासाठी आवश्यक असते तेवढ्याच प्रमाणात यशस्वी होतात.

 

जीवनाकडून तुमच्यावर जेव्हा कधी आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केली पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही मान वर करून आनंदाने म्हणता, ”मी काय शिकले पाहिजे? ते मला जाणून घ्यायचे आहे. मी माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला जाणून घ्यायचे आहे.” तर, तुम्ही असे केले पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 121-122]

विचारशलाका ०८

‘ईश्वरी प्रभावा’प्रत स्वत:ला खुले करणे, उन्मुख करणे हे ‘पूर्णयोगा’चे समग्रतत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या उर्ध्वस्थित असतो आणि तुम्ही जर त्याबाबत सचेत झालात तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही त्यास आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या रूपाने, ‘प्रकाशा’च्या रूपाने, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरतो; ‘आनंद’रूपाने अवतरतो; तो साकार किंवा निराकार रूपातील ‘ईश्वरी उपस्थिती’ म्हणून अवतरतो.

व्यक्तीला जोपर्यंत ही चेतना लाभत नाही तोपर्यंत तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाचीच विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते – जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतीशील तयारी चालू होते. परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 106]

विचारशलाका – ०३

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’चे नाम, प्रतिमा किंवा संकल्पना, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी आणि त्यांनी मन, प्राण आणि कृती यांचे नियंत्रण करावे यासाठी आस बाळगणे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 225]

आध्यात्मिकता ३६

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य-चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे. सत्य-चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे केवळ एक साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

*

(बडोदा येथील वास्तव्यामध्ये महाराष्ट्रातील योगी विष्णु भास्कर लेले यांनी श्री. अरविंद घोष यांना मन कसे निःस्तब्ध करावे यासंबंधी मार्गदर्शन केले होते. आणि तीन दिवसांच्या साधनेने श्री. अरविंद घोष ‘शांत-ब्रह्मा’च्या साक्षात्काराप्रत जाऊन पोहोचले होते. पुढे त्याच अवस्थेमध्ये ते लेले यांच्यासमवेत (इ. स. १९०८ मध्ये) मुंबई येथे राजकीय दौऱ्यावर गेले होते. लेले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उपस्थित जनसमुदायाला ईश्वर समजून अभिवादन केले आणि भाषणास सुरूवात केली होती. या सर्व अनुभवमालिकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या, आपल्या साधनेबाबत श्रीअरविंद १९३८ साली सांगत आहेत…)

कलकत्त्याला जाण्यासाठी मी मुंबईहून निघालो होतो, तेव्हा मी लेले यांना विचारले की, “मी माझ्या साधनेबाबत काय केले पाहिजे?”

ते काही काळ शांत राहिले, कदाचित त्यांच्या अंतरंगातून येणाऱ्या आवाजाची ते प्रतीक्षा करत असावेत. आणि मग त्यांनी उत्तर दिले, “दिवसातील एका ठरावीक वेळी ध्यान करत जा आणि अंतःकरणातून येणारा आतला आवाज ऐकत जा.”

मला अंतःकरणातून कोणताही आवाज ऐकू आला नाही पण मस्तकाच्या वरच्या बाजूने एक काहीसा निराळा असा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर मी एका ठरावीक वेळी ध्यान करणे सोडून दिले – कारण माझे ध्यान सदासर्वकाळ चालू असे.

(Talks with Sri Aurobindo – Vol 01 by Nirodbaran : 03)

आध्यात्मिकता ३५

एक अशा प्रकारचे ध्यान असते, ज्या ध्यानामध्ये व्यक्ती कोणत्याही विचारांना थांबविण्याचा प्रयत्न करत नाही, पण शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करते. कारण जे विचार निव्वळ यांत्रिक स्वरूपाचे असतात, ते तुम्ही थांबविण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला अनेक वर्षे लागतील, आणि तरीसुद्धा तुम्हाला परिणामाची खात्री देता येणार नाही. म्हणून विचार थांबविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, (अशा प्रकारच्या ध्यानामध्ये) तुम्ही तुमची सर्व चेतना एकवटून, शक्य तितके शांत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बाह्य गोष्टींमध्ये आता स्वारस्य उरलेले नसल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त करा, आणि मग अचानक, तुमच्या अभीप्सेची ज्योत प्रज्वलित होईल. तुमच्यापाशी जे जे काही येते ते ते सारे तुम्ही या अभीप्सारूपी अग्नीमध्ये हवन करा, ज्यामुळे ती ज्वाला अधिकाधिक उच्च, उच्चतर होत जाईल. तुम्ही त्या अभीप्सारूपी ज्वालेशी एकात्म व्हा आणि उर्ध्वगामी होत, तुम्ही तुमच्या चेतनेच्या आणि अभीप्सेच्या सर्वोच्च बिंदुपाशी जाऊन पोहोचा. अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. ही अभीप्सा वर वर उसळत राहते, ऊर्ध्वगामी होत राहते, ती किंचितदेखील परिणामाचा विचार करत नाही, परिणाम काय होईल किंवा विशेषतः काय होणार नाही याचा क्षणमात्रदेखील ती विचार करत नाही, एवढेच नव्हे तर, वरून काही अवतरित व्हावे अशी इच्छादेखील ती बाळगत नाही तर इथे केवळ, ऊर्ध्वगामी होत राहणाऱ्या अभीप्सेचा आनंद तेवढा असतो. सातत्याने केलेल्या एकाग्रतेमुळे ती अभीप्सा अधिकाधिक उत्कट होत राहते. आणि अशा वेळी मी तुम्हाला खात्री देऊ शकते की जे काही घडेल ते, सर्वोत्तम शक्य असेल तेच घडेल. म्हणजे असे की, तुम्ही जेव्हा हे सारे करता तेव्हा, तुमच्या क्षमता साकार होण्याची ती परम सीमा असते. या क्षमता प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असू शकतात.

पण तुम्ही असे केलेत तर, शांत राहण्याचा प्रयत्न, दृश्य रूपांच्या मागे जाण्याचा प्रयास, प्रतिसाद देणाऱ्या शक्तीला आवाहन, तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळावे म्हणून खोळंबून राहणे, या साऱ्या गोष्टींबाबतच्या चिंता, अ-वास्तव असणाऱ्या एखाद्या वाफेप्रमाणे नाहीशा होऊन जातात. तुम्ही या अभीप्सारूपी ज्वालेमध्ये, या ऊर्ध्वगामी झालेल्या अभीप्सेच्या स्तंभामध्ये, जाणीवपूर्वक जीवन जगण्यात जर यशस्वी झालात तर याचा परिणाम अगदी त्वरित जरी आढळून आला नाही तरी, कालांतराने काहीतरी नक्कीच घडून येणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी [CWM 04 : 104-105]