Tag Archive for: ध्यान

साधना, योग आणि रूपांतरण – ३८

साधक : ध्यानाची उद्दिष्टे काय असली पाहिजेत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?

श्रीअरविंद : जी संकल्पना तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असेल ती! परंतु जर तुम्ही मला नेमके उत्तर विचारत असाल, तर मी सांगेन की, ध्यानासाठी किंवा निदिध्यासनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे सर्वांतर्यामी ‘ईश्वर’ आहे व ‘ईश्वरा’मध्ये सर्व आहेत आणि सर्व काही ‘ईश्वर’च आहे या संकल्पनेवर मन स्थिर केले पाहिजे. मग तो ईश्वर ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे किंवा तो व्यक्तिनिष्ठ असा ‘आत्मा’ आहे, या गोष्टीने मूलतः काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो किंवा पारलौकिक सत्य असो किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 294-295)

साधना, योग आणि रूपांतरण – २८

सर्वसाधारणपणे (व्यक्तीमधील) चेतना ही सर्वत्र पसरलेली, विखुरलेली असते. ती या किंवा त्या दिशेने, या किंवा त्या वस्तुंच्या वा विषयांच्या मागे बारा वाटांनी धावत असते. जेव्हा एखादी शाश्वत स्वरूपाची गोष्ट करायची असते तेव्हा व्यक्ती प्रथम कोणती गोष्ट करत असेल तर ती म्हणजे – ही सर्वत्र विखुरलेली चेतना अंतरंगामध्ये ओढून घेते आणि एकाग्रता करते. त्यानंतर मग, जर व्यक्ती अधिक बारकाईने निरीक्षण करू लागली तर तिला असे आढळते की तिचे लक्ष एका जागी आणि कोणत्या तरी एका मनोव्यापारावर, एका विषयावर किंवा एखाद्या वस्तुवर केंद्रित झाले आहे – तुम्ही काव्यरचना करत असता किंवा एखादा वनस्पतीशास्त्रज्ञ फुलाचा अभ्यास करत असतो तसेच असते हे. जर तो विचार असेल तर व्यक्तीचे लक्ष तिच्या मेंदूमध्ये कोठेतरी एखाद्या जागी केंद्रित झालेले असते. आणि जर ती भावना असेल तर व्यक्तीचे लक्ष हृदयामध्ये केंद्रित झालेले असते.

योगमार्गातील एकाग्रता (concentration) म्हणजे याच गोष्टीचे विस्तारित आणि घनीभूत रूप असते. त्राटक करताना, व्यक्ती एखाद्या तेजस्वी बिंदुवर लक्ष केंद्रित करते त्याप्रमाणे एखाद्या वस्तुवर एकाग्रता केली जाऊ शकते. तेव्हा व्यक्तीला त्या बिंदुवर, त्या वस्तुवर अशा रीतीने लक्ष केंद्रित करावे लागते की व्यक्तीला फक्त तो बिंदूच दिसतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार तिच्या मनात नसतो. व्यक्ती एखाद्या संकल्पनेवर, एखाद्या शब्दावर किंवा एखाद्या नामावर, (म्हणजे उदाहरणार्थ) ईश्वराच्या संकल्पनेवर, ॐ या शब्दावर किंवा कृष्णाच्या नामावर किंवा संकल्पना व शब्द किंवा संकल्पना व नाम यांच्यावर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करू शकते. परंतु पुढे व्यक्ती योगामध्ये (भ्रूमध्यासारख्या) एका विशिष्ट स्थानीसुद्धा लक्ष केंद्रित करू शकते.

भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची एक प्रसिद्ध पद्धत आहे. भ्रूमध्य हे आंतरिक मनाचे, गूढ दृष्टीचे आणि संकल्पाचे केंद्र असते. तेथून तुम्ही तुमच्या एकाग्रतेचा जो विषय असतो त्याचा दृढपणे विचार केला पाहिजे किंवा त्या केंद्राच्या ठिकाणी त्या एकाग्रतेचा विषयाची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर असे करण्यात यशस्वी झालात तर, काही काळानंतर, तुमची समग्र चेतना त्या स्थानी (अर्थात काही काळासाठी) एकवटली असल्याचे तुम्हाला जाणवेल. काही काळ आणि पुन्हापुन्हा तसे करत राहिल्याने ही प्रक्रिया सहज सुलभ बनते.

पूर्णयोगामध्ये आपण तेच करतो पण त्यामध्ये भ्रूमध्यामधल्या एका विशिष्ट बिंदुवरच लक्ष एकाग्र करावे लागते असे नाही, तर मस्तकामध्ये कोठेही तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता किंवा शरीर-विज्ञान शास्त्रज्ञांनी जेथे हृदयकेंद्राचे स्थान निश्चित केले आहे तेथे म्हणजे छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र केले जाते.

एखाद्या वस्तुवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही एखादा संकल्प करून मस्तकामध्ये लक्ष एकाग्र करू शकता; वरून तुमच्यामध्ये शांती अवतरित व्हावी म्हणून तिला आवाहन करू शकता किंवा काहीजण करतात त्याप्रमाणे, अदृष्ट (unseen) झाकण उघडावे (अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांच्यामध्ये असणारे झाकण, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी असते.) आणि तेथून त्याच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आरोहण करता यावे यासाठी तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता. हृदयकेंद्रामध्ये तुम्ही (‘ईश्वरी शक्ती’प्रत) खुले होण्यासाठी एक अभीप्सा बाळगून, किंवा तेथे ‘ईश्वरा’ची चैतन्यमय प्रतिमा दिसावी किंवा ‘ईश्वरी’ उपस्थितीची जाणीव व्हावी यासाठी किंवा अन्य कोणत्या एखाद्या उद्दिष्टासाठी लक्ष एकाग्र करू शकता. तेथे तुम्ही नामजप करू शकता, पण तसे असेल तर, तेथे तुम्ही त्या नामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हृदयकेंद्रामध्ये ते नाम आपोआप चालू राहिले पाहिजे.

तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, जेव्हा असे एखाद्या विशिष्ट स्थानी लक्ष एकाग्र झालेले असते तेव्हा उर्वरित चेतनेचे काय होते? अशा वेळी, एकतर ती चेतना, इतर एकाग्रतेच्या वेळी जशी शांत होते तशी, ती शांत होऊन जाते किंवा तसे झाले नाही तर, विचार किंवा अन्य गोष्टी जणूकाही (तुमच्या) बाहेर असाव्यात त्याप्रमाणे इतस्ततः हालचाल करत राहतात पण एकाग्र झालेला भाग त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याने विचलितही होत नाही. अशावेळी एकाग्रता बऱ्यापैकी यशस्वी झालेली असते.

परंतु तुम्हाला जर अशा प्रकारे एकाग्रतेची, ध्यानाची सवय नसेल तर तुम्ही दीर्घ काळ ध्यान करून स्वतःला शिणवता कामा नये कारण शिणलेल्या मनाने ध्यान केले तर ध्यानाचे सर्व मोल वा त्याची शक्ती हरवून जाते. अशा वेळी तुम्ही एकाग्रतेच्या (concentration) ऐवजी, ‘विश्रांत’ अवस्थेमध्ये ध्यान (meditation) करू शकता. तुमची एकाग्रता जेव्हा सहजस्वाभाविक होते तेव्हाच तुम्ही अधिकाधिक दीर्घ वेळ ध्यान करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 308-309)

साधना, योग आणि रूपांतरण – २७

साधक : मानसिक उपासनेचे प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी कोणती साधना करायची?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट असते. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय (surface) असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुह्य (hidden) चेतना असते आणि तिच्यामध्ये आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते; आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे रूपांतर घडवून आणता येऊ शकते. पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते.

खऱ्या चेतनेची या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त आणखी दोन मुख्य केंद्रं असतात. एक केंद्र हृदयामध्ये असते. (शारीरिक हृदयामध्ये नव्हे तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला अंतरात्म्याचे किंवा व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे चैत्य पुरुषाचे (Psychic being) ज्ञान होते. अनावरण (unveiled) झालेला हा चैत्य पुरुष मग अग्रभागी येण्यास सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, प्रकृतीला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’ च्या दिशेने, ‘ईश्वरा’ च्या दिशेने वळवू लागतो, आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला आवाहन करतो. त्याला त्या ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची जाणीव होते, त्या ‘सर्वोच्चा’प्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, ऊर्ध्वस्थित राहून आपली वाट पाहात असते, तिचे आपल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी तो तिला आर्जव करतो.

‘ईश्वरा’प्रति स्वतःला समर्पित करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि आंतरिक उन्मुखतेची व हृदयातील ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. आणि एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने शांत अशा मानसिक चेतनेस ऊर्ध्वाभिमुख करत मनाच्या वर असणाऱ्या सर्व गोष्टींप्रत खुले केले पाहिजे.

कालांतराने (आपली) चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः ती चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना ‘विश्वात्म्या’च्या, ‘दिव्य शांती’च्या, ‘दिव्य प्रकाशा’च्या ‘दिव्य शक्ती’च्या, ‘दिव्य ज्ञाना’च्या, ‘परमानंदा’ च्या संपर्कात येऊ लागते आणि त्यामध्ये प्रवेश करू लागते आणि त्यांच्यासारखीच होऊन जाते. आणि तिला प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास येऊ लागते.

अचंचलतेसाठी आणि ऊर्ध्वस्थित ‘आत्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या साक्षात्कारासाठी मनामध्ये अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये चेतनेची एकाग्रता करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये जीवन जगण्यासाठी तेथे चढून जाण्याऐवजी ती फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’ चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; तर काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते. पण हृदयकेंद्रापासून सुरुवात करणे अधिक इष्ट असते. अर्थात, जर व्यक्तीला तसे करणे शक्य असेल तर!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 06-07)

साधना, योग आणि रूपांतरण – २६

(श्रीअरविंद येथे ध्यानाचे पारंपरिक मार्ग सांगत आहेत.)

तुम्ही विचारांना नकार देऊन विचार करणे थांबवू शकता आणि शांत अवस्थेमध्ये तुम्ही स्वत:चा शोध घेऊ शकता.

तीच गोष्ट तुम्ही – विचारांचे प्रवाहित होणे तसेच चालू ठेवून, त्यापासून स्वतःला अलिप्त करून – साध्य करू शकता. त्यासाठी आणखीही अनेक मार्ग आहेत.

‘क्ष’च्या पुस्तकामध्ये नमूद केलेली ही पद्धत मला अद्वैत-ज्ञानी मार्गाची पद्धत वाटते. यामध्ये व्यक्ती “मी म्हणजे हे शरीर नाही, मी म्हणजे प्राण नाही, मी म्हणजे मन नाही,” असे म्हणत शरीर, प्राण, मन यांच्यापासून विवेकाच्या साहाय्याने स्वतःला वेगळे करून पाहते. मन, प्राण आणि शरीर यांच्यापासून स्वतंत्र असणाऱ्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत व्यक्ती हे असे करत राहते. हा देखील ध्यानाचा एक मार्ग आहे.

प्रकृतीपासून पुरुषाला स्वतंत्र करणे हा देखील आणखी एक मार्ग आहे. यामध्ये व्यक्ती सर्व गतिविधींकडे साक्षीभावाने पाहते आणि ‘साक्षी चेतना’ या भूमिकेतून आपण त्या सर्व गतिविधींपासून स्वतंत्र असल्याचे जोपर्यंत तिला जाणवत नाही तोपर्यंत ती व्यक्ती प्रकृतीपासून पुरुषास स्वतंत्र करत राहण्याची प्रक्रिया करत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 302)

साधना, योग आणि रूपांतरण – २५

साधक : माताजी, जेव्हा तुम्ही आम्हाला एखाद्या विषयावर ध्यान करायला सांगता तेव्हा, आम्ही अनेक तरतऱ्हेच्या गोष्टींच्या कल्पना करायला लागतो. उदाहरणार्थ, आम्ही प्रकाशाप्रत खुले होत आहोत, एखादे प्रवेशद्वार खुले होत आहे, इत्यादी. पण या सर्व गोष्टी नेहमीच एक मानसिक रूप धारण करतात.

श्रीमाताजी : ते व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येकाची ध्यानाची स्वतःची अशी विशिष्ट प्रक्रिया असते. ती प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. काही जणांना या प्रतिमा (images) साहाय्यक ठरतात. तर इतर काही जणांचे मन हे अधिक अमूर्त (abstract) असते आणि त्यांना केवळ संकल्पना दिसतात; तर ज्या व्यक्ती भावभावना, संवेदना यांच्यामध्ये अधिककरून जीवन व्यतीत करत असतात, त्यांच्याबाबतीत मानसिक आंदोलने, आंतरिक भावभावना, किंवा संवेदना यांच्या गतिविधी आढळून येतात. हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.

ज्यांच्यापाशी रचनात्मक मानसिक शक्ती, सक्रिय शारीर-मन असते त्यांना अशा प्रतिमा दिसतात. परंतु प्रत्येकाला तसा अनुभव येतोच असे नाही. (ज्या व्यक्तीला अशा प्रतिमा दिसतात) ती व्यक्ती स्वतःच्या मानसिक चेतनेबाबत सक्रिय आहे याचे ते द्योतक असते.

साधक : पण हे बरोबर आहे का?

श्रीमाताजी : ज्यातून परिणाम साध्य होतो अशी कोणतीही गोष्ट बरोबरच असते. कोणतेही माध्यम हे चांगलेच असते. ते बरोबर नाही, असे तुम्हाला का वाटते?

अशा प्रतिमा या हास्यास्पदच असतात, असे काही नाही. त्या हास्यास्पद नसतात, तर त्या मानसिक प्रतिमा असतात. त्यातून जर काही परिणाम साध्य होत असेल तर त्या नक्कीच योग्य असतात. त्यातून तुम्हाला जर काही अनुभूती प्राप्त होत असेल तर त्या योग्य असतात.

उदाहरणार्थ, मी जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर जायला सांगते तेव्हा तुमच्यापैकी काही जण एक प्रकारच्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करत असतील, पण इतर काही जणांना मात्र आपण एका खोल विहिरीमध्ये आत उतरत आहोत अशी भावना होऊ शकते. आणि त्यांना खरोखर अगदी स्पष्टपणे, एका काळोख्या, खोल विहिरीमध्ये आत उतरत जाणाऱ्या पायऱ्यांची प्रतिमा दिसते आणि ते त्या पायऱ्यांवरून खाली खाली, खोल खोल उतरत जातात आणि काही वेळाने ते एका विशिष्ट प्रवेशद्वारापाशी जाऊन पोहोचतात. दरवाजा उघडून आत जाण्याचा संकल्प करून त्याच्यासमोर ते बसून राहतात आणि कधीकधी मग तो दरवाजा उघडतो आणि ते आत प्रवेश करतात आणि आतमध्ये त्यांना एक प्रकारचे दालन किंवा एखादी खोली किंवा एखादी गुहा अशा प्रकारचे काहीतरी दिसते आणि त्यामधूनही जर जे पुढे पुढे जाऊ लागले तर ते पुन्हा आणखी एका प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतात आणि पुन्हा तेथे थांबतात आणि काहीशा प्रयत्नांनी पुन्हा तोही दरवाजा उघडतो आणि ते आणखी पुढे जातात.

आणि हे जर पुरेशा चिकाटीने ते करत राहिले आणि व्यक्तीने हा अनुभव सुरूच ठेवला, तर एक वेळ अशी येते जेव्हा त्या व्यक्तीला असे आढळते की ती आता पुन्हा एका प्रवेशद्वारासमोर आहे… त्या दरवाज्याला एक प्रकारची घनता असते आणि भारदस्तपणा असतो आणि एकाग्रतेच्या महाप्रयासानंतर तो दरवाजा उघडतो आणि अचानकपणे त्या व्यक्तीचा निर्मळतेच्या आणि प्रकाशाच्या दालनात प्रवेश होतो. आणि मग, त्या व्यक्तीला तिच्या आत्म्याशी संपर्क झाल्याची अनुभूती येते.

– श्रीमाताजी (CWM 09 : 378-379)

साधना, योग आणि रूपांतरण – २४

साधक : मी प्रार्थना आणि ध्यान करायला अगदी तळमळीने सुरुवात करतो; सुरुवातीला माझी आस उत्कट असते; माझी प्रार्थना भावपूर्ण असते आणि नंतर, काही काळानंतर मात्र ती आस यांत्रिक बनते आणि प्रार्थना नुसती शाब्दिक होते; अशा वेळी मी काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : हे काही तुमच्याच बाबतीत घडते असे नाही; हे अगदी स्वाभाविक आहे. मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे, पण आता ओघात आलेच आहे तर, परत एकदा सांगते, जे लोक असा दावा करतात की, ते दररोज काही तास ध्यान करतात आणि त्यांचा सर्व दिवस ते प्रार्थनेमध्ये व्यतीत करतात, माझ्या मते, त्यांचा त्यातील तीन-चतुर्थांश वेळ हा पूर्णत: यांत्रिकपणे जात असणार म्हणजे त्यावेळी त्यामधील सर्व मन:पूर्वकता गमावलेली असते…

…एकाग्रता आणि ध्यान करण्यासाठी, ज्याला मी एकाग्रतेसाठी ‘मानसिक स्नायुंची घडण’ असे म्हणते तो व्यायाम तुम्ही केला पाहिजे. ज्याप्रमाणे व्यक्ती वजन उचलण्यासाठी स्नायुंचे व्यायाम करते तसेच प्रयत्न तुम्ही एकाग्रतेसाठी केले पाहिजेत. एकाग्रता अगदी मन:पूर्वक व्हावी, ती कृत्रिम असू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही त्यासाठी खरोखरीचा प्रयत्न केला पाहिजे.

…हे उघडच आहे की, ज्याला एकाग्रता करण्याची अजिबात सवय नाही, त्याच्यापेक्षा ज्या व्यक्तीला त्याची सवय आहे ती व्यक्ती जास्त काळ एकाग्रता साधू शकेल.

…ध्यानाच्या कालावधीला तितकेसे काही महत्त्व नाही; त्याच्या कालावधीवरून तुम्ही ध्यानाला किती रुळलेला आहात एवढेच काय ते लक्षात येते. अर्थातच, हा कालावधी खूप वाढवता देखील येऊ शकतो पण त्यालाही काही मर्यादा असते आणि व्यक्ती जेव्हा त्या मर्यादेपर्यंत जाऊन पोहोचते तेव्हा तिने थांबले पाहिजे, इतकेच. ती अप्रामाणिकता नसते तर, ती अक्षमता असते.

…(मात्र जेव्हा) तुम्ही ध्यान करत नसता पण ध्यान करत आहात असे भासवता तेव्हा, ती अप्रामाणिकता ठरते. तेव्हा मग ते ध्यान असत नाही, तर तो केवळ एक उपचार असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 227-228)

साधना, योग आणि रूपांतरण – २३ (उत्तरार्ध)

(श्रीमाताजी ध्यानाचे काही प्रकार येथे सांगत आहेत. काल त्यातील अंशभाग आपण पाहिला.)

काही जण त्यांच्या डोक्यातील सर्व मानसिक आंदोलने, कल्पना, प्रतिक्षिप्त क्रिया, प्रतिक्रिया हटविण्यासाठी व एका खरोखर शांत प्रशांत स्थितीप्रत पोहोचण्यासाठी धडपडत असतात. हे अतिशय कठीण असते. अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांनी पंचवीस-पंचवीस वर्षे प्रयत्न केले होते पण त्यांना यश आले नाही, कारण असे करू पाहणे म्हणजे बैलाची शिंगे पकडून त्याच्या आधारे बैलाला पकडण्यासारखे आहे.

आणखी एक अशा प्रकारचे ध्यान असते, ज्या ध्यानामध्ये व्यक्ती कोणत्याही विचारांना थांबविण्याचा प्रयत्न करत नाही, पण शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करते. कारण जे विचार निव्वळ यांत्रिक स्वरूपाचे असतात, ते तुम्ही थांबविण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला अनेक वर्षे लागतील, आणि तरीसुद्धा तुम्हाला परिणामाची खात्री देता येणार नाही. म्हणून विचार थांबविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, (अशा प्रकारच्या ध्यानामध्ये) तुम्ही तुमची सर्व चेतना एकवटून, शक्य तितके शांत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बाह्य गोष्टींमध्ये आता स्वारस्य उरलेले नसल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त करा, आणि मग अचानक, तुमच्यामध्ये अभीप्सेची ज्योत प्रज्वलित होईल. (ध्यानामध्ये) तुमच्यापाशी जे जे काही येते ते ते सारे तुम्ही या अभीप्सारूपी अग्नीमध्ये हवन करा, ज्यामुळे ती ज्वाला अधिकाधिक उच्च, उच्चतर होत जाईल. तुम्ही त्या अभीप्सारूपी ज्वालेशी एकात्म व्हा आणि उर्ध्वगामी होत, तुम्ही तुमच्या चेतनेच्या आणि अभीप्सेच्या सर्वोच्च बिंदुपाशी जाऊन पोहोचा. अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. ही अभीप्सा वर वर उसळत राहते, ऊर्ध्वगामी होत राहते, ती परिणामाचा किंचितही विचार करत नाही, परिणाम काय होईल किंवा विशेषतः काय होणार नाही याचा क्षणमात्रदेखील ती विचार करत नाही. एवढेच नव्हे तर, वरून काही अवतरित व्हावे अशी इच्छादेखील ती बाळगत नाही तर इथे केवळ, ऊर्ध्वगामी होत राहणाऱ्या अभीप्सेचा आनंद तेवढा असतो…

सातत्याने केलेल्या एकाग्रतेमुळे ती अभीप्सा अधिकाधिक उत्कट होत राहते. आणि अशा वेळी मी तुम्हाला खात्री देऊ शकते की जे काही घडेल ते, सर्वोत्तम शक्य असेल तेच घडेल. म्हणजे असे की, तुम्ही जेव्हा हे सारे करता तेव्हा, तुमच्या क्षमता साकार होण्याची ती परम सीमा असते. या क्षमता प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असू शकतात.

पण तुम्ही असे केलेत म्हणजे मग, शांत राहण्याचा प्रयत्न करणे, दृश्य रूपांच्या मागे जाण्याचा प्रयास करणे, प्रतिसाद देणाऱ्या शक्तीला आवाहन करणे, तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळावे म्हणून खोळंबून राहणे, या साऱ्या गोष्टींबाबतच्या चिंता, आभासी असणाऱ्या वाफेप्रमाणे नाहीशा होऊन जातात. तुम्ही या अभीप्सारूपी ज्वालेमध्ये, या ऊर्ध्वगामी झालेल्या अभीप्सेच्या स्तंभामध्ये, जाणीवपूर्वक, सचेतरीतीने जीवन जगण्यात यशस्वी झालात तर याचा परिणाम – अगदी त्वरित जरी आढळून आला नाही तरी, – कालांतराने नक्कीच घडून येणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी (CWM 04 : 104-105)

साधना, योग आणि रूपांतरण – २२ (पूर्वार्ध)

एका कोपऱ्यात बसून ध्यान करण्याची क्षमता असणे ही आध्यात्मिक जीवनाची खूण आहे, असे काही जणांना वाटते. ही अगदी सार्वत्रिक कल्पना आहे. मला टिका करायची नाहीये पण, जे लोक त्यांच्या ध्यान करण्याच्या क्षमतेचे मोठे अवडंबर माजवतात त्यांच्यापैकी बहुतांश जण, तासभराच्या ध्यानाच्या बैठकीमध्ये एक मिनिटसुद्धा खऱ्या अर्थाने ध्यानस्थ होत नाहीत.

जे खऱ्या अर्थाने ध्यान करत असतात ते त्याची कधीही वाच्यता करत नाहीत, कारण त्यांच्यासाठी ती अगदी स्वाभाविक गोष्ट असते. तुम्हाला जेव्हा ध्यानाची मातब्बरी वाटत नाही आणि तुमच्यासाठी ती एक अतिशय स्वाभाविक अशी गोष्ट होते, तेव्हा तुम्ही प्रगती करत आहात, असे तुम्ही स्वत:ला सांगू शकता. जे लोक ध्यानाविषयी बोलत राहतात आणि ते ध्यान करतात म्हणून स्वतःला इतरांपेक्षा अधिक श्रेष्ठ समजू लागतात, तेव्हा तुम्ही निश्चित समजा की, ते (ध्यानाच्या वेळी) बहुतांश वेळा पूर्णपणे जडतेच्या स्थितीमध्ये असतात.

ध्यान करणे अतिशय कठीण असते. ध्यानाचे अनेक प्रकार असतात… तुम्ही एक कल्पना करू शकता आणि त्या कल्पनेचा मागोवा घेतघेत एका निष्कर्षाप्रत येऊन पोहोचता, हे ‘सक्रिय ध्यान’ असते; ज्यांना एखादी समस्या सोडवायची असते किंवा ज्यांना काही लिखाण करायचे असते, तेव्हा त्यांच्या नकळतपणे ते अशा प्रकारचे ध्यान करत असतात.

काहीजण ध्यानाला बसतात आणि एखाद्या कल्पनेचा मागोवा घेण्याऐवजी ते कोणत्यातरी एखाद्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करतात — स्वतःची एकाग्रताशक्ती अधिक तीव्र करण्यासाठी एखाद्या बिंदुवर लक्ष केंद्रित करतात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बिंदुवर लक्ष एकाग्र करता तेव्हा सहसा पुढील गोष्टी घडून येतात : एखाद्या बिंदुवर – मग तो बिंदू मानसिक असो, प्राणिक असो किंवा भौतिक असो – जर तुम्ही तुमची एकाग्रतेची क्षमता पुरेशी एकवटण्यामध्ये यशस्वी झालात तर, तुम्ही एका विशिष्ट क्षणी त्या बिंदुतून आरपार जाता आणि एका वेगळ्या चेतनेमध्ये प्रवेश करता. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 103-104)

साधना, योग आणि रूपांतरण – २१ (भाग ०५)

(‘ध्यान’ आणि ‘कर्म’ या दोन्ही गोष्टींसंबंधीचे विचार आपण कालच्या भागामध्ये लक्षात घेतले. परिणामकारकतेच्या दृष्टीने, ‘ध्याना’पेक्षा ‘योग्य रीतीने केलेले कर्म’ हे अधिक सरस असते, असा श्रीमाताजींचा अभिप्राय असल्याचे येथे साधकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्या मनात ध्यानाच्या उपयुक्ततेविषयीच साशंकता निर्माण झाली. ती त्याने श्रीमाताजींपाशी मोकळेपणाने व्यक्त केली आहे.)

साधक : तर मग ध्यानाचा काहीच उपयोग नाही का?

श्रीमाताजी : नाही, तसे नाही, पण जोपर्यंत ते आवश्यक असेल तोवर ते अगदी उत्स्फूर्तपणे, सहजपणे होत राहील. अचानकपणे, एखाद्या गोष्टीकडून (उच्चतर दिव्य शक्तीकडून) तुमचा ताबा घेतला जाईल आणि त्यामुळे तुम्ही अगदी निश्चल होऊन जाल, तेव्हा तुम्हाला एखाद्या संकल्पनेच्या दर्शनावर किंवा एखाद्या मानसिक अवस्थेवर लक्ष एकाग्र करायला प्रवृत्त केले जाईल. ती गोष्ट तुमचा ताबा घेईल, तेव्हा मात्र तुम्ही तिला विरोध करता कामा नये. मग तुम्ही आवश्यक ती प्रगती साध्य करून घ्याल. आणि अशा एखाद्या अवचित क्षणी तुम्हाला असे आढळते की, तुम्हाला काहीतरी उमगले आहे आणि तुम्हाला जे आंतरिकरित्या काहीतरी गवसले आहे त्यानिशी पुन्हा अगदी पुढच्या क्षणीच तुम्ही तुमचे काम करू लागाल, परंतु त्यामध्ये कोणताही आविर्भाव, कोणतेही ढोंग नसेल.

जे ध्यानाला बसतात आणि आपण कोणीतरी असामान्य व्यक्ती आहोत असा स्वतःविषयी ग्रह करून घेतात त्यांची मला सर्वात जास्त चिंता वाटते. सर्व गोष्टींमध्ये ही गोष्ट सर्वात जास्त धोकादायक असते कारण ते लोक आत्मसंतुष्टीने इतके भरून जातात आणि विफल बनतात की, ते अशा प्रकारे प्रगतीचे सर्व मार्गच बंद करून टाकतात.

– श्रीमाताजी (CWM 05 : 44)

साधना, योग आणि रूपांतरण – २० (भाग ०४)

माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवाच्या आधारे सांगायचे तर (आणि माझा अनुभव पुरेसा दीर्घ आहे, कारण गेली सुमारे तेहतीस वर्षे मी विविध लोकांच्या संपर्कात आहे; त्यांचे प्रश्न, त्यांची योगसाधना, त्यांचे आंतरिक प्रयत्न मला माहीत आहेत; मी येथेही आणि इतरत्र, जगभरामध्ये सर्वत्र ते प्रश्न हाताळले आहेत.) मला असे वाटते की, ध्यानाद्वारे तुम्ही स्वतःमध्ये रूपांतर घडवून आणू शकत नाही… उलटपक्षी, (कर्माबाबत) मात्र मला अगदी खात्रीच आहे.

तुम्हाला जे कर्म करणेच भाग आहे, मग ते कर्म कोणतेही असो, ते जर तुम्ही केलेत आणि ते करत असताना ‘ईश्वरा’चे विस्मरण होऊ नये म्हणून काळजी घेतलीत, सतर्क राहिलात; तुम्ही जे काही कर्म केले असेल ते ‘ईश्वरा’र्पण केलेत आणि ‘ईश्वरा’ने तुमच्या प्रतिक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणावे म्हणून तुम्ही स्वतःचे आत्मदान केलेत; तुमच्या प्रतिक्रिया स्वार्थी, क्षुल्लक, मूर्ख आणि अज्ञ असण्याऐवजी तुम्ही त्या तेजोमय, उदार अशा बनविल्यात तर, (तुम्ही जर अशा रीतीने वागलात तर) तुम्ही प्रगती कराल. याप्रकारे, तुम्ही केवळ स्वतःचीच प्रगती केलेली असते असे नाही, तर तुम्ही सार्वत्रिक प्रगतीला देखील हातभार लावलेला असतो.

कमीअधिक प्रमाणात रिक्त, पोकळ ध्यान करण्यासाठी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ध्यान करत बसले आहेत आणि त्यांनी बरीच प्रगती केली आहे, असे मला आढळले नाही; किंवा त्यांनी काही प्रगती केली असेलच तर ती अगदीच किरकोळ होती.

उलट, मी अशीही काही माणसं बघितली आहेत की, आपण योगसाधना करत आहोत असा त्यांच्यामध्ये कोणताही आविर्भाव नव्हता, परंतु ते, या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या उत्साहाने आणि ‘ईश्वरा’चे या जगामध्ये अवतरण होणार या संकल्पनेमुळे उत्साहाने भारलेले होते आणि त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले जे काही छोटेमोठे कार्य होते ते हृदयापासून, उत्साहाने, स्वतःमध्ये जे काही आहे ते, हातचे काहीही राखून न ठेवता, संपूर्णपणे झोकून देऊन केले होते. त्या पाठीमागे वैयक्तिक मुक्तीची कोणतीही स्वार्थी संकल्पना नव्हती, अशा लोकांनी उत्कृष्ट प्रगती, खरोखरच उत्कृष्ट प्रगती केलेली मी पाहिली आहे. आणि कधीकधी खरोखरच अशी माणसं अद्भुत असतात.

मी संन्यासी पाहिले आहेत, मठांमध्ये राहणारे लोक पाहिले आहेत, जे स्वतःला योगी म्हणवून घेतात अशी माणसंही मी पाहिली आहेत. पण अशी बारा माणसं आणि (वर सांगितल्याप्रमाणे,) उत्कृष्ट कार्य करणारी एक व्यक्ती यांची बरोबरीच होऊ शकत नाही. (म्हणजे मी हे, पृथ्वीच्या रूपांतरणाच्या आणि जगाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. म्हणजे आपण जे करू इच्छित आहोत, हे जग जसे आत्ता आहे ते तसेच राहू नये आणि ते खऱ्या अर्थाने, दिव्य चेतनेनिशी ‘ईश्वरी’ संकल्पाचे साधन बनावे या दृष्टिकोनातून मी हे म्हणत आहे.) या जगापासून दूर पलायन करून तुम्ही या जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाही. तर इथेच राहून, विनम्रपणे, विनयाने परंतु हृदयामध्ये अर्पण भाव जागता ठेवून ते शक्य होईल. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 43-44)