Tag Archive for: धावा

(व्यक्तीचा जेव्हा तिच्या अंतरात्म्याशी किंवा चैत्य पुरुषाशी संपर्क झालेला असतो, तेव्हाचे ते क्षण महत्त्वाचे असतात असे श्रीमाताजी सांगत आहेत…)

अंतरात्म्याशी होणाऱ्या संपर्काचे हे क्षण म्हणजे बरेचदा जीवनातील एखाद्या निर्णायक वळणाचे क्षण असतात. अशा वेळी व्यक्तीचे एक पाऊल पुढे पडलेले असते, चेतनेच्या दृष्टीने तिची प्रगती झालेली असते. आणि बरेचदा त्याचा संबंध संकटाशी किंवा एखाद्या अत्यंत बिकट परिस्थितीशी असतो. अशा प्रसंगी व्यक्तीच्या समग्र अस्तित्वाकडून त्या ईश्वराचा अत्यंत तीव्र, उत्कट धावा केला जातो. तो इतका आर्त असतो की, त्यामुळे व्यक्तीची आंतरिक चेतना, तिला झाकून टाकणारे अचेतनेचे सर्व पडदे भेदून, तिच्या सर्व दीप्तिमानतेनिशी पृष्ठभागावर येते.

व्यक्ती जेव्हा असा अत्यंत आर्ततेने ईश्वराचा धावा करते तेव्हा त्यातून एखाद्या व्यक्तित्वाचे, दिव्य अंशावताराचे (emanation) अवतरणदेखील घडून येऊ शकते. त्या विशिष्ट क्षणी, एखादे नियत कार्य पूर्ण करण्यासाठी, तुमच्या व्यक्तित्वाशी एखादा दिव्य पैलू जोडला जाऊ शकतो. एखादी लढाई जिंकणे किंवा एखादी गोष्ट अभिव्यक्त करणे अशा प्रकारचे हे नियत कार्य असू शकते. आणि एकदा का हे नियत कार्य पूर्ण झाले की, बहुतेक वेळा तो अंशावतार लोप पावतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 341)

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि ती कोणत्याही क्षमतेपेक्षा अधिक मूलभूत महत्त्वाची व अधिक परिणामकारक असते.

आंतरिक हाक, आंतरिक अनुभूती येण्यासाठी आणि आंतरिक उपस्थितीची जाणीव होण्यासाठी बहिर्मुख न राहता, चेतना अंतरंगामध्ये वळविणे हीदेखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 55)

साधनेची मुळाक्षरे – १२

‘ईश्वरी’ प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. ईश्वर तुमच्या उर्ध्वदिशेस विद्यमान असतो आणि जर तुम्हाला त्याची जाणीव झाली तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरते; ‘आनंद’रूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते ‘दिव्य अस्तित्व’ अवतरते. व्यक्तीला जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत, तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, धावा, प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे आहेत आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी आहेत. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते वा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण डोक्यामध्ये वा डोक्याच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी दोन्ही गोष्टी करू शकते – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही उतावीळ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच वेळ लागतो; तुमची चेतना सज्ज होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)