Tag Archive for: दोष

 

प्रश्न : माताजी, प्रामाणिकपणाचा खरा अर्थ काय?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. विचार करायचा एक आणि बोलायचे वेगळेच, मागायची एक गोष्ट पण हवी असते निराळीच गोष्ट, हे असे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा; ही झाली प्रामाणिकपणाची अगदी पहिली श्रेणी. म्हणजे असे पाहा की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये उत्कट अभीप्सा आहे, आणि तिला आध्यात्मिक जीवन हवे आहे, असे म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या पूर्णपणे विरोधी वर्तन करत असते.

(प्रामाणिकपणाची आता दुसरी श्रेणी पाहूया.) बरेचदा असे घडते एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्यातील दोष काढून टाकायचे आहेत,” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या त्याच दोषांना खतपाणी घालत असते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, ते काढून टाकू नयेत म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडत असते.

म्हणजे व्यक्तीमधील एखाद्या भागाला असे वाटत असते की, त्याच्यातील सर्व दोष, सर्व अपूर्णता इत्यादी गोष्टी निघून गेल्या पाहिजेत. ती व्यक्ती तसा विचार करत असते, तसे म्हणतही असते आणि तशी अभीप्सादेखील ती बाळगून असते; आणि अगदी त्याच वेळी, त्या व्यक्तीमधील इतर भाग मात्र ते दोष आणि त्या अपूर्णता दडवून ठेवू इच्छित असतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला कोणी भाग पाडू नये, अशा रितीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे.

आणि हाच मुद्दा आपण अजून विस्ताराने विचारात घेतला तर असे लक्षात येते की, ईश्वराबद्दल असणाऱ्या मध्यवर्ती अभीप्सेला विरोधी असा एखादा भाग जरी आपल्यामध्ये शिल्लक असेल तर तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीमधील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची धडपड व्यक्ती करत असते; व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते.

…या सर्व गोष्टींची गणना अप्रामाणिकपणामध्ये होते. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी दिव्य उपस्थितीची चेतना असते, दिव्य संकल्पाची चेतना असते आणि व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जेव्हा दीप्तीमान, स्वच्छ, शुद्ध व संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य अस्तित्वाचा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा अस्तित्वात येतो. आणि तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.

व्यक्तीने जेव्हा स्वत:ला ईश्वराप्रत समर्पित केलेले असते, जेव्हा ती फक्त ईश्वराच्याच इच्छेने चालण्याची आस बाळगत असते, तेव्हा तिच्याबाबतीत काहीही घडत असले तरी, ती नेहमीच म्हणजे अगदी कोणत्याही क्षणी, स्वत:च्या समग्र अस्तित्वानिशी ईश्वराला म्हणत असते की, “सारेकाही तुझ्याच इच्छेने घडू दे,” आणि खरोखर तशीच तिची भावना असते. आणि हे असे जेव्हा अगदी उत्स्फूर्तपणे, संपूर्णपणे, समग्रपणे घडते, तेव्हा ती व्यक्ती प्रामाणिक असते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 397-398)

साधना, योग आणि रूपांतरण – ११६

तुम्ही सतत मनामध्ये कोणत्या तरी गोष्टींबाबत चिंता करत असता, विचार करत असता की, “हे बरोबर नाही, माझ्यातील किंवा माझ्या कामातील ही गोष्ट चुकीची आहे,” आणि परिणामतः “मी कुचकामी आहे, मी वाईट आहे, माझे काहीच होऊ शकणार नाही.” असा विचार तुम्ही सतत करत राहता आणि त्यातूनच, त्याचा परिणाम म्हणूनच तुम्हाला अडचणी येताना दिसतात. उदाहरणार्थ, तुम्ही करत असलेले भरतकाम, तयार करत असता त्या लँपशेड्स इ. गोष्टी खरोखरच नेहमी उत्तम असतात आणि तरीही तुम्ही सतत असाच विचार करत राहता की, “हे काम चांगले झाले नाहीये, ते चुकीचे झाले,” आणि असा विचार करत राहिल्यानेच तुम्ही गोंधळात पडता आणि सारेकाही बिघडते. साहजिकपणेच मग तुम्ही सतत चुका करत राहता; आणि तुम्ही जेव्हा साध्यासरळपणे व आत्मविश्वासाने काम करता तेव्हापेक्षा, जेव्हा तुम्ही काळजी करत असता तेव्हा अधिक चुका करता.

कर्म असो की साधना असो धीमेपणाने वाटचाल करत राहणे अधिक बरे! ‘शक्ती’ला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे आणि तिला तिचे कार्य योग्य रीतीने करता यावे म्हणून, स्वतःला त्रास करून न घेता किंवा पदोपदी सतत अस्वस्थपणे प्रत्येक टप्प्यावर प्रश्न उपस्थित न करता, तुम्ही तुमचे कर्म सर्वोत्तम रीतीने केले पाहिजे. तुम्ही जर ते दोष सतत उगाळत राहिला नाहीत तर, जे कोणते दोष असतील ते यथावकाश निघून जातील; कारण सातत्याने त्या दोषांचा विचार करत राहिल्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वासच डळमळीत होत आहे. तसेच, वास्तविक जी कायमच तेथे समानत्वाने असते त्या ‘शक्ती’प्रत खुले होण्याच्या तुमच्या क्षमतेवरील तुमचा विश्वासही डळमळीत होत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहूनच त्या ‘शक्ती’च्या कार्य करण्याच्या मार्गामध्ये अनावश्यक अडथळे निर्माण करत आहात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 284)

विचारशलाका ११

साधक : अनुभवाची नकारात्मक बाजू (Negative Side). आणि सकारात्मक बाजू (Positive Side). म्हणजे काय?

श्रीमाताजी : तुमच्यामध्ये निश्चितपणे काही दोष आहेत, ते तुम्हालादेखील माहीत आहेत, जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. ते दोष घालविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्यापासून सुटका करून घेणे ही झाली (अनुभवाची) नकारात्मक बाजू (Negative Side).

काही बाबी वास्तवात उतरविण्यासाठी, काही बाबतीत त्यामध्ये तुमचे स्वत:चे असणे, काही बाबतीत तुम्ही स्वत:ला घडविणे तसेच काही गुण तुम्ही तुमच्या अंगी बाणवणे गरजेचे असते. तेव्हा ही झाली (अनुभवाची) रचनात्मक बाजू म्हणजे सकारात्मक बाजू (Positive Side).

तुमच्यात एक दोष आहे, उदाहरणार्थ, खरे न बोलण्याची सवय. आता, खरे न बोलणे व खरे न बघणे, ही जी खोटेपणाची सवय आहे, ती सवय घालविण्याचा प्रयत्न करून, तसेच तुमच्या चेतनेतील खोटेपणाचा अस्वीकार करून, तुम्ही त्या सवयीविरुद्ध लढा देता. ही गोष्ट करण्यासाठी, तुम्ही फक्त सत्यच बोलण्याची सवय तुमच्या अंगी बाणवली पाहिजे. आणि त्यासाठी, सत्य काय ते समजावून घेण्याची व नेहमी सत्यच सांगण्याची सवय तुम्ही अंगी बाणवली पाहिजे. तुम्ही दोषांना नकार देता, ती झाली नकारात्मक बाजू. तुम्ही गुण अंगी बाणवता, ही दुसरी बाजू म्हणजे सकारात्मक बाजू; हे असे आहे.

हे प्रत्येक बाबतीतच असे आहे. उदाहरणार्थ, तुमच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी तुम्हाला एक प्रकारच्या बंडखोरीची – अज्ञानी, दुराग्रही, अस्फुटशा बंडखोरीची अशी एक खोड असते; की ती सवय, जे काही वरून येते त्याला नकार देते. तेव्हा या सवयीच्या विरोधात लढा देणे, तिला अभिव्यक्त होण्यापासून रोखणे, आणि तुमच्या प्रकृतीतून तिला हद्दपार करणे ही झाली नकारात्मक बाजू. आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूने तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मकतेने समर्पणवृत्ती, समजूतदारपणा, आत्म-निवेदन, आत्म-दान, आणि दिव्य शक्तींशी पूर्णत: सहकार्य करण्याची भावना या बाबींचा अंगीकार केला पाहिजे. ही झाली सकारात्मक बाजू. समजले? त्याप्रमाणेच – जे लोक खूप रागीट असतात… जे खूप चिडतात, अचानक रागाचा उद्रेक होणे ही ज्यांची सवयच असते… त्यापैकी कोणी एखादा त्या सवयीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, रागावणे नाकारतो, स्वत:मध्ये असणाऱ्या रागाच्या उर्मींना झुगारून देतो; मात्र या साऱ्याची जागा अविचल शांतीने, परिपूर्ण सहनशक्तीने, दुसऱ्यांची भूमिका समजून घेण्याच्या वृत्तीने, सुस्पष्ट आणि स्थिरचित्त दृष्टीने, प्रशांत अशा निर्णयाने घेतली गेली पाहिजे, ही झाली सकारात्मक बाजू.

– श्रीमाताजी [CWM 07 : 202-203]

मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच ‘धर्मग्रंथां’मध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, “जे कोणी तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतात त्यांच्याबाबतीत तुम्ही अत्यंत कृतज्ञ असलेच पाहिजेत आणि त्याच्या साथसंगतीची तुम्ही इच्छा बाळगलीच पाहिजे.”

…एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला एखादा अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल. “अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुमच्या प्रगतीच्या आड येत होती ती आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्यायोग्य नाही असे साधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तीही त्याच्या ठायी असते. दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर खेचून काढलेल्या मलिनतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)

कर्म आराधना – ३४

‘ईश्वरा’साठी केलेले प्रत्येक कर्म हे ईश्वरी कर्मासमानच असते; ‘ईश्वरा’साठी केलेले शारीरिक श्रम हे स्वतःच्या विकासासाठी, प्रसिद्धीसाठी किंवा मानसिक समाधानासाठी केलेल्या मानसिक संस्कारांपेक्षा अधिक ईश्वरीय असतात.
*
कर्माचा एक मोठा लाभ हा आहे की, कर्म हे प्रकृतीची परीक्षा घेते आणि साधकाला त्याच्या बाह्यवर्ती अस्तित्वाच्या दोषांच्या सामोरे उभे करते, अन्यथा ते दोष त्याच्या नजरेतून निसटण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 247, 241]

विचार शलाका – ०४

प्रश्न : चैत्य अग्नी (psychic fire) प्रज्वलित कसा करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे.

प्रगतीसाठीच्या संकल्पाद्वारे आणि आत्मशुद्धीकरणाने हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

जेव्हा प्रगतीची इच्छा तीव्र असते, व ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळविली जाते तेव्हा आपोआप त्या व्यक्तीमधील हा अग्नी प्रदिप्त होतो.

एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, त्याची जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये आहुती दिला तर तो अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे. कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

काही लोकांच्या प्राणिक प्रकृतीला नेहमीच गोंधळ, विसंवाद, क्षुद्र भांडणं आणि गोंधळगडबड हवाहवासा वाटतो; त्याचप्रमाणे त्यांना बहुधा दु:ख-कष्टाचे एक प्रकारचे खूळ असते आणि त्यांना वाटत असते की, प्रत्येक जण त्यांच्या विरोधात आहे.

यामध्ये सुधारणा करणे खूप अवघड असते आणि त्यासाठी प्रकृतीच्या आमूलाग्र रूपांतरणाची आवश्यकता असते. अशा लोकांशी वागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया मनावर घ्यायच्या नाहीत आणि जे करणे आवश्यक आहे ते तुम्ही साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने करत राहायचे.

*

प्रश्न : माताजी, आमच्यामध्ये दोष असतात म्हणूनच आम्ही ते दुसऱ्यांमध्ये खपवून घेऊ शकत नाही, असेच नां? आम्हाला जो धक्का बसतो त्याचे मूळ कशामध्ये असते?

श्रीमाताजी : हो, सर्वसाधारणपणे, तुमच्यामध्ये जे दोष असतात तेच दोष इतरांमध्ये असल्याचे आढळून आल्यावर तुम्हाला खूप धक्का बसतो. आणि कालांतराने मग तुम्हाला उमगते की, इतर जण म्हणजे तुम्ही जे काही आहात त्याचे प्रतिबिंब दर्शविणारे आरसे आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 280 & 16 : 297-298)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १२

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत, कारण तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरेल.

श्रीमाताजी : मानवीप्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे, पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे, ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरी ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की, अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, ज्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की, जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत कारण, तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरतो.

श्रीमाताजी : मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो, त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिना लाभल्यासारखेच वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे योगसाधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तिही त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव ह्या गोष्टींचा स्वीकार करता कामा नये. कारण तसे करणे ह्याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सामर्थ्य आले नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही, अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता.

कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)