Tag Archive for: दर्शन

साधना, योग आणि रूपांतरण – १४४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : आज संध्याकाळी श्रीमाताजींच्या दर्शनाच्या वेळी त्यांची दृष्टी माझ्यावर पडली आणि मला माझ्यामध्ये भक्तीचा एक उमाळा दाटून आलेला आढळला. आणि आजवर मी यासाठीच आसुसलेलो होतो असे मला वाटले. जोपर्यंत अशी भक्ती माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे तोपर्यंत मला अन्य कोणतीच इच्छा नाही, असे मला वाटले. मला ‘अहैतुकी भक्ती’ लाभावी, असे आपण वरदान द्यावे. श्रीरामकृष्ण परमहंस असे म्हणत की, ‘भक्तीची इच्छा ही काही इच्छा-वासना म्हणता यायची नाही.’ त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की, मीही अशाच भक्तीची इच्छा बाळगत आहे म्हणजेच, मी काही कोणताही व्यवहार करत नाहीये, कारण भक्ती हा ‘दिव्यत्वा’चा गाभा आहे, त्यामुळे भक्तीसाठी मी केलेली मागणी रास्त आहे ना?

श्रीअरविंद : ‘ईश्वरा’विषयी इच्छा किंवा ‘ईश्वरा’विषयी भक्ती ही एक अशी इच्छा असते की, जी इच्छा व्यक्तीला अन्य सर्व इच्छांपासून मुक्त करते. त्या इच्छेच्या अगदी गाभ्यात शिरून जर आपण पाहिले तर असे आढळते की, ती इच्छा नसते तर ती ‘अभीप्सा’ असते, ती ‘आत्म्याची निकड’ असते, आपल्या अंतरात्म्याच्या अस्तित्वाचा ती श्वास असते आणि त्यामुळेच तिची गणना इच्छा-वासना यांच्यामध्ये होत नाही.

साधक : श्रीमाताजींविषयी माझ्या मनामध्ये शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल?

श्रीअरविंद : विशुद्ध उपासना, आराधना, कोणताही दावा किंवा मागणी न बाळगता ‘ईश्वरा’विषयी प्रेम बाळगणे याला म्हणतात ‘शुद्ध भक्ती’.

साधक : ती आपल्यामध्ये कोठून आविष्कृत होते?

श्रीअरविंद : अंतरात्म्यामधून.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 476)

विचारशलाका – ०५

साधक : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आम्ही बाळगली पाहिजे का?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यापेक्षा, प्रगतीची आस बाळगणे किंवा अधिक सचेत, अधिक जागृत होण्याविषयी आस बाळगणे किंवा चांगले काही करावे, चांगले बनावे अशी आकांक्षा बाळगणे अधिक सुज्ञपणाचे आहे, असे मला वाटते. कारण आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यातून, कमीअधिक काल्पनिक आणि भ्रामक अनुभवांची दारे उघडू शकतात, उच्च गोष्टींचे रूप धारण करणाऱ्या प्राणिक हालचालींची दारे उघडू शकतात. त्याद्वारे व्यक्ती स्वत:चीच फसवणूक करून घेऊ शकते. आध्यात्मिक अनुभव हे वस्तुत: केवळ ‘अनुभवासाठी अनुभव’ अशा पद्धतीने येता कामा नयेत तर, ते सहजस्फूर्तपणे आले पाहिजेत, आंतरिक प्रगतीचा परिणाम म्हणून आले पाहिजेत.

*

आध्यात्मिक अनुभव म्हणजे स्वत:मधील किंवा बाहेरील, ‘ईश्वरा’च्या संपर्कात येणे. हा अनुभव सर्व देशांमध्ये, सर्व माणसांमध्ये, सर्व काळामध्ये सारखाच असतो. तुम्हाला जर ‘ईश्वर’ भेटला तर तो तुम्हाला नेहमीच सर्वत्र सारख्याच प्रकारे भेटतो. (आलेल्या अनुभवाचे वर्णन, ‘कोणी येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले’ असे करतो तर ‘कोणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले’ असे करतो, हा असा फरक पडतो.) कारण, आलेला अनुभव आणि त्याची शब्दांतील मांडणी यामध्ये एक खोल दरी असते. तुम्हाला प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव येतो तो तुमच्या ‘आंतरिक चेतनेमध्ये’ आणि तो शब्दांकित केला जातो तुमच्या ‘बाह्य चेतनेमध्ये’! तुमचे शिक्षण, तुमची श्रद्धा, तुमच्या मानसिक वृत्तीप्रवृती यानुसार तो शब्दांकित केला जातो. केवळ एकच सत्य, एकच सद्वस्तु अस्तित्वात आहे, पण ते सत्य, ती सद्वस्तु ज्या रूपांमधून अभिव्यक्त होते ती रूपे मात्र अनंत आहेत.

– श्रीमाताजी [CWM 06 : 432], [CWM 03 : 17]