Tag Archive for: तितिक्षा

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा लागला, तरी न थकता, निराश न होता, नाउमेद न होता किंवा अधीर न होता प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता म्हणजे तितिक्षा (endurance). थकवा, निराशा इत्यादी गोष्टी आल्या तरी व्यक्तीने आपले उद्दिष्ट किंवा आपला निर्धार ढासळू देता कामा नये किंवा प्रयत्न करणे सोडून देता कामा नये, हे देखील तितिक्षेमध्ये अभिप्रेत असते.

*

“मी पुन्हा प्रयत्न करीन”, असे नुसते म्हणणे पुरेसे नाही. आवश्यकता आहे ती सतत, अविचलपणे, निराश न होता प्रयत्न करत राहण्याची. गीतेमध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे ‘अनिर्विण्णचेतसा‌’ प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच्यासाठी साडेपाच वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे, असे तुमचे म्हणणे आहे. पण तुम्ही म्हणताय तेवढ्या कालावधीत, जर एखाद्या योग्याला, स्वतःच्या प्रकृतीमध्ये पूर्णपणे परिवर्तन करता आले आणि त्याला ईश्वराचा अगदी निर्णायक सघन असा अनुभव आला तर, तो योगी आध्यात्मिक मार्गावर वेगाने घोडदौड करणारा आहे, असेच म्हटले पाहिजे. आध्यात्मिक परिवर्तन ही अगदी सोपी गोष्ट आहे, असे आत्तापर्यंत कोणीच कधीही म्हटलेले नाही. सर्व आध्यात्मिक साधक हेच सांगतील की, ती अतिशय अवघड गोष्ट असते पण ती खरोखरच प्रयत्न करण्याजोगी गोष्ट आहे.

ईश्वरप्राप्ती व्हावी अशी एकमेव आस जर एखाद्या व्यक्तीला लागली असेल तर ती व्यक्ती निश्चितच, कोणतीही काचकूच न करता किंवा त्यासाठी किती काळ लागतोय किंवा त्यामध्ये किती अडचणी येत आहेत किंवा त्यासाठी किती कष्ट उपसावे लागत आहेत, याची कोणतीही तक्रार न करता, स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यासाठी देऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 117) & (CWSA 30 : 18)

सद्भावना – १३

एकदा तुम्ही (योगमार्गाच्या वाटचालीस) सुरुवात केलीत की मग मात्र तुम्ही अगदी अंतापर्यंत गेलेच पाहिजे. माझ्याकडे मोठ्या उत्साहाने जेव्हा लोकं येतात तेव्हा मी कधीकधी त्यांना सांगते की, “थोडा विचार करा, हा मार्ग सोपा नाही, तुम्हाला वेळ लागेल, धीर धरावा लागेल. तुमच्याकडे तितिक्षा (Endurance) असणे गरजेचे आहे, पुष्कळशी चिकाटी आणि धैर्य आणि अथक अशी सद्भावना असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत का ते पाहा आणि मगच सुरुवात करा. पण एकदा का तुम्ही सुरुवात केलीत की मग सारे संपते, तेथे परत फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तुम्हाला शेवटपर्यंत गेलेच पाहिजे.”

– श्रीमाताजी
(CWM 06 : 441)

विचार शलाका – १९

संसारी मनुष्य सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे सहन करू शकतो. तो हे समर्थ मानसिक नियंत्रणाच्या साहाय्याने करतो. परंतु ती समता नाही, ती तितिक्षा होय. सहन करण्याची ही ताकद म्हणजे समतेची केवळ पहिली पायरी किंवा समतेचा केवळ तो पहिला घटक होय.

*

समता नसेल तर साधनेचा भरभक्कम पायाच रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य धीराने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारायला शिकला पाहिजेत. या गोष्टी म्हणजे समतेची कसोटीच असते. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, माणसं आणि परिस्थिती सुखकारक आहे तेव्हा समत्व बाळगणे, धीर राखणे सहजसोपे आहे. परंतु जेव्हा यापेक्षा विपरित परिस्थिती असते तेव्हा धीर, शांती, समत्व ह्यांच्या पूर्णतेचा कस लागतो, अशा परिस्थितीमध्ये, त्या अधिक बळकट, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 135), (CWSA 29 : 129)