Tag Archive for: तत्त्वज्ञान

साधना, योग आणि रूपांतरण – २४४

मनाचे रूपांतरण

मनाच्या निश्चल-नीरव अशा अवस्थेमध्ये अतिशय प्रभावी आणि मुक्त कृती घडून येऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या ग्रंथाचे लेखन, काव्य, अंतःप्रेरणेतून दिलेले एखादे व्याख्यान इत्यादी. मन सक्रिय झाले की ते अंतःस्फूर्तीमध्ये ढवळाढवळ करते, स्वतःच्या किरकोळ कल्पनांची त्यात भर घालते आणि त्यामुळे अंतःस्फूर्तीमधून स्फुरलेल्या गोष्टीमध्ये त्या कल्पनांची सरमिसळ होते. अन्यथा मग ती स्फूर्ती निम्न पातळीवरून काम करू लागते किंवा मग निव्वळ मनाकडून आलेल्या सूचनांच्या बुडबुड्यांमुळे ती अंतःस्फूर्ती पूर्णपणे थांबून जाण्याची शक्यता असते. अगदी त्याप्रमाणे, जेव्हा मनाच्या सामान्य कनिष्ठ स्तरावरील गतिविधी सक्रिय नसतात तेव्हा अंतःसूचना किंवा (आंतरिक किंवा उच्चस्तरीय) कृती या अधिक सहजपणे घडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे मनाच्या निश्चल-नीरव अवस्थेमध्ये असताना अंतरंगामधून किंवा वरून येणारे, म्हणजे आंतरात्मिक किंवा उच्चतर चेतनेकडून येणारे ज्ञानदेखील सर्वाधिक सहजतेने येऊ शकते.

*

अविरत चालणारी कृती ही मनाची एक नेहमीचीच अडचण असते. त्याने निश्चल-नीरव होण्यास शिकण्याची आवश्यकता असते आणि स्वतःच्या उपयोगासाठी ज्ञानावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न न करता, त्याने ज्ञानोदय होण्यास वाव दिला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 55-56, 54)

साधना, योग आणि रूपांतरण – २४३

मनाचे रूपांतरण

मनाची ग्रहणशील निश्चल-नीरवता (silence), मानसिक अहंकाराचा निरास आणि मनोमय पुरुष साक्षीभावाच्या भूमिकेत उतरणे, ‘दिव्य शक्ती’बरोबर असलेला घनिष्ठ संपर्क आणि अन्य कोणाप्रत नव्हे तर, त्या दिव्य शक्तीच्या ‘प्रभावा’प्रत खुलेपणा या गोष्टी ‘ईश्वरा’चे साधन बनण्यासाठी, आणि केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’द्वारेच संचालित होण्यासाठी आवश्यक अटी असतात. केवळ मनाच्या निश्चल-नीरवतेमुळे अतिमानसिक चेतना अवतरित होते असे नाही. मानवी मन आणि अतिमानस (supermind) यांच्या दरम्यान चेतनेच्या बऱ्याच अवस्था, बऱ्याच पातळ्या, बरेच स्तर असतात.

निश्चल-नीरवतेमुळे मन आणि उर्वरित अस्तित्व हे महत्तर गोष्टींप्रत खुले होते, कधीकधी ते ब्रह्मांडगत चेतनेप्रत खुले होते, कधीकधी शांत ‘आत्म्या’च्या अनुभवाप्रत खुले होते. तर कधी ते ‘ईश्वरा’च्या शक्तीप्रत किंवा उपस्थितीप्रत खुले होते; कधीकधी ते मानवी मनापेक्षा अधिक उच्च असणाऱ्या चेतनेप्रत खुले होते. या पैकी कोणतीही गोष्ट घडण्यासाठी मनाची निश्चल-नीरवता ही सर्वाधिक अनुकूल परिस्थिती असते.

‘दिव्य-शक्ती’ सर्वप्रथम व्यक्तिगत चेतनेवर आणि नंतर त्या चेतनेमध्ये अवतरित होण्यासाठी आणि ती चेतना रूपांतरित करण्याचे तिचे कार्य करण्यासाठी, तसेच आवश्यक असे अनुभव प्रदान करण्यासाठी, आणि व्यक्तीचा दृष्टिकोन व तिच्या वृत्तीप्रवृत्ती पूर्णतः बदलून टाकण्यासाठी आणि व्यक्ती जोवर अंतिम अतिमानसिक परिवर्तनसाठी तयार होत नाही तोपर्यंत तिला टप्प्याटप्याने पुढे घेऊन जाण्यासाठी, मनाची निश्चल-नीरवता ही पूर्णयोगामधील सर्वात अनुकूल परिस्थिती असते. अर्थात हीच केवळ एकमेव अनुकूल परिस्थिती असते असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 266-267)

साधना, योग आणि रूपांतरण – २४२

नमस्कार वाचकहो,

मानवी प्रकृतीचे रूपांतरण हे पूर्णयोगाचे एक वैशिष्ट्य आहे.

‘रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार’ या निकषावर आधारित असलेले, आंतरात्मिक रूपांतरण, आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक रूपांतरण हे तीन प्रकार आपण आजवर पाहिले. अगदी सारांशरूपाने सांगायचे तर, चैत्य पुरुषाद्वारे होणारे रूपांतरण हे आंतरात्मिक रूपांतरण, उच्चतर चेतनेद्वारे होणारे रूपांतरण हे आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक शक्तीद्वारे होणारे रूपांतरण हे अतिमानसिक रूपांतरण असते हे आता आपल्याला ज्ञात झाले आहे.

आता ‘रूपांतरण कोणाचे’ या निकषावर आधारित असलेले मानसिक, प्राणिक व शारीरिक रूपांतरण हे तीन प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. या रूपांतरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्या रूपांतरणाचा समावेश होतो. तसेच पुढे जाऊन, आपल्यामधील अवचेतन, आणि अचेतनाचे रूपांतरणही पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते.

मनुष्य देहरूपात आला तेव्हा त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचे, आणि स्वत:च्या अंतरीच्या दिव्यत्वाचे विस्मरण झाले. आणि त्याच्या मन, प्राण व शरीर या साधनांमध्ये विकार निर्माण झाले. आणि त्यामुळेच दिव्य जीवनाकडे चालणाऱ्या मार्गक्रमणामध्ये, साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हे साधकासाठी आवश्यक ठरते. त्यावर मात करायची झाली तर त्याचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे, त्याची गुणवैशिष्ट्ये व मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे, मन, प्राण, शरीर यांचे स्वरूप काय आहे, त्यांची बलस्थानं कोणती व त्यांच्या मर्यादा कोणत्या याचा सारासार आणि सांगोपांग विचार श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केला आहे. हा विचार इतका विस्तृत व सखोल आहे की, त्या सगळ्याचा येथे समावेश करायचा ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. त्यामुळे इतक्या तपशिलात न जाता, परंतु तरीही त्यातील गाभाभूत विचार वाचकांच्या हाती लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. आता आपण क्रमशः मन, प्राण व शरीर यांच्या रूपांतरणासाठी साहाय्यक होतील असे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. उद्यापासून ‘मानसिक रूपांतरण’ हा भाग सुरू करत आहोत.

धन्यवाद.
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – २४१

‘अंतरात्म्या’ची प्राप्ती किंवा ‘ईश्वर’ प्राप्ती हा पूर्णयोगाचा पाया असला आणि त्याविना रूपांतरण शक्य नसले तरी, पूर्णयोग म्हणजे केवळ ‘अंतरात्म्या’च्या प्राप्तीचा किंवा ‘ईश्वर’ प्राप्तीचा योग नाही. तर तो व्यक्तीच्या रूपांतरणाचा योग आहे.

या रूपांतरणामध्ये चार घटक असतात. आंतरात्मिक खुलेपणा, अज्ञेय प्रांत ओलांडून जाणे किंवा अज्ञेय प्रांतामधून संक्रमण करणे, आध्यात्मिक मुक्ती, आणि अतिमानसिक परिपूर्णत्व. या चार घटकांपैकी कोणताही एक घटक जरी साध्य झाला नाही तरी हा योग अपूर्ण राहतो.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 367-368)

साधना, योग आणि रूपांतरण – २४०

दिव्य जीवनासाठी फक्त उच्चतर मानसिक चेतनेच्या संपर्कात येणे पुरेसे नसते. ती फक्त एक अनिवार्य अशी अवस्था असते. दिव्य जीवनासाठी अधिक उच्च आणि अधिक शक्तिशाली स्थानावरून ‘दिव्य शक्ती’चे अवतरण होणे आवश्यक असते.

पुढील सर्व गोष्टी सद्यस्थितीत अदृश्य असलेल्या शिखरावरून अवतरित होणाऱ्या ‘शक्ती’विना अशक्यप्राय आहेत :
१) उच्चतर चेतनेचे अतिमानसिक प्रकाश आणि शक्तीमध्ये रूपांतरण,
२) प्राण आणि त्याच्या जीवनशक्तीचे विशुद्ध, विस्तृत, स्थिरशांत, दिव्य ऊर्जेच्या शक्तिशाली आणि उत्कट साधनामध्ये रूपांतरण,
३) तसेच स्वयमेव शरीराचे दिव्य प्रकाश, दिव्य कृती, सामर्थ्य, सौंदर्य आणि हर्ष यांच्यामध्ये रूपांतरण

‘ईश्वरा’प्रत आरोहण या एका गोष्टीबाबत इतर योग आणि पूर्णयोग यांमध्ये साधर्म्य आढळते परंतु पूर्णयोगामध्ये केवळ आरोहण पुरेसे नसते तर मन, प्राण, शरीर यांच्या सर्व ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी ‘ईश्वरा’चे अवतरण होणेदेखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 118-119)

साधना, योग आणि रूपांतरण – २३९

(आपल्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. एक अध-ऊर्ध्व म्हणजे जडभौतिकापासून ते सच्चिदानंदापर्यंत असणारी प्रणाली आणि दुसरी बाहेरून आत जाणारी म्हणजे बाह्य व्यक्तित्व ते चैत्य पुरुष अशी असणारी केंद्रानुगामी प्रणाली. या दोन्ही प्रणालींचा येथे संदर्भ आहे.)

रूपांतरणासाठी ‘संपूर्ण’ आणि ‘समग्र’ ईश्वराधीनतेची (consecration) आवश्य कता असते. सर्वच प्रामाणिक साधकांची तीच आस असते, नाही का?

‘संपूर्ण’ ईश्वराधीनता म्हणजे ऊर्ध्व-अधर (vertically) अशा पद्धतीने ईश्वराधीन होणे. येथे व्यक्ती सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे अगदी जडभौतिक अवस्थांपासून ते अगदी सूक्ष्म अशा सर्व अवस्थांपर्यंत, सर्वत्र ईश्वराधीन असते.

आणि ‘समग्र’ ईश्वराधीनता म्हणजे क्षितिजसमांतर (horizontally) पद्धतीने ईश्वराधीन होणे. शरीर, प्राण, मन यांनी मिळून ज्या बाह्यवर्ती व्यक्तित्वाची घडण झालेली असते त्या व्यक्तित्वाच्या विभिन्न आणि बरेचदा परस्परविरोधी असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ईश्वराधीनता असणे म्हणजे समग्र ईश्वराधीन असणे.

– श्रीमाताजी (CWM 15 : 88)

साधना, योग आणि रूपांतरण – २३८

फक्त ‘रूपांतरणा’मुळेच पृथ्वीवरील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडू शकते. एक उच्चतर समतोल आणि एक नूतन प्रकाश घेऊन या पृथ्वीवर अवतरणारी एक नवचेतना, एक नवीन शक्ती, एक नवीन ऊर्जा हीच केवळ या ‘रूपांतरणा’चा चमत्कार साध्य करू शकेल. परंतु त्यासाठी व्यक्तीने पशुवत जगणे थांबविले पाहिजे आणि दिव्य मनुष्य झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 20)

साधना, योग आणि रूपांतरण – २३७

तुम्ही जर मानवी प्रकृतीचे रूपांतरण (transformation) गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरबूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला श्रीमाताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (plasticity) आणि नि:शेष समर्पण या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.

श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, श्रीमाताजी तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी चैतन्यमय संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे, म्हणजे –
१) स्वयंपर्याप्त (self-sufficient) अज्ञानी मन जसे प्रश्नह विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.
२) ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक दिव्य प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देणारी असता कामा नये.
३) माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करत राहते आणि ती जशी शरीराच्या अंधकारमय गोष्टींमधील किरकोळ सुखाला चिकटून राहते तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी असता कामा नये. तसेच शरीराच्या कंटाळवाण्या दिनचर्येला, आळसाला किंवा त्याच्या जड निद्रेला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाच्या विरोधात शारीरिक चेतना जशी आकांडतांडव करते; तशी तुमची प्रकृती ही स्वत:च्या अक्षमतेला, जडतेला आणि तामसिकतेला हटवादीपणे चिकटून राहणारी असता कामा नये.

नि:शेष समर्पण आणि तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण हे तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभता घडवून आणेल. वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता या साऱ्या गोष्टींप्रत तुम्ही सातत्याने खुले राहिलात तर, तुमच्यामधील सर्व घटकांमध्ये चेतना जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही त्यानंतर अर्धचेतन चेतनेशी एकत्व न पावता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परमप्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 24-25)

साधना, योग आणि रूपांतरण – २३६

फक्त उच्चतर चेतनेचे अनुभव आल्यामुळे, प्रकृतीमध्ये परिवर्तन होणार नाही. ज्यांद्वारे हे परिवर्तन घडून येऊ शकते असे पुढील चार मार्ग असतात :
१) एकतर, उच्चतर चेतनेने समग्र अस्तित्वामध्ये गतिशील अवतरण करून, त्या अस्तित्वाचे परिवर्तन केले पाहिजे.
२) किंवा मग, उच्चतर चेतनेने आंतरिक शरीरापर्यंत खाली उतरून, स्वतःला आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित केले पाहिजे त्यामुळे आपण बाह्य (स्थूल) शरीरापासून विलग आहोत असा अनुभव आंतरिक शरीराला येऊ शकेल आणि ते बाह्य शरीरावर मुक्तपणे कार्य करू शकेल.
३) किंवा अंतरात्मा अग्रस्थानी आला पाहिजे आणि त्याने प्रकृतीचे परिवर्तन घडविले पाहिजे;
४) किंवा मग, आंतरिक इच्छा जागृत होऊन तिने प्रकृतीस परिवर्तन करण्यास भाग पाडले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 23)

साधना, योग आणि रूपांतरण – २३५

व्यक्ती आणि तिचे घटक यांच्या व्यवस्थेमध्ये एकाचवेळी दोन प्रणाली कार्यरत असतात. त्यातील एक केंद्रानुगामी असते. या प्रणालीमध्ये वर्तुळांची किंवा कोशांची एक मालिका असते, आणि तिच्या केंद्रस्थानी अंतरात्मा असतो. दुसरी प्रणाली ऊर्ध्व-अधर (vertical) अशी असते. म्हणजे यामध्ये आरोहण आणि अवरोहण असते, पायऱ्या-पायऱ्यांची एक शिडी असावी तशी ती असते. मनुष्याकडून ‘ईश्वरा’कडे होत जाणाऱ्या संक्रमणामध्ये, एकावर एक रचलेल्या स्तरांची जणू ही मालिकाच असते आणि त्यामध्ये अधिमानस (Overmind) व अतिमानस (Supermind) हे महत्त्वाचे टप्पे असतात.

हे संक्रमण घडून यायचे असेल तर आणि त्याच वेळी ते रूपांतरण देखील ठरावे असेही अपेक्षित असेल तर त्यासाठी, केवळ एकच मार्ग असतो. प्रथम, अंतर्मुखी परिवर्तन झाले पाहिजे, व्यक्तीने आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध घेण्यासाठी अंतरंगात शिरले पाहिजे आणि त्यास अग्रस्थानी आणले पाहिजे. आणि त्याचवेळी प्रकृतीचे आंतरिक मन, आंतरिक प्राण व आंतरिक शरीराचे घटक उघड केले पाहिजेत. नंतर, आरोहणाची प्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे ऊर्ध्वगामी परिवर्तनाची एक मालिकाच तेथे असली पाहिजे आणि निम्न स्तरावरील घटकांचे परिवर्तन करण्यासाठी चेतनेने पुन्हा खाली उतरून आले पाहिजे. व्यक्तीने जेव्हा अंतर्मुखी परिवर्तन घडवून आणलेले असते तेव्हा समग्र कनिष्ठ प्रकृती दिव्य परिवर्तनासाठी सुसज्ज व्हावी यासाठी व्यक्ती त्या प्रकृतीचे आंतरात्मिकीकरण घडवते. ऊर्ध्वगामी होत असताना, व्यक्ती मानवी मनाच्या अतीत जाते आणि आरोहणाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीचे एका नवीन चेतनेमध्ये परिवर्तन होते आणि त्याचवेळी या नवीन चेतनेचा व्यक्तीच्या समग्र प्रकृतीमध्ये संचार होतो.

अशा रीतीने जेव्हा आपण बुद्धीच्या पलीकडे आरोहण करत, प्रकाशित उच्च मनाच्या (illuminated higher mind) माध्यमातून अंतःस्फूर्त (intuitive) चेतनेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण सर्व गोष्टींकडे बौद्धिक श्रेणीतून नाही किंवा बुद्धी या साधनाच्या माध्यमाद्वारे नाही तर अधिक महान अशा अंतःस्फूर्त उंचीवरून आणि अंतःस्फूर्तिमय झालेल्या इच्छा, भावभावना, संवेदना आणि शारीरिक संपर्काच्या माध्यमाद्वारे पाहू लागतो. म्हणून, अंतःस्फूर्त मनाकडून त्यापेक्षाही महान असलेल्या अधिमानसिक उंचीवर जाताना, एक नवीन परिवर्तन होते आणि आपण प्रत्येक गोष्ट अधिमानसिक चेतनेमधून आणि अधिमानसिक विचार, दृष्टी, इच्छा, भावना, संवेदना, शक्तीक्रीडा आणि संपर्काने प्रभावित झालेल्या मन, हृदय, प्राण आणि शरीर यांच्याद्वारे पाहू लागतो, अनुभवू लागतो. परंतु अंतिम परिवर्तन हे अतिमानसिक असते, कारण एकदा का आपण तेथे पोहोचलो, एकदा का प्रकृतीचे अतिमानसिकीकरण झाले की मग आपण ‘अज्ञान’दशेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो असतो आणि मग चेतनेचे परिवर्तन गरजेचे राहत नाही. अर्थात त्यापुढेही दिव्य प्रगती, किंबहुना अनंत विकसन होणे अजूनही शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 84-85)