Tag Archive for: तत्त्वज्ञान

हठयोगाच्या मुख्य प्रक्रिया आसन व प्राणायाम या आहेत. हठयोगात अनेक आसने किंवा शरीराच्या निश्चल बैठका आहेत; या आसनांच्या द्वारा हठयोग प्रथम शरीराची चंचलता दूर करतो : शरीरात विश्वव्यापी प्राणशक्ती-सागरातून ज्या प्राणशक्ती ओतल्या जात असतात, त्या प्राणशक्ती, काहीतरी क्रिया व हालचाली करून निकालात न काढता, शरीरात राखून ठेवण्याची शरीराची असमर्थता या चंचलतेने व्यक्त होत असते; ही चंचलता प्रथम हठयोग अनेक आसनांचा उपयोग करून दूर करीत असतो; परिणामतः हठयोग शरीराला असामान्य आरोग्य देतो, जोर देतो, लवचिकपणा देतो; तसेच, ज्या सवयींमुळे शरीराला, सामान्य भौतिक प्रकृतीच्या ताब्यात व तिच्या स्वाभाविक व्यापारांच्या मर्यादित परिघामध्ये राहावे लागते, त्या सवयींपासून शरीराला मुक्त करण्यासाठी हठयोग प्रयत्नशील असतो. गुरुत्वाकर्षण-शक्तीवरसुद्धा विजय मिळविण्यापर्यंत, ह्या शरीरजयाची मजल जाऊ शकते अशी समजूत हठयोगाच्या प्राचीन परंपरेत कायमच प्रचलित असलेली दिसते.

विविध दुय्यम व सूक्ष्म प्रक्रियांद्वारा हठयोगी शरीरशुद्धी, नाडीशुद्धी करतो. शरीरातील नाना प्रकारचा मल, नाड्यांतील नाना प्रकारची घाण ही प्राणाच्या प्रवाहाला अवरूद्ध करते, म्हणून ती दूर करणे इष्ट असते; श्वास आणि उच्छवास या श्वसनक्रिया काही नियमांनुसार करणे म्हणजेच प्राणायामाच्या क्रिया होत; या क्रिया हठयोगाची फार महत्त्वाची साधने आहेत.

प्राणायाम म्हणजे श्वसनावर किंवा प्राणशक्तीवर नियंत्रण मिळविणे; प्राणशक्तीचे शरीरातील प्रमुख कार्य म्हणजे श्वसन होय. हठयोगाला प्राणायाम दोन तऱ्हांनी उपयोगी पडणारा आहे. त्याचा पहिला उपयोग : शरीराचे पूर्णत्व तो पूर्ण करतो. भौतिक प्रकृतीच्या पुष्कळशा सामान्य गरजा पुरविण्याच्या कामातून प्राणशक्ती मोकळी केली जाते; परिणामतः भक्कम आरोग्य, चिर तारुण्य आणि पुष्कळदा असामान्य दीर्घ आयुष्य हठयोग्याला प्राप्त होते.

त्याचा दुसरा उपयोग : प्राणायाम प्राणकोशातील ‘कुंडलिनी’ (वेटोळे घालून पडलेली प्रसुप्त प्राणक्रियासर्पिणी) जागी करतो आणि या कुंडलिनीच्या द्वारा हठयोग्याला, सामान्य मानवी जीवनात अशक्य असणाऱ्या अशा असामान्य शक्ती, असामान्य अनुभूतिक्षेत्रे व असामान्य जाणीव-क्षेत्रे खुली करून देतो; तसेच त्याला उपजतपणेच प्राप्त असणाऱ्या सामान्य शक्तीही अधिक तीव्र, जोरकस करतो…….

……हठयोगाचे परिणाम याप्रमाणे नजरेत भरणारे असतात; आणि सामान्य व भौतिक मनाला ते सहजच फार ओढ लावतात. तथापि हठयोगाचा प्रचंड खटाटोप करून शेवटीं आम्हाला जें प्राप्त होते ते एव्हढे मोलाचे आहे काय ? असा प्रश्न आमच्या पुढे येतो.

हठयोग भौतिक प्रकृतीचे साध्य साधून देतो. केवळ भौतिक जीवन तो दीर्घ काळ टिकवतो, तो या जीवनाचे पूर्णत्व पराकोटीला पोहोचवितो, भौतिक जीवन भोगावयाची शक्ति तो एक प्रकारे असामान्य दर्जाची करतो; हे सर्व खरें – पण या योगाचा एक दोष हा आहे की, त्याच्या कष्टमय अवघड प्रक्रिया योग्याचा इतका वेळ व इतकी शक्ति खातात, आणि सामान्य मानवी संसारापासून योग्याला इतकें पूर्णपणे तोडून टाकतात की, या योगाचीं फळे जगाच्या संसाराला उपयोगी पडतील असे करणे हठयोग्याला अगदीं अव्यवहार्य होते किंवा फारच थोड्या प्रमाणांत व्यवहार्य होते.

हठयोगाने मिळणाच्या सिद्धि राजयोगाने व तंत्रामार्गानेहि मिळू शकतात व या दुसऱ्या पद्धतीत कष्ट कमी पडतात, सिद्धि राखण्याच्या अटीहि हठयोगांतील अटींहून सौम्य असतात. हठयोगाने प्राप्त होणाच्या भौतिक सिद्धि म्हणजे खूप वाढलेली प्राणशक्ति, दीर्घ तारुण्य, सुदृढ प्रकृति व दीर्घ आयुर्मान या होत – परंतु या सिद्धि, सामान्य मानवी जीवनापासून अलग राहून, जगाच्या सामान्य व्यवहारांत यांची भर न टाकतां हठयोग्याने कृपणाप्रमाणे एकट्याने भोगावयाच्या असल्याने, एका दृष्टीने कुचकामी ठरतात. एकंदरीत, हठयोगाला मोठी मोठी फळे येतात, परंतु या फळांसाठी किंमत फारच मोजावी लागते आणि शेवटी, या फळांचा उपयोग मानवी समाजाला जवळजवळ काहीच होत नाहीं.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 34)

*

(एका साधकाला दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग)
हठ्योगाच्या पद्धतीचा आम्ही आमच्या साधनेमध्ये समावेश करत नाही. या पद्धतीचा उपयोग जर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने करणार असाल तर, ती पद्धत साधनेपेक्षा स्वतंत्र म्हणूनच, तुमच्या स्वत:च्या निवडीने, उपयोगात आणली गेली पाहिजे.

मुक्त व पूर्ण मानवी जीवनात, ईश्वर व प्रकृती यांचे पुन:एकत्व हे ज्याचे ध्येय असते; आणि आंतरिक व बाह्य कृती यांच्यात सुमेळ ही ज्याची पद्धत असते; तसेच त्या दोन्हींची परिपूर्ती दिव्यत्वात होते ही ज्याची अनुभूती असते; तोच योगसमन्वय उचित होय.

कारण, भौतिक जगतात उतरलेल्या उच्चतर सत्तेचे, सद्वस्तूचे मानव हेच असे प्रतीक व निवासस्थान आहे की, तेथे निम्नतर वस्तूला स्वतःमध्ये रुपांतर घडवून, उच्चतर वस्तूचा धर्म आत्मसात करता येतो आणि उच्चतर वस्तूला निम्नतर वस्तूच्या नाना रूपांतून आपले स्वतःचे स्वत्व प्रकट करता येते. ही जी द्विविध शक्ती व शक्यता असते, ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जे जीवन मानवाला दिले आहे, ते जीवन टाळणे ही केव्हाही योगाची अनिवार्य अट होऊ शकत नाही; किंवा त्याच्या परमोच्च प्रयत्नांचे वा त्याच्या सर्वात शक्तिशाली अशा आत्मपरिपूर्तीच्या साधनांचे म्हणजे योगाचे, अंतिम व पूर्ण साध्यही असू शकत नाही.

जीवन टाळणे, हे विशिष्ट परिस्थितीत तात्पुरत्या निकडीचे असू शकेल इतकेच; किंवा मानव जातीच्या सर्वसाधारण उद्धाराची तयारी करण्याकरिता म्हणून जीवन सर्वस्वी टाळण्याचा अत्यंतिक खास प्रयत्न कोणा व्यक्तीकडून करवून घेतला जात असेल, तर तेही समर्थनीय म्हणावे लागेल.

पण, योगाचा खरा व पूर्ण उद्देश, आणि उपयोग तेव्हाच सिद्ध झाला असे म्हणता येईल की, जेव्हा मानवाचा जाणीवयुक्त योग, निसर्गाच्या (प्रकृतीच्या) अर्धजागृत (Subconscious) योगाप्रमाणे बाह्यतः जीवनाशी समव्याप्त होईल; आणि अर्धजागृत व जाणीवयुक्त योगांचा मार्ग व सिद्धी यांजकडे पाहून आम्हाला सुस्पष्टपणे, खऱ्या अर्थाने व सर्वार्थाने असे म्हणता येईल की, “सर्व जीवन हे योगच आहे.”

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 08)

योगपद्धती आणि मानवाच्या सवयीच्या मनोवैज्ञानिक क्रिया यांचा संबंध थोड्याबहुत प्रमाणात विज्ञान आणि निसर्ग यांच्या संबंधासारखा आहे : वाफ किंवा वीज या निसर्ग शक्तीचे स्वाभाविक सामान्य व्यापार आणि याच शक्तीचे विज्ञानघटित व्यापार याचा जो संबध तोच संबध थोड्याफार प्रमाणात मानवाच्या सवयीच्या सामान्य मनोवैज्ञानिक क्रिया आणि योगप्रक्रिया यांचा आहे. विज्ञानाच्या प्रक्रिया ज्याप्रमाणे नियमितपणे केलेले प्रयोग, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि सातत्याने दिसून येणारे परिणाम यांद्वारे विकसित व निश्चित झालेल्या ज्ञानावर आधारित असतात, त्याचप्रमाणे योगाच्या प्रक्रिया पण अशाच ज्ञानावर आधारित असतात.

उदाहरणार्थ राजयोग घ्या. हा योग पुढील आकलनावर व अनुभवावर आधारलेला आहे : आमचे आंतरिक मूळ घटक, आमचे आंतरिक संयोग, आंतरिक नियत कार्ये आणि शक्ती, या सर्वांना एकमेकांपासून अलग करता येते, त्यांचा विलय पण करता येतो, त्यांच्यातून नवे संयोग घडविता येतात; आणि या नव्या संयोगांच्या द्वारा पूर्वी अशक्य असणाऱ्या नव्या कार्यांना त्यांना जुंपता येते. तसेच त्यांचे रूपांतर घडवून आणता येते. आणि निश्चित अशा आंतरिक प्रक्रियांच्या द्वारा त्यांचा नवा सर्वसाधारण समन्वय घडवून आणता येतो. ही राजयोगाची गोष्ट झाली.

हठयोगाची गोष्ट अशीच आहे. हा योग पुढील आकलनावर व या अनुभवावर आधारलेला आहे : आमचे जीवन सामान्यतः ज्या प्राणशक्तीवर आणि प्राणव्यापारांवर आधारलेले आहे, ज्यांचे सामान्य व्यापार निश्चित स्वरूपाचे व अपरिहार्य वाटतात, त्या शक्ती व त्या व्यापारांवर मानवाला प्रभुत्व संपादित करता येते, ते व्यापार बदलता येतात, स्थगितही करता येतात. अशक्यप्राय वाटावे असे परिणाम त्यामुळे घडून येतात आणि ज्यांना या प्रक्रियांमागील तर्कसंगती उमगत नाही त्यांना ते चमत्कारच वाटतात. ही हठयोगाची गोष्ट झाली.

राजयोग आणि हठयोग यांखेरीज जे योगाचे इतर प्रकार आहेत, त्या प्रकारात योगाचे हे वैशिष्ट्य तितकेसे दिसून येत नाही; याचे कारण, दिव्य समाधीचा आनंद प्राप्त करून देणारा भक्तियोग आणि दिव्य अनंत अस्तित्व व जाणीव प्राप्त करून देणारा ज्ञानयोग हे दोन्ही योग राजयोग वा हठयोग या दोन योगांइतके यांत्रिक नाहीत, ते अधिक अंतर्ज्ञानप्रधान आहेत. मात्र त्यांचाही आरंभ हा आम्हातील एखादी महत्त्वाची शक्ती वापरण्यापासूनच होत असतो.

एकंदरीत, योग या सामान्य नावाखाली ज्या पद्धती एकत्र करण्यात येतात, त्या सर्व पद्धती म्हणजे विशिष्ट मानसिक प्रक्रिया आहेत, निसर्गाच्या एखाद्या निश्चित सत्यावर त्या आधारलेल्या आहेत. योगामध्ये, या विशिष्ट मानसिक प्रक्रियाच्या आधारे, सामान्यतः न आढळून येणारे परिणाम व शक्ती विकसित होतात. अर्थात या शक्ती, हे परिणाम, सामान्य व्यापारांत नेहमीच अप्रकट अवस्थेत अंतर्भूत असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 07)

आमचा योगसमन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा आहे यापेक्षा, तो मनोमय देहाचा आत्मा आहे असे मानतो; त्यामुळे मानव मनाच्या पातळीवरही आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; मनोमय कोशातील मानसिक शक्तियुक्त आत्मा हा उच्च आध्यात्मिक शक्ती, उच्च आध्यात्मिक अस्तित्व प्रत्यक्ष आत्मसात करू शकतो आणि अशा रीतीने, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो आणि या उच्च आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून आपली सर्व प्रकृती पूर्ण, पूर्णतासंपन्न करू शकतो, असे आमचा योगसमन्वय मानतो.

असा आमचा दृष्टिकोन असल्याने, आत्म्याला उपलब्ध असणाऱ्या मनाच्या शक्तींचा उपयोग करण्यावर आरंभी आमचा भर आहे. आत्म्याच्या कुलूपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली लावून ती उघडण्यावर आमचा भर आहे; आमच्या ‘समन्वययोगा’त हठयोगपद्धती उपयोगात आणावी लागत नाही, मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही; राजयोग पद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते.

आमचा समन्वययोग आम्ही हाती घेण्याची स्फूर्ती आम्हाला झाली ह्याला कारण आहे ते असे कि – मानवी आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक अस्तित्व जास्तीत जास्त विकसित व्हावे आणि या विकसित अस्तित्वाने व शक्तीने आमच्या मानवी जीवनाच्या सर्व प्रांतांत आम्हाला आमची प्रकृती मुक्त व दिव्य करता यावी, आणि हे सर्व कार्य पूर्णत्वास नेण्याचा मार्ग दीर्घ नसावा, अल्पांत अल्प अगदी जवळचा असावा अशी आमची इच्छा होती आणि असा मार्ग म्हणजे ‘समन्वययोग’ हे आमच्या लक्षात आले.

आमच्या समन्वययोगात ‘आत्मसमर्पण’ (surrender) हे तत्त्व आम्ही साधकांपुढे ठेवले आहे. साधकाने या योगात आपले अस्तित्व सर्वथा ईश्वराच्या हाती द्यावयाचे असते. साधकाने आपले सर्व अस्तित्व ईश्वराच्या अस्तित्वाच्या, जाणिवेच्या, शक्तिच्या, आनंदाच्या हाती द्यावयाचे असते. साधकाच्या अंतरात्म्यात, त्याच्या मनोमय अस्तित्वात, ईश्वराला भेटण्याची जेवढी म्हणून स्थाने आहेत, त्या त्या सर्व स्थानी साधकाने ईश्वराची भेट घ्यावयाची असते; त्याच्याशी साहचर्य, ऐक्य प्रस्थापित करावयाचे असते. हे ऐक्य प्रस्थापित झाल्यावर ईश्वर साधकाच्या साधनभूत अस्तित्वाचा प्रत्यक्ष मालक होतो, आपला पडदा दूर करून, उघडपणे मालक होतो आणि आपल्या उपस्थितीने व मार्गदर्शनाने साधकाचे मानवी अस्तित्व पूर्ण करतो, त्याच्या प्रकृतीच्या सर्व शक्ती पूर्णतासंपन्न करून त्याची दिव्य जीवन जगण्याची पूर्ण तयारी करून देतो.

– श्रीअरविंद

शिक्षक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान मूलदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलांमध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण ते सत्य त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेद्य होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. ….आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये ह्या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते.

लहान मुलाला वेगवेगळे सिद्धान्त सांगणे अगदीच निरूपयोगी आहे कारण जेव्हा त्याचे मन जागृत होईल तेव्हा त्या सिद्धान्ताच्या विरोधी हजारो कारणे त्याला सापडतील.

मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असणारी दिव्यत्वाची उपस्थिती. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती.

आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेतात, तेव्हापासून या चैत्यपुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात.

जर तुम्ही अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या आंतमध्ये काय चालू आहे ह्याविषयी सांगू शकाल. …डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – ते इतके खरे असतात, ते जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर खूप दूर गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 26-27)

यानंतर आपण अगदी स्वाभाविकपणे चार मुक्तींकडे वळतो की ज्या ह्या सिद्धीची सघन अशी रूपे असतात. अतिमानसिक एकत्वाचा पूर्ण साक्षात्कार झाल्याने, भावनांची मुक्ती म्हणजे त्याच वेळी दुःखभोगापासूनही मुक्ती असेल.

मानसिक मुक्ती किंवा अज्ञानापासून मुक्तता झाली म्हणजे ज्योतिर्मन (Mind of light) किंवा विज्ञानमय चेतनेची (Gnostic consciousness) आपल्या अस्तित्वामध्ये प्रस्थापना होईल, जिच्या अभिव्यक्तीमध्ये शब्दाचे सृजनशील सामर्थ्य असेल.

प्राणिक मुक्ती किंवा वासनामुक्ती प्राप्त झाल्याने, व्यक्तीला स्वत:ची इच्छा दिव्य इच्छेमध्ये संपूर्णत: आणि जाणीवपूर्वक एकरूप करण्याची क्षमता येईल आणि त्यामुळे नित्य शांती, प्रसन्नता आणि त्यांच्यापासून निर्माण होणारी शक्ती यांची प्राप्ती होईल.

अखेरचे शिखर म्हणजे शारीरिक मुक्ती; म्हणजेच भौतिक जगामध्ये असणाऱ्या कार्यकारणभावाच्या नियमापासूनही मुक्ती. संपूर्ण आत्मप्रभुत्वाचा परिणाम म्हणून, व्यक्ती आता प्राकृतिक नियमांची दास बनून राहत नाही. माणसांना अवचेतन वा अर्धचेतन भावावेगांच्या द्वारा कृती करावयास भाग पाडणा-या आणि सामान्य जीवनाच्या चाकोरीत बांधून ठेवणाच्या प्राकृतिक नियमांच्या आधीन आता अशी व्यक्ती राहत नाही. या मुक्तीच्या साहाय्याने मग, व्यक्ती कोणता मार्ग निवडावयाचा, कोणते कार्य पूर्ण करावयाचे हे पूर्ण जाणीवेने ठरवू शकते. आणि अंध नियतीच्या सर्व पाशांमधून ती व्यक्ती स्वत:ला मोकळे करते; की ज्यायोगे, व्यक्तीच्या जीवनक्रमामध्ये उच्चतम संकल्पशक्ती, सर्वोच्च सत्यमय ज्ञान, अतिमानसिक जाणीव यांखेरीज दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप करू दिला जात नाही.

 

– श्री माताजी
(CWM 12 : 71)

आता आपण प्राणिक तपस्येकडे, संवेदनांच्या तपस्येकडे, शक्तिच्या तपस्येकडे वळू. कारण, प्राण हेच शक्तीचे आणि प्रभावशाली उत्साहाचे अधिष्ठान आहे. प्राणतत्त्वामध्येच विचाराला संकल्पाचे स्वरूप येते, त्यामुळे कार्याला गती प्राप्त होते. हेही तितकेच खरे आहे की, वासना आणि विकार, हिंसक आवेग, आणि तितक्याच जोरदार प्रतिक्रिया, बंडखोर वृत्ती आणि निराशा यांचे अधिष्ठान प्राणच असतो. यावर साधारणत: नेहमी केला जाणारा उपाय म्हणजे त्यांचा कोंडमारा करणे, सर्व संवेदना काढून घेऊन त्याची उपासमार करणे. वास्तविक मुख्यतः या संवेदनावरच ‘प्राण’ पोसला जातो आणि सर्व संवेदनाच काढून घेतल्या तर तो झोपी जातो, सुस्त आणि आळशी होऊन जातो. त्याचा जणू (संवेदनारूपी अन्न न मिळाल्याने) भूकबळी जातो.

खरे पाहता, प्राणाचे पोषण होण्यास तीन स्रोत उपलब्ध असतात. सर्वात सुलभ असा स्रोत खालच्या बाजूने असतो : संवेदनांद्वारा येणाऱ्या भौतिक शक्तींपासून त्याचे पोषण होते.

दुसरा स्रोत त्याच्या स्वत:च्याच पातळीवर, प्राणाच्याच पातळीवर असतो. प्राणतत्त्व हे जर पुरेसे व्यापक आणि ग्रहणशील असेल, तर विश्वांतील विविध प्राणशक्तींशी त्याचा संबंध येतो व त्याला शक्ती प्राप्त होते.

शक्तीचा तिसरा स्रोत उच्च पातळीवरून येतो. जेव्हा प्रगतीची उत्कट आकांक्षा असते, तेव्हाच प्राण या स्रोतास अभिमुख होतो. वरून आलेली आध्यात्मिक शक्ती व प्रेरणा यांच्या संचाराने व समावेशामुळे हा स्रोत प्राणापर्यंत येऊन पोहोचतो.

यापेक्षा आणखी एका वेगळ्या शक्तिस्रोताची भर घालण्याचा लोक नेहमीच थोडाफार प्रयत्न करतात. पण त्यांचे बहुतेक सर्व कष्ट आणि दुर्भाग्य यांनाही तो स्रोतच कारणीभूत होत असतो. आपल्या बरोबरीच्या व्यक्तींमध्ये – सामान्यत: दोन व्यक्तींमध्ये – प्राणशक्तीची जी देवाणघेवाण होते त्यालाच लोक चुकून प्रेम असे समजून त्याद्वारा पोषण घेतात. पण वास्तविक ते प्रेम परस्परांच्या देवाणीघेवाणीमध्ये सुख घेणाऱ्या दोन शक्तींमधील केवळ आकर्षण असते.

संवेदनांची उपासमार नको, शुद्धिकरण हवे

आपल्यामधील प्राणतत्त्वाची उपासमार होऊ नये अशी आपली इच्छा असेल, तर संवेदनांचा त्यागही करता कामा नये किंवा त्यांची संख्या अथवा त्यांची तीव्रताही कमी करता कामा नये; संवेदना टाळणेही योग्य नाही, तर विचारपूर्वक व विवेकाने त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे.

संवेदना हे ज्ञानप्राप्तीचे व शिक्षणाचे उत्तम साधन आहे. पण हे कार्य त्याकरवी करून घ्यावयाचे असेल, तर स्व-समाधान आणि सुख याकरता चाललेल्या अज्ञानपूर्ण व अंध प्रयत्नांत, सुखोपभोगाचे एक साधन म्हणून अहंकारीपणाने संवेदनांचा उपयोग करता कामा नये.

कोणताही तिरस्कार किंवा नाखुषी न दर्शविता सर्वकाही सहन करावयास आपली इंद्रिये समर्थ असली पाहिजेत. पण त्याचबरोबर प्राणाच्या निरनिराळ्या उर्मीचे प्रकार, त्यांचे मूळ आणि त्यांचे परिणाम यांबाबत सारासार विवेक करण्याची इंद्रियांना शक्ती येऊन, ती अधिकाधिक विकसित झाली पाहिजेत; ती एवढ्यासाठी की, त्या उर्मी सुसंवाद, सौंदर्य आणि आरोग्य यांना उपकारक आहेत की, शरीर आणि प्राण यांच्या समतोलास व विकासास अपायकारक आहेत, हे इंद्रियांना कळले पाहिजे. भौतिक व प्राणिक जगतातील व्यामिश्रतेसह त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांच्याप्रत पोहोचणे व त्यांचा अभ्यास करणे या दृष्टीने साधने म्हणून या इंद्रियांचा उपयोग केला पाहिजे. असे केले म्हणजेच रूपांतरणासाठी करावयाच्या महान प्रयत्नांत त्यांचे योग्य स्थान इंद्रिये प्राप्त करून घेतील.

प्राणशक्ती दुर्बल करून नव्हे तर, ती ज्ञानयुक्त, सामर्थ्यसंपन्न आणि शुद्ध करूनच व्यक्ती आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या विकासास मदत करू शकते. संवेदनाच वर्ज्य करणे हे, जेवण न घेता स्वत:ची उपासमार करण्याइतकेच अपायकारक आहे. संवेदनांची निवड व नियंत्रण शास्त्रशुद्ध तपाचरणाने आणि फक्त प्राणशक्तीचा विकास व पूर्णता यांसाठीच केली पाहिजे. कारण प्राण हे खूप क्रियाशील, गतिशील असे साधन आहे, ते अस्तित्वाच्या इतर भागांप्रमाणेच प्रगतीसाठी आवश्यक आहे.

प्राणशक्तीला शिक्षण देऊन, तिला अधिक शुद्ध करून, अधिक संवेदनाक्षम बनवून, अधिक सूक्ष्म व अधिक सुसंस्कृत बनवून आपण तिच्या हिंसात्मक व पाशवी वृत्तींवर विजय मिळवू शकू. या गोष्टी म्हणजे वास्तविक अविचारीपणा, अज्ञान आणि अभिरुचीचा अभाव यांच्या निदर्शक आहेत.

प्राणशक्तीवर कोणतेही संस्कार न करता तिला आहे त्याच अवस्थेत सोडून दिले तर ती असंस्कृत, अहंकारी आणि विकृत असते हे खरे आहे परंतु त्याच प्राणशक्तीला संवर्धित करून ज्ञानपूर्ण केल्यानंतर ती सुसंस्कृत, धैर्यशील आणि नि:स्वार्थी होऊ शकते हेही तेवढेच खरे आहे. स्वत:मधील सुखतृष्णेचे रूपांतरण अतिमानसिक विपुलतेसाठी असलेल्या अभीप्सेमध्ये (Aspiration towards Divine) कसे करावयाचे एवढे जरी प्रत्येकाला कळले तरी ते पुरेसे आहे. त्यासाठी प्राणशक्तीला शिक्षण देण्याचे काम चिकाटीने, निष्ठेने व प्रामाणिकपणाने करीत राहिले तर अशी एक वेळ येते की, आपल्या ध्येयाची महानता आणि उज्ज्वलता, यांची तिला खात्री पटल्याने, दिव्य आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्राणशक्ती स्वत:च आपल्या क्षुद्र व भ्रामक अशा संवेदनाजन्य सुखोपभोगांचा त्याग करते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 55)

तपस्या म्हणजे आत्मपीडन असा सर्वसाधारणपणे एक गैरसमज असतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती तपस्येविषयी बोलू लागते तेव्हा आपण तपस्व्याच्या कठोर शिस्तीचा विचार करतो. शारीरिक, प्राणमय, आणि मानसिक जीवनाचे आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तन करण्याचे महाकठीण काम टाळण्यासाठी, असे परिवर्तन अशक्यच आहे असे तो तपस्वी प्रतिपादन करतो. आणि हे जीवन म्हणजे निरर्थक ओझे, एक बंधन आहे किंवा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक प्रगतीस पायबंद घालणारे आहे अशा भावनेने तो निर्दयपणे त्याला दूर लोटतो; निदानपक्षी, जीवन म्हणजे न सुधारता येणारी अशी एक गोष्ट आहे, प्रकृतिधर्मानुसार अथवा परमेश्वरकृपेने मृत्यूच्या माध्यमातून आपली जीवनातून सुटका होईपर्यंत कमी अधिक आनंदाने वाहिलेच पाहिजे असे ते एक ओझे आहे असे तो तपस्वी मानतो. किंवा फारतर, उन्नति करून घेण्याकरता ऐहिक जीवन हे एक क्षेत्र आहे म्हणून त्याचा व्यक्तीने जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे, व पूर्णतेच्या ज्या अवस्थेमध्ये ही जीवनपरीक्षा अनावश्यक ठरून तिचा अंत होईल अशा अवस्थेपर्यंत शक्य तितक्या लवकर जाऊन पोहोचले पाहिजे असे तो तपस्वी मानतो. Read more

या जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे अस्तित्वाची आणि चेतनेची एक वास्तविकता आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ आत्म्यात, चैतन्यात संघटित आहेत पण चेतनेच्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या आत्म्याविषयी आणि मन, प्राण, देह यांतील वास्तविकतेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणिवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची, स्वत:मधील व सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे. Read more

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. मला ते वर दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे. आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाचे समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे, हे त्या सत्य-तत्त्वाला शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

-श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)