Tag Archive for: तत्त्वज्ञान

जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ईश्वराच्या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ईश्वराच्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये देवाला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण ”सर्व प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे कारण ती देवाच्या पुत्रांना (मानवांना) साक्षात्कार होण्याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आमच्या स्मरणात असला पाहिजे.

म्हणून मी आज तुम्हाला ह्या गोष्टींची आठवण करून दिली. एखाद्या दुर्मिळ हिऱ्याप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात ह्या विचाराची जपणूक करून मार्गक्रमण केले आणि त्याला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे काम आपल्यामध्ये करू देण्यास मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे एकत्व आपण अनुभवू शकतो.

तेव्हा आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल; आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जाताना, आपला मंद अहंकार, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी कोसळून पडताना आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंधांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व वाहून जात असल्याचे आपल्याला जाणवेल.

व्यक्तिमधील आत्मा आणि वैश्विक आत्मा हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)

जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे ह्या हेतूने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे ह्याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतूने, आजवर त्याला सत्य वाटत होते अशा विचारांचा (जर तशीच आवश्यकता असेल तर,) परित्याग करण्यासाठी जो तयार झाला आहे; तो हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा प्रचंड विचार-पुंजांच्या संपर्कात येतो.

मग पुष्कळशा ध्यानानंतर, मननानंतर, तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही. त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही त्याचा एक भागच बनून जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवण, जे सारे कधीकधी खूपच विरोधाभासात्मक वाटते, त्या साऱ्या पाठीमागील गहन सत्य त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून काहीच लपून राहू शकत नाही.

अगदी दोष, अज्ञान ह्या गोष्टी सुद्धा त्याला आता अस्वस्थ करत नाहीत, कारण असे कोणा एका अज्ञात अधिकारी व्यक्तीने सांगून ठेवले आहे : जो सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे त्याला कोणताही दोष त्रास देत नाही कारण तो हे जाणून असतो की, ”दोष हा सत्याच्या दिशेने चाललेला जीवनाचा पहिलावहिला प्रयत्न असतो.”

अशा परिपूर्ण धीरगंभीरतेच्या स्थितीप्रत पोहोचणे म्हणजे विचारांच्या शिखरावर जाऊन पोहोचणे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 28)

आध्यात्मिक ज्ञानाचे मन ज्या एकमेव उद्दिष्टाकडे वळले पाहिजे ते उद्दिष्ट म्हणजे शाश्वत परब्रह्म होय. या इथे प्रकृतीच्या धुक्याने परिवेष्टित झालेला आणि अभ्राच्छादित झालेला आत्मा, त्या ‘शाश्वता’वर लक्ष स्थिर करून, स्वत:ची स्वाभाविक असणारी अशी अमर्त्यतेची आणि विश्वातीततेची मूळ चेतना पुन:प्राप्त करून घेऊन, तिचा आनंद घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 415)

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व कृतींचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा व्यक्ती रूपांतरणाविषयी बोलत असे तेव्हा तिला केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही निगूढ चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करावयाचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून धुत्कारत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही निगूढ अशा सत्याची अभिव्यक्ती करावी, अशी त्या सत्याकडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य की, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या सत्याचा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू म्हणजे ग्रहणशीलता, याबद्दल आपण या आधीही बोललो आहोत. रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी ह्यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंतच झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा काहीसे असेच घडून येते. खूप काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची जाणीव नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. जर का तुमच्यापाशी तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोध देखील जाणवतो; जणू काही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही पडत नाही. पण जेव्हा तुम्ही अंतरंगातून सिद्ध झालेला असता तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न – आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 18-19)

प्रश्न : भौतिक जाणिवेमध्ये आणि पूर्णत: भौतिक परिस्थितीमध्ये आपल्याला सदासर्वकाळ अडकवून ठेवणाऱ्या भौतिक जाणिवेमधून बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : ते करण्याचे अगणित मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करावयाची म्हटले तर काहीच हाती लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांपाशी परत येऊन पोहोचतो. ह्यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, ह्या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; ह्या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग रुपांतरित झाल्याविना तसाच शिल्लक राहतो. त्यांच्यासाठी रूपांतरण करणे हा उपाय नसून, परित्याग करणे, शक्य तितक्या त्वरेने या शरीरातून बाहेर पडणे हाच केवळ त्यावरील उपाय असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक जाणिवेचे रूपांतरण हवे आहे, त्याचा परित्याग करणे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा परमेश्वराप्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक बाबींचा व भौतिक जाणिवेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर, भौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 299-300)

चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. पहिल्या प्रथम आरोहण किंवा ऊर्ध्वगमन असते; तुम्ही स्वत:ला जडभौतिक चेतनेमधून काढून, उच्चतर पातळ्यांवरील चेतनेमध्ये वर उचलून घेता. निम्नतर प्रतलामधून उच्चतर प्रतलावर होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर प्रतलावर अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता – कोणतातरी प्रकाश, रुपांतरकारी अशी कोणतीतरी शक्ती, किंवा जुन्या प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणण्याकडे जिचा कल असतो अशा शक्तीचे अवतरण घडवता.

आणि मग, ज्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एकमेकांशी असंलग्न होत्या, एकमेकींपासून विलग होत्या; जसे की, तुमच्यामधील उच्चतर आणि निम्नतर स्तर, तुमच्या व्यक्तित्वाचे आंतरिक आणि बाह्य स्तर ह्या गोष्टी आता एकमेकांना भेटू लागतात, हळूहळू त्या एकमेकांमध्ये मिसळू लागतात आणि कालांतराने एका सुसंवादामध्ये एक सत्य बनून, एकरूप होतात. ज्याला चमत्कार चमत्कार असे म्हणतात ते असे घडून येतात.

हे विश्व चेतनेच्या अगणित स्तरांचे बनलेले आहे आणि त्या प्रत्येक स्तराचे, त्या प्रतलाचे स्वत:चे असे काही खास नियम असतात, कायदे असतात; एका स्तराचे कायदे दुसऱ्याला लागू पडत नाहीत. चमत्कार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अचानक घडून आलेले अवतरण असते; एका वेगळ्या स्तरावरील चेतनेचे आणि तिच्या शक्तींचे उसळून येणे असते. बहुधा या प्राणिक शक्ती असतात आणि त्यांचे या जडभौतिक स्तरावर अवतरण होते. जडभौतिक यंत्रणेवर उच्चतर स्तरावरील यंत्रणेकडून वर्षाव होतो. जणू काही एका वीजकल्लोळाद्वारे आपल्या सामान्य चेतनेचे ढग भेदले जातात आणि त्यामध्ये उच्चतर शक्तींचा, गतिविधींचा, प्रवाहांचा वर्षाव होतो. आणि त्या परिणामाला आपण चमत्कार म्हणतो. कारण आपल्याला अचानक झालेला बदल दिसतो; आपल्या सामान्य पातळीवरील निसर्गकायद्यामध्ये आकस्मिक हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो पण आपल्याला त्याचा क्रम, ती व्यवस्था, त्याचे कारण काय हे काहीच कळत नाही, दिसू शकत नाही कारण त्या चमत्काराचा स्रोत हा एका वेगळ्या स्तरावर असतो.

आपल्या जडभौतिक विश्वामध्ये त्यापलीकडील जगतांचा असा हस्तक्षेप होणे ही फार काही जगावेगळी घटना नाही, किंबहुना अशा घटना या सतत इंद्रियगोचर सुद्धा असू शकतात; आपल्याला त्या पाहण्याची दृष्टी असेल आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे ह्याची जाण जर आपल्याला असेल तर असे पुष्कळ चमत्कार आपल्याला पदोपदी दिसू शकतील. विशेषत: उच्चतर स्तरावरील वैभवाचे, पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांच्याबाबतीत तर ती नित्याची बाब असू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 29-31)

प्रश्न : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का?

श्रीमाताजी : मुक्तता आणि प्रारब्ध, स्वातंत्र्य आणि निश्चयवाद ह्या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना समान पातळीवर आणून, परस्परांविरोधात उभे करण्यास मनाला भाग पाडणारे जर कोणी असेल तर ते अज्ञानच असते.

चेतना ही काही एकच एक एकसंध अशी वास्तविकता नाही, तर ती खूप जटिल आहे; एखादे सरळसोट प्रतल असल्यासारखी ती नाही तर ती बहुआयामी आहे. एका बाजूला सर्वोच्च उंचीवर ‘अव्यक्त परात्पर’ आहे तर सर्वात खाली ‘जडद्रव्य’ आहे आणि या दोहोंच्या दरम्यान, म्हणजेच सर्वोच्च उंची आणि निम्नतम खोली यांच्या दरम्यान चेतनेच्या अगणित पातळ्या आहेत, स्तर आहेत.

जडभौतिकाच्या प्रतलावर आणि सामान्य चेतनेच्या पातळीवर तुमचे हातपाय बांधलेले असतात. तेथे तुम्ही प्रकृतीच्या यंत्रणेचे गुलाम असता तुम्ही कर्मबंधांनी बांधलेले असता, आणि तेथे जे काही घडते ते, जे आधी घडून गेले आहे त्याचा काटेकोर परिणाम असतो. तेथे स्वतंत्र कृतीचा व कर्माचा आभास असतो पण वास्तविक, इतर जण जे काही करत असतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता, या जगतामध्ये प्रकृतीच्या ज्या वैश्विक घडामोडी चालतात त्यांचा तुम्ही केवळ प्रतिध्वनी असता, तिच्या वैश्विक यंत्राच्या रहाटगाडग्यावर तुम्ही असहाय्यपणे फिरत राहता.

पण हे असेच असायला पाहिजे असे मात्र नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे स्थान बदलू शकता; तुम्ही खाली असण्याऐवजी, या अजस्त्र यंत्रणेखाली चिरडून जाण्याऐवजी, किंवा कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाली करण्याऐवजी, तुम्ही वर उठू शकता आणि वरून पाहू शकता; आणि तुमच्या चेतनेमध्ये परिवर्तन घडवून त्यायोगे, वरकरणी अपरिहार्य भासणारी परिस्थिती आणि बंधवत वाटणारी स्थिती यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या जणू एखाद्या दांड्याचाच तुम्ही ताबा घेऊ शकता. एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्याच्या वर उठलात आणि वर भरभक्कमपणे उभे राहिलात तर तुमच्या असे लक्षात येते की तुम्ही मुक्त आहात.

तुम्ही सर्व प्रकारच्या सक्तींपासून मुक्त होता; तुम्ही आता केवळ एक अगतिक साधन राहत नाही; इतकेच नाही, तर तुम्ही आता एक सक्रिय असे माध्यम बनता. आता तुम्ही तुमच्या कर्मफलांनी बद्ध राहत नाही; तर, तुम्ही त्या कर्मफलांमध्ये बदल सुद्धा घडवून आणू शकता.

एकदा का तुम्ही ह्या साऱ्याकडे शक्तींची लीला या दृष्टीने पाहू लागलात; एकदा का तुम्ही या शक्तींचा उगम जेथे आहे त्या चेतनेच्या प्रतलावर जाऊन पोहोचलात, आणि त्या गतिमान अशा शक्ति-उगमाशी तद्रूप झालात की मग, तुम्ही केवळ एखाद्या कळसूत्री बाहलीप्रमाणे हालचाल करणारे उरत नाही तर ती सूत्रे हालविणाऱ्यांपैकी एक बनता.

प्रकृतीच्या यांत्रिक रहाटगाडग्यामधून बाहेर पडून दिव्य गतिविधींमध्ये प्रवेश होणे हेच खरंतर योगसाधनेचे उद्दिष्ट आहे. योगसाधनेच्या साहाय्याने तुम्ही प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामधून बाहेर पडता. प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामध्ये तुम्ही केवळ एक अज्ञानी गुलाम असता; असहाय्य, अगतिक असे साधन असता, अशा यांत्रिक चक्रामधून योगसाधनेच्या आधारे बाहेर पडून; तुम्ही, उच्चतर नियतीचे कामकाज जेथे चालू असते त्या एका निराळ्या चेतनेच्या प्रतलावरील जागरूक सहभागीदार आणि क्रियाशील माध्यम बनता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 29-31)

प्रश्न : स्वत:च्या जाणिवेमध्ये बदल कसा करायचा?

श्रीमाताजी : अर्थातच ह्याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब करावयास हवा. आपल्या मार्गाचा संकेत हा बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. प्रत्येकाच्या बाबतीत त्यात काही ना काही फरकही आढळून येतो.

उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पसरलेल्या अशा अगदी सामान्य जाणिवेचे भान असू शकते; ती एकाचवेळी वस्तुमात्रांच्या पृष्ठवर्ती भागामध्ये कार्य करते. त्या व्यक्तीचा वरवरच्या बाह्यवर्ती गोष्टी, माणसे, परिस्थिती यांच्याशी संपर्क असतो आणि कधीतरी, जसे मी म्हटले त्याप्रमाणे, प्रत्येकाबाबत ही गोष्ट भिन्न भिन्न असते – अचानक, या ना त्या कारणाने वस्तुमात्राकडे समपातळीवरून क्षितिजसमांतर पद्धतीने पाहण्याऐवजी व्यक्ती वर उचलली जाते; तुम्ही अकस्मात इतरांवर प्रभुत्व मिळविता, त्यांच्याकडे वरून पाहता; तुमच्या जवळपास असणाऱ्या छोट्या छोट्या असंख्य गोष्टी पाहण्यापेक्षा आता तुम्ही त्या त्यांच्या समग्रतेने पाहता; जणू काही तुम्हाला कोणीतरी वर उचलून घेतलेले असते आणि तुम्ही पर्वतशिखरावरून किंवा विमानातून पाहता. अशा वेळी प्रत्येक छोटेमोठे बारकावे न्याहाळत बसण्यापेक्षा, तुम्ही त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पातळीवरून पाहता, तुम्ही या सर्व गोष्टींकडे एकात्मतेने आणि फार फार उंचावरून पाहता.

हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग आहेत पण बहुधा हा अनुभव एखाद्या दिवशी अचानकपणे योगायोगाने येऊन जातो किंवा कधीकधी असेही होते की, या अनुभवाच्या अगदी विरोधी असाही अनुभव येतो पण आपण तेथेच येऊन पोहोचतो. व्यक्ती अचानकपणे अगदी खोलवर बुडी मारते, आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर, खोलवर बुडी मारते; या साऱ्या गोष्टी तिला आता दूरस्थ, वरवरच्या, अगदी किरकोळ अशा भासू लागतात; ती व्यक्ती आंतरिक शांततेमध्ये, आंतरिक शांतीमध्ये, वस्तुमात्रांविषयीच्या आंतरिक दृष्टीमध्ये प्रवेश करते. त्या व्यक्तीला वस्तुमात्राविषयी व आजूबाजूच्या परिस्थितीविषयी अगदी अंतरंगातून आकलन होते आणि त्यामुळे सर्वांचे मूल्यच बदलून जाते. विविध अशा बाह्य रूपांपाठीमागे असलेल्या एका सखोल एकात्मतेची, एकरूपतेची जाणीव मग त्या व्यक्तीला होते. किंवा कधीकधी, अचानकपणे, मर्यादितपणाची जाणीवच नाहीशी होते आणि व्यक्तीचा आदिअंतरहित अशा अनिश्चित काळाच्या, की जो आजवर होता आणि पुढेही कायमच असणार आहे अशा काळाच्या अनुभूतीमध्ये प्रवेश होतो.

तुमच्या आयुष्यात, हे अनुभव अचानकपणे वीजेप्रमाणे क्षणार्धात येतात; तुम्हाला कळतही नाही ते का आणि कसे आले… ते अगणित असतात, ते व्यक्तीव्यक्तीनुसार भिन्न भिन्न असतात, पण ह्या एका निमिषार्धातील अनुभवामुळे तुम्ही त्या गोष्टीचा धागा पकडू शकता.

व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव पुन्हा आठवून पाहिला पाहिजे, त्याची आस बाळगली पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा प्रारंभबिंदू असतो; आणि तुम्हाला तुमचा मार्ग कोणता ते सुचविणारा जो धागा, जो संकेत देण्यात आला होता त्याचे प्रयोजन आता येथे संपलेले असते.

ज्यांच्याबाबतीत त्यांच्या आंतरिक अस्तित्वाचा, त्यांच्या अस्तित्वाच्या सत्याचा त्यांना शोध लागणार हे निर्धारित झालेले असते त्यांच्या जीवनात एखादी तरी अशी वेळा असते की, जेव्हा ते त्यांचे उरत नाहीत, वीज चमकून जावी त्याप्रमाणे एखादा क्षणही पुरेसा असतो. व्यक्तीने कोणता मार्ग अनुसरावा हे सुचविण्यासाठी ते पुरेसे असते; हेच ते द्वार असते की जे या मार्गाकडे उघडले जाते. तेव्हा तुम्ही या द्वारातून प्रवेश करावयास हवा. आणि अधिक खरेखुरे, अधिक समग्र अशा कशाकडे तरी घेऊन जाणारी एक नवीनच स्थिती प्राप्त व्हावी म्हणून अथक चिकाटीने, सातत्याने प्रयत्नशील राहावयास हवे.

नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत पण तुम्हाला आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग यामध्ये ती परिणामकारकता नसते; जी परिणामकारकता कोणत्याही सुस्पष्ट कारणाविना आलेल्या या उत्स्फूर्त अनुभवामध्ये असते. ते आत्म्याच्या जागृतीचे सहजतेने उमलणे असते; एका क्षणासाठी तुमचा तुमच्या चैत्य पुरुषाशी आलेला तो संपर्क असतो; त्यातून तुमच्या आवाक्यात असलेला, तुमच्यासाठी सर्वोत्तम असा मार्ग कोणता, हे तुम्हाला दर्शविण्यात आलेले असते. ध्येयपूर्तीसाठी त्या मार्गाचे चिकाटीने अनुसरण करणे एवढेच आता तुम्हाला करावयाचे असते – हा एक क्षण असतो जो तुम्हाला कशी व कोठून सुरुवात करावयाची हे दाखवून देतो.

काही जणांना हा अनुभव रात्री स्वप्नामध्ये येतो, एखाद्याला तो कोणत्याही आकस्मिक क्षणी येऊ शकतो; कधीतरी कोणाला असे काहीतरी दिसते की, ज्यामुळे त्याच्यामध्ये एक नवीनच जाणीव उदयास येते. काहीतरी ऐकण्यात येते, एखादे सुंदर निसर्गदृश्य, सुमधुर संगीत, वाचण्यात आलेले काही शब्द, किंवा जीवापाड एकाग्रतेने केलेले प्रयास, त्याची तीव्रता असे ते काहीही असू शकते, हा अनुभव येण्याचे अक्षरश: हजारो मार्ग आणि हजारो कारणे आहेत.

पण मी पुन्हा तेच सांगते, की ज्यांना साक्षात्कार होणार हे निश्चित असते त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी असा हा अनुभव येतोच येतो. भले तो क्षणिक असेल, भले त्यांना तो अनुभव अगदी बालपणी आलेला असेल पण आयुष्यात एकदा तरी सत्य-चेतना काय ह्याचा अनुभव त्यांना आलेला असतो. कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे सूचित करणारा तो सर्वोत्तम संकेत असतो.

व्यक्तीने त्याचा स्वत:च्या अंत:करणात शोध घ्यावा, किंवा तो ध्यानात ठेवावा, वा त्याचे निरीक्षण करावे, व्यक्तीने काय चालू आहे त्याची नोंद घ्यावी, त्याकडे लक्ष पुरवावे, बस्, इतकेच पुरेसे असते.

कधीकधी, व्यक्ती एखादी अगदी उदारतेने केलेली कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी कानावर पडते, उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता अचानकपणे दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारी द्वारे खुली होतात. हा देखील तो संकेताचा धागा पकडण्याचा एक प्रकार आहे. हजारो मार्ग आहेत, व्यक्तीने फक्त सावधचित्त असले पाहिजे आणि निरीक्षण केले पाहिजे.

ह्यासाठी सर्वप्रथम स्वत:ला या जाणिवेतील परिवर्तनाची निकड भासली पाहिजे; मला माझ्या ध्येयाप्रत घेऊन जाणारा हाच तो मार्ग आहे हे तुम्ही स्वीकारले पाहिजे आणि एकदा का तुम्ही ते तत्त्व स्वीकारले की, मग तुम्ही जागरुक राहिले पाहिजे. तेव्हा तुम्हाला आढळेल की, खरोखरच तुम्हाला ते गवसते. आणि एकदा का ते गवसले की, कोणतीही चलबिचल न होऊ देता, तुम्ही वाटचालीला सुरुवात केली पाहिजे.

व्यक्तीने आत्मनिरीक्षण करावयास हवे, कायम सावध असावयास हवे, हा प्रारंभबिंदू आहे; तिने सदानकदा उदासीन, अनुत्सुक असू नये; सदोदित अनास्था बाळगू नये.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 101)

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती ह्या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू काही एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ईश्वर काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गाढतर चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हावयाचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तीपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; जेणेकरून ती दिव्य शक्ती आपल्या जाणिवेचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणेल. दिव्यत्वाच्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे. या सत्याचा साक्षात्कार जाणिवेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

मनुष्यप्राण्यामध्ये नेहमीच दोन प्रकारच्या प्रकृती असतात; एक आंतरिक प्रकृती म्हणजे आत्मिक व आध्यात्मिक, जी ईश्वराच्या संपर्कामध्ये असते; आणि दुसरी बाह्य प्रकृती म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक. ह्या बाह्य प्रकृतीचे भरणपोषण अज्ञानामध्ये झालेले असते आणि ही प्रकृती दोष, अपूर्णता, अशुद्धता यांनी भरलेली असते. आणि त्यामुळेच साधनेमध्ये गोष्टी अचानक एका निमिषार्धात बदलू शकत नाहीत.

आंतरिक अनुभूती वाढत जाते, विस्तारत जाते आणि बाह्य प्रकृतीला ती अधिकाधिक व्यापत जाते. पण जोवर ती अनुभूती बाह्य प्रकृतीला पूर्णतया व्यापत नाही तोवर कोठेतरी अपूर्णता शिल्लक राहतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89-90)