Tag Archive for: तत्त्वज्ञान

(श्रीमाताजींनी शारीरिक, प्राणिक आणि मानसिक निरीक्षणाविषयी विवेचन केले आहे. त्यानंतर एकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)

प्रश्न : चैत्यामध्ये निरीक्षण शक्ती असते का?

श्रीमाताजी : त्यामध्ये निरीक्षण क्षमतेपेक्षाही अधिक काही असते. वस्तुंबाबतची थेट दृष्टी तेथे असते. ज्यामध्ये वस्तु प्रतिबिंबित होतात अशा आरशासारखी ती असते, मग त्या वस्तु कोणत्याही का असेनात. आणि सर्वसाधारणत: जी मुले, जी अजूनही निष्पाप असतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता स्पष्टपणे आढळून येते.

उदाहरणार्थ, त्यांच्याजवळ जी माणसं येतात त्यांच्या वातावरणाबद्दल अशी मुलं खूप संवेदनशील असतात. काही मुलं कोणतेही कारण नसताना देखील एखाद्या व्यक्तीकडे झेपावतात आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीपासून दूर पळतात. तुमच्या दृष्टीने ती दोन्ही माणसं सारखीच चांगली किंवा सारखीच वाईट असतात, तुम्हाला त्यात कोणताही फरक जाणवत नाही.

पण ही मुलं मात्र त्यातल्या एखाद्या व्यक्तीकडे ताबडतोब आकर्षित होतात आणि दुसऱ्या व्यक्तीबाबत मात्र, तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती भोकाड पसरतील, रडतील, किंवा त्या व्यक्तीपासून पळून जातील, पण ती मुलं त्या व्यक्तीकडे जाणार नाहीत. हे आकर्षण किंवा प्रतिकर्षण म्हणजे अज्ञानाच्या जाणिवेमध्ये, चैत्य लक्षणाचा झालेला एक प्रकारचा अनुवाद असतो. त्या व्यक्तींच्या चैत्य लक्षणाचे थेट दर्शन त्या बालकाला झालेले असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 08-09)

तुम्ही लहान मुलांच्या डोळ्यांत लक्षपूर्वक पाहा, तेथे तुम्हाला एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काहीजण त्याचे वर्णन निष्पाप असे करतात – परंतु तो प्रकाश खूप खरा असतो, खूपच सत्य असतो, जो या जगाकडे आश्चर्याने टुकूटुकू पाहत असतो.

ही आश्चर्याची भावना, ही चैत्याची (Psychic) आश्चर्यभावना असते, की जी सत्य पाहू शकते पण तिला या जगाविषयी फारसे काही अवगत नसते, कारण ती त्या पासून खूप खूप दूर असते.

लहान मुलांमध्ये ती आश्चर्यभावना असते; परंतु जसजशी मुले शिकू लागतात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिकाधिक शिक्षित होतात, तसतशी ही आश्चर्यभावना मागे पडत जाते आणि मग त्यांच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे विचार, इच्छा-वासना, आवेग, दुष्टपणा अशा साऱ्या गोष्टी दिसू लागतात. तेव्हा मात्र, अत्यंत शुद्ध असणारी ही छोटीशी ज्योत, तेथे असत नाही. अशावेळी तुम्ही निश्चितपणे समजा की, तेथे ‘मना’चा प्रवेश झालेला आहे आणि ‘चैत्य’ हा खूप दूरवर मागे लोटला गेला आहे.

– श्रीअरविंद
(CWM 04 : 26-27)

जे अस्तित्व आपल्यामधील इतर सर्व बाबींना आधार पुरविते आणि जन्म आणि मृत्युच्या फेऱ्यांमधूनही जे टिकून राहते अशा आपल्यातील ईश्वरांशाला, सहसा आपल्या योगामध्ये ‘केंद्रवर्ती अस्तित्व’ अशी संज्ञा वापरण्यात येते.

केंद्रवर्ती अस्तित्वाची दोन रूपे असतात – वरच्या भागात असणारे अस्तित्व म्हणजे जीवात्मा, आपले सत् अस्तित्व. आपल्याला जेव्हा उच्चतर असे आत्म-ज्ञान प्राप्त होते तेव्हा, आपल्याला ह्या अस्तित्वाची जाण येते. खालील भागात, मन, प्राण व शरीर यांच्या पाठीशी उभा असतो तो चैत्य पुरुष.

जीवात्मा हा जीवनामध्ये होणाऱ्या आविष्करणाच्या वर असतो आणि तेथून तो जीवनाचे संचालन करत असतो. तर चैत्य पुरुष हा मागे उभा राहून जीवनाच्या आविष्करणाला आधार पुरवीत असतो.

आपण बालक आहोत, ईश्वराचे मूल आहोत, भक्त आहोत असे वाटणे हा, चैत्य पुरुषाचा स्वाभाविक दृष्टिकोन असतो. चैत्य पुरुष हा ईश्वराचाच एक अंश असतो, तत्त्वत: तो एकच असतो परंतु या आविष्करणाच्या गतिविधींमध्ये या एकत्वामध्येही नेहमीच भिन्नता आढळून येते. या उलट, जीवात्मा, हा साररूपामध्येच जगत असतो आणि तो ईश्वराच्या एकत्वामध्ये स्वत:चा विलय करू शकतो. पण तो सुद्धा ज्या क्षणी जीवनामधील आविष्करणाच्या गतिविधींचे अध्यक्षपद स्वीकारतो, संचालन करू लागतो, त्या क्षणी तो स्वत:ला विविधरूपी ईश्वराच्या अनेक केंद्रांपैकी आपण केवळ एक केंद्र आहोत असे मानू लागतो, तेव्हा तो स्वत:ला परमेश्वर मानत नाही.

हा भेद लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. नाहीतर, जर का कोठेही थोडा जरी प्राणिक अहंकार असेल तर, व्यक्ती स्वत:ला अवतार समजायला लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 61)

*

आत्मा हा त्याच्या प्रकृतीनुसार एकतर विश्वातीत (परमात्मा) (Transcendent) असतो किंवा वैश्विक (आत्मा) (Universal) असतो. जेव्हा तो व्यक्तिरूप धारण करतो आणि केंद्रवर्ती अस्तित्व बनतो, तेव्हा तो जीवात्मा असतो. जीवात्म्याला विश्वाशी एकत्व जाणवत असते पण त्याचवेळी, ईश्वराचा एक भाग या नात्याने त्याला केंद्रीय पृथगात्मकतेची (central separateness) देखील जाणीव असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 55)

जर आपली प्रगती समग्रपणे व्हावी अशी आपली इच्छा असेल तर आपल्या चेतनायुक्त अस्तित्वामध्ये आपण एक बलवान आणि शुद्ध मानसिक समन्वय (Mental Synthesis) घडविले पाहिजे की, जे सर्व बाह्य प्रलोभनांपासून आपले संरक्षण करू शकेल, जे आपल्याला इतस्तत: भटकण्यापासून रोखणाऱ्या मैलाच्या दगडाप्रमाणे असेल, जीवनाच्या या हालत्याडुलत्या सागरामधून जे आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवेल.

प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तीनुसार, आवडीनिवडीनुसार आणि आकांक्षांनुसार स्वत:ची मानसिक संरचना घडविली पाहिजे. पण जर आपल्याला ती संरचना खरोखरच जिवंत आणि प्रकाशमान अशी हवी असेल तर तिची घडण आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ईश्वराचे बौद्धिक प्रतिनिधित्व करणाऱ्या संकल्पनेभोवती झाली पाहिजे. तो ईश्वरच आपले जीवन आणि तो ईश्वरच आपला प्रकाश. ही संकल्पना अनेकविध प्रांतांमध्ये, अनेकानेक युगे सर्व महान गुरुंकडून विविध प्रकारे शिकविण्यात आलेली आहे, ती अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्ध झालेली आहे.

प्रत्येकाचा आत्मा आणि या विश्वाचा महान आत्मा हे एकच आहेत; (ही ती संकल्पना होय.) आपल्या पूर्वसुरींनी योग्य असेच सांगितले आहे की, आपले मूळ आणि आपण, आपला देव आणि आपण हे एकच आहोत. आणि हे एकत्व म्हणजे एकत्वाचे केवळ कमीअधिक जवळचे, घनिष्ठ नाते आहे असे समजता कामा नये, कारण ते खरोखरच एक आहेत.

जेव्हा माणूस त्या दिव्यत्वाला गवसणी घालू पाहतो तेव्हा तो अप्राप्याच्या दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू इच्छितो, तेव्हा तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसाठा आणि त्याच्याकडील अगदी अंतर्ज्ञानसुद्धा त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नव्हे. तसेच त्याला ही जाणीवसुद्धा नसते की, जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते.

जोपर्यंत त्याच्यामध्ये असलेल्या ह्या ‘आद्या’ विषयी तो जागृत होत नाही तोवर त्याला उत्पत्तीविषयी ज्ञान कसे बरे होईल?

स्वत:ला समजून घेतल्यानेच आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यानेच तो परमशोध लावू शकतो आणि तो आश्चर्यचकित होऊन बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे त्या कुल-प्रमुखाप्रमाणे म्हणू शकतो, “देवाचे घर हे इथेच तर होते आणि मला ते माहीतही नव्हते.” म्हणून, ज्या शब्दांमुळे स्वर्ग आणि पृथ्वी भरून जातात असा तो, भौतिक जगताच्या निर्मिकाचा ”मी सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये आहे;” हा जो परमबोध आहे तो आपण अभिव्यक्त केला पाहिजे; ते शब्द सर्वांना माहीत करून दिले पाहिजेत.

जेव्हा सर्वांना हे सारे ज्ञात होईल तेव्हा, ज्या दिवसाचे आश्वासन आपल्याला देण्यात आले आहे तो रूपांतरणाचा दिवस आपल्या अगदी नजीक आलेला असेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)

जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ईश्वराच्या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ईश्वराच्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये देवाला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण ”सर्व प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे कारण ती देवाच्या पुत्रांना (मानवांना) साक्षात्कार होण्याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आमच्या स्मरणात असला पाहिजे.

म्हणून मी आज तुम्हाला ह्या गोष्टींची आठवण करून दिली. एखाद्या दुर्मिळ हिऱ्याप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात ह्या विचाराची जपणूक करून मार्गक्रमण केले आणि त्याला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे काम आपल्यामध्ये करू देण्यास मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे एकत्व आपण अनुभवू शकतो.

तेव्हा आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल; आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जाताना, आपला मंद अहंकार, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी कोसळून पडताना आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंधांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व वाहून जात असल्याचे आपल्याला जाणवेल.

व्यक्तिमधील आत्मा आणि वैश्विक आत्मा हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)

जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे ह्या हेतूने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे ह्याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतूने, आजवर त्याला सत्य वाटत होते अशा विचारांचा (जर तशीच आवश्यकता असेल तर,) परित्याग करण्यासाठी जो तयार झाला आहे; तो हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा प्रचंड विचार-पुंजांच्या संपर्कात येतो.

मग पुष्कळशा ध्यानानंतर, मननानंतर, तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही. त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही त्याचा एक भागच बनून जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवण, जे सारे कधीकधी खूपच विरोधाभासात्मक वाटते, त्या साऱ्या पाठीमागील गहन सत्य त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून काहीच लपून राहू शकत नाही.

अगदी दोष, अज्ञान ह्या गोष्टी सुद्धा त्याला आता अस्वस्थ करत नाहीत, कारण असे कोणा एका अज्ञात अधिकारी व्यक्तीने सांगून ठेवले आहे : जो सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे त्याला कोणताही दोष त्रास देत नाही कारण तो हे जाणून असतो की, ”दोष हा सत्याच्या दिशेने चाललेला जीवनाचा पहिलावहिला प्रयत्न असतो.”

अशा परिपूर्ण धीरगंभीरतेच्या स्थितीप्रत पोहोचणे म्हणजे विचारांच्या शिखरावर जाऊन पोहोचणे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 28)

आध्यात्मिक ज्ञानाचे मन ज्या एकमेव उद्दिष्टाकडे वळले पाहिजे ते उद्दिष्ट म्हणजे शाश्वत परब्रह्म होय. या इथे प्रकृतीच्या धुक्याने परिवेष्टित झालेला आणि अभ्राच्छादित झालेला आत्मा, त्या ‘शाश्वता’वर लक्ष स्थिर करून, स्वत:ची स्वाभाविक असणारी अशी अमर्त्यतेची आणि विश्वातीततेची मूळ चेतना पुन:प्राप्त करून घेऊन, तिचा आनंद घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 415)

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व कृतींचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा व्यक्ती रूपांतरणाविषयी बोलत असे तेव्हा तिला केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही निगूढ चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करावयाचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून धुत्कारत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही निगूढ अशा सत्याची अभिव्यक्ती करावी, अशी त्या सत्याकडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य की, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या सत्याचा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू म्हणजे ग्रहणशीलता, याबद्दल आपण या आधीही बोललो आहोत. रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी ह्यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंतच झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा काहीसे असेच घडून येते. खूप काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची जाणीव नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. जर का तुमच्यापाशी तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोध देखील जाणवतो; जणू काही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही पडत नाही. पण जेव्हा तुम्ही अंतरंगातून सिद्ध झालेला असता तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न – आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 18-19)

प्रश्न : भौतिक जाणिवेमध्ये आणि पूर्णत: भौतिक परिस्थितीमध्ये आपल्याला सदासर्वकाळ अडकवून ठेवणाऱ्या भौतिक जाणिवेमधून बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : ते करण्याचे अगणित मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करावयाची म्हटले तर काहीच हाती लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांपाशी परत येऊन पोहोचतो. ह्यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, ह्या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; ह्या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग रुपांतरित झाल्याविना तसाच शिल्लक राहतो. त्यांच्यासाठी रूपांतरण करणे हा उपाय नसून, परित्याग करणे, शक्य तितक्या त्वरेने या शरीरातून बाहेर पडणे हाच केवळ त्यावरील उपाय असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक जाणिवेचे रूपांतरण हवे आहे, त्याचा परित्याग करणे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा परमेश्वराप्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक बाबींचा व भौतिक जाणिवेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर, भौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 299-300)

चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. पहिल्या प्रथम आरोहण किंवा ऊर्ध्वगमन असते; तुम्ही स्वत:ला जडभौतिक चेतनेमधून काढून, उच्चतर पातळ्यांवरील चेतनेमध्ये वर उचलून घेता. निम्नतर प्रतलामधून उच्चतर प्रतलावर होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर प्रतलावर अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता – कोणतातरी प्रकाश, रुपांतरकारी अशी कोणतीतरी शक्ती, किंवा जुन्या प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणण्याकडे जिचा कल असतो अशा शक्तीचे अवतरण घडवता.

आणि मग, ज्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एकमेकांशी असंलग्न होत्या, एकमेकींपासून विलग होत्या; जसे की, तुमच्यामधील उच्चतर आणि निम्नतर स्तर, तुमच्या व्यक्तित्वाचे आंतरिक आणि बाह्य स्तर ह्या गोष्टी आता एकमेकांना भेटू लागतात, हळूहळू त्या एकमेकांमध्ये मिसळू लागतात आणि कालांतराने एका सुसंवादामध्ये एक सत्य बनून, एकरूप होतात. ज्याला चमत्कार चमत्कार असे म्हणतात ते असे घडून येतात.

हे विश्व चेतनेच्या अगणित स्तरांचे बनलेले आहे आणि त्या प्रत्येक स्तराचे, त्या प्रतलाचे स्वत:चे असे काही खास नियम असतात, कायदे असतात; एका स्तराचे कायदे दुसऱ्याला लागू पडत नाहीत. चमत्कार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अचानक घडून आलेले अवतरण असते; एका वेगळ्या स्तरावरील चेतनेचे आणि तिच्या शक्तींचे उसळून येणे असते. बहुधा या प्राणिक शक्ती असतात आणि त्यांचे या जडभौतिक स्तरावर अवतरण होते. जडभौतिक यंत्रणेवर उच्चतर स्तरावरील यंत्रणेकडून वर्षाव होतो. जणू काही एका वीजकल्लोळाद्वारे आपल्या सामान्य चेतनेचे ढग भेदले जातात आणि त्यामध्ये उच्चतर शक्तींचा, गतिविधींचा, प्रवाहांचा वर्षाव होतो. आणि त्या परिणामाला आपण चमत्कार म्हणतो. कारण आपल्याला अचानक झालेला बदल दिसतो; आपल्या सामान्य पातळीवरील निसर्गकायद्यामध्ये आकस्मिक हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो पण आपल्याला त्याचा क्रम, ती व्यवस्था, त्याचे कारण काय हे काहीच कळत नाही, दिसू शकत नाही कारण त्या चमत्काराचा स्रोत हा एका वेगळ्या स्तरावर असतो.

आपल्या जडभौतिक विश्वामध्ये त्यापलीकडील जगतांचा असा हस्तक्षेप होणे ही फार काही जगावेगळी घटना नाही, किंबहुना अशा घटना या सतत इंद्रियगोचर सुद्धा असू शकतात; आपल्याला त्या पाहण्याची दृष्टी असेल आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे ह्याची जाण जर आपल्याला असेल तर असे पुष्कळ चमत्कार आपल्याला पदोपदी दिसू शकतील. विशेषत: उच्चतर स्तरावरील वैभवाचे, पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांच्याबाबतीत तर ती नित्याची बाब असू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 29-31)