Tag Archive for: तत्त्वज्ञान

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

आत्मसाक्षात्कार – ०४

साधक : माताजी, ‘ईश्वराचा साक्षात्कार होणे’ याचा नेमका काय अर्थ आहे ?

श्रीमाताजी : स्वत:च्या अंतरंगात असणाऱ्या किंवा आध्यात्मिक शिखरावर असणाऱ्या ‘ईश्वरी उपस्थिती’बाबत सजग होणे, सचेत होणे आणि एकदा का तुम्ही त्या ईश्वरी उपस्थितीबाबत सचेत झालात की, ईश्वराच्या इच्छेव्यतिरिक्त, तुमची स्वतःची अशी कोणतीही स्वतंत्र इच्छा शिल्लक राहणार नाही, इतक्या पूर्णपणे त्याला समर्पित होणे आणि अंतिमतः स्वत:ची चेतना ही त्याच्या चेतनेशी एकरूप करणे, याला म्हणतात ‘ईश्वराचा साक्षात्कार’!

*

‘ईश्वराचा साक्षात्कार’ होणे अशक्य आहे असा या जगात कोणीही नाही. मात्र काही जणांना त्यासाठी अनेक जन्म लागतील, तर काहीजण अगदी याच जन्मामध्ये तो साध्य करून घेऊ शकतील. हा इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. इथे निवड तुम्ही करायची असते. पण मी हे निश्चितपणे सांगेन की, सद्यकालीन परिस्थिती त्यासाठी विशेष अनुकूल आहे.

– श्रीमाताजी (CWM 16 : 409-410)

आत्मसाक्षात्कार – ०३

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ म्हणतात. अशा प्रकारे वैयक्तिक, सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्व्यक्तिक, निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतानासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे आणि युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात असतानादेखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनयुक्त प्रयत्न करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे मग पुढे, अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसं खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकुर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल, इतकेच.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

आत्मसाक्षात्कार – ०२

आपल्यासाठी ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.

१) सर्व वस्तुंच्या व व्यक्तींच्या अंतरंगामध्ये व पाठीमागे असणारे ‘चैतन्य’ आणि ‘विश्वात्मा’ म्हणजे ‘ईश्वर’. ज्याच्यापासून आणि ज्याच्यामध्ये विश्वातील सर्वाचे आविष्करण झाले आहे तो म्हणजे ईश्वर. सद्यस्थितीत हे आविष्करण अज्ञानगत असले तरीसुद्धा ते ईश्वराचेच आविष्करण आहे.

२) आपल्या अंतरंगातील, आपल्या अस्तित्वाचा ‘स्वामी’ व ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. आपण त्याची सेवा केली पाहिजे; आपण आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला शिकले पाहिजे, तसे केल्यामुळे आपल्याला अज्ञानामधून प्रकाशाकडे उन्नत होता येईल.

३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान आणि शक्ती आहे. त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या प्रकाशाकडे आपण उन्नत झाले पाहिजे; तसेच त्याची सत्यता आपण आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक उतरविली पाहिजे.

सर्वसाधारण जीवनात आपण अज्ञानामध्ये जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती (undivine forces) असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना व अचेतनेचा एक पडदा विणतात आणि त्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ म्हणजे काय हे जाणते आणि त्यामध्ये जाणिवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर व सखोल चेतनेमध्ये प्रविष्ट व्हायचे असेल तर, आपण कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या क्रियेसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे. तसे केल्याने ती दिव्य शक्ती, आपल्या चेतनेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर घडवून आणेल.

ही आहे ‘ईश्वरा’ची, ‘दिव्यत्वा’ची संकल्पना आणि तिच्यापासून आपण प्रारंभ केला पाहिजे. दिव्यत्वाच्या सत्याचा साक्षात्कार, चेतना खुली होण्याने आणि तिच्या परिवर्तनामुळेच होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – २९०

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते.

जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा ज्याला ‘परिसरीय चेतना’ (environmental consciousness) असे म्हणता येईल, त्यामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेथून त्या काही काळपर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतात किंवा तेथून ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत, चेतनेवर दबाव टाकतात.

त्या (इच्छावासना) परिसरीय चेतनेमधून येत असतील तर त्या विचार-सूचनांचे किंवा आवेगांचे रूप घेतात किंवा मग त्यांचा अस्वस्थ करणारा एक अंधुकसा दबाव व्यक्तीला जाणवतो. त्या जर अवचेतनामध्ये गेल्या असतील तर तेथून त्या बरेचदा स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात, परंतु त्या जागृतावस्थेत सुद्धा पृष्ठभागावर येऊ शकतात.

जेव्हा शरीर नव-चेतनामय झालेले असते आणि त्याच वेळी त्याच्या ठायी ‘दिव्य शांती’ आणि ‘दिव्य शक्ती’ असते तेव्हा, व्यक्तीला बाह्यवर्ती दबावाची जाणीव होते परंतु त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होत नाही आणि मग (शारीर-मनावर किंवा शरीरावर तत्काळ दबाव न टाकता) तो दबाव सरतेशेवटी (व्यक्तीपासून) दूर निघून जातो किंवा मग तो हळूहळू किंवा त्वरेने नाहीसा होतो.

मी ज्याला ‘परिसरीय चेतना’ असे संबोधतो ती चेतना प्रत्येक मनुष्य, त्याच्या नकळत, स्वतःच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूस, सभोवार वागवत असतो आणि या परिसरीय चेतनेच्या माध्यमातून तो इतरांच्या आणि वैश्विक शक्तींच्या संपर्कात असतो. या चेतनेद्वारेच इतरांच्या भावना, विचार इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. याच चेतनेद्वारे वैश्विक शक्तींच्या लहरी म्हणजे इच्छावासना, लैंगिकता इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. आणि व्यक्तीच्या मन, प्राण व शरीराचा ताबा घेतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 601)

साधना, योग आणि रूपांतरण – २८९

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते म्हणजे खरंतर, तुमच्या (subconscient) अवचेतनामधून वर आलेल्या गतकालीन रचना होत्या किंवा त्यांचे ठसे होते. आपण जीवनामध्ये जे जे काही करतो, आपल्याला जे जाणवते किंवा ज्याचा आपण अनुभव घेतो, त्या सगळ्यांचा काही एक ठसा, एक प्रकारची मूलभूत स्मृती अवचेतनामध्ये जाऊन बसते आणि आपल्या सचेत अस्तित्वामधून त्या (जुन्या) भावना, वृत्तीप्रवृत्ती किंवा ते अनुभव पुसले गेले तरी त्यानंतरही दीर्घ काळपर्यंत ते स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात. अनुभव जेव्हा नुकतेच घडून गेलेले असतात किंवा मन वा प्राणामधून ते अगदी नुकतेच फेकले गेलेले असतात, त्यांच्यापेक्षाही या जुन्या गोष्टी आधिक्याने पृष्ठभागावर येतात.

आपण आपल्या जुन्या परिचितांविषयी किंवा नातेवाईकांविषयी विचार करणे थांबविल्यानंतरसुद्धा दीर्घ काळ त्यांच्याबद्दलची स्वप्नं ही अवचेतनामधून पृष्ठभागावर येत राहतात. त्याचप्रमाणे, सचेत प्राणाला जरी आता, लैंगिकतेचा किंवा रागाचा त्रास होत नसला तरीसुद्धा लैंगिकतेबद्दलची किंवा राग आणि भांडणतंट्यांची स्वप्नं पडू शकतात.

अवचेतन शुद्ध झाल्यानंतरच ती स्वप्नं पडायची थांबतात. परंतु तोपर्यंत म्हणजे व्यक्ती त्या जुन्या गतिप्रवृत्ती जागृतावस्थेमध्ये टिकून राहण्यास किंवा जागृतावस्थेमध्ये पुन्हापुन्हा घडण्यास संमती देत नसेल (त्या स्वप्नांचे स्वरूप काय हे व्यक्तीला समजत असेल आणि त्यामुळे तिच्यावर त्यांचा परिणाम होत नसेल तर) ती स्वप्नं तितकीशी महत्त्वाची ठरत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 606)

साधना, योग आणि रूपांतरण – २८८

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी अवचेतनावर कार्य करत होते. त्याचा संदर्भ येथे आहे.)

अवचेतनामधील (subconscient) साधनेचे हे कार्य व्यक्तिगत स्वरूपाचे नसून, ते सार्वत्रिक स्वरूपाचे असते. पण निश्चितच त्याचा येथील (श्रीअरविंद-आश्रमातील) प्रत्येकावर काही ना काही प्रमाणात परिणाम होत आहे. अवचेतनामध्ये चेतना व प्रकाश उतरविला नाही तर त्यामध्ये काहीही परिवर्तन होऊ शकणार नाही. कारण या अवचेतनामध्येच सर्व जुन्या कनिष्ठ प्राणिक उपजत प्रेरणांची आणि वृत्तीप्रवृत्तींची बीजे दडलेली असतात. आणि कनिष्ठ प्राणामधून या उपजत प्रेरणा व वृत्तीप्रवृत्ती काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या प्रवृत्ती खालून (अवचेतनामधून) पुन्हा डोकं वर काढतात.

तसेच अवचेतना हीच शारीर-चेतनेचा गुप्त आधार देखील असतो. अवचेतनाने स्वतःमध्ये उच्चतर चेतनेला आणि सत्य-प्रकाशाला प्रवेश करू देणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 611-612)

साधना, योग आणि रूपांतरण – २८६

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनाचा प्रांत (subconscient) हा अंधकारमय आणि अज्ञानमय प्रांत असतो आणि त्यामुळे तेथे प्रकृतीच्या अंधकारमय गतिप्रवृत्तींची ताकद अधिक प्रबळ असणे, हे स्वाभाविक आहे. कनिष्ठ प्राणापासून (lower vital) खाली असणाऱ्या प्रकृतीच्या इतर सर्व कनिष्ठ भागांच्या बाबतीतही हे तितकेच खरं आहे. परंतु अगदी क्वचितच, या भागाकडून चांगल्या गोष्टीसुद्धा पृष्ठभागावर पाठविल्या जातात.

अवचेतनाचा प्रांत हा (सद्यस्थितीत) कनिष्ठ उपजत गतिप्रवृत्तींचा पाया आहे, मात्र साधनेच्या वाटचालीमध्ये (साधकाने) त्यास प्रकाशित करणे आणि शारीर- प्रकृतीमध्ये त्यास उच्चतर चेतनेचा आधार बनविणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 611)

साधना, योग आणि रूपांतरण – २८५

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

आपल्या शरीरामध्ये उच्चतर चेतना जेथून उतरते, तो अतिचेतनाचा (superconscient) प्रांत आपल्या डोक्याच्या वर (आपल्या वर्तमान चेतनेच्या वर) असतो, त्याचप्रमाणे (आपल्या वर्तमान चेतनेच्या खाली) आपल्या पावलांच्या खाली अवचेतनाचा (subconscient) प्रांत असतो.

जडभौतिकाची (Matter) निर्मिती ही अवचेतनामधून झालेली असल्यामुळे, जडभौतिक हे या शक्तीच्या नियंत्रणाखाली असते. आणि असे असल्यामुळे आपल्याला जडभौतिक हे काहीसे अचेतन, चेतनाविहीन (unconscious) असल्यासारखे वाटते. याच कारणामुळे जडभौतिक शरीर (material body) हे अवचेतनाच्या शक्तीच्या प्रभावाखाली असते. आणि म्हणूनच, आपल्या शरीरामध्ये काय चाललेले असते याविषयी आपण बहुतांशी प्रमाणात सचेत (conscious) नसतो.

आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपली बाह्यवर्ती चेतना या अवचेतनामध्ये उतरते आणि म्हणून आपण झोपलेलो असताना आपल्यामध्ये काय चाललेले असते याची आपल्याला, काही थोड्या स्वप्नांचा अपवाद वगळता, जाणीव नसते. त्यापैकी बरीचशी स्वप्नं या अवचेतनामधून पृष्ठभागी येतात. जुन्या स्मृती, आपल्या मनावर उमटलेले ठसे इत्यादी गोष्टी असंबद्ध रीतीने एकत्र येऊन ही स्वप्नं तयार होतात. आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही करतो किंवा जे काही अनुभवतो त्याचे प्रभाव अवचेतनाकडून ग्रहण केले जातात आणि त्यामध्ये ते साठवून ठेवले जातात. झोपेमध्ये त्यातील काही अंशभाग बरेचदा पृष्ठभागावर पाठविले जातात.

अवचेतन हा व्यक्तित्वाचा एक अगदी महत्त्वाचा भाग असतो परंतु आपल्या सचेत संकल्पशक्तीद्वारे आपण त्यामध्ये फार काही करू शकत नाही. आपल्यामध्ये कार्यकारी असणारी उच्चतर ‘शक्ती’ ही तिच्या स्वाभाविक क्रमानुसार अवचेतनास स्वतःप्रति खुले करेल आणि त्यामध्ये स्वतःचा प्रकाश पोहोचवेल आणि नियंत्रण प्रस्थापित करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 599-600)

साधना, योग आणि रूपांतरण – २७३

शरीराचे रूपांतरण

हट्टीपणा हा शारीर-मनाचा (physical mind) स्वभावधर्म असतो. एकाच गोष्टीची सातत्याने पुनरावृत्ती करत राहण्यामुळे ही शारीर-प्रकृती टिकून राहते. एवढेच की, त्या गोष्टीचे विविध रूपांद्वारे सातत्याने सादरीकरण, प्रस्तुती होत राहते. जेव्हा शारीर-प्रकृती कार्यरत असते तेव्हा, ही हटवादी पुनरावृत्ती हा तिच्या प्रकृतीचा एक भाग असतो, पण ती जेव्हा कार्यरत नसते तेव्हा ती सुस्त, जड असते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला शारीर-प्रकृतीच्या जुन्या वृत्तीप्रवृत्तींपासून सुटका करून घ्यायची असते तेव्हा त्या प्रवृत्ती अशा प्रकारच्या हटवादी पुनरावृत्तीने प्रतिकार करतात. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी व्यक्तीने नकार देण्याच्या बाबतीत खूप चिकाटी बाळगली पाहिजे.

सर्व प्रकारच्या ‘प्रकृती’ प्रमाणे शारीर-‘प्रकृती’चेही व्यक्तिगत आणि वैश्विक असे दोन पैलू असतात. व्यक्तीमध्ये सर्व गोष्टी वैश्विक प्रकृतीकडून येतात. परंतु व्यक्तिगत शारीर-प्रकृती त्यांच्यापैकी काही गोष्टींचेच जतन करते व इतर गोष्टी नाकारते आणि ती ज्या गोष्टी जतन करून ठेवते त्यांना ती वैयक्तिक रूप देते… परंतु व्यक्तीला जेव्हा त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची असते तेव्हा व्यक्ती अंतरंगामध्ये (साचलेले) जे काही असते ते आधी सभोवतालच्या ‘प्रकृती’ मध्ये फेकून देते. आणि तेथून मग वैश्विक ‘प्रकृती’ त्या गोष्टी परत आत आणण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्या जागी तिच्या स्वतःच्या अशा काही नवीन किंवा तत्सम गोष्टी आणते. व्यक्तीला या आक्रमणास सातत्याने थोपवून धरावे लागते, नकार द्यावा लागतो. सतत दिलेल्या नकारामुळे, सरतेशेवटी पुनरावृत्तीची शक्ती क्षीण होते आणि मग व्यक्ती मुक्त होते आणि उच्चतर चेतना व तिच्या गतिप्रवृत्ती शारीरिक अस्तित्वामध्ये उतरवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 361)