Tag Archive for: तत्त्वज्ञान

मनुष्याच्या खऱ्या, अगदी आंतरतम, उच्चतम आणि विशालतम अशा ‘स्व’च्या आणि ‘आत्म्या’च्या चेतनेवर आधारलेले, एक नूतन आणि महत्तर आंतरिक जीवन हा ‘आध्यात्मिकते’चा अर्थ आहे.

हे असे जीवन असते की, ज्यायोगे मनुष्य त्याचे समग्र अस्तित्व एका वेगळ्या भूमिकेतून स्वीकारतो. समग्र अस्तित्व हे त्याच्या आत्म्याचे या विश्वामधील एक प्रगमनशील (progressive) आविष्करण आहे, अशा भूमिकेतून तो ते स्वीकारतो. आणि ज्यामध्ये दिव्य चेतना गवसेल अशा प्रकारच्या संभाव्य रूपांतरणाचे एक क्षेत्र म्हणजे त्याचे स्वतःचे जीवन आहे अशा भूमिकेतून मनुष्य ते जीवन स्वीकारतो.

ज्यामध्ये त्याच्यामधील सर्व क्षमता या अत्युच्च स्तरावर विकसित झालेल्या असतील; आत्ता अपूर्ण स्वरूपात असणाऱ्या रूपांचे दिव्य पूर्णत्वाच्या प्रतिमेमध्ये परिवर्तन झालेले असेल आणि त्याच्या व्यक्तित्वाच्या महत्तर शक्यता दृष्टिपथात येण्यासाठीच नव्हे तर, त्या शक्यता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याच्याकडून प्रयत्न केला जाईल, अशा भूमिकेतून मनुष्य ते जीवन स्वीकारतो.

– श्रीअरविंद [CWSA 26 : 270]

मन आणि प्राण यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठतर अशा कोणत्यातरी गोष्टीचे अभिज्ञान (recognition) होणे; आपल्या सामान्य मानसिक आणि प्राणिक प्रकृतीच्या अतीत असणाऱ्या विशुद्ध, महान, दिव्य चेतनेप्रत अभीप्सा असणे; आपल्या कनिष्ठ घटकांच्या क्षुद्रतेमधून आणि त्यांच्या बंधनातून बाहेर पडून, आपल्या अंतरंगामध्ये गुप्त रूपाने वसत असलेल्या महत्तर गोष्टीच्या दिशेने, मनुष्यामधील अंतरात्म्याचा उदय आणि त्याचे उन्नयन होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’!

– श्रीअरविंद [CWSA 20 : 121]

‘आध्यात्मिकता’ म्हणजे उच्च दर्जाची बुद्धिमत्ता नव्हे, आदर्शवादही नव्हे, मनाचा तो नैतिक कलही नव्हे किंवा नैतिक शुद्धता आणि तपस्यादेखील नव्हे; आध्यात्मिकता म्हणजे धार्मिकता नव्हे किंवा एक आवेशयुक्त आणि उदात्त भावनिक उत्कटताही नव्हे, किंवा वरील सर्व उत्तम गोष्टींचा समुच्चयही नव्हे. आध्यात्मिक उपलब्धी आणि अनुभूती म्हणजे एक मानसिक विश्वास, पंथ किंवा श्रद्धा, एक भावनिक आस, धार्मिक किंवा नैतिक सूत्रांना अनुसरून केलेले वर्तनाचे नियमन देखील नव्हे. या सर्व गोष्टींना मनाच्या आणि जीवनाच्या दृष्टीने मोठेच मोल असते. त्यांना आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीनेही थोडेफार मोल असते. शिस्त लावणाऱ्या, शुद्धीकरण घडविणाऱ्या किंवा प्रकृतीला सुयोग्य आकार देणाऱ्या, पूर्वतयारी घडविणाऱ्या प्रक्रिया म्हणून त्यांचे काही विशिष्ट मोल असते; परंतु तरीसुद्धा त्या प्रक्रियांची गणना ‘मानसिक विकासा’च्या या प्रकारामध्येच होते. तेथे अजूनपर्यंत आध्यात्मिक साक्षात्कार, अनुभूती किंवा परिवर्तन या गोष्टींची सुरूवात झालेली नसते.

साररूपाने सांगायचे तर, आपल्या अस्तित्वाच्या आंतरिक वास्तवाबद्दल जाग येणे; आपल्या मन, प्राण आणि शरीर या सगळ्यांहून भिन्न असणाऱ्या चैतन्याविषयी, ‘स्व’ विषयी, आत्म्याविषयी जाग येणे; ते जाणण्याची, ते अनुभवण्याची आणि तेच बनण्याची एक आंतरिक अभीप्सा निर्माण होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’! या विश्वाला व्यापून असणाऱ्या आणि त्याच्याही अतीत असणाऱ्या तसेच, खुद्द आपल्या अंतर्यामी निवास करणाऱ्या एका महत्तर ‘सत्या’च्या (Reality) संपर्कात येणे, ‘त्या’च्याशी भावैक्य होणे, ‘त्या’च्याशी एकात्म पावणे आणि त्या ऐक्याचा, त्या संपर्काचा आणि त्या अभीप्सेचा परिणाम म्हणून आपले समग्र अस्तित्व त्याच्याकडे वळणे, आपल्या अस्तित्वाचे परिर्वतन घडणे आणि रूपांतरण घडणे; एका नवीन संभूतीमध्ये (becoming), एका नवीन अस्तित्वामध्ये, एका नवीन आत्मत्वामध्ये, एका नवीन प्रकृतीमध्ये जागृत होणे किंवा वृद्धिंगत होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’!

– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 889-890]

अहंकाराव्यतिरिक्त आणखी एका चेतनेविषयी जेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते आणि त्या चेतनेमध्ये तुम्ही जीवन जगायला सुरूवात करता किंवा अधिकाधिक रीतीने तुम्ही त्या चेतनेच्या प्रभावात जीवन जगू लागता तेव्हा ती ‘आध्यात्मिकता’ असते.

ही चेतना व्यापक, अनंत, स्वयंभू, अहंकारविरहित अशी असते, या चेतनेला चैतन्य (‘आत्मा, ब्रह्म, ईश्वर’) या नावांनी ओळखले जाते, आणि हाच अनिवार्यपणे ‘आध्यात्मिकते’चा अर्थ असला पाहिजे.

– श्रीअरविंद [SABCL 23 : 877]

सामान्य मानवी जीवन हे सर्वसामान्य मानवी चेतनेचे असे जीवन असते की जे, स्वत:च्या खऱ्या ‘स्व’ पासून तसेच ‘ईश्वरा’ पासून विभक्त झालेले असते आणि मन, प्राण, शरीर यांच्या सामान्य सवयींद्वारे, म्हणजेच अज्ञानाच्या नियमांद्वारे या जीवनाचे नेतृत्व केले जाते.

…या उलट, आध्यात्मिक जीवन चेतनेच्या परिवर्तनाद्वारे थेटपणे वाटचाल करत असते. स्वत:च्या खऱ्या ‘स्व’ पासून आणि ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेल्या, अज्ञानी अशा सामान्य चेतनेकडून एका महान चेतनेकडे ही वाटचाल होत असते. या महान चेतनेमध्ये व्यक्तीला स्वतःचे खरेखुरे अस्तित्व सापडते आणि व्यक्ती प्रथमतः ‘ईश्वरा’च्या प्रत्यक्ष व चैतन्यमय संपर्कात येते आणि नंतर त्या ईश्वराबरोबर एकत्व पावते.

आध्यात्मिक साधकाच्या दृष्टीने हे चेतनेचे परिवर्तन हीच एकमेव अशी गोष्ट असते की जी मिळविण्यासाठी व्यक्ती धडपडत असते, अन्य कोणत्याही गोष्टीची तिला मातब्बरी वाटत नसते.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 419]

आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठभागावरच जीवन जगत असल्याने, आपल्याला केवळ या पृष्ठवर्ती चेतनेचेच भान असते. ही पृष्ठवर्ती चेतना (माणसामधील सर्वसाधारण जाग्रत मन) म्हणजेच आपण आहोत, समग्रत्वाने आपण आहोत असे आपल्याला वाटत असते, कारण आपण केवळ त्या पृष्ठवर्ती भागावरच जाग्रत असल्याने आपल्याला फक्त त्याचीच जाणीव असते.

पण अंतरंगामध्ये, आंतरिक अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांच्या दरम्यान गूढतेची किंवा विस्मृतीची एक प्रकारची भिंत असते; एक आंतरिक अस्तित्व (Inner being) – आंतरिक मन, प्राण, शरीर असते आणि आंतरतम भागामध्ये चैत्य पुरुष (an Inmost or Psychic being) असतो; मात्र आपण या साऱ्यांविषयी अनभिज्ञ असतो. तेथून पृष्ठभागावर जे जे काही येते फक्त त्याचीच जाणीव आपल्याला असते; त्याचा उगम कोठे आहे किंवा ते पृष्ठभागावर कोठून, कसे आले याविषयी आपल्याला काहीच माहीत नसते.

‘योगसाधने’तून ती भिंत हळूहळू ढासळू लागते आणि आपल्याला आपल्यातील आंतरिक आणि आंतरतम अशा अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. असे केल्यामुळे आपल्यामध्ये जी एक नवीन ‘योगमय’ चेतना निर्माण होते त्या चेतनेला सभोवती असलेल्या वैश्विक चेतनेशी आणि वर असलेल्या उच्चतर आध्यात्मिक चेतनेशी थेट संपर्क साधणे शक्य असते.

ज्याप्रमाणे व्यक्तीकडे स्वत:ची अशी चेतना असते, त्याचप्रमाणे वैश्विक चेतना, वैश्विक ‘अस्तित्व’, वैश्विक ‘मन’, वैश्विक ‘प्राण’, वैश्विक भौतिक जाणीवयुक्त ‘प्रकृती’ देखील असते. आपण आपल्या बाह्य शारीर अस्तित्वामध्येच कोंडून पडल्यामुळे आपण त्या साऱ्याविषयी अनभिज्ञ असतो.

आंतरिक जागृतीमुळे आणि ऊर्ध्वमुख विकसनामुळे वैश्विक चेतना, वैश्विक ‘प्रकृती’, वैश्विक ‘आत्मा’ आणि त्याच्या हालचालींविषयी आपण जागृत होतो; आपली चेतना व्यापक होऊन, आपण त्या वैश्विक चेतनेशी तद्रूप होऊ शकतो. वैश्विक ‘प्रकृती’च्या शक्ती सातत्याने आपल्यावर कार्य करत असतात. वैश्विक प्रकृतीच्या शक्ती कशा कार्य करतात याची आपल्याला कल्पनादेखील नसते किंवा आपल्यावर चालणाऱ्या त्यांच्या कार्यावर आपण नियंत्रणही ठेवू शकत नाही. विश्वप्रकृतीविषयी सचेत झाल्यानेच आपण त्यांचे कार्य ओळखू शकतो आणि त्यावर नियंत्रणही मिळवू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 19-20)

मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत कारण, या जीवनात कधीच गवसू शकणार नाहीत अशा उच्चतर गोष्टींची ते या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच लोकांसाठी ‘पूर्णयोग’ आहे.

ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वत:ला विचारत राहतात आणि तरीही ज्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, कोणतीही निश्चित अशी उत्तरे त्यांना गवसत नाहीत, अशा लोकांचीच ‘पूर्णयोगा’साठी तयारी झालेली असते.

मानवजातीच्या भवितव्याची ज्यांना काळजी आहे आणि विद्यमान व्यवस्थेबाबत जे समाधानी नाहीत अशा लोकांना हमखासपणे जे प्रश्न पडत राहतात, अशा मूलगामी प्रश्नांची एक मालिकाच असते. ते प्रश्न साधारणपणे असे असतात :

मरायचेच असेल तर व्यक्ती जन्मालाच का येते?

दु:खभोग सहन करण्यासाठीच का व्यक्ती जीवन जगत असते?

जर वियोग होणारच असेल तर व्यक्ती प्रेमच का करते?

चुका करण्यासाठीच व्यक्ती विचार करते का?

चुका करण्यासाठीच का व्यक्ती कृती करते?

याचे स्वीकारार्ह असे एकमेव उत्तर आहे की, गोष्टी जशा असायला हव्यात तशा त्या नाहीत. मात्र हे विरोधाभास अटळ आहेत असे नाही, तर ते सुधारता येण्यासारखे आहेत आणि एक ना एक दिवस ते विरोधाभास नाहीसे होतीलच. जग आज जसे आहे त्यावर काही उपायच नाही असेही नाही.

ही पृथ्वी अशा एका संक्रमणकाळात आहे की, जो काळ मानवाच्या तोकड्या चेतनेला खूप दीर्घ भासतो पण शाश्वत चेतनेच्या दृष्टीने तो एखाद्या परमाणु इतका अल्प असतो. एवढेच नव्हे तर, अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाबरोबर हा संक्रमणकाळसुद्धा संपुष्टात येईल. त्यावेळी विरोधाभास सुसंवादामध्ये आणि विरोध हा समन्वयामध्ये परिवर्तित होईल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)

‘पूर्णयोग’ म्हणजे भौतिक जीवनापासून पलायन नव्हे, की जे त्याला त्याच्या नशिबावर अपरिवर्तनीय रुपात, आहे तसेच सोडून देते; किंवा कोणत्याही निर्णायक बदलाची आशासुद्धा न बाळगता, भौतिक जीवनाचा ते जसे आहे तसाच स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे, किंवा विश्व हे ‘ईश्वरी इच्छे’चे अंतिम आविष्करण आहे असे मानून, विश्वाचा स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे.

सामान्य मानसिक चेतनेपासून, अतिमानसिक आणि दिव्य चेतनेपर्यंत असणाऱ्या चेतनेच्या सर्व श्रेणी चढत जाणे आणि जेव्हा हे आरोहण पूर्णत्वाला पोहोचेल तेव्हा या भौतिक विश्वामध्ये पुन्हा परत येणे आणि – पृथ्वी क्रमश: ईश्वरीय आणि अतिमानसिक विश्वामध्ये परिवर्तित व्हावी या हेतुने – प्राप्त करून घेतलेल्या त्या अतिमानसिक शक्तीनिशी व चेतनेनिशी, हे भौतिक विश्व प्रेरित करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.

 

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

श्रीअरविंदांच्या जन्मापर्यंत, अध्यात्म आणि धर्म हे भूतकाळातील व्यक्तिमत्त्वांभोवती, विभूतींभोवती केंद्रित झालेले होते, आणि ‘पृथ्वीवरील जीवनास नकार’ या उद्दिष्टाकडे ते निर्देश करीत असत. तेव्हा, तुम्हाला दोन पर्यायामधून एकाची निवड करावी लागे : सुखदुःख, आनंद व दु:खभोग यांच्या रहाटगाड्यामध्ये फिरत असलेले, आणि तुम्ही योग्य आचरण केले नाहीत तर, नरकवासाची धमकी देणारे ‘इहलोका’तील जीवन हा एक पर्याय आणि दुसऱ्याच विश्वामध्ये, ‘परलोका’मध्ये पलायन, स्वर्ग, निर्वाण, मोक्ष हा दुसरा पर्याय असे…

या दोहोंमधून एकाची निवड करायची झाली तर निवडीसाठी फारसा वावच नसे, कारण दोन्ही पर्याय तितकेच वाईट असत. या मूलभूत चुकीमुळेच भारतामध्ये दुर्बलता आली, भारताचे अवमूल्यन झाले, हे श्रीअरविंदांनी आपल्याला सांगितले…

या पार्थिव जीवनापासून पलायन करून सत्य गवसणार नाही तर त्यामध्येच राहून, त्याचे परिवर्तन करून, त्याला ‘दिव्य’ बनविण्यामध्येच सत्य सामावलेले आहे; असे केल्याने या ‘भौतिक जगा’मध्येच ‘ईश्वरा’चे आविष्करण घडून येईल, हे श्रीअरविंदांनी दाखवून दिले.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 210-211)

*

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधला पाहिजे. पण येथे व्यक्तीने एक चूक करता कामा नये; ती म्हणजे तो मार्ग ‘तर्कबुद्धी’ने ‘शोधता’ कामा नये, तर तो मार्ग ‘अभीप्से’च्या (Aspiration) आधारे ‘शोधला’ पाहिजे. अभ्यास आणि विश्लेषण यांद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलचा (Inner opening) प्रामाणिकपणा यांच्या माध्यमातून तो मार्ग शोधला पाहिजे.

व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे जेव्हा त्या आध्यात्मिक ‘सत्या’प्रतिच अभिमुख झालेली असते, – मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, निरपवाद, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो. अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट होते. आणि अशा रीतीने वाटचाल केल्यास, व्यक्तीकडून कोणतीही चूक होण्याची शक्यता उरत नाही….

हे तुमच्यासाठी चांगले असते, हेच केवळ आवश्यक असते. मात्र ती काहीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील तुम्ही जेव्हा ती इतरांवर लादू पाहता तेव्हा ती मिथ्या बनते…

…मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत मात्र प्रत्येकाने स्वत:चाच मार्ग अनुसरला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल केली पाहिजे.

अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे; ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 406-407)