Tag Archive for: तत्त्वज्ञान

आत्मसाक्षात्कार – २६

(मागील भागावरून पुढे…)

तुम्ही आत्म्यामध्ये मुक्त व्हा आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये स्वतंत्र व्हाल. कारण चैतन्य म्हणजे स्वातंत्र्य.

तुम्ही ईश्वर आणि सर्व जिवांशी एकरूप व्हा. तुम्ही तुमच्या क्षुद्र अहंकारामध्ये नव्हे तर, आत्म्यामध्ये राहून जीवन जगा. कारण चैतन्य म्हणजे एकत्व.

तुम्ही मृत्युवर विश्वास ठेवू नका. ‘स्व’ बना, अमर्त्य व्हा; कारण मृत्यू तुमच्या शरीराचा होतो, तुमचा नव्हे. कारण चैतन्य म्हणजे अमर्त्यत्व.

अमर्त्य असणे म्हणजे तुमचे अस्तित्व, तुमची चेतना आणि तुमचा आनंद अनंत असणे; कारण चैतन्य हे अनंत असते आणि सांत गोष्टी (finite) या केवळ अनंततेमुळेच जीवित असतात.

(स्वातंत्र्य, एकत्व, अमर्त्यत्व, अनंतत्व) या गोष्टी म्हणजे तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी बनू शकता; कारण या गोष्टी म्हणजे जर तुम्ही नसता, तर त्या गोष्टी म्हणजे तुम्ही कधीच बनू शकला नसतात. जे तुमच्या अंतरंगात असते, केवळ त्याचेच तुमच्या अस्तित्वामध्ये प्रकटीकरण होऊ शकते. मात्र तुम्ही आहात त्यापेक्षा काहीतरी वेगळेच (म्हणजे बद्ध, विभक्त, मर्त्य, सीमित) असल्याचे तुम्ही दिसता.

आणि मग, जर का (स्वातंत्र्य, एकत्व, अमर्त्यत्व, अनंतत्व या गोष्टी म्हणजे तुम्ही आहात) तर, तुम्ही दृश्य रूपांचे गुलाम होऊन का राहावे बरे? (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 151)

आत्मसाक्षात्कार – २५

(मागील भागावरून पुढे…)

इथे तुम्ही कोणतीही चूक करता कामा नये. कारण ही चूक म्हणजे स्वतःला न जाणणे. तीच तुमच्या सर्व दुःखांचे उगमस्थान असते आणि तुमच्या सर्व अध:पतनाचे कारण असते.

तुम्हाला जो ‘मी’ आहे असे वाटते, त्या ‘मी’च्या अतीत तुम्ही गेलेच पाहिजे आणि तुम्ही ज्याला मनुष्य म्हणून ओळखता तो मनुष्य म्हणजे प्रकट ‘पुरुष’ असतो. आणि हा मनुष्य म्हणजे कोण? मनुष्य म्हणजे प्राण आणि जडभौतिक शरीर यांचा गुलाम असलेला मनोमय पुरुष असतो. आणि जेथे तो प्राण व शरीर यांचा गुलाम झालेला नसतो, तेथे तो त्याच्या मनाचा गुलाम असतो. पण ही फार मोठी गुलामी असते, कारण मनाचे गुलाम असणे म्हणजे मिथ्यत्वाचे, मर्यादिततेचे आणि व्यक्ताचे, दृश्याचे (apparent) गुलाम असणे होय. जो ‘स्व’ हा मन, प्राण आणि शरीर यांच्या पडद्याआड अंतरंगामध्ये असतो, तो ‘स्व’ तुम्ही बनले पाहिजे. आध्यात्मिक बनणे, दिव्य बनणे, अतिमानव, खरा ‘पुरुष’ बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. कारण मनोमय पुरुषाच्या ऊर्ध्वस्थित जर कोणी असेल तर तो ‘अतिमानव’ (superman) असतो.

अतिमानव बनणे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे, तुमच्या प्राणाचे आणि तुमच्या शरीराचे स्वामी बनणे; आत्ता तुम्ही ज्या प्रकृतीच्या हातचे साधन आहात, त्या प्रकृतीचे तुम्ही सम्राट बनणे. आत्ता तुम्ही तिच्या पायाखाली आहात, तेच तुम्ही तिच्याही वर जाण्यासाठी उचलले जाणे म्हणजे अतिमानव बनणे. अतिमानव बनणे म्हणजे गुलाम नव्हे तर, मुक्त होणे; विभक्त असणे नव्हे तर एकत्व पावणे; मृत्युने झाकोळलेले नसणे तर अमर्त्य असणे, अंधकारमय नव्हे तर संपूर्ण प्रकाशमान असणे; दुःखशोक यांच्या खेळामध्ये नसणे तर पूर्णतया आनंदमय असणे; दुर्बलतेच्या गर्तेत जाऊन पडणे नव्हे तर शक्तिसामर्थ्यामध्ये उन्नत होणे. अतिमानव बनणे म्हणजे अनंतामध्ये जीवन जगणे आणि सांत गोष्टींवर (finite) ताबा मिळवणे. अतिमानव बनणे म्हणजे ईश्वरामध्ये जीवन जगणे आणि त्याच्या अस्तित्वामध्ये राहून त्याच्याशी एकत्व अनुभवणे. हे सर्व बनणे आणि त्यापासून प्रवाहित होणाऱ्या साऱ्या गोष्टी बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150-151)

आत्मसाक्षात्कार – २३

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

निश्चितच, ‘अधिमानस’ (Overmind) किंवा ‘अतिमानसा’च्या (Supermind) विकसनाच्या कितीतरी आधी ‘चैतन्या’चा (Spirit) साक्षात्कार होतो. प्रत्येक काळातल्या शेकडो साधकांना आजवर उच्चतर मनाच्या पातळीवर आत्मसाक्षात्कार झालेला आहे पण म्हणून त्यांना अतिमानसिक साक्षात्कार झाला आहे असे नाही. व्यक्तीला ‘आत्म्या’चा किंवा ‘चैतन्या’चा किंवा ‘ईश्वरा’चा मानसिक, प्राणिक किंवा अगदी शारीरिक पातळीवरही ‘आंशिक’ साक्षात्कार (partial realisations) होऊ शकतो मात्र व्यक्ती जेव्हा मनुष्याच्या सामान्य मानसिक पातळीच्या वर उच्चतर आणि विशालतर मनामध्ये उन्नत होते तेव्हा, ‘आत्मा’ त्याच्या सर्व सचेत व्यापकतेनिशी प्रकट व्हायला सुरुवात होते.

‘आत्म्या’च्या या व्यापकतेमध्ये संपूर्णतया प्रवेश केल्यामुळे, मानसिक कृती विराम पावणे शक्य होते आणि व्यक्तीला आंतरिक नीरवता लाभते. आणि मग त्यानंतर, व्यक्ती कोणत्याही प्रकारची कृती करत असली तरी तिच्यामधील ही आंतरिक नीरवता तशीच टिकून राहते; व्यक्ती अंतरंगांतून शांत-नीरव राहते. साधनभूत अस्तित्वामध्ये कृती चालू राहते आणि या कृतीच्या अंमलबजावणीसाठी — मग ती कृती मानसिक असो, प्राणिक असो किंवा शारीरिक असो — त्या कृतीसाठी आवश्यक असणारे सर्व संकेत, आत्म्याच्या या सारभूत शांतीला आणि स्थिरतेला धक्का न पोहोचवता, उच्चतर स्त्रोतापासून मिळत राहतात.

मात्र वर वर्णन केलेल्या अवस्थेपेक्षा ‘अधिमानसिक’ आणि ‘अतिमानसिक’ अवस्था या अधिक उच्च स्तरावरील असतात. व्यक्तीला त्यांचे आकलन व्हायला हवे असेल तर, तिला आधी आत्म-साक्षात्कार झालेला असला पाहिजे; आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाची व हृदयाची पूर्ण कृती तिच्या ठिकाणी होत असली पाहिजे; तिच्या ठिकाणी अंतरात्म्याबाबतची जागृती झालेली असली पाहिजे; बंदिस्त असलेल्या चेतनेची मुक्ती, तसेच आधाराचे शुद्धीकरण व त्याचे पूर्णतया उन्मीलन (opening) झालेले असले पाहिजे. त्यामुळे मुक्त झालेल्या प्रकृतीमध्ये, प्रथम उपरोक्त अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 413)

आत्मसाक्षात्कार – २२

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार खालीलप्रमाणे आहेत.

१) संपूर्ण भक्ती ही ज्यायोगे हृदयाची मुख्य प्रेरणा व विचारांची स्वामिनी बनेल आणि ज्यायोगे जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहील अशा प्रकारचे चैत्य, अंतरात्मिक परिवर्तन (psychic change) घडणे.

२) शरीराच्या पेशी न्‌ पेशी ज्यामुळे भारल्या जातील अशा प्रकारे, ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती, प्रकाश, शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण होणे.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ईश्वराची व श्रीमाताजींची अनुभूती येणे आणि त्या अनंत चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – २१

खालील चार गोष्टींवर साक्षात्कार आधारित केला गेला पाहिजे.

१) मनाच्या वर असणाऱ्या केंद्रामध्ये उन्नत होणे
२) वैश्विक चेतनेप्रत खुले होणे
३) चैत्य खुलेपण
४) उच्चतर चेतनेचे तिच्या शांती, प्रकाश, शक्ती, ज्ञान, आनंद इत्यादीसहित अस्तित्वाच्या अगदी भौतिक स्तरापर्यंतच्या सर्व स्तरांमध्ये अवतरण होणे.

श्रीमाताजींच्या शक्ती-कार्याला तुमच्या अभीप्सेची, श्रद्धेची आणि समर्पणाची जोड देऊन, उपरोक्त साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. हाच मार्ग आहे. बाकी साऱ्या गोष्टी म्हणजे या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत, आणि त्यासाठी श्रीमाताजी तुमच्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – २०

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

ज्या विशालतेमध्ये, नितांत अशा स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निश्चल-नीरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये निवास करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु आपल्या योगामधील (पूर्णयोगामधील) ईश्वराच्या साक्षात्काराची आणि रूपांतरणाची ही केवळ पहिली पायरी आहे. जीव उच्चतर किंवा दिव्य चेतनेमध्ये वृद्धिंगत होत जाणे यालाच आम्ही ‘रूपांतरण’ असे संबोधतो.

*

एखादा साधक, ‘अवैयक्तिक, निर्गुण ब्रह्मा’पाशीच थांबला आणि त्याने पुढे वाटचालच केली नाही तर मग, तो ‘पूर्णयोगाचा साधक’ आहे, असे म्हणता येणार नाही. ‘निर्गुण साक्षात्कार’ हा स्वयमेव शांत-‘आत्म्याचा’, विशुद्ध ‘सत्‌-चित्‌-आनंदा’चा साक्षात्कार असतो, पण त्यामध्ये ‘सत्यमया’ची, ‘चैतन्यमया’ची, ‘आनंदमया’ची कोणतीही जाणीव नसते. (म्हणजे हे सगुण-साकार विश्व सत्यमय, चैतन्यमय आणि आनंदमय असल्याची जाणीव नसते.) त्यामुळे हा साक्षात्कार ‘निर्वाणा’कडे घेऊन जातो.

आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी असली किंवा समग्र ज्ञानाचा तो एक महत्त्वाचा भाग असला तरी, समग्र ज्ञानामधील ती केवळ एक पायरी असते. सर्वोच्च साक्षात्काराचे ते अंतिम साध्य नसते, तर तो केवळ प्रारंभ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

आत्मसाक्षात्कार – १९

ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि एखादी गोष्ट जर त्याकडे घेऊन जाणारी असेल किंवा त्यासाठी साहाय्यक ठरत असेल किंवा जर ती गोष्ट प्रत्यक्षात आणल्याने तो साक्षात्कार अधिक व्यापक होणार असेल किंवा त्या साक्षात्काराचे आविष्करण होणार असेल, तरच ती गोष्ट इष्ट असते.

साक्षात्कारासाठी वैयक्तिक व सामूहिक साधना आणि ईश्वराचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तींचे सामुदायिक जीवन ही, ईश्वरी कार्यासाठी समग्र जीवनाचे सुसंघटन किंवा आविष्करण करण्यासाठी आवश्यक असणारी पहिली आवश्यक गोष्ट आहे. आणि यासाठी आवश्यक असणारी दुसरी गोष्ट म्हणजे, ‘प्रकाशा’प्रत वळण्यासाठी आणि त्यामध्ये जीवन जगता यावे यासाठी जगाला मदत करणे. हे माझ्या योगाचे (पूर्णयोगाचे) प्रयोजन आहे आणि तोच त्याचा सर्वार्थ आहे.

परंतु साक्षात्कार ही पहिली आवश्यक गोष्ट आहे आणि त्या भोवतीच सारे काही फिरत असते; अन्यथा, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीला काही अर्थ नाही.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 784)

आत्मसाक्षात्कार – १६

(जडभौतिक विश्व आणि आंतरात्मिक व आध्यात्मिक विश्व यांच्या अतीत असणाऱ्या ‘परमसत्या’च्या, ‘परमज्ञाना’च्या विश्वाबद्दल येथे संवाद चालू आहे. श्रीमाताजी असे सांगत आहेत की, “हे विश्व उदयाला आले आहे; पण ते अजून संपूर्णपणे अस्तित्वात यायचे आहे. आणि त्यासाठी केवळ एकटा अवतार पुरेसा नाही तर, त्यासाठी ईश्व रप्राप्तीची अभीप्सा बाळगणाऱ्या अनेक माणसांची आवश्यकता आहे.’’ हे ऐकल्यानंतर, एका साधकाने त्यांना प्रश्न विचारला आहे की, आम्ही त्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय केले पाहिजे?)

श्रीमाताजी : त्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वाचा, ‘पुरुषा’चा, ‘आत्म्या’चा साक्षात्कार करून घेतला पाहिजे; स्वतःच्या अस्तित्वाचे जे परम‘सत्य’ आहे, त्याच्याशी सचेत (conscious) नाते जोडले पाहिजे; ते नाते कोणत्याही रूपातील असले, ते कोणत्याही मार्गाने जोडलेले असले, तरी त्याने काही फरक पडत नाही, परंतु हाच एकमेव मार्ग आहे.

प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतरंगामध्ये एक सत्य वागवत असते आणि त्या सत्याशीच व्यक्तीने ऐक्य साधले पाहिजे, तेच सत्य ती जगली पाहिजे. या सत्याप्रत पोहोचण्यासाठी आणि त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्तीला जो मार्ग अनुसरावा लागेल तोच मार्ग व्यक्तीला त्या (उपरोक्त) परम‘ज्ञाना’च्या अधिकाधिक निकट घेऊन जाईल. म्हणजे असे म्हणता येईल की, (अंतिमतः) वैयक्तिक साक्षात्कार आणि परम‘ज्ञान’ या दोन्ही गोष्टी अगदी एकच आहेत.

– श्रीमाताजी (CWM 10 : 136)

आत्मसाक्षात्कार – १४

(अहंची आवश्यकता का असते ते कालच्या भागात आपण पाहिले. आता व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व निर्माण झाल्यावर काय होते त्याबद्दल आणि अहंच्या विलीनीकरणाबद्दल त्या येथे सांगत आहेत.
या मालिकेतील भाग ०८ ते १४ सलग वाचल्यास हा विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, असे वाटते.)

तुम्ही व्यक्ती म्हणून स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाला आहात आणि आता योग्य वेळ आली आहे, असे ईश्वराला जेव्हा वाटते, तेव्हा मग ईश्वर तुमचा अहं त्याच्यामध्ये विलीन करण्याची आणि इथून पुढचे तुमचे सर्व जीवन केवळ ईश्वरासाठी व्यतीत करण्याची तुम्हाला अनुमती देतो. हा निर्णय ईश्वर घेत असतो. मात्र त्याआधी तुम्ही हे सगळे काम पूर्ण केले पाहिजे, तुम्ही स्वतः आधी एक सचेत व्यक्ती बनले पाहिजे. तुमच्या अस्तित्वाचे तुम्ही पूर्णपणे, अगदी अनन्यपणे केवळ ईश्वराभोवतीच केंद्रीकरण केले पाहिजे आणि ईश्वर हाच तुमचा चालविता धनी असला पाहिजे. पण एवढे सगळे झाल्यावरही, अहं शिल्लक असतोच. कारण त्या अहंनेच तर आजवर तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवण्यामध्ये योगदान दिलेले असते.

परंतु एकदा का (स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण होण्याचे) ते काम पूर्ण झाले, ते निर्दोष, परिपूर्ण झाले की मग, त्या क्षणी तुम्ही ईश्वराला म्हणू शकता की, “हा मी इथे उभा आहे, मी तयार आहे. माझा तू स्वीकार करशील का?” आणि तेव्हा ईश्वर बहुधा नेहमीच ‘हो’ म्हणतो. तेव्हा सारे काही पूर्ण झालेले असते, सारे काही सिद्धीस गेलेले असते. आणि अशा वेळी मग तुम्ही ईश्वरी कार्य करण्यासाठी ‘खरे साधन’ बनलेले असता.

(सारांश : सरमिसळ अशा सामूहिक अस्तित्वामधून, अहंच्या सहाय्याने व्यक्तीची स्वतंत्र, पृथगात्म अशी घडण – व्यक्तीच्या सर्व घटकांचे ईश्वराभोवती केंद्रीकरण – ईश्वराप्रत आत्मदान – अहंचा विलय करण्यास ईश्वराची अनुमती – अहंचा विलय – आणि व्यक्ती ईश्वरी कार्याचे साधन बनते.)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260-261)

आत्मसाक्षात्कार – १३

(मनाच्या पृथगात्मतेविषयी (individualised) श्रीमाताजींनी काय सांगितले होते ते आपण काल पाहिले. अहंची आवश्यकता काय असते, हे त्या आता समजावून सांगत आहेत.)

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करण्यापूर्वी आपण काय आहोत, हे आधी व्यक्तीने थोडेतरी जाणून घेतले पाहिजे. व्यक्तीमध्ये अहंकार असतो. तुम्ही जागृत, स्वतंत्र, पृथगात्म (individual) व्यक्ती म्हणून तयार होण्यासाठी अहं आवश्यक असतो. म्हणजे पृथगात्मकतेची जाणीव आवश्यक असते, असे मला म्हणायचे आहे. म्हणजे जिथे सर्व गोष्टी एकमेकांवर येऊन आदळतात असा एखादा चव्हाटा तुम्ही असता कामा नये. तुमचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे आणि त्यासाठी अहं आवश्यक असतो.

…नंतर, व्यक्ती हे सारे काही ईश्वराला अर्पण करते. पण त्यापूर्वी अनेक वर्षं प्रयत्न करावे लागतात. म्हणजे तुम्ही केवळ, स्वतःविषयी, अगदी प्रत्येक तपशिलामध्ये शिरून सचेत होणे एवढेच पुरेसे नसते, तर तुम्ही ज्याला ‘अहं, मी’ असे संबोधता त्याचे तुमच्या चैत्य केंद्राभोवती (psychic centre), म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या दिव्य केंद्राभोवती संघटन करावे लागते, जेणेकरून, तुमचे एकच एक, एकसंध असे, सुसंगत, पूर्णपणे जागृत असे व्यक्तित्व तयार होईल.

आणि हे दिव्य केंद्र आधीपासून ईश्वराशी पूर्णतया समर्पित असल्याने, (श्रीमाताजी अर्पण केल्याप्रमाणे हातांची ओंजळ करून दाखवितात.) त्याभोवती जर प्रत्येक गोष्टीची सुव्यवस्थित बांधणी झाली असेल तर, आपोआपच ती प्रत्येक गोष्ट ईश्वराप्रत समर्पित होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260)