Tag Archive for: तत्त्वज्ञान

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०९)

‘ईश्वरी उपस्थिती’ आणि ‘दिव्य चेतने’मध्ये प्रवेश करणे आणि त्याने परिव्याप्त होणे हे या योगाचे (पूर्णयोगाचे) उद्दिष्ट आहे; ‘ईश्वरा’वर केवळ ‘ईश्वरा’साठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी मिळतीजुळती करणे, मेळविणे आणि आपली इच्छा, आपली कर्मे, आपले जीवन हे सारे ‘ईश्वरा’चे साधन बनवणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव (Superman) बनणे (काळाच्या ओघात तसे घडेलही) किंवा अहंकाराच्या शक्तीसाठी, अभिमानासाठी किंवा सुखासाठी ‘ईश्वरा’ला आपलेसे करणे, हे काही या योगाचे उद्दिष्ट नाही. या योगाद्वारे मुक्ती मिळत असली तरीही हा योग ‘मोक्षा’साठी नाही, किंवा यामधून इतरही साऱ्या गोष्टी साध्य होत असल्या तरीपण, त्या गोष्टी हे आपले उद्दिष्ट असता कामा नये. एकमेव ‘ईश्वर’ हेच आपले उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०८)

(१९३७ च्या सुमारास एक साधक पूर्णयोगाची साधना अंगीकारु इच्छित होता, त्यासाठी तो आश्रमात राहू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे स्वत:चे आध्यात्मिकीकरण करून घेतले आहे तसेच त्यांनी बुद्धिपूर्वक स्वत:चे दिव्यत्वात रुपांतर करून घेतले आहे, असे त्याचे म्हणणे होते. या विचाराने भारावलेला तो साधक ‘पूर्णयोगा’कडे वळू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी त्याला त्याच्या इच्छेनुसार तीन महिने आश्रमात राहण्याची परवानगी एका पत्राद्वारे कळवली. मात्र त्याच पत्रात त्यांनी त्याला त्याच्या वरील विचारातील फोलपण दाखवून दिले. बुद्धीच्या आधारे नव्हे, तर तिच्या अतीत होऊन, मनाच्या पूर्ण शांत, निर्विचार अवस्थेत उच्चतर चेतनेचे अवतरण झाले आणि माझे आध्यात्मिकीकरण झाले, असे त्यांनी त्याला लिहिले आहे. त्या साधकाच्या निमित्ताने, ‘पूर्णयोगा’ची साधना कोण करू शकतो यावर श्रीअरविंद यांनी प्रकाश टाकला आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)

….मानवी प्रकृती आज जशी आहे तशा त्या प्रकृतीचे पूर्णत्व हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व नाही, तर व्यक्तीच्या सर्व घटकांचे आंतरिक चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आणि नंतर त्या घटकांवर कार्य करणाऱ्या उच्चतर चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतरण (psychic and spiritual transformation) करणे, त्या घटकांच्या साऱ्या जुन्या गतिविधी टाकून देणे किंवा त्यांचे त्या उच्चतर चेतनेने जणू स्वतःचीच प्रतिमा असावी अशा पद्धतीने परिवर्तन घडविणे आणि अशा प्रकारे कनिष्ठ प्रकृतीचे उच्चतर प्रकृतीमध्ये रूपांतरण करणे, हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व आहे.

….ही सावकाश चालणारी आणि अवघड प्रक्रिया आहे; मार्ग लांबचा आहे आणि अगदी आवश्यक अशा पायाभूत गोष्टी सुस्थिर करणे हे सुद्धा खूप कठीण आहे. विद्यमान असलेली जुनी प्रकृती विरोध करत राहते आणि अडथळे निर्माण करत राहते आणि एका पाठोपाठ एक अडचणी येत राहतात आणि त्यांच्यावर मात केली जात नाही तोवर त्या पुन्हापुन्हा येत राहतात. आणि म्हणूनच, (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून वाटचाल करण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, व्यक्तीने खात्री करून घेतली पाहिजे की, आपल्याला ज्या मार्गाची हाक आली आहे तो मार्ग हाच आहे का?

– श्रीअरविंद (CWSA 35 : 585-586)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०६)

 

(मनुष्याने) मानवजातीला उपयुक्त ठरावे ही पाश्चात्त्यांकडून उसनी घेतलेली संकल्पना आहे आणि त्यामुळे झालेला हा जुनाच गोंधळ आहे. हे स्पष्टच आहे की, मानवजातीला ‘उपयुक्त’ ठरण्यासाठी ‘योगा’ची आवश्यकता नाही. जो कोणी मानवी जीवन जगत असतो तो या ना त्या प्रकारे मानवजातीला उपयुक्तच ठरत असतो.

 

‘योग’ हा ईश्वराभिमुख असतो, मनुष्याभिमुख नाही. ‘दिव्य अतिमानसिक चेतना’ आणि ‘शक्ती’ जर खाली या जडभौतिक जगात आणता आली आणि प्रस्थापित करता आली तर साहजिकच त्याचा अर्थ असा होईल की, त्यामुळे मानवजात आणि तिच्या जीवनासहित, पृथ्वीकरता मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून येईल मात्र मानवजातीवरील हा प्रभाव म्हणजे त्या परिवर्तनाचा केवळ एक परिणाम असेल; ते साधनेचे उद्दिष्ट असू शकणार नाही. ‘दिव्य चेतने’मध्ये निवास करणे आणि त्या चेतनेचे जीवनात आविष्करण करणे हेच साधनेचे उद्दिष्ट असले पाहिजे.

 

– श्रीअरविंद (CWSA 28 : 441-442)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०४)

उत्तरार्ध

आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे ‘ईश्वरी प्रकाश’ व ‘सत्य’, ‘ईश्वरी शक्ती’ आणि ‘ऊर्जा’, ईश्वरी ‘विशुद्धता’ व ‘शांती’ आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच आपल्या चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी ‘आत्म’रूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ‘ईश्वरी’ प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा व चेतनेचा उपयोग केला जात आहे – हे आपल्याला जाणवेल. आपल्यामध्ये जेव्हा ‘ईश्वरी उपस्थिती’ सातत्याने असेल आणि आपली चेतना रूपांतरित झालेली असेल तेव्हाच, या भौतिक स्तरावर ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो.

एखादा मानसिक आदर्श किंवा तत्त्व मनाशी दृढ बाळगणे आणि ते आपल्या आंतरिक कार्यावर लादणे यामधून आपण आपल्या स्वतःला मानसिक अनुभूतीमध्येच मर्यादाबद्ध करण्याचा धोका संभवतो; किंवा ‘ईश्वरा’शी सायुज्य व एकत्व यांची खरी पूर्ण वाढ होण्याऐवजी, तसेच ‘ईश्वराच्या इच्छे’चा आपल्या आयुष्यात जीवलग व मुक्त बहर येण्याऐवजी, अर्ध्या-कच्च्या घडणीद्वारे त्याचा आभास निर्माण होण्याचा किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका संभवतो. मनाला लागलेल्या वळणाची ही चूक आहे आणि त्या बाजूलाच आजच्या मनाचा विशेष कल आहे. एकमेव आवश्यक असणाऱ्या गोष्टीवरून (म्हणजे ‘ईश्वराचा शोध’ घेणे या गोष्टीवरून) आपले चित्त विचलित करणाऱ्या अशा किरकोळ गोष्टी जवळ करण्यापेक्षा, ‘ईश्वरा’च्या साक्षात्कारामधून प्राप्त होऊ शकतात अशा ‘शांती’ किंवा ‘प्रकाश’ किंवा ‘आनंद’ या गोष्टी मिळविण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे हे अधिक बरे!

आंतरिक जीवनाप्रमाणे भौतिक जीवनाचेदेखील दिव्यत्वात रूपांतर (divinisation) करणे हा, आम्ही जी ‘दिव्य योजना’ पाहत आहोत तिचाच एक भाग आहे, पण आंतरिक साक्षात्काराच्या बहरातूनच तो पूर्णत्वास जाऊ शकतो; (भौतिक जीवनाचे दिव्यत्वात रूपांतर) ही अशी एक गोष्ट आहे की जी मानसिक तत्त्वाच्या कार्यामधून होऊ शकत नाही; तर ती अंतरंगातून बाह्य दिशेने विकसित होत जाते.

श्रीअरविंद (CWSA 29 : 05-06)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०३)

पूर्वार्ध

वास्तविक, आध्यात्मिक ‘सत्या’साठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीचे, उपासनेचे आद्य कारण ‘ईश्वरा’चा शोध हेच आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत् आहे.

आणि एकदा का ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग ‘त्या’चे आविष्करण करणे – म्हणजे, सर्वप्रथम आपल्या मर्यादित चेतनेचे रूपांतर ‘दिव्य चेतने’मध्ये करणे; अनंत ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘प्रेम’, ‘सामर्थ्य’, ‘परमानंद’ यांमध्ये जीवन जगणे; आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये आपण तो ‘ईश्वर’च होणे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या क्रियाशील प्रकृतीने, त्याचे वाहन, त्याचे माध्यम, त्याचे साधन बनणे होय. (हे उद्दिष्ट असू शकते.) पण, ‘मानवतेसाठी कार्य’ करणे किंवा भौतिक स्तरावर ‘एकतेचे तत्त्व’ प्रत्यक्ष कृतीत आणणे या गोष्टी म्हणजे ‘दिव्य सत्या’चा मनाने चुकीच्या पद्धतीने केलेला अनुवाद आहे – या गोष्टी आध्यात्मिक उपासनेचे पहिले खरे उद्दिष्ट असू शकत नाहीत.

आधी आपण आपला ‘आत्मा’ शोधला पाहिजे, ‘ईश्वर’ शोधला पाहिजे, तेव्हाच आपल्याला, आपला ‘आत्मा’ किंवा ‘ईश्वर’ आपल्याकडून ज्या कार्याची अपेक्षा करत आहे, ते कार्य काय आहे ते समजून येईल. तोपर्यंत आपले जीवन आणि आपल्या कृती या, ‘ईश्वरा’चा शोध घेण्याची साधने ठरू शकतात किंवा त्या शोधासाठी साहाय्यक ठरू शकतात पण त्यांचे अन्य कोणतेही उद्दिष्ट असता कामा नये.

जसजसे आपण आंतरिक चेतनेमध्ये विकसित होऊ लागतो, किंवा आपल्यामध्ये ‘ईश्वरा’चे आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होऊ लागते, तसतसे आपले जीवन आणि आपल्या कृती, आपली कर्मं ही खरेतर, त्यामधूनच प्रवाहित झाली पाहिजेत, त्याच्याशीच समरस झालेली असली पाहिजेत. पण त्याआधीच (आत्म्याचा किंवा ईश्वराचा शोध लागण्यापूर्वीच), आपले जीवन कसे असले पाहिजे, आपले कार्य काय असले पाहिजे हे आपल्या मर्यादित मानसिक संकल्पनांच्या आधारे ठरविणे म्हणजे आपल्या आंतरिक आध्यात्मिक ‘सत्या’च्या विकसनामध्येच खोडा घालण्यासारखे आहे. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 05)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०२)

जगातील प्रत्येक गोष्टीकडून माणसाचा नेहमीच अपेक्षाभंग होतो, हा जीवनाकडून मिळणारा धडा आहे – पण मनुष्य जर पूर्णतया ‘ईश्वरा’कडे वळला तर ‘ईश्वर’च एक असा आहे की, ज्याच्याकडून त्याचा कधीच अपेक्षाभंग होत नाही. तुमच्यामध्ये काहीतरी वाईट आहे म्हणून तुमच्यावर संकटे येऊन कोसळतात असे नाही तर, सगळ्याच माणसांना अपेक्षाभंगाचा धक्का बसत असतो कारण ज्या गोष्टी चिरस्थायी नसतात (अशाश्वत असतात) त्यांच्याविषयीच्या कामना (desires) ते बाळगून असतात. आणि मग ते त्या गोष्टी गमावून तरी बसतात किंवा अगदी जरी त्या गोष्टी त्यांना मिळाल्या तरी त्या गोष्टींपासून त्यांच्या पदरी निराशाच पडते, त्या गोष्टी त्यांचे समाधान करू शकत नाहीत.

‘ईश्वराभिमुख होणे’ हेच जीवनातील एकमेव सत्य आहे.

श्रीअरविंद (CWSA 31 : 625)

अमृतवर्षा २८

(जगभरामध्ये युद्धाचे वारे वाहत आहेत. महायुद्धाची आशंकादेखील व्यक्त केली जात आहे. यत्रतत्र सर्वत्र कलियुगाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. हे पाहून सामान्य माणसाचे मन काहीसे भयभीत होत आहे. परंतु या सगळ्या पाठीमागेसुद्धा एक ‘ईश्वरी योजना’ कार्यरत असते, याचे अचूक भान जागविण्याचे कार्य श्रीअरविंदलिखित पुढील विचाराद्वारे होत आहे, यामध्ये प्रतिपादित करण्यात आलेली कलियुगाची सकारात्मक बाजू वाचकांच्या मनात एक आश्वासकता जागवेल असा विश्वास वाटतो.)

सध्याचे युग म्हणजे पापाचा प्रेरक आणि मनुष्याच्या प्रगतीचा मुख्य शत्रू असणाऱ्या कलीच्या राजवटीचा कालखंड आहे. कलीच्या या कालखंडामध्ये मनुष्याची सर्वाधिक अधोगती होते आणि त्याचे सर्वाधिक पतनही याच कालखंडामध्ये होते. परंतु त्याचवेळी या कलियुगामध्येच अडथळ्यांशी लढा देत सामर्थ्यसंपादन देखील करता येते. तसेच जुन्या गोष्टी नष्ट करून नवनिर्मितीसुद्धा या कलियुगातच करता येते. ही प्रक्रिया कलियुगामध्ये घडताना दिसते.

जगाच्या उत्क्रांतीदरम्यान ज्या अनिष्ट, अमंगल घटकांचा विनाश केला जाणार आहे; हे नेमके तेच घटक असतील की जे त्यांच्या अतिरिक्त वाढीद्वारे वगळले जाणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला, नवसृष्टीची बीजे रुजवली जाणार आहेत, ती अंकुरित होणार आहेत. आणि येणाऱ्या सत्ययुगामध्ये, याच बीजांमधून वृक्ष निर्माण होणार आहेत.

तसेच, ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये एका ग्रहाच्या महादशेमध्ये इतर ग्रह त्यांच्या अन्तर्दशेचा आनंद घेतात, त्याचप्रमाणे कलियुगामध्ये, सत्य, त्रेता, द्वापार आणि कलि ही चारही युगं पुनःपुन्हा आपापल्या अन्तर्दशेचा आनंद घेतात. या चक्राकार घडामोडीच्या माध्यमातून, कलियुगामध्ये एक मोठे पतन घडून येते, त्याच्या पाठोपाठ ऊर्ध्वगामी विकास होतो, मग परत मोठे पतन, त्यानंतर पुन्हा ऊर्ध्वगामी वाटचाल होते; या सगळ्यामधून ‘ईश्वरा’ चे हेतू सिद्धीस जातात.

द्वापार आणि कलियुगाच्या या संधिकाळात, ‘ईश्वर’ आपल्या अवताराच्या माध्यमातून अनिष्टाची घटकांची अतिरिक्त वाढ होऊ देण्यास मुभा देतो. तो या अनिष्ट घटकांचा विनाश करतो, चांगल्या बीजांचे रोपण करतो आणि त्यांच्या अंकुरणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो, आणि त्यानंतर कलियुग सुरू होते.

सत्ययुग अवतरण्यासाठी उपयोगी पडेल असे गुप्त ज्ञान आणि अशी कार्यपद्धती श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितली आहे. कलियुगामध्ये जेव्हा सत्ययुगाची अन्तर्दशा येते तेव्हा जगभरात गीतोक्त धर्माचा प्रचार-प्रसार होणे अपरिहार्य असते.

तसा काळ आता आला आहे, आणि म्हणूनच, काही थोड्या प्रज्ञावंत आणि सुविद्य व्यक्तींपुरतीच मर्यादित न राहता, आता गीतेला परदेशामध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्येसुद्धा मान्यता मिळू लागली आहे.
(लेखनकाळ : १९०९-१०)

ही मालिका येथे समाप्त होत आहे.

– श्रीअरविंद [CWSA 09 : 94-95]

अमृतवर्षा २७

जडद्रव्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसांना जेव्हा अंतर्यामी निवास करणाऱ्या ‘ईश्वरा’च्या विचाराची जाणीव होईल; प्रत्येक सजीवामध्ये जेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाचा काही संकेत जाणवू लागेल; प्रत्येक माणसाला जेव्हा त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वर’ दिसू लागेल तेव्हा या प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील आणि अरुणोदय होईल. कारण ”सर्व प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे कारण ती ‘ईश्वर-पुत्रां’ना (मानवांना) साक्षात्कार होण्याची वाट पाहत थांबली आहे.”

हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की, जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो. सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे.

…एखाद्या दुर्मिळ हिऱ्याप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून मार्गक्रमण केले आणि त्याला त्याचे प्रकाशमान करण्याचे व रूपांतरणाचे कार्य आपल्यामध्ये करण्यास आपण वाव दिला तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो.

तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, आपल्या किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जाताना, आपल्या निर्बुद्ध अहंकाराची, तसेच आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची उरलीसुरली तटबंदी ढासळून पडताना आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंधांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत असल्याचे आपल्याला जाणवेल.

व्यक्तिगत ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कणामध्ये ‘ईश्वराची उपस्थिती’ असते आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41]

अमृतवर्षा २५

उद्दिष्ट जरी समान असले तरी, विविध साधकांच्या वृत्तीप्रवृत्ती विभिन्न असतात आणि त्यामुळे प्रत्येकाचे मार्गदेखील भिन्नभिन्न असतात. प्रार्थना आणि स्तोत्र या गोष्टी हा सुद्धा ‘ईश्वरा’च्या साक्षात्काराचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु तो मार्ग प्रत्येकालाच भावतो असे नाही. जो साधक ज्ञानमार्गाचा अवलंब करतो तो ध्यान व एकाग्रतेचा अभ्यास करतो. कर्ममार्गी व्यक्तीसाठी कार्याचे समर्पण हा उत्तम मार्ग असतो.

प्रार्थना आणि स्तोत्र हे भक्तीचे एक महत्त्वाचे अंग आहे. मात्र ते सर्वोच्च आहे असे नाही. शुद्ध प्रेम ही भक्तीची सर्वोच्च परिपूर्णता आहे. अशा प्रेमाला, प्रार्थना आणि स्तोत्र या माध्यमातून ईश्वरा’चा खरा आत्मा लाभू शकतो आणि त्यानंतर प्रार्थना आणि मंत्रादींच्या पलीकडे जात, हे शुद्ध प्रेम ‘ईश्वरा’च्या आत्म-भुक्तिमध्ये (self-enjoyment) विरघळून जाते. आणि असे असूनसुद्धा, प्रार्थना व स्तोत्राविना ज्याचे चालू शकते असा भक्तियोगी विरळाच आढळेल. जेव्हा कोणत्याही प्रक्रियांची आणि साधनेची आवश्यकता उरलेली नसते अशावेळीदेखील हृदयातून प्रार्थना आणि स्तोत्र स्फुटित होतात. फक्त एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की, (योग) मार्ग हा व्यक्तीनिरपेक्ष मार्ग असत नाही; त्यामुळे एखाद्याचा मार्ग हाच दुसऱ्याचा मार्ग असेल असे नाही.

बऱ्याच भक्तिमार्गी लोकांची अशी समजूत असते की, जो प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी करत नाही, त्या गोष्टींमध्ये ज्याला आनंद लाभत नाही, तो माणूस आध्यात्मिक (सत्य धर्माचे पालन करणारा) नसतो. परंतु असे समजणे हे भ्रांतीचे आणि संकुचितपणाचे लक्षण आहे. (गौतम) बुद्ध हे कधीही प्रार्थना व स्तोत्र या गोष्टींमध्ये रममाण झाले नाहीत पण म्हणून ते आध्यात्मिक नव्हते असे कोण म्हणेल बरे? प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी भक्तिसाधनेसाठी विकसित झालेल्या आहेत.

– श्रीअरविंद [Writings in bengali : 186]

अमृतवर्षा १८

सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे या हेतूने म्हणजेच, हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; तसेच आजवर त्याला जे सत्य वाटत होते अशा विचारांचा (जर तशीच आवश्यकता असेल तर,) परित्याग करण्यासाठी जो तयार होतो; तो हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा महान विचार-पुंजांच्या संपर्कात येतो.

दीर्घ ध्यानाभ्यासानंतर, मननानंतर, तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही.

त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही त्याचा एक भागच बनून जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवण, जे सारे कधीकधी खूपच विरोधाभासात्मक वाटते, त्या साऱ्या पाठीमागील गहन सत्य त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून आता काहीच लपून राहू शकत नाही.

अगदी कोणत्याही त्रुटी, अज्ञान या गोष्टी सुद्धा त्याला आता अस्वस्थ करत नाहीत, कारण असे कोणा एका अज्ञात अधिकारी व्यक्तीने सांगून ठेवले आहे : जो सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो त्याला कोणत्याही त्रुटींचा त्रास होत नाही कारण तो हे जाणून असतो की, ”त्रुटी म्हणजे जीवनाचा सत्याच्या दिशेने चाललेला पहिलावहिला प्रयत्न असतो.”

अशा परिपूर्ण धीरगंभीरतेच्या स्थितीप्रत पोहोचणे म्हणजे विचारांच्या शिखरावर जाऊन पोहोचणे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 28]