Tag Archive for: तत्त्वज्ञान

साधना, योग आणि रूपांतरण – २१ (भाग ०५)

(‘ध्यान’ आणि ‘कर्म’ या दोन्ही गोष्टींसंबंधीचे विचार आपण कालच्या भागामध्ये लक्षात घेतले. परिणामकारकतेच्या दृष्टीने, ‘ध्याना’पेक्षा ‘योग्य रीतीने केलेले कर्म’ हे अधिक सरस असते, असा श्रीमाताजींचा अभिप्राय असल्याचे येथे साधकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्या मनात ध्यानाच्या उपयुक्ततेविषयीच साशंकता निर्माण झाली. ती त्याने श्रीमाताजींपाशी मोकळेपणाने व्यक्त केली आहे.)

साधक : तर मग ध्यानाचा काहीच उपयोग नाही का?

श्रीमाताजी : नाही, तसे नाही, पण जोपर्यंत ते आवश्यक असेल तोवर ते अगदी उत्स्फूर्तपणे, सहजपणे होत राहील. अचानकपणे, एखाद्या गोष्टीकडून (उच्चतर दिव्य शक्तीकडून) तुमचा ताबा घेतला जाईल आणि त्यामुळे तुम्ही अगदी निश्चल होऊन जाल, तेव्हा तुम्हाला एखाद्या संकल्पनेच्या दर्शनावर किंवा एखाद्या मानसिक अवस्थेवर लक्ष एकाग्र करायला प्रवृत्त केले जाईल. ती गोष्ट तुमचा ताबा घेईल, तेव्हा मात्र तुम्ही तिला विरोध करता कामा नये. मग तुम्ही आवश्यक ती प्रगती साध्य करून घ्याल. आणि अशा एखाद्या अवचित क्षणी तुम्हाला असे आढळते की, तुम्हाला काहीतरी उमगले आहे आणि तुम्हाला जे आंतरिकरित्या काहीतरी गवसले आहे त्यानिशी पुन्हा अगदी पुढच्या क्षणीच तुम्ही तुमचे काम करू लागाल, परंतु त्यामध्ये कोणताही आविर्भाव, कोणतेही ढोंग नसेल.

जे ध्यानाला बसतात आणि आपण कोणीतरी असामान्य व्यक्ती आहोत असा स्वतःविषयी ग्रह करून घेतात त्यांची मला सर्वात जास्त चिंता वाटते. सर्व गोष्टींमध्ये ही गोष्ट सर्वात जास्त धोकादायक असते कारण ते लोक आत्मसंतुष्टीने इतके भरून जातात आणि विफल बनतात की, ते अशा प्रकारे प्रगतीचे सर्व मार्गच बंद करून टाकतात.

– श्रीमाताजी (CWM 05 : 44)

साधना, योग आणि रूपांतरण – २० (भाग ०४)

माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवाच्या आधारे सांगायचे तर (आणि माझा अनुभव पुरेसा दीर्घ आहे, कारण गेली सुमारे तेहतीस वर्षे मी विविध लोकांच्या संपर्कात आहे; त्यांचे प्रश्न, त्यांची योगसाधना, त्यांचे आंतरिक प्रयत्न मला माहीत आहेत; मी येथेही आणि इतरत्र, जगभरामध्ये सर्वत्र ते प्रश्न हाताळले आहेत.) मला असे वाटते की, ध्यानाद्वारे तुम्ही स्वतःमध्ये रूपांतर घडवून आणू शकत नाही… उलटपक्षी, (कर्माबाबत) मात्र मला अगदी खात्रीच आहे.

तुम्हाला जे कर्म करणेच भाग आहे, मग ते कर्म कोणतेही असो, ते जर तुम्ही केलेत आणि ते करत असताना ‘ईश्वरा’चे विस्मरण होऊ नये म्हणून काळजी घेतलीत, सतर्क राहिलात; तुम्ही जे काही कर्म केले असेल ते ‘ईश्वरा’र्पण केलेत आणि ‘ईश्वरा’ने तुमच्या प्रतिक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणावे म्हणून तुम्ही स्वतःचे आत्मदान केलेत; तुमच्या प्रतिक्रिया स्वार्थी, क्षुल्लक, मूर्ख आणि अज्ञ असण्याऐवजी तुम्ही त्या तेजोमय, उदार अशा बनविल्यात तर, (तुम्ही जर अशा रीतीने वागलात तर) तुम्ही प्रगती कराल. याप्रकारे, तुम्ही केवळ स्वतःचीच प्रगती केलेली असते असे नाही, तर तुम्ही सार्वत्रिक प्रगतीला देखील हातभार लावलेला असतो.

कमीअधिक प्रमाणात रिक्त, पोकळ ध्यान करण्यासाठी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ध्यान करत बसले आहेत आणि त्यांनी बरीच प्रगती केली आहे, असे मला आढळले नाही; किंवा त्यांनी काही प्रगती केली असेलच तर ती अगदीच किरकोळ होती.

उलट, मी अशीही काही माणसं बघितली आहेत की, आपण योगसाधना करत आहोत असा त्यांच्यामध्ये कोणताही आविर्भाव नव्हता, परंतु ते, या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या उत्साहाने आणि ‘ईश्वरा’चे या जगामध्ये अवतरण होणार या संकल्पनेमुळे उत्साहाने भारलेले होते आणि त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले जे काही छोटेमोठे कार्य होते ते हृदयापासून, उत्साहाने, स्वतःमध्ये जे काही आहे ते, हातचे काहीही राखून न ठेवता, संपूर्णपणे झोकून देऊन केले होते. त्या पाठीमागे वैयक्तिक मुक्तीची कोणतीही स्वार्थी संकल्पना नव्हती, अशा लोकांनी उत्कृष्ट प्रगती, खरोखरच उत्कृष्ट प्रगती केलेली मी पाहिली आहे. आणि कधीकधी खरोखरच अशी माणसं अद्भुत असतात.

मी संन्यासी पाहिले आहेत, मठांमध्ये राहणारे लोक पाहिले आहेत, जे स्वतःला योगी म्हणवून घेतात अशी माणसंही मी पाहिली आहेत. पण अशी बारा माणसं आणि (वर सांगितल्याप्रमाणे,) उत्कृष्ट कार्य करणारी एक व्यक्ती यांची बरोबरीच होऊ शकत नाही. (म्हणजे मी हे, पृथ्वीच्या रूपांतरणाच्या आणि जगाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. म्हणजे आपण जे करू इच्छित आहोत, हे जग जसे आत्ता आहे ते तसेच राहू नये आणि ते खऱ्या अर्थाने, दिव्य चेतनेनिशी ‘ईश्वरी’ संकल्पाचे साधन बनावे या दृष्टिकोनातून मी हे म्हणत आहे.) या जगापासून दूर पलायन करून तुम्ही या जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाही. तर इथेच राहून, विनम्रपणे, विनयाने परंतु हृदयामध्ये अर्पण भाव जागता ठेवून ते शक्य होईल. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 43-44)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (३०)

(एका साधकाच्या प्रश्नाला उत्तर देताना, आद्य शंकराचार्य, भगवान बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श घेऊन झाल्यावर मग, श्रीअरविंद त्यांनी स्वतः मांडलेल्या तत्त्वज्ञानाविषयी थोडे अधिक स्पष्टीकरण येथे करत आहेत.)

विश्वाचे मी जे स्पष्टीकरण केले आहे त्यामध्ये, येथे (पृथ्वीवर) असलेल्या आपल्या अस्तित्वाचा अर्थ म्हणून आध्यात्मिक उत्क्रांतीचे मूलभूत तथ्य मी समोर ठेवले आहे. ही आध्यात्मिक उत्क्रांती म्हणजे आरोहणांची एक मालिकाच असते. त्यामध्ये शारीरिक अस्तित्व आणि चेतना यांपासून प्राणमय पुरुषाकडे, म्हणजे ज्या अस्तित्वावर जीवन-शक्तीचे वर्चस्व असते त्या अस्तित्वाकडे आरोहण होत असते. तेथून पुढे, पूर्ण विकसित मनुष्यामधील मनोमय पुरुषाकडे आरोहण होत असते. त्यानंतर, मानसिक चेतनेच्या अतीत असणाऱ्या परिपूर्ण चेतनेकडे म्हणजे ‘अतिमानसिक’ चेतनेकडे, आणि ‘विज्ञानमय’ पुरुषाकडे, म्हणजे आध्यात्मिक अस्तित्वाची संपूर्ण चेतना असणाऱ्या ‘सत्य-चेतने’ कडे (Truth-Consciousness) आरोहण होत राहते.

‘मन’ ही काही आपली अंतिम सचेत अभिव्यक्ती असू शकत नाही कारण मन म्हणजे मूलतः अज्ञान असते, की जे ज्ञान मिळविण्यासाठी धडपडत असते; केवळ ‘अतिमानसिक सत्य-चेतना’च आपल्याला शुद्ध आणि समग्र ‘आत्म-ज्ञान’ आणि ‘जगत-ज्ञान’ प्रदान करू शकते; त्या चेतनेच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या खऱ्या, सत् अस्तित्वाची प्राप्ती होऊ शकते आणि आपली आध्यात्मिक उत्क्रांती परिपूर्णतेला जाऊन पोहोचू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 396-397)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२९)

महत्तर चेतना जर मनाच्या अतीत असेल आणि त्या चेतनेप्रत आपण पोहोचू शकलो तरच आपण त्या ‘परब्रह्मा’ला जाणू शकतो आणि त्यामध्ये प्रवेश करू शकतो. अशा प्रकारची महत्तर चेतना असते किंवा नाही यासंबंधीची कोणतीही बौद्धिक अटकळ, तार्किक विचार यांच्या आधारे आपण प्रगतिपथावर फार दूरवर जाऊन पोहोचू शकत नाही. परब्रह्माची अनुभूती मिळविण्यासाठी, तेथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि त्यामध्येच जीवन जगण्यासाठी आपल्याला एका मार्गाची आवश्यकता असते. आपल्याला जर तो मार्ग सापडला तर, बौद्धिक अटकळ आणि तर्क हे अपरिहार्यपणे अगदी दुय्यम स्थानी जाऊन पडले पाहिजेत आणि (तसे झाल्यास) त्यांच्या असण्याचे प्रयोजनच शिल्लक राहणार नाही. तरीही तत्त्वज्ञान, ‘सत्या’ची बौद्धिक अभिव्यक्ती या गोष्टी शिल्लक राहू शकतील. आणि प्रामुख्याने, या महान शोधाला अभिव्यक्त करण्याचे साधन म्हणूनच त्या गोष्टी असतील आणि ती परब्रह्माची अनुभूती मानसिक परिभाषेमध्ये मांडता येत असेल, आणि शक्य असेल तेवढ्या प्रमाणात ती मांडली तर, आशय तेवढा शिल्लक राहील आणि तोही अशा लोकांसाठी शिल्लक राहील की जे अजूनही मानसिक बौद्धिक स्तरावरच जीवन जगत आहेत.

(बुद्धीच्या आधारे ‘परतत्त्वा’चे, ‘सत्या’चे आकलन करून घेण्याच्या भारतीय किंवा पाश्चात्त्य चिंतनांबद्दल विस्ताराने ऊहापोह करून झाल्यानंतर, हे प्रयत्न कसे अपुरेच ठरतात, यासंबंधी श्रीअरविंद यांनी आधी सांगितले आहे. आणि आता, ‘पूर्णयोगा’च्या परिभाषेत ‘सत्य’ कशाला म्हणायचे हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत…)

अखिल ब्रह्माचा ‘बुद्धिपूर्वक विचार’ केल्याने नव्हे तर, चेतनेच्या परिवर्तनामुळे व्यक्ती अज्ञानातून ‘ज्ञाना’कडे जाऊ शकते. हे ‘ज्ञान’ अशा प्रकारचे असते की, आपण जे जाणतो ते आपण स्वतः बनतो. बाह्यवर्ती चेतनेमधून थेट आणि सखोल आंतरिक चेतनेमध्ये प्रवेश करणे, अहंकार आणि शरीराच्या कक्षा ओलांडून चेतना विशाल करणे, आंतरिक संकल्प आणि अभीप्सेद्वारा चेतना उन्नत करणे आणि मनाच्या अतीत होईपर्यंत चेतनेचे आरोहण करत करत, तिला ‘प्रकाशा’प्रत खुली करणे, आत्मदान आणि समर्पणाच्या माध्यमातून अतिमानसिक ‘ईश्वरा’चे अवतरण घडविणे आणि परिणामतः मन, प्राण आणि शरीराचे रूपांतर घडविणे हा ‘सत्या’प्रत जाण्याचा ‘पूर्णयोगा’चा मार्ग आहे. याला इथे आम्ही ‘सत्य’ असे संबोधतो आणि आमच्या ‘योगा’मध्ये (‘पूर्णयोगा’मध्ये) तेच आमचे ध्येय असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 352 and 355)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२८)

जग हे माया आहे, ते मिथ्या आहे या मताशी मी सहमत नाही. ‘ब्रह्म’ हे जसे विश्वातीत ‘केवलतत्त्वा’मध्ये आहे तसेच ते येथेही आहे. ज्या गोष्टीवर मात करणे आवश्यक आहे अशी एक गोष्ट म्हणजे ‘अज्ञान’. जे अज्ञान आपल्याला अंध बनविते आणि आपल्या अस्तित्वाचे सत्य स्वरूप ओळखण्यास तसेच, या जगामध्ये आणि जगाच्या अतीतही असणाऱ्या ‘ब्रह्मा’चा साक्षात्कार करून घेण्यास आपल्याला प्रतिबंध करते, त्या अज्ञानावर आपण मात केली पाहिजे.

– श्री अरविंद (CWSA 29 : 391)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२७)

(उत्तरार्ध)

(‘ईश्वरा’प्रति आत्मदान करण्याची प्रेरणा) ही प्रेरणा प्राणिक इच्छा नसते तर ती आत्म्याची प्रेरणा असते; (त्या पाठीमागे) एक तर्कही असतो पण तो मनाचा तर्क नसतो, तर तो आत्म्याचा आणि जीवात्म्याचा तर्क असतो. तेथेही एक मागणी असते, पण ती मागणी म्हणजे प्राणिक लालसा नसते तर ती आत्म्याची अंगभूत अभीप्सा असते. जेव्हा, “मी तुझा अमुक कारणासाठी शोध घेत आहे, मी तुझा त्या करणासाठी शोध घेत आहे,” अशी भाषा जाऊन तेथे, “मी तुझा शोध केवळ तुझ्यासाठीच घेत आहे,” असा बदल घडून येतो; म्हणजे जेव्हा निव्वळ आत्मदान घडून येते तेव्हा अशा प्रकारची अभीप्सा उदयाला येते. कृष्णप्रेम (रोनाल्ड हेनरी निक्सन नावाचे एक ब्रिटिश साधक, यांनी वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला.) जेव्हा म्हणतात, ‘ज्ञान नको, हेही नको आणि तेही नको, तर फक्त कृष्णच हवा,” तेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या या अदभुत आणि अनिर्वचनीय केवलाविषयी बोलायचे असते.

‘ईश्वरा’ची ओढ ही खरोखरच एक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आपल्यामधील जीवात्मा ‘ईश्वरा’कडे ओढला जातो कारण त्याला त्या महत्तर ‘आत्म्या’ची अनिवार्य हाक आलेली असते. जीवात्मा आपल्या आराध्य दैवताकडे अनिवार्यपणे ओढला जातो, कारण ‘ईश्वरा’शिवाय त्याचे अस्तित्वच असू शकत नाही. कारण जीवात्मा हा जीवात्मा असतो आणि ‘ईश्वर’ हा ‘ईश्वर’ असतो. ‘ईश्वरा’साठीच ईश्वराचा शोध, अन्य कशासाठीही नाही, असे आम्ही जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे स्पष्ट व्हावे म्हणून, (अर्थात जेवढे स्पष्ट करण्याजोगे होते तेवढे) मी हे सर्व लिहिले आहे. स्पष्टीकरण करण्याजोगे असू देत वा नसू देत, आध्यात्मिक अनुभूतीची ही एक सर्वात प्रभावी वास्तविकता असते. ‘आत्मदानाची प्रेरणा’ ही या वास्तविकतेची केवळ एक अभिव्यक्ती असते.

परंतु याचा अर्थ असा होत नाही की, मी तुमच्या ‘आनंदा’च्या मागणीवर आक्षेप घेत आहे. जोपर्यंत तुमच्या व्यक्तित्वाच्या कोणत्याही एखाद्या भागाला तशी गरज असते, तोपर्यंत तुम्ही खुशाल त्याची मागणी करू शकता, कारण जोपर्यंत आपल्यामध्ये सदोदित असलेली निरपवाद आंतरिक हाक, स्वतःला पृष्ठस्तरावर नेण्यासाठी जोर लावत नाही तोपर्यंत (आनंद, प्रकाश, शक्ती, ज्ञान, शांती इत्यादी) याच गोष्टी व्यक्तीला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाणाऱ्या असतात. आणि ही आंतरिक हाक खरोखरच अगदी आरंभापासूनच असते आणि पाठीशी असते – ती आध्यात्मिक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आत्म्याची ‘ईश्वरा’प्रति असलेली ही निखालस (absolute) गरज असते.

त्या ठिकाणी ‘आनंद’ असताच कामा नये, असे काही माझे म्हणणे नाही. आत्मदान म्हणजेच स्वयमेव एक अपार ‘आनंद’ असतो, आणि जेव्हा ते आत्मदान स्वत:सोबत ‘आनंद’ घेऊन येते, तेव्हा ते एक अनिर्वचनीय ‘आनंद’ जागृत करते आणि इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा, (निःस्वार्थी आत्मदान करणे) या पद्धतीद्वारे हा ‘आनंद’ लवकर गवसतो, म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकते की, “निःस्वार्थी आत्मदान ही सर्वोत्तम नीती आहे.” अर्थातच केवळ एक ‘नीती’ म्हणून ती व्यक्ती ते आत्मदान आचरणात आणत नाही. ‘आनंद’ हे फल असते, पण या फलासाठी आत्मदान केले जात नाही, तर ते स्वयमेव आत्मदानासाठी आणि साक्षात ‘ईश्वरा’साठीच केले जाते – यामध्ये अगदी सूक्ष्मसा फरक आहे; तो मानसिक आहे असे वाटेल, पण त्यामध्ये खरोखरच फरक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 12-13)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२६)

(ईश्वरावर ‘निरपेक्ष प्रेम’ करता येते ही कल्पना न मानवणाऱ्या कोणा व्यक्तीस श्रीअरविंद येथे ती गोष्ट विविध उदाहरणानिशी समजावून सांगत आहेत.)

‘ईश्वरा’शी ऐक्य साधल्याने ‘आनंद’ प्राप्त होईल, हे आपल्याला माहीत असल्यामुळे, आपण त्या ‘आनंदा’च्या प्राप्तीकरताच ‘ईश्वरा’शी ऐक्य साधण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, हा तुमचा युक्तिवाद खरा नाही, त्यामध्ये काही अर्थ नाही.

एखाद्या पुरुषाचे राणीवर प्रेम असेल आणि त्याला तिचे प्रेम मिळाले तर त्याला त्या प्रेमाबरोबरच सत्ता, पद, वैभव या गोष्टीही प्राप्त होतील, हे त्याला माहीत असू शकते; पण म्हणून काही तो सत्ता, पद, वैभव यासाठी तिच्यावर प्रेम करतो, असे नाही. तो तिच्यावरील प्रेमापोटीच प्रेम करू शकतो; ती राणी नसती तरीही त्याने तिच्यावर तसेच प्रेम केले असते; त्याला तिच्याकडून कोणतीही अपेक्षा नसतानासुद्धा तो तिच्यावर प्रेम करू शकतो, तिची प्रणयाराधना करू शकतो, तिच्यासाठीच तो जगू शकतो किंवा मरूही शकतो कारण ती त्याची प्रेमिका असते, ती ‘ती आहे’ म्हणूनच त्याचे तिच्यावर प्रेम असते. कोणत्याही सुखाची वा फलाची आशा नसतानादेखील एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर प्रेम केले आहे, अशी उदाहरणे आहेत. तिला वार्धक्य आले आणि तिचे सौंदर्य नाहीसे झाले तरीही त्यांचे प्रेम तसेच टिकून राहिले, त्यातील उत्कटता तशीच टिकून राहिली अशी उदाहरणे आहेत.

देश जेव्हा समृद्ध, शक्तिशाली, महान असतो आणि जेव्हा देशाकडे देशभक्तांना देण्यासारखे खूप काही असते तेव्हाच ते देशावर प्रेम करतात असे नाही; तर जेव्हा त्यांचा देश निर्धन होता, तो उतरणीला लागलेला होता, तो दुःखसंकटामध्ये होता, देशाकडे त्यांना देण्यासारखे काहीही नव्हते, आणि असलेच तर त्यांच्या सेवेची परतफेड म्हणून फक्त नुकसान, जखमा, छळवणूक, तुरुंगवास, मृत्यू याच गोष्टी तो देऊ शकत होता तेव्हासुद्धा त्यांचे देशावरील प्रेम अतिशय तीव्र, उत्कट आणि निरपवाद असेच होते. देशाला स्वातंत्र्य मिळालेले आपल्याला कधीच पाहता येणार नाही हे माहीत असूनही ती माणसे या देशासाठी जगली, त्यांनी देशाची सेवा केली आणि देशासाठी प्राणार्पणही केले. आणि हे सारे त्यांनी केले ते देशासाठी केले होते, देश त्यांना काहीतरी देऊ शकेल या अपेक्षेने केले नव्हते. लोकांनी देशासाठीच ‘सत्या’वर प्रेम केले होते आणि त्यांना त्या सत्यामधून देशाबद्दल जे आढळेल किंवा गवसेल, त्यासाठीच प्रेम केले होते; त्यासाठी त्यांनी गरिबी, जाच आणि अगदी मृत्युदेखील स्वीकारला होता. ते सत्य त्यांना गवसले नाही तरी सत्याच्या शोधामध्येच ते नेहमी समाधानी होते, आणि तरीही त्यांनी आपला शोध कधीच थांबविला नव्हता. त्याचा अर्थ काय ?

त्याचा अर्थ असा की, अन्य कोणत्या गोष्टीसाठी नाही, तर माणसं देश, सत्य आणि तत्सम अन्य गोष्टी यांच्यावर त्या गोष्टींवरील प्रेमासाठीच प्रेम करू शकतात; म्हणजे कोणत्या परिस्थितीसाठी नाही किंवा आनुषंगिक गुणवत्तेसाठी किंवा परिणामस्वरूप मिळणाऱ्या मौजमजेसाठीदेखील नाही, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या किंवा त्यांच्या दृश्य रूपांमागे वा परिस्थितीच्या पाठीमागे असणाऱ्या अशा कोणत्यातरी निरपवाद गोष्टीसाठी (माणसं, देश, सत्य आणि तत्सम अन्य गोष्टींवर) प्रेम करता येऊ शकते.

‘ईश्वर’ हा एखादा पुरूष किंवा स्त्री, जमिनीचा तुकडा, एखादा वंश, मत, शोध किंवा तत्त्व यांच्यापेक्षा नक्कीच महान आहे. तो सर्वातीत असा ‘पुरुष’ आहे, सर्व आत्म्यांचे तो ‘निजधाम’ आणि ‘देश’ आहे. सर्व सत्यं म्हणजे ज्याची केवळ अपूर्ण रूपं असतात असे ‘दिव्य सत्य’ तो आहे. माणसांनी त्यांच्या निम्नतर अस्तित्वानिशी आणि प्रकृतीनिशी, वर उल्लेख केल्याप्रमाणे किंवा त्याहून अधिक कितीतरी गोष्टी केल्या आहेत. असे जर असेल तर मग, ‘ईश्वरा’वर त्याच्यावर असलेल्या ‘प्रेमासाठीच प्रेम’ केले जाऊ शकत नाही का? त्याच्या शोधासाठी धडपड केली जाऊ शकत नाही का?

जे परम आहे किंवा मनुष्यामधील जे काही पूर्णत्वाकडे झुकणारे आहे त्याचे, आणि त्याचप्रमाणे मनुष्याची ‘ईश्वर’ प्राप्तीसाठीची जी धडपड असते त्याचे स्पष्टीकरण मानसिक तर्कबुद्धीने किंवा प्राणिक प्रेरणेच्या माध्यमातून करता येत नाही; याकडे तुमच्या तर्कबुद्धीचे दुर्लक्ष होत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 11-12) (क्रमश:)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२५)

(भगवद्गीतेमध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या चार प्रकारच्या भक्तांचे उल्लेख आले आहेत. त्यातील ‘अर्थार्थी’ भक्ताच्या भक्तीविषयी एका साधकाने श्रीअरविंदांना काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले उत्तर…)

‘ईश्वरा’कडून काहीतरी मिळावे म्हणूनच केवळ ईश्वर-प्राप्तीची धडपड करायची हा दृष्टिकोन उचित नाही, हे उघडच आहे; पण (अशा गोष्टी मिळवायच्या असतील तर ‘ईश्वरा’कडे वळूच नका असे सांगून) त्यांना पूर्ण मज्जाव केला तर जगातील बहुतांशी माणसं ‘ईश्वरा’कडे कधीच वळणार नाहीत. माणसांची ईश्वराभिमुख होण्यास किमान सुरूवात तरी व्हावी म्हणून या गोष्टींना मुभा देण्यात आलेली आहे असे मला वाटते – त्यांच्यामध्ये श्रद्धा असल्यास, त्यांनी जे मागितले आहे ते त्यांना मिळू शकेल आणि मग या मार्गाने पुढे जाणे बरे आहे, असे त्यांना वाटू लागेल परंतु पुढे कधीतरी अचानकपणे एके दिवशी, ‘हे असे करणे बरं नाही’, (काहीतरी मागण्यासाठीच ‘ईश्वरा’कडे वळायचे हे बरं नाही) या विचारापाशी ते येऊन पोहोचतील; ‘ईश्वरा’भिमुख होण्याचे अधिक चांगले मार्ग आहेत आणि अधिक चांगल्या वृत्तीने ‘ईश्वरा’कडे वळले पाहिजे, हे त्यांना कळेल.

त्यांना जे हवे होते ते त्यांना मिळाले नाही आणि तरीसुद्धा जर ते ‘ईश्वरा’भिमुख झाले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आता त्यांची (ईश्वराभिमुख होण्याची) तयारी होत आहे हे दिसून येते. ज्यांची अजूनपर्यंत तयारी झालेली नाही अशा लोकांसाठीची ती (अर्थार्थी दृष्टिकोन ही) बालवाडी आहे, असे समजून आपण त्याकडे पाहूया. पण अर्थातच हे काही आध्यात्मिक जीवन नव्हे, हा केवळ एक अगदी प्राथमिक धार्मिक दृष्टिकोन झाला.

काहीतरी देणे आणि (त्या मोबदल्यात) कशाचीही मागणी न करणे हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे. तथापि साधक, त्याचे आरोग्य उत्तम राहावे किंवा त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी, त्याच्या साधनेचा एक भाग म्हणून, ‘ईश्वरी शक्ती’ची मागणी करू शकतो; जेणेकरून आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्याचे शरीर सक्षम होईल, सुयोग्य होईल आणि तो ‘ईश्वरी कार्या’साठी एक सक्षम साधन बनू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 08-09)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२४)

माझ्या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) खरोखर, इतर जगतांचा – ‘परम आत्म्या’च्या स्तराचा, भौतिक जगताचा आणि दरम्यानच्या सर्व स्तरांचा – तसेच त्यांचा आपल्या जीवनावर व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचादेखील समावेश होऊ शकतो. पण हेदेखील शक्य आहे की, आधी केवळ ‘परमपुरुषा’च्या साक्षात्कारावर भर द्यायचा अन्यथा, ‘ईश्वरा’च्या अगदी एखाद्या पैलूवर म्हणजे जगदाधिपती आणि आपला व आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या ‘कृष्ण’, ‘शिव’ यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा; अन्यथा, विश्वात्मक ‘सच्चिदानंदा’वर भर द्यायचा आणि या ‘योगा’साठी (पूर्णयोगासाठी) आवश्यक असणारे पायाभूत परिणाम साध्य करून घ्यायचे; आणि नंतर त्या परिणामांपासून प्रगत होत, समग्र परिणामांकडे वळायचे. (म्हणजे) जर एखाद्याने ‘दिव्य जीवना’कडे वाटचाल करणे आणि भौतिक जीवनावर आत्म्याचे आधिपत्य निर्माण करणे’ हे ध्येय स्वीकारलेले असेल तर पूर्णयोगाचे पायाभूत परिणाम साध्य करून घेतल्यानंतर, मग त्याच्या समग्र परिणामांकडे वळायचे, हे शक्य आहे.

‘ईश्वरा’चा, ‘परमेश्वरा’चा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांसहित त्याच्याकडे वळणे, स्वतःच्या कर्मांद्वारे त्याची सेवा करणे आणि त्याला जाणणे – त्याला ‘बौद्धिक आकलना’द्वारेच जाणले पाहिजे असे नाही तर ‘आध्यात्मिक अनुभूती’च्या माध्यमातून त्याला जाणणे – यादेखील ‘पूर्णयोगा’च्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 375)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२३)

भारतात परतल्यापासूनच, लौकिक किंवा पारलौकिक असा कोणताही भेद मी माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या ‘योगा’मध्ये कधीही केला नाही. मला वाटते, माणसांना ज्या गोष्टींमध्ये रस असतो, त्या सर्व गोष्टी बहुधा ऐहिक असतात आणि त्यातील बहुतांशी सर्वच गोष्टींचा माझ्या मानसिक क्षेत्रात प्रवेश झाला होता. उदाहरणार्थ, राजकारण. त्याचा तर माझ्या जीवनातच प्रवेश झाला होता. पण त्याच वेळी, मी मुंबईतील अपोलो बंदरावर, या भारतभूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हा मला आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली; पण त्या अनुभवांची या जगापासून कधीच फारकत झालेली नव्हती तर त्यांचा या जगाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला ‘अनंत’ व्यापून आहे आणि भौतिक वस्तुंमध्ये, देहांमध्ये तो ‘अंतर्यामी’ वास्तव्य करतो, असे मला जाणवत असे. अगदी त्याच वेळी, पारलौकिक जगतांमध्ये आणि स्तरांमध्ये माझा प्रवेश होत आहे आणि त्यांचा प्रभाव व परिणाम या भौतिक जगतावर घडत आहे असे मला दिसत असे. त्यामुळे ज्याला मी ‘अस्तित्वाची दोन टोकं’ (जडभौतिक आणि सच्चिदानंद) असे संबोधतो ती टोकं आणि त्या दोहोंच्या दरम्यान येणारे सर्वकाही यांमध्ये मी कधीच कट्टर विरोध वा फारकत करू शकलो नाही. माझ्यासाठी सर्व काही ‘ब्रह्म’च आहे आणि मला सर्वत्र ‘ईश्वरर’च दिसतो. पण लौकिकाचा त्याग करून, फक्त पारलौकिकाची निवड करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे आणि एखाद्या व्यक्तीला त्या निवडीमुळे जर शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून असे करणे मला स्वत:ला तरी आवश्यसक वाटले नाही.

माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही जगतांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या हृदयात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो, असे मला आढळून आले. हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक ‘आध्यात्मिक’ ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनाने लौकिक, पार्थिव गोष्टींचा, गतिविधींचा मागोवा घेतल्यामुळे आणि त्यांचा आपल्या परिघात समावेश केल्यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. वास्तव (reality) आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ‘ईश्वरा’चे स्वरूप, याविषयीचा माझा तरी हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुसरण करणे याला मी ’पूर्णयोग’ म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णत्वाची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारू इच्छित असेल किंवा या लौकिक जीवनाचा पूर्णपणे त्याग करून, समग्रतया पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वा स ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे पण तसे असेल तर माझा ’योग’ करणे त्याला अशक्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 374-375)