Tag Archive for: तत्त्वज्ञान

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

(पूर्वार्ध)

श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.

अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही. मला असे वाटते की, (जे लोक अमुक एका गोष्टीला अंधश्रद्धा असे संबोधतात) त्या गोष्टीवर ते पुराव्याविना विश्वास ठेवणार नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा. परंतु पुराव्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष म्हणजे श्रद्धा नसते, तर तो निष्कर्ष म्हणजे एक मानसिक प्रचिती असते किंवा तो त्यातून झालेला बोध असतो.

श्रद्धा ही अशी एक गोष्ट असते की, जी पुराव्याच्या किंवा ज्ञानाच्या आधी व्यक्तीकडे असते आणि ज्ञानाप्रत किंवा अनुभूतीप्रत घेऊन जाण्यासाठी ती तुम्हाला मदत करते. ईश्वर अस्तित्वात आहे याचा कोणताही पुरावा देता येत नाही, परंतु जर माझी त्यावर श्रद्धा असेल तर, मला दिव्यत्वाची अनुभूती येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २७

ज्या ऊर्जेमुळे व्यक्तीला सत्कृत्य करण्याची प्रेरणा मिळते आणि जी ऊर्जा व्यक्तीला दुष्कृत्य करण्यापासून रोखते ती ऊर्जा म्हणजे ‘संकल्पशक्ती’ होय.

*

संकल्प हा चेतनेचाच एक भाग असतो आणि मनुष्यामध्ये तो (कनिष्ठ) प्रकृतीच्या गतीविधींचे नियंत्रण करणारा मुख्य घटक असलाच पाहिजे.

*

आपण जर सातत्याने संकल्पाचा उपयोग करत राहिलो तर आपल्या अस्तित्वाचे इतर घटकदेखील हळूहळू त्या संकल्पाची आज्ञा प्रमाण मानू लागतात आणि मग आपल्या कृतीदेखील प्राणिक भावना वा इच्छावासनांनुसार न होता, त्या संकल्पाच्या बरहुकूम होऊ लागतात. उर्वरित सर्व गोष्टी (भावना, इच्छा इ. स्वयमेव) जर कल्पनेमध्ये किंवा कृतीमध्ये आणल्या गेल्या नाहीत आणि त्यांना जर संकल्पाची जोड दिली गेली नाही आणि त्या मनात उमटतील तेव्हा नुसते त्यांचे अवलोकन केले आणि त्यांना नकार दिला तर, थोड्याशा संघर्षानंतर त्या गोष्टी क्षीण होत जातात आणि कालांतराने नाहीशा होतात.

*

साधकामध्ये जोवर ध्येय साध्य करून घेण्याची इच्छा आणि दृढ संकल्प नसतो तोवर ती ‘दिव्य शक्ती’सुद्धा निश्चित आणि चिरस्थायी परिणाम निर्माण करू शकत नाही.

*

साधकामध्ये जोपर्यंत वरून होणारे ‘दिव्य शक्ती’चे कार्य किंवा अंतरंगातील गहनतर ‘दिव्य संकल्पा’चे कार्य सातत्यपूर्ण रितीने घडून येत नाही तोपर्यंत मानसिक इच्छेची आवश्यकता असतेच.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 718, 716, 716, 720, 720)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

उत्तरार्ध

पूर्णयोगामध्ये साधकाने प्रत्येक आदर्शवादी मानसिक संस्कारांच्या अतीत जाणे अभिप्रेत असते. संकल्पना आणि आदर्श हे मनाशी संबंधित असतात आणि या गोष्टी केवळ अर्धसत्य असतात; कोणतातरी एखादा आदर्श मी मानतो यामध्येच मन बरेचदा संतुष्ट असते; आदर्शवादाच्या आनंदामध्ये ते संतुष्ट असते आणि तेव्हा जीवनामध्ये मात्र कोणताही बदल न होता ते आहे तसेच राहते किंवा बदल झालाच तर तो बदल अगदी आंशिक आणि बरेचदा वरकरणी असतो.

आध्यात्मिक साधक हा केवळ आदर्शवादामध्ये रममाण होऊन, साक्षात्काराच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांकडे पाठ फिरवीत नाही; ‘दिव्य सत्या’चा केवळ आदर्श ठेवणे नव्हे तर, ते सत्य प्रत्यक्षात उतरविणे – मग ते परलोकामध्ये असो किंवा इहलोकामध्ये असो – हे त्याचे ध्येय असते. आणि तो हे ध्येय जर इहलोकामध्ये प्रत्यक्षात उतरवू इच्छित असेल तर, मन आणि प्राण यांच्यात रूपांतरण घडविणे आवश्यक असते आणि (तुमच्यामध्ये चालू असणाऱ्या) श्रीमाताजींच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याला समर्पित झाल्याशिवाय हे रूपांतरण घडू शकत नाही.

‘निर्गुण-निराकार’ ईश्वराचा (Impersonal) शोध घेण्यासाठी धडपडणे हा अशा लोकांचा मार्ग असतो की, जे या जीवनापासून दूर जाऊ पाहतात; आणि ते सहसा ही गोष्ट त्यांच्या स्व-प्रयत्नाच्या बळावर करू पाहतात; परंतु उच्चतर ‘शक्ती’प्रत स्वतःला खुले करून अथवा समर्पणाच्या मार्गाने ते ही गोष्ट करत नाहीत; पण निर्गुण-निराकार ईश्वर हा काही कोणी साहाय्य करणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो; तर तो प्राप्त करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या मार्गाने आणि त्याच्या प्रकृतीच्या क्षमतेनुसार तो प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर मोकळीक देतो. तर दुसरीकडे, श्रीमाताजींप्रत खुले राहिले आणि समर्पण केले तर निर्गुण-निराकार ईश्वराबरोबरच ‘सत्या’च्या अन्य प्रत्येक पैलूचा देखील व्यक्ती साक्षात्कार करून घेऊ शकते.

समर्पण हे अगदी अनिवार्यपणे प्रगमनशीलच (progressive) असले पाहिजे. कोणतीही व्यक्ती अगदी प्रारंभापासूनच संपूर्ण समर्पण करू शकत नाही, त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्यक्तीला तेथे समर्पणाचा अभावच आढळतो, परंतु हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, समर्पणाचे तत्त्वच न स्वीकारण्याचे आणि एकेक पायरी, एकेक क्षेत्र ओलांडत स्थिरपणे, प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये क्रमाक्रमाने समर्पणचा अवलंब करत करत वाटचाल न करण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०७

पूर्णयोगामध्ये आत्म-निवेदनाचे (self-consecration) आणि आत्म-दानाचे (self-giving) सर्वसाधारण तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्म-निवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष‌’ या साधकाचा मार्ग हा ‘क्ष‌’साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे चैतन्यमय शक्ती न राहता, तो एक अलवचिक अशी मानसिक यंत्रणा ठरला असता.
*

योगमार्ग ही एक जिवंत, चैतन्यमय गोष्ट असली पाहिजे. व्यक्तीपरत्वे विभिन्नता असते आणि (एक प्रकारे) ती आवश्यकदेखील असते. पण त्या विभिन्नतेला न मानता, ज्याला चिकटून राहावे असे कोणते एकच एक मानसिक तत्त्व किंवा पद्धती म्हणजे योगमार्ग, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०३

पूर्णयोगामध्ये केवळ ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यासाठी व्यक्तीचे आंतरिक व बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत व्यक्तीचे जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्र तपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन (discipline) येथे अभिप्रेत आहे.

पूर्णयोगाचा मार्ग हा इतर बहुतांश योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे. त्यामुळे, आपल्याला अंतरात्म्याकडून हाक आली आहे आणि अंतिम ध्येयाप्रत वाटचाल करत राहण्याची आपली तयारी आहे, या गोष्टीची खात्री पटल्याशिवाय व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

नैराश्यापासून सुटका – ३४

जीव ‘ईश्वर‌’शोधास प्रवृत्त व्हावा यासाठी दुःख आवश्यकच असते, या म्हणण्यामध्ये फारसे काही तथ्य नाही. जीव अंतरंगामधून ईश्वराला जी साद घालत असतो त्यातून तो ईश्वराभिमुख होण्यास प्रवृत्त होतो आणि व्यक्ती अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये असताना ही गोष्ट घडू शकते. अगदी पूर्ण समृद्धी व ऐषोआराम उपभोगत असताना किंवा बाह्यवर्ती विजयाच्या अगदी शिखरावर असताना आणि कोणतेही दुःख किंवा अपेक्षाभंग झालेला नसताना देखील, अकस्मात किंवा क्रमाक्रमाने होत गेलेल्या ज्ञानोदयामुळे जीव ईश्वराभिमुख होऊ शकतो; किंवा ऐंद्रिय सुखाच्या परमावधीमध्ये असताना, क्षणकाल चमकून गेलेल्या प्रकाशामुळे तो ईश्वराभिमुख होऊ शकतो; किंवा अहंकार व अज्ञानामध्ये बाह्यवर्ती जीवन जगण्यापेक्षा, अधिक महान असे काहीतरी सत्य अस्तित्वात असले पाहिजे अशी जाणीव झाल्यामुळे, तो ईश्वराभिमुख होऊ शकतो. अशा विविध परिस्थितीमध्ये जीव जेव्हा ईश्वराभिमुख होतो तेव्हा, त्यापैकी कोणत्याच परिस्थितीत, त्याच्या जोडीला दुःख आणि निराशेची आवश्यकता नसते.

“जीवन हे एखाद्या क्रीडेप्रमाणे आहे, ते तितकेच स्वारस्यपूर्ण देखील आहे, परंतु ती फक्त एक क्रीडा आहे; मानसिक आणि ऐंद्रिय जीवनापेक्षा आध्यात्मिक वास्तविकता (spiritual reality) ही कितीतरी अधिक महान आहे,” असे म्हणत बहुधा व्यक्ती ईश्वराकडे वळते. व्यक्ती कोणत्याही कारणाने जरी ईश्वराकडे वळली तरी, ईश्वराकडून आलेली हाक किंवा जिवाने ईश्वराला घातलेली सादच महत्त्वाची असते. सामान्यात: प्रकृतीला भुरळ पाडणाऱ्या गोष्टींपेक्षा ईश्वराबद्दलचे हे आकर्षण कितीतरी अधिक प्रभावी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 202)

जीवन जगण्याचे शास्त्र – २३

आपली (कनिष्ठ) प्रकृती ही गोंधळाच्या, अव्यवस्थेच्या आधारे कार्य करत असते. तिला कृती करणे जणू भागच असते म्हणून ती अस्वस्थपणे कृती करत राहते. पण ईश्वर मात्र अगाध स्थिरतेच्या, शांतीच्या आधारे मुक्तपणे कार्य करत असतो. आपल्या आत्म्यावरील कनिष्ठ प्रकृतीची पकड आपल्याला नाहीशी करायची असेल तर, आपण प्रगाढ शांतीच्या खोल दरीत झेप घेतली पाहिजे आणि आपण त्या ईश्वराप्रमाणेच झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 365)

आत्मसाक्षात्कार – २८

(मागील भागावरून पुढे…)

(आत्मसाक्षात्कार २४ ते २८ हे भाग एकत्रित वाचल्यास श्रीअरविंद प्रणीत ‘दिव्य अतिमानव’ ही संकल्पना अधिक चांगल्या रितीने समजेल, असा विश्वास वाटतो.)

अतिमानस (Supermind) म्हणजे अतिमानव; त्यासाठी मनाच्या अतीत होणे ही अनिवार्य अट आहे.

अतिमानव होणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव-देवता या ईश्वराच्या शक्ती असतात. तुम्ही मानववंशामधील ईश्वराची शक्ती बनून राहा.

दिव्य अस्तित्वामध्ये वसती करून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेला व परमानंदाला, आत्म्याच्या संकल्पशक्तीला व ज्ञानाला तुमचा ताबा घेऊ देणे आणि त्यांना तुमच्या समवेत व तुमच्या माध्यमातून लीला करू देणे, हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण असते. स्वत:मध्ये ईश्वराचा शोध घेणे आणि स्वत:च्या सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रकट करणे हे सर्वोच्च रूपांतरण असते. त्याच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीसहित कृती करा, त्याच्या परमानंदामध्ये न्हाऊन निघा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

यांपैकी अंशभाग जरी तुम्ही प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या (supermanhood) पहिल्या काही पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 152)

‘आत्मसाक्षात्कार’ ही मालिका येथे समाप्त होत आहे. धन्यवाद!!

आत्मसाक्षात्कार – २७

(मागील भागावरून पुढे…)

उठा, (जागे व्हा आणि) स्वतःच्या अतीत जा, तुमचे स्वत:चे मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची समग्र प्रकृतीच अशी असते की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मानवामधील पशु-मानव (animal man) होता, तो आता त्याहूनही वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण त्याने आता विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनले पाहिजे; तो आता ज्ञानद्रष्टा झाला पाहिजे. त्याने आता कारागीरापेक्षा अधिक काही बनले पाहिजे; तो निर्माणकर्ता आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी झाला पाहिजे. त्याने आता केवळ सौंदर्योपासक न राहता, अधिक काही बनले पाहिजे; कारण तो सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा आस्वाद घेऊ शकतो.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य सत्त्व (substance) मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे आणि त्याच्याकडील ज्ञान आंशिक असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि शुद्ध दृष्टी यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

हे सर्व प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे; कारण तसे बनणे म्हणजे मनामधून अतिमानसाकडे उन्नत होणे. त्याला ‘दिव्य मन’ किंवा ‘दिव्य ज्ञान’ किंवा ‘अतिमानस’ काहीही नाव द्या; ते दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती व प्रकाश असतात. चैतन्याने (Spirit) अतिमानसाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने या जगतांमध्ये (worlds) स्वत:ची निर्मिती केली, अतिमानसाच्याद्वारे ते चैतन्य त्या जगतांमध्ये निवास करते आणि त्यांचे शासन करते. त्याच्यामुळेच ते स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 151-152)