Tag Archive for: तंत्रयोग

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

(श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.)

प्राचीन योगांच्या तुलनेत पूर्णयोग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.

१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण करणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. ते उद्दिष्ट गौण आणि अनुषंगिक आहे, असे पूर्णयोग मानत नाही तर तो त्यास वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट मानतो.

अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते. अन्य योगांमध्ये ‘आरोहण’ हीच सत्य गोष्ट असते. पूर्णयोगात आरोहण हे अनिवार्य आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि अवतरण हेच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाद्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. ‘तंत्रयोग’ आणि ‘वैष्णव’ या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका करून घेण्यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेऊन, व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेदेखील येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक चेतनेची (supramental consciousness) शक्ती येथे आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे संपूर्ण व समग्र परिवर्तन हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. ते जेवढे संपूर्ण व समग्र आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिर्धारित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच संपूर्ण व समग्र आहे. पूर्णयोगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार हा केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या जुन्या साधनापद्धती त्याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

अशी पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली गेली आहे असे, मला आढळले नाही. मला जर तशी पद्धती आढळली असती तर, मी हा (पूर्णयोगाचा) मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ दवडला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः रेखाटलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गांवरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 400 – 401)

साधना, योग आणि रूपांतरण – ७५

निश्चल – नीरवतेचे (silence) ‘अवरोहण’ ही गोष्ट मी इतर योग-प्रणालींमध्ये ऐकलेली नाही; इतर योगांमध्ये मन निश्चल-नीरवतेमध्ये ‘प्रविष्ट होणे’ हा भाग आढळून येतो. पण तरीदेखील मी जेव्हापासून आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) यांविषयी लिहीत आहे तेव्हापासूनच मला अनेक ठिकाणाहून असे सांगितले जात आहे की, (मी सांगत आहे त्या) या योगामध्ये नवीन असे काहीच नाही. आणि म्हणून मला नवल वाटते की, आरोहण आणि अवरोहण म्हणजे काय, हे माहीत नसताना त्यांना त्याचा अनुभव येत होता की काय? किंवा असे होते काय की, त्यांचे त्या प्रक्रियेकडे लक्ष गेले नव्हते?

या योगामध्ये मला आणि इतरांना जो अनुभव आलेला आहे तो असा आहे की, चेतना मस्तकाच्या वर आरोहण करते आणि तेथे वास्तव्य करते. मी जेव्हा प्रथम याविषयी बोललो होतो तेव्हा लोकं माझ्याकडे बघायला लागले आणि मी काहीतरी निरर्थक बोलत आहे असा विचार करू लागले. पूर्वीच्या योगमार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना व्यापकतेची जाणीव नक्कीच झालेली असली पाहिजे कारण अन्यथा स्वतःमध्ये विश्व सामावले असल्याचा अनुभव त्यांना आला नसता किंवा शारीर-चेतनेपासून स्वतंत्र झाल्याचा किंवा ‘अनंतम् ब्रह्मा’शी एकत्व पावल्याचा अनुभव त्यांना आला नसता.

सर्वसाधारणपणे, उदाहरणार्थ तंत्रयोगामध्ये, मस्तकाच्या शिखरावर, ब्रह्मरंध्रापर्यंत आरोहण करणाऱ्या चेतनेचा अनुभव हा सर्वोच्च असल्याचे सांगितले जाते. राजयोगामध्येसुद्धा सर्वोच्च अनुभव घेण्याचे साधन म्हणून ‘समाधी’वर भर दिलेला आढळतो. परंतु हे स्पष्टच आहे की, व्यक्ती जर जाग्रतावस्थेमध्ये ‘ब्राह्मी स्थिती’ मध्ये नसेल तर त्या साक्षात्काराला पूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. भगवद्गीता अगदी सुस्पष्टपणे ‘समाहित’ असण्यासंबंधी सांगते. (ही अवस्था समाधीमध्ये असणाऱ्या अवस्थेशी समांतर असते.) तसेच ब्राह्मी स्थितीसंबंधीही भगवद्गीतेमध्ये सुस्पष्टपणे उल्लेख येतो. ही अशी एक स्थिती असते की, ज्यामध्ये व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये (समाधी-अवस्थेत असल्याप्रमाणे) जीवन व्यतीत करते आणि सर्व क्रियाकलाप करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377)

विचार शलाका – १८

चक्रांमधून उन्नत होत होत, कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया आणि चक्रांचे शुद्धीकरण या गोष्टी ‘तंत्रयोगा’तील ज्ञानाचा भाग आहेत. आपल्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोगामध्ये) चक्रांच्या हेतूपूर्वक शुद्धीकरणाची आणि उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत नसते, तसेच विशिष्ट अशा ठरावीक प्रक्रियेद्वारा कुंडलिनीचे उत्थापन देखील अभिप्रेत नसते. …परंतु तरीही तेथे विविध स्तरांकडून आणि विविध स्तरांद्वारे चेतनेचे आरोहण होऊन, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेशी ऐक्य घडून येते. तेथे चक्रांचे खुले होणे आणि त्या चक्रांचे ज्यांच्यावर नियंत्रण असते त्या (मानसिक, प्राणिक आणि शारीरिक) स्तरांचे खुले होणे देखील घडून येते; त्यामुळे, मी म्हटले त्याप्रमाणे या पूर्णयोगामध्ये रूपांतरणाच्या प्रक्रियेमागे ‘तंत्रयोगा’चे ज्ञान आहे.

*

‘पूर्णयोगा’मध्ये चक्रांचे प्रयत्नपूर्वक उन्मीलन केले जात नाही तर शक्तीच्या अवतरणामुळे ती चक्रे आपोआप खुली होतात. तंत्रयोगाच्या साधनेमध्ये ती ‘मूलाधारा’पासून सुरुवात करून ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात तर, पूर्णयोगामध्ये ती वरून खाली या दिशेने खुली होत जातात. परंतु ‘मूलाधारा’तून शक्ती वर चढत जाणे हे घडून येतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460)