Tag Archive for: जीवनऋतू

बालकाची वाढ स्वाभाविकपणे होत राहते; ते स्वतःच्या वाढीची काळजी करत बसत नाही.
*
बालकाच्या साध्यासुध्या विश्वासामध्ये महान शक्ती सामावलेली असते.
*
विश्वास, बालकसदृश विश्वास असणे ही पूर्णयोगामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे. बालकाच्या ठिकाणी अशी एक साधीसरळ भावना असते की, जे जे काही आवश्यक आहे, गरजेचे आहे ते त्याला मिळेलच. त्याबाबतीत त्याच्या मनात कोणतीही शंका नसते. एखाद्या बालकाला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा त्याला ही खात्री असते की, ती गोष्ट त्याला नक्की मिळेल. अशा प्रकारचा, बालकसदृश साधासरळ विश्वास किंवा भरवसा ही पूर्णयोगामधील सर्वात महत्त्वाची अट आहे.
*
एखादे बालक जेव्हा स्वाभाविक (normal) स्थितीमध्ये जीवन जगत असते तेव्हा त्याच्या सर्व गरजा पुरविल्या जातील असा त्याला एक दृढ विश्वास असतो. हा विश्वास आयुष्यभर तसाच अविचल टिकून राहिला पाहिजे. बालकाची त्याच्या स्वतःच्या गरजांविषयीची जी कल्पना असते ती मर्यादित, अजाणतेपणाची आणि अगदी वरवरची असते; ती कल्पना हळूहळू अधिक विशाल, अधिक सखोल आणि अधिक खऱ्या संकल्पनेने युक्त झाली पाहिजे. तसे झाले म्हणजे त्याच्या कल्पनेची परिणती एका परिपूर्ण संकल्पनेमध्ये होते. परमप्रज्ञेची (supreme wisdom) गरजेविषयी असणारी संकल्पना म्हणजे परिपूर्ण संकल्पना. आपल्या खऱ्या गरजा या केवळ ईश्वरालाच माहीत असतात, हे आपल्या लक्षात येईपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वरावरच विसंबून राहायचे ही अवस्था येईपर्यंत ही परिणती होत राहिली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124-125)

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील वानप्रस्थाश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘संन्यासाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)

संन्यासाश्रम

जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर व्यक्ती उरलेसुरले बंध टाकून देण्यास आणि सामाजिक जीवनाच्या सर्व प्रकारांपासून पराकोटीच्या आध्यात्मिक निर्लिप्ततेने, अनासक्तीने या जगामध्ये वावरण्यास मोकळी असे. या टप्प्यावर ती व्यक्ती जीवनाच्या अगदी किमान गरजांची पूर्ती करत असे आणि विश्वात्म्याशी संवाद साधून, अनंताच्या प्राप्तीसाठी स्वत:च्या जिवाची तयारी करून घेत असे.

हे जीवनचक्र सर्वांना बंधनकारक होते असे मात्र नाही. त्यातील बहुसंख्य लोक हे पहिल्या दोन टप्प्यांच्या पुढे कधीच जात नसत. बरेच जण वानप्रस्थाश्रमामध्ये किंवा अरण्यवासामध्ये असतानाच निधन पावत असत. अगदी थोडेच जण अंतिम पराकोटीचे धाडस करून, परिव्राजकाचे जीवन स्वीकारत असत.

मानवी जिवाची संपूर्ण वाटचाल डोळ्यांसमोर ठेवून, त्यानुसार या जीवनचक्राची गांभीर्यपूर्वक आखणी करण्यात आलेली असल्यामुळे, प्रत्येक जिवाची खरोखरच जेवढी प्रगती झालेली असेल त्यानुसार प्रत्येक व्यक्ती या प्रणालीचा लाभ घेऊ शकत असे. हे जीवनचक्र पूर्ण करण्याइतपत ज्यांची विद्यमान जन्मामध्येच पुरेशी प्रगती झालेली असे ते, या प्रणालीचा पूर्णपणे लाभ घेऊ शकत असत.

• श्रीअरविंद (CWSA 20 : 175-176)

 

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील गृहस्थाश्रमाचा अल्पसा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘वानप्रस्थाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)

वानप्रस्थाश्रम

जीवनाच्या तिसऱ्या टप्प्यावर व्यक्ती अरण्यामध्ये जाऊन राहत असे आणि तेथे एका विशिष्ट एकांतवासात आत्म्याच्या सत्यशोधार्थ साधना करत असे. व्यक्ती तेव्हा कठोर सामाजिक बंधनापासून काहीशी मुक्त होऊन, अधिक मोकळ्या वातावरणात जीवन जगत असे. परंतु तिची इच्छा असेल तर ती व्यक्ती आपल्या अवतीभोवती तरुणांना एकत्र करून त्यांना किंवा चौकस व जिज्ञासू व्यक्तींना, स्वतःच्या ज्ञानाच्या आधारे मार्गदर्शन करू शकत असे आणि अशा रितीने ती व्यक्ती नवोदित पिढीचा शिक्षक किंवा आध्यात्मिक गुरू होऊ शकत असे. (क्रमश:)

• श्रीअरविंद (CWSA 20 : 175)