Tag Archive for: जीवन

नैराश्यापासून सुटका – ४०

जीवन आणि त्यातील अडचणींना धीराने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्याकडे नाही, अशा व्यक्तीला साधनेमधील त्याहून अधिक खडतर अशा आंतरिक अडचणींमधून पार होणे शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या अग्निपरीक्षा यांना शांत, अविचल मनाने, धीराने आणि ईश्वरी शक्ती‌वरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे; हा पूर्णयोगाच्या साधनेमधील पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111)

नैराश्यापासून सुटका – ३५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्ही कायम प्रसन्न राहावे, असे आम्हाला अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की, अंतरात्म्याच्या आनंदाला आता त्याचा स्वतःचा मार्ग सापडला आहे आणि कितीही अडचणी आल्या तरी तो आनंदच (आता तुम्हाला) मार्गप्रवण करेल आणि ध्येयाप्रत घेऊन जाईल, हे निश्चित. एखाद्या साधकामध्ये जेव्हा अशी प्रसन्नता सातत्याने आढळून येते, तेव्हा आम्हाला माहीत असते की, तो साधक त्याच्या अत्यंत कठीण अशा अडचणीमधून बाहेर पडला आहे आणि आता तो सुरक्षित मार्गावरून दृढतापूर्वक वाटचाल करू लागला आहे.

*

चेष्टामस्करी, थट्टा यामधील सुख हे प्राणिक (vital) स्वरूपाचे असते. ते असता कामा नये असे मी म्हणत नाहीये; पण त्यापेक्षाही एक अधिक गभीर अशी प्रसन्नता असते, एक आंतरिक ‘सुखहास्य‌’ असते आणि ते सुखहास्य ही प्रसन्नतेची आध्यात्मिक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 173, 174)

नैराश्यापासून सुटका – ३४

जीव ‘ईश्वर‌’शोधास प्रवृत्त व्हावा यासाठी दुःख आवश्यकच असते, या म्हणण्यामध्ये फारसे काही तथ्य नाही. जीव अंतरंगामधून ईश्वराला जी साद घालत असतो त्यातून तो ईश्वराभिमुख होण्यास प्रवृत्त होतो आणि व्यक्ती अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये असताना ही गोष्ट घडू शकते. अगदी पूर्ण समृद्धी व ऐषोआराम उपभोगत असताना किंवा बाह्यवर्ती विजयाच्या अगदी शिखरावर असताना आणि कोणतेही दुःख किंवा अपेक्षाभंग झालेला नसताना देखील, अकस्मात किंवा क्रमाक्रमाने होत गेलेल्या ज्ञानोदयामुळे जीव ईश्वराभिमुख होऊ शकतो; किंवा ऐंद्रिय सुखाच्या परमावधीमध्ये असताना, क्षणकाल चमकून गेलेल्या प्रकाशामुळे तो ईश्वराभिमुख होऊ शकतो; किंवा अहंकार व अज्ञानामध्ये बाह्यवर्ती जीवन जगण्यापेक्षा, अधिक महान असे काहीतरी सत्य अस्तित्वात असले पाहिजे अशी जाणीव झाल्यामुळे, तो ईश्वराभिमुख होऊ शकतो. अशा विविध परिस्थितीमध्ये जीव जेव्हा ईश्वराभिमुख होतो तेव्हा, त्यापैकी कोणत्याच परिस्थितीत, त्याच्या जोडीला दुःख आणि निराशेची आवश्यकता नसते.

“जीवन हे एखाद्या क्रीडेप्रमाणे आहे, ते तितकेच स्वारस्यपूर्ण देखील आहे, परंतु ती फक्त एक क्रीडा आहे; मानसिक आणि ऐंद्रिय जीवनापेक्षा आध्यात्मिक वास्तविकता (spiritual reality) ही कितीतरी अधिक महान आहे,” असे म्हणत बहुधा व्यक्ती ईश्वराकडे वळते. व्यक्ती कोणत्याही कारणाने जरी ईश्वराकडे वळली तरी, ईश्वराकडून आलेली हाक किंवा जिवाने ईश्वराला घातलेली सादच महत्त्वाची असते. सामान्यात: प्रकृतीला भुरळ पाडणाऱ्या गोष्टींपेक्षा ईश्वराबद्दलचे हे आकर्षण कितीतरी अधिक प्रभावी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 202)

नैराश्यापासून सुटका – ०५

सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या सभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता. तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थी भावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर, तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार; म्हणजे सतत दु:ख, सततचा असंतोषच तुमच्या वाट्यास येणार; म्हणजे अंतिमत: तुमच्या पदरी नैराश्यच पडणार.

तुम्ही देह-त्याग केलात तर तुमची या वातावरणापासून सुटका होईल असे तुम्ही मानता कामा नये; उलट, देह हा एक प्रकारे अचेतनाचा (unconsciousness) पडदा असल्यासारखा असतो, जो दुःखभोगाची तीव्रता कमी करतो. जडभौतिक प्राणिक जीवनामध्ये (vital life) वावरत असताना जर तुम्ही देहाच्या संरक्षणाविना असाल तर, दुःखभोग हे अधिक तीव्र होतात आणि ज्यामध्ये बदल घडविणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडविण्याची, ज्यामध्ये सुधारणा घडविणे आवश्यक असते त्यामध्ये सुधारणा घडविण्याची, आणि अधिक उच्चतर, अधिक आनंदी व अधिक प्रकाशमय जीवन व चेतना यांच्याप्रत स्वतःला खुले करण्याची संधीही (देह नसल्याने) आता तुमच्यापाशी नसते.

म्हणून तुम्ही तुमचे कार्य येथेच (या पृथ्वीवर असतानाच) करण्याची त्वरा केली पाहिजे; कारण तुम्ही तुमचे कार्य इथेच खऱ्या अर्थाने करू शकता. मृत्युकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. जीवन हीच तुमची मुक्ती आहे. या जीवनात राहूनच तुम्ही स्वतःचे रूपांतरण केले पाहिजे. पृथ्वीवरच तुमची प्रगती होऊ शकते आणि पृथ्वीवरच तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. या देहामध्ये असतानाच तुम्ही विजय संपादन करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 197-198)

आध्यात्मिकता ४९

‘सर्व जीवन म्हणजे योगच आहे’

०१) पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी सक्षम नसते… आणि म्हणून या मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतर आणि प्रतिक्रिया यांपासून स्वतःला दूर राखणे अगदी अनिवार्य असते.

०२) सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी कोणती प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.

०३) तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.

०४) कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून त्या परिस्थितीला सामोरे जा.

०५) आणि तरीसुद्धा, तुम्ही अजून कोणती प्रगती करणे आवश्यक आहे याचा शोध घेण्यामध्ये कायम सतर्क राहा आणि तसे करण्यासाठी अजिबात वेळ दवडू नका.

०६) भौतिक घटनांच्या दर्शनी रूपावरून त्याचे मूल्य ठरवू नका. कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.

०७) एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर ती ताकद असेलच, तर तक्रार करण्याऐवजी (त्या व्यक्तीमधील ती गोष्ट) बदलून टाका.

०८) तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वतः समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका. एकदा का तुम्ही या महान शोधासाठी (चैत्य पुरुषाचा शोध) प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात.

०९) खाण्यापूर्वी काही क्षण अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य (पोषक) द्रव्य मिळावे आणि तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल, अशी भावना ठेवा.

१०) झोपी जाण्यापूर्वी काही क्षण अशी अभीप्सा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरू करू शकाल.

११) कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच नाही तर परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

१२) जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा जे तुमच्या मुखातून बाहेर पडणे नितांत आवश्यक आहे तेवढेच बोलण्यास संमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास संमती द्या.

१३) सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे; तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर त्या परमशोधाची इच्छा असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

१४) तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, बाह्य रूपे केवळ नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुतः जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे जीर्ण कपडे जसे टाकून द्यावेत त्याप्रमाणे असतात, याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल. आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याच्या भाराने दबून जाऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल. आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

‘आध्यात्मिकता’ ही मालिका येथे समाप्त झाली.

– श्रीमाताजी [CWM 12 : 33-35]

विचार शलाका – १९

व्यक्ती दिव्यत्वाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी या पृथ्वीवर आलेली असते, हेच त्याच्या पार्थिव अस्तित्वाचे औचित्य आहे.

अन्यथा या प्रयोजनाविना त्याचे पार्थिव जीवन म्हणजे एक राक्षसीपणा ठरला असता.

‘ईश्वरा’चा पुनर्शोध घेणे आणि स्वत:च ‘तो’ बनणे, ‘त्या’चे आविष्करण करणे, बाह्य जीवनात सुद्धा ‘त्या’चा अनुभव घेणे हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन (जीवनात) नसते, तर हे पार्थिव जीवन म्हणजे एक भयंकर, अघोरी अशी बाब ठरली असती.

साहजिकच आहे, लोक जेवढे जास्त जाणीवशून्य असतात तेवढीच त्यांना ही गोष्ट कळण्याची शक्यता कमी असते. कारण ते वस्तुनिष्ठपणे पाहात नाहीत, स्वत:च्या जीवनसरणीविषयी जागरुक नसतानाही, किंवा त्रयस्थ होऊन स्वत:चा वस्तुनिष्ठपणे विचार न करता ते केवळ सवयीनुसार, यांत्रिकपणे जगत राहतात. आणि मग जसजशी जाणीव, चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे त्यांना कळू लागते की हे जीवन – जसे ते आत्ता आहे – तसे जीवन हा किती भयप्रद नरक आहे.

आणि जीवन त्याला ज्या दिशेने घेऊन जात असते त्याविषयी जेव्हा तो सचेत (conscious) होतो, तेव्हाच तो जीवनाचा स्वीकार करू शकतो, आणि त्याचे आकलन करून घेऊ शकतो. केवळ जीवनाच्या या प्रयोजनामुळेच जीवन स्वीकारार्ह होते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 119)