Tag Archive for: चेतना

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २१

व्यक्ती ईश्वराप्रति जर विश्वासाने आणि खात्रीपूर्वक स्वत:स अर्पण करेल तर ईश्वराकडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल. तिची आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, (आंतरिक व बाह्य चेतना यामधील तसेच कनिष्ठ चेतना व उच्चतर चेतना यामधील) पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मार्पण जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य व मार्गदर्शन मिळत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क व त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची लुडबुड कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. तेव्हा मग त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता उरणार नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 69)

साधना, योग आणि रूपांतरण – ८४

(आरोहण आणि अवरोहण प्रक्रियेचे परिणाम काय घडून येतात हे कालच्या भागात आपण पाहिले.)

एकदा हे अवरोहण स्वाभाविक झाले की, श्रीमाताजींची ‘दिव्य शक्ती’ आणि त्यांची ‘ऊर्जा’ कार्य करू लागते, आणि आता ती केवळ वरून किंवा पडद्याआडूनच कार्य करते असे नव्हे तर ती खुद्द ‘आधारा’मध्येच सचेतरितीने कार्यरत होते आणि आधाराच्या अडीअडचणी, त्याच्या संभाव्यता या गोष्टी हाताळू लागते आणि ती ‘दिव्य शक्ती’च तुमची योगसाधना करू लागते.

आणि मग सरतेशेवटी, सीमा ओलांडण्याची वेळ येते. तेथे चेतना निद्रिस्त नसते किंवा तिच्यात घट झालेली नसते. कारण चेतना ही सदासर्वकाळ तेथे असतेच; फक्त आता ती चेतना बाह्यवर्ती आणि भौतिकातून निघून, बाह्यवर्ती गोष्टींना आपली द्वारे बंद करून घेते आणि अस्तित्वाचा भाग असणाऱ्या आंतरिक आत्म्यामध्ये आणि प्राणामध्ये प्रवेश करण्यासाठी काहीशी मागे सरकते. आणि तेथे चेतना अनेकानेक अनुभवांमधून प्रवास करते. यामधील काही अनुभव हे जागृतावस्थेमध्ये सुद्धा जाणवले पाहिजेत, आणि तसे ते जाणवू शकतात. कारण, आंतरिक अस्तित्व अग्रभागी येणे आणि आंतरिक अस्तित्वाची आणि प्रकृतीची जाणीव होण्यासाठी चेतनेने अंतरंगामध्ये प्रविष्ट होणे, या दोन्हीही प्रक्रिया आवश्यक असतात.

अनेक कारणांसाठी चेतनेची ही अंतराभिमुख प्रक्रिया अपरिहार्य असते. अभिव्यक्त होण्यासाठी अगदी अंशतः प्रयत्नशील असणारे आंतरिक अस्तित्व आणि बाह्य साधनभूत चेतना यांच्यामधला जो अडथळा आहे तो अडथळा मोडून पडण्यामध्ये किंवा किमान तो दूर होऊन, त्यातून पलीकडे जात येण्यामध्ये तिचा (अंतराभिमुख प्रक्रियेचा) प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अनंत समृद्ध संभाव्यतेबाबत आणि अनुभूतीबाबत एक सचेत जाणीव भविष्यामध्ये निर्माण व्हावी आणि लोकं ज्याला चुकीने स्वतःचे संपूर्ण अस्तित्वच मानतात, त्या छोट्या, अगदी अंध आणि मर्यादित शारीरिक व्यक्तिमत्त्वाच्या पडद्याआड अलक्षितपणे पहुडलेल्या नवीन अस्तित्वाची आणि नव्या जीवनाची जाणीव (त्या लोकांना) भविष्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी तिचा प्रभाव कृतिशील असतो. (चेतनेने) अंतराभिमुख होत घेतलेली बुडी आणि या आंतरिक जगतामधून पुन्हा जागृतावस्थेमध्ये येणे या दरम्यान गहनतर, संपूर्ण आणि समृद्ध असणाऱ्या जाणिवेचा प्रारंभ होतो आणि ती जाणीव निरंतर विस्तार पावू लागते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217)

साधना, योग आणि रूपांतरण – २८

सर्वसाधारणपणे (व्यक्तीमधील) चेतना ही सर्वत्र पसरलेली, विखुरलेली असते. ती या किंवा त्या दिशेने, या किंवा त्या वस्तुंच्या वा विषयांच्या मागे बारा वाटांनी धावत असते. जेव्हा एखादी शाश्वत स्वरूपाची गोष्ट करायची असते तेव्हा व्यक्ती प्रथम कोणती गोष्ट करत असेल तर ती म्हणजे – ही सर्वत्र विखुरलेली चेतना अंतरंगामध्ये ओढून घेते आणि एकाग्रता करते. त्यानंतर मग, जर व्यक्ती अधिक बारकाईने निरीक्षण करू लागली तर तिला असे आढळते की तिचे लक्ष एका जागी आणि कोणत्या तरी एका मनोव्यापारावर, एका विषयावर किंवा एखाद्या वस्तुवर केंद्रित झाले आहे – तुम्ही काव्यरचना करत असता किंवा एखादा वनस्पतीशास्त्रज्ञ फुलाचा अभ्यास करत असतो तसेच असते हे. जर तो विचार असेल तर व्यक्तीचे लक्ष तिच्या मेंदूमध्ये कोठेतरी एखाद्या जागी केंद्रित झालेले असते. आणि जर ती भावना असेल तर व्यक्तीचे लक्ष हृदयामध्ये केंद्रित झालेले असते.

योगमार्गातील एकाग्रता (concentration) म्हणजे याच गोष्टीचे विस्तारित आणि घनीभूत रूप असते. त्राटक करताना, व्यक्ती एखाद्या तेजस्वी बिंदुवर लक्ष केंद्रित करते त्याप्रमाणे एखाद्या वस्तुवर एकाग्रता केली जाऊ शकते. तेव्हा व्यक्तीला त्या बिंदुवर, त्या वस्तुवर अशा रीतीने लक्ष केंद्रित करावे लागते की व्यक्तीला फक्त तो बिंदूच दिसतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार तिच्या मनात नसतो. व्यक्ती एखाद्या संकल्पनेवर, एखाद्या शब्दावर किंवा एखाद्या नामावर, (म्हणजे उदाहरणार्थ) ईश्वराच्या संकल्पनेवर, ॐ या शब्दावर किंवा कृष्णाच्या नामावर किंवा संकल्पना व शब्द किंवा संकल्पना व नाम यांच्यावर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करू शकते. परंतु पुढे व्यक्ती योगामध्ये (भ्रूमध्यासारख्या) एका विशिष्ट स्थानीसुद्धा लक्ष केंद्रित करू शकते.

भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची एक प्रसिद्ध पद्धत आहे. भ्रूमध्य हे आंतरिक मनाचे, गूढ दृष्टीचे आणि संकल्पाचे केंद्र असते. तेथून तुम्ही तुमच्या एकाग्रतेचा जो विषय असतो त्याचा दृढपणे विचार केला पाहिजे किंवा त्या केंद्राच्या ठिकाणी त्या एकाग्रतेचा विषयाची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर असे करण्यात यशस्वी झालात तर, काही काळानंतर, तुमची समग्र चेतना त्या स्थानी (अर्थात काही काळासाठी) एकवटली असल्याचे तुम्हाला जाणवेल. काही काळ आणि पुन्हापुन्हा तसे करत राहिल्याने ही प्रक्रिया सहज सुलभ बनते.

पूर्णयोगामध्ये आपण तेच करतो पण त्यामध्ये भ्रूमध्यामधल्या एका विशिष्ट बिंदुवरच लक्ष एकाग्र करावे लागते असे नाही, तर मस्तकामध्ये कोठेही तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता किंवा शरीर-विज्ञान शास्त्रज्ञांनी जेथे हृदयकेंद्राचे स्थान निश्चित केले आहे तेथे म्हणजे छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र केले जाते.

एखाद्या वस्तुवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही एखादा संकल्प करून मस्तकामध्ये लक्ष एकाग्र करू शकता; वरून तुमच्यामध्ये शांती अवतरित व्हावी म्हणून तिला आवाहन करू शकता किंवा काहीजण करतात त्याप्रमाणे, अदृष्ट (unseen) झाकण उघडावे (अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांच्यामध्ये असणारे झाकण, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी असते.) आणि तेथून त्याच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आरोहण करता यावे यासाठी तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता. हृदयकेंद्रामध्ये तुम्ही (‘ईश्वरी शक्ती’प्रत) खुले होण्यासाठी एक अभीप्सा बाळगून, किंवा तेथे ‘ईश्वरा’ची चैतन्यमय प्रतिमा दिसावी किंवा ‘ईश्वरी’ उपस्थितीची जाणीव व्हावी यासाठी किंवा अन्य कोणत्या एखाद्या उद्दिष्टासाठी लक्ष एकाग्र करू शकता. तेथे तुम्ही नामजप करू शकता, पण तसे असेल तर, तेथे तुम्ही त्या नामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हृदयकेंद्रामध्ये ते नाम आपोआप चालू राहिले पाहिजे.

तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, जेव्हा असे एखाद्या विशिष्ट स्थानी लक्ष एकाग्र झालेले असते तेव्हा उर्वरित चेतनेचे काय होते? अशा वेळी, एकतर ती चेतना, इतर एकाग्रतेच्या वेळी जशी शांत होते तशी, ती शांत होऊन जाते किंवा तसे झाले नाही तर, विचार किंवा अन्य गोष्टी जणूकाही (तुमच्या) बाहेर असाव्यात त्याप्रमाणे इतस्ततः हालचाल करत राहतात पण एकाग्र झालेला भाग त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याने विचलितही होत नाही. अशावेळी एकाग्रता बऱ्यापैकी यशस्वी झालेली असते.

परंतु तुम्हाला जर अशा प्रकारे एकाग्रतेची, ध्यानाची सवय नसेल तर तुम्ही दीर्घ काळ ध्यान करून स्वतःला शिणवता कामा नये कारण शिणलेल्या मनाने ध्यान केले तर ध्यानाचे सर्व मोल वा त्याची शक्ती हरवून जाते. अशा वेळी तुम्ही एकाग्रतेच्या (concentration) ऐवजी, ‘विश्रांत’ अवस्थेमध्ये ध्यान (meditation) करू शकता. तुमची एकाग्रता जेव्हा सहजस्वाभाविक होते तेव्हाच तुम्ही अधिकाधिक दीर्घ वेळ ध्यान करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 308-309)

अमृतवर्षा १५

 

पूर्णत्वप्राप्तीसाठीची पहिली पायरी म्हणजे आपल्या स्वत:विषयी, आपल्या अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांविषयी व त्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या कार्यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे कळू शकेल.

…(आपल्या अस्तित्वाच्या) या क्रियांचे, गतीविधींचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना आपल्या उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, त्याने दिलेला निर्णय मानण्याची आपण प्रामाणिक इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील निर्णयक्षमतेला असे वळण लावण्याची आपण आशा बाळगू शकू, की जी कधीच चुकणार नाही.

श्रीमाताजी [CWM 12 : 03]

चेतना व्यापक करण्याचे बौद्धिक मार्गही बरेच आहेत. जेव्हा तुम्ही कशाने तरी कंटाळला असाल, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला दुःखदायक किंवा अत्यंत अप्रिय वाटत असेल, तेव्हा जर तुम्ही कालाच्या अनंततेचा किंवा अवकाशाच्या असीमतेचा विचार करायला लागलात, जे काही आत्तापर्यंत घडून गेलेले आहे व जे काही पुढे घडणार आहे त्या सगळ्याचा विचार करायला लागलात आणि अनंत काळातील हा क्षण म्हणजे जणू काही ‘आला क्षण, गेला क्षण’ असा आहे हे जर तुम्हाला जाणवले तर मग या अनंत काळाच्या तुलनेत, अशा एखाद्या गोष्टीने अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच किरकोळ, हास्यास्पद वाटू लागते. अशी गोष्ट इतकी नगण्य ठरते की, तिची जाणीव होण्याइतका सुद्धा वेळ नसतो, तिला काही स्थान नसते, महत्त्व नसते कारण खरोखर अनंत काळाच्या अनंततेमध्ये एक क्षण तो काय?… तुमच्या जर हे लक्षात येऊ शकले आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात, तुम्ही जर असे चित्र रंगवू शकलात की, आपण किती छोटी व्यक्ती आहोत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती सुद्धा किती लहान आहे आणि जाणिवेतील एक क्षण, जो तुम्हाला आत्ता दुखावतो आहे किंवा अप्रिय वाटतो आहे, तो सुद्धा तुमच्या जीवनातील एक लहानसा क्षण आहे; तसेच तुम्ही पूर्वी काय काय होतात आणि पुढे काय काय होणार आहात ते आणि आत्ता जी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करत आहे ती, कदाचित दहा वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे विसरूनही जाल किंवा तुम्हाला त्याची आठवण झाली तर तुम्ही म्हणाल, ‘मी त्या गोष्टीला इतके महत्त्व कसे दिले?”… हे सगळे मुळात जर तुम्हाला जाणवू शकले आणि नंतर तुम्हाला तुमच्या खुज्या व्यक्तित्वाची जाणीव झाली तर.. आणि हे व्यक्तित्वसुद्धा कसे? तर अनंत काळांतील जणू एखादा क्षण. नाही नाही, क्षणाइतकेही नाही, कळणारही नाही इतका क्षणाचाही अंशभाग म्हणावे असे तुमचे व्यक्तित्व आहे, ह्याची जाणीव तुम्हाला झाली तर?

तुम्हाला जर अशीही जाणीव झाली की, हे सबंध जग यापूर्वीही आविष्कृत झाले आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आविष्कृत होत राहणार आहे; समोर, पाठीमागे, सर्व बाजूंनी… तर तुम्हाला एकदम असे वाटू लागेल की तुमच्या बाबतीत जे काय घडले आहे, त्याला इतके महत्त्व देणे हे किती हास्यास्पद आहे!… खरोखरीच तुम्हाला असे वाटू लागेल, की तुम्ही तुमच्या स्वत:ला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना जे महत्त्व देत आहात ते किती असमंजसपणाचे आहे.

जर तुम्ही असे योग्य प्रकारे केलेत तर केवळ तीन मिनिटांच्या अवधीत सर्व अप्रियपणा एकदम झटकला जाईल, अगदी खोलवर गेलेले दुःख देखील झटकून टाकता येईल. अशा रीतीने फक्त एकाग्रता करायला पाहिजे, आपण अनंतत्वात आणि शाश्वततेत आहोत अशी कल्पना केली पाहिजे. तर मग सर्वकाही निघून जाईल. त्यातून तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडाल. हे सर्व योग्य रीतीने कसे करायचे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही सर्व आसक्तीपासून मुक्त होऊ शकाल, एवढेच नव्हे तर, मी सांगते की, अगदी खोलवर गेलेल्या दु:खापासूनसुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या क्षुद्र अहंकारातूनही बाहेर याल.

 

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

विचारशलाका ४२

 

भाग – ०४

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

व्यक्तीने त्या अनुभवाचा स्वत:च्या अंत:करणात शोध घ्यावा, किंवा त्याचे स्मरण ठेवावे अथवा त्याचे निरीक्षण करावे, परंतु व्यक्तीने काय चालू आहे त्याची नोंद घेतलीच पाहिजे, त्याकडे लक्ष पुरविलेच पाहिजे, बस्, इतकेच पुरेसे असते.

व्यक्ती कधीकधी, एखादी अगदी उदारतेने केलेली कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी तिच्या कानावर पडते; उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी ती पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता अचानकपणे दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारे द्वार खुले होते. हा देखील तो संकेताचा धागा पकडण्याचा एक प्रकार आहे. हजारो मार्ग आहेत, व्यक्तीने फक्त सावधचित्त असले पाहिजे आणि निरीक्षण केले पाहिजे.

यासाठी सर्वप्रथम स्वत:ला ‘चेतनेमधील परिवर्तना’ची निकड जाणवली पाहिजे; तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत घेऊन जाणारा हाच तो मार्ग आहे हे तुम्ही स्वीकारलेच पाहिजे आणि एकदा का तुम्ही ते तत्त्व स्वीकारले की, मग तुम्ही दक्ष असले पाहिजे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, तुम्हाला ते निश्चितपणे गवसते. आणि एकदा का ते गवसले की, कोणतीही चलबिचल न होऊ देता, तुम्ही वाटचालीला सुरुवात केली पाहिजे.

व्यक्तीने सदानकदा उदासीन, अनुत्सुक असे जीवन जगू नये; सदोदित अनास्था बाळगू नये. व्यक्तीने आत्मनिरीक्षण केले पाहिजे, व्यक्तीने कायम सावध राहिले पाहिजे, हा प्रारंभबिंदू आहे.

– श्रीमाताजी [CWM 08 : 404-405]

विचारशलाका ४१

 

भाग – ०३

 

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

तुम्हाला नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले असतात पण आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग यामध्ये ती परिणामकारकता नसते; जी परिणामकारकता कोणत्याही सुस्पष्ट कारणाविना आलेल्या या उत्स्फूर्त अनुभवामध्ये असते. ते आत्म्याच्या जागृतीचे सहजतेने उमलणे असते; तुमचा तुमच्या चैत्य पुरुषाशी (Psychic being) क्षणभरापुरता आलेला तो संपर्क असतो; त्यातून तुमच्या आवाक्यात असलेला, तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेला मार्ग कोणता, हे तुम्हाला दर्शविण्यात आलेले असते. ध्येयपूर्तीसाठी त्या मार्गाचे चिकाटीने अनुसरण करणे एवढेच आता तुम्हाला करायचे असते – हा असा एक क्षण असतो की, जो तुम्हाला कशी व कोठून सुरुवात करायची हे दाखवून देतो….

काही जणांना हा अनुभव रात्री स्वप्नामध्ये येतो, एखाद्याला तो कोणत्याही आकस्मिक क्षणी येऊ शकतो; कधीतरी कोणाला असे काहीतरी दिसते की, ज्यामुळे त्याच्यामध्ये एक नवीनच चेतना उदयास येते. व्यक्तीच्या ऐकण्यात काहीतरी येते, एखादे सुंदर निसर्गदृश्य, सुमधुर संगीत, वाचण्यात आलेले काही शब्द किंवा जीवापाड एकाग्रतेने केलेल्या प्रयासाची उत्कटता असे ते काहीही असू शकते, हा अनुभव येण्याचे अक्षरश: हजारो मार्ग आणि हजारो कारणे आहेत.

पण मी पुन्हा तेच सांगते, की ज्यांना साक्षात्कार होणार हे निश्चित असते त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी असा हा अनुभव येतोच येतो. भले तो क्षणिक असेल, भले त्यांना तो अनुभव अगदी बालपणी आलेला असेल पण आयुष्यात एकदा तरी ‘खरी चेतना’ काय याचा अनुभव त्यांना आलेला असतो. कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे सूचित करणारा तो सर्वोत्तम संकेत असतो. (क्रमश: …)

– श्रीमाताजी [CWM 08 : 404]

विचारशलाका ४०

 

भाग – ०२

 

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव पुन्हा आठवून पाहिला पाहिजे, त्याची आस बाळगली पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा प्रारंभबिंदू असतो; आणि तुम्हाला तुमचा मार्ग कोणता याचे मार्गदर्शन करणारा जो धागा होता, जो संकेत देण्यात आला होता त्याचे प्रयोजन आता येथे संपलेले असते.

ज्यांना स्वत:च्या आंतरिक अस्तित्वाचा, अस्तित्वाच्या सत्याचा शोध लागणार हे ज्यांच्याबाबतीत निर्धारित झालेले असते, त्यांच्या जीवनात एखादा तरी असा क्षण असतो की, जेव्हा ते पहिल्यासारखे राहत नाहीत, वीज चमकून जावी तसा तो क्षण असतो, पण तो तेवढा एखादा क्षणही पुरेसा असतो. व्यक्तीने कोणता मार्ग अनुसरावा हे सुचविण्यासाठी ते पुरेसे असते; हेच ते द्वार असते की जे या मार्गाकडे (चेतनेचे परिवर्तन घडविणाऱ्या मार्गाकडे) उघडले जाते. तेव्हा तुम्ही या द्वारातून प्रवेश केलाच पाहिजे. आणि प्राप्त झालेल्या त्या अवस्थेला उजाळा देण्यासाठी तुम्ही अथक चिकाटीने, सातत्याने आणि अविरत स्थिरपणे प्रयत्नशील राहिले पाहिजे. म्हणजे मग ती अवस्था तुम्हाला अधिक खऱ्याखुऱ्या, अधिक समग्र अशा एका अवस्थेकडे घेऊन जाईल. (क्रमश: ..)

– श्रीमाताजी [CWM 08 : 404]

विचारशलाका ३९

 

भाग – ०१

 

साधक : व्यक्तीने स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन कसे करायचे?

श्रीमाताजी : अर्थातच याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आणि बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे त्या मार्गाचा संकेत आपल्याला मिळून जातो. तो मार्ग गवसण्याची पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत काहीशी वेगवेगळी असते.

उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पसरलेल्या अशा अगदी सामान्य चेतनेचे भान असू शकते; ती एकाचवेळी वस्तुमात्रांच्या पृष्ठवर्ती भागामध्ये कार्य करते. माणसं, वस्तू परिस्थिती यांच्या वरवरच्या बाह्यवर्ती भागाशी तिचा संपर्क असतो आणि कधीतरी अचानक या ना त्या कारणाने – मी म्हटले त्याप्रमाणे, प्रत्येकाबाबत हे कारण वेगळे असते – तुमची चेतना वर उचलली जाते; आणि वस्तुमात्रांकडे त्यांच्याच पातळीवरून म्हणजे क्षितिजसमांतर पद्धतीने पाहण्याऐवजी, तुम्ही अकस्मात इतरांवर प्रभुत्व मिळविता, त्यांच्याकडे वरून पाहता; तुमच्या जवळपास असणाऱ्या छोट्या छोट्या अगणित गोष्टी पाहण्यापेक्षा आता तुम्ही त्यांच्याकडे समग्रतेने पाहता; जणू काही तुम्हाला कोणीतरी वर उचलून घेतलेले असते आणि तुम्ही पर्वतशिखरावरून किंवा विमानातून पाहता. अशा वेळी, त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पातळीवरून न पाहता, आणि प्रत्येक छोटेमोठे बारकावे न्याहाळत न बसता, तुम्ही त्या सर्व गोष्टींमध्ये जणू एकत्व आहे या दृष्टीने आणि खूप उंचावरून पाहता.

हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग आहेत पण बहुधा हा अनुभव एखाद्या दिवशी अचानकपणे योगायोगाने येतो किंवा कधीकधी असेही होते की, या अनुभवाच्या अगदी विरोधी असाही अनुभव येतो पण आपण तेथेच येऊन पोहोचतो. व्यक्ती अचानकपणे चेतनेमध्ये अगदी खोलवर बुडी मारते, आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर जाते; या साऱ्या गोष्टी तिला आता दूरस्थ, वरवरच्या, अगदी किरकोळ अशा भासू लागतात; ती व्यक्ती आंतरिक निरवतेमध्ये, आंतरिक स्थिरतेमध्ये, वस्तुमात्रांच्या आंतरिक दृष्टीमध्ये प्रवेश करते. त्या व्यक्तीला वस्तुमात्रांचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे अगदी अंतरंगातून आकलन होते, एक सखोल जाणीव होते आणि त्यामुळे सर्वांचे मूल्यच बदलून जाते. आणि मग, वरकरणी कितीही बाह्य रुपं असली तरी त्या बाह्य रूपांपाठीमागे असलेल्या एका सखोल एकात्मतेची, एकरूपतेची जाणीव त्या व्यक्तीला होते.

किंवा कधीकधी, अचानकपणे, मर्यादितपणाची जाणीवच नाहीशी होते आणि आदिअंतरहित अशा अनिश्चित काळाच्या, की जो काळ आजवर होता आणि पुढेही कायमच असणार आहे अशा काळाच्या अनुभूतीमध्ये व्यक्ती प्रवेश करते. हे अनुभव तुमच्या आयुष्यात अचानकपणे वीजेप्रमाणे क्षणार्धात येतात; तुम्हाला कळतदेखील नाही ते का आणि कसे आले…

इतरही अनेक मार्ग असतात, अनेक अनुभव असतात. ते अगणित असतात, ते व्यक्तीव्यक्तीनुसार वेगवेगळे असतात, पण, एका क्षणाच्या, निमिषार्धातील या एखाद्या अनुभवामुळे तुम्ही त्या गोष्टीचा धागा पकडू शकता. (क्रमश: ..)

– श्रीमाताजी [CWM 08 : 402-404]

विचारशलाका ३७

 

परिपूर्ण चेतना प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तुमची प्रत्यक्ष चेतना ही तिच्या सद्यस्थितीतील सवयी व कक्षा यांच्या पलीकडे वृद्धिंगत करणे; तिला प्रशिक्षण देणे, तिला ‘दिव्य प्रकाशा’च्या दिशेने खुली करणे, तिच्यामध्ये ‘दिव्य प्रकाशा’ला त्याचे कार्य मुक्तपणे आणि परिपूर्णपणे करू देणे.

परंतु तो ‘दिव्य प्रकाश’ तेव्हाच त्याचे कार्य परिपूर्णपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व लालसा आणि भीती यांपासून मुक्त झालेले असता; जेव्हा तुमच्यामध्ये कोणतेही मानसिक पूर्वग्रह नसतात; कोणत्याही प्राणिक आवडीनिवडी नसतात; तुम्हाला बंधनात पाडणारी किंवा गढूळ करणारी कोणतीही शारीरिक भयशंकितता नसते किंवा विचलित करणारे कसले आकर्षणही नसते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 101]