Tag Archive for: गुलाम

आत्मसाक्षात्कार – २५

(मागील भागावरून पुढे…)

इथे तुम्ही कोणतीही चूक करता कामा नये. कारण ही चूक म्हणजे स्वतःला न जाणणे. तीच तुमच्या सर्व दुःखांचे उगमस्थान असते आणि तुमच्या सर्व अध:पतनाचे कारण असते.

तुम्हाला जो ‘मी’ आहे असे वाटते, त्या ‘मी’च्या अतीत तुम्ही गेलेच पाहिजे आणि तुम्ही ज्याला मनुष्य म्हणून ओळखता तो मनुष्य म्हणजे प्रकट ‘पुरुष’ असतो. आणि हा मनुष्य म्हणजे कोण? मनुष्य म्हणजे प्राण आणि जडभौतिक शरीर यांचा गुलाम असलेला मनोमय पुरुष असतो. आणि जेथे तो प्राण व शरीर यांचा गुलाम झालेला नसतो, तेथे तो त्याच्या मनाचा गुलाम असतो. पण ही फार मोठी गुलामी असते, कारण मनाचे गुलाम असणे म्हणजे मिथ्यत्वाचे, मर्यादिततेचे आणि व्यक्ताचे, दृश्याचे (apparent) गुलाम असणे होय. जो ‘स्व’ हा मन, प्राण आणि शरीर यांच्या पडद्याआड अंतरंगामध्ये असतो, तो ‘स्व’ तुम्ही बनले पाहिजे. आध्यात्मिक बनणे, दिव्य बनणे, अतिमानव, खरा ‘पुरुष’ बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. कारण मनोमय पुरुषाच्या ऊर्ध्वस्थित जर कोणी असेल तर तो ‘अतिमानव’ (superman) असतो.

अतिमानव बनणे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे, तुमच्या प्राणाचे आणि तुमच्या शरीराचे स्वामी बनणे; आत्ता तुम्ही ज्या प्रकृतीच्या हातचे साधन आहात, त्या प्रकृतीचे तुम्ही सम्राट बनणे. आत्ता तुम्ही तिच्या पायाखाली आहात, तेच तुम्ही तिच्याही वर जाण्यासाठी उचलले जाणे म्हणजे अतिमानव बनणे. अतिमानव बनणे म्हणजे गुलाम नव्हे तर, मुक्त होणे; विभक्त असणे नव्हे तर एकत्व पावणे; मृत्युने झाकोळलेले नसणे तर अमर्त्य असणे, अंधकारमय नव्हे तर संपूर्ण प्रकाशमान असणे; दुःखशोक यांच्या खेळामध्ये नसणे तर पूर्णतया आनंदमय असणे; दुर्बलतेच्या गर्तेत जाऊन पडणे नव्हे तर शक्तिसामर्थ्यामध्ये उन्नत होणे. अतिमानव बनणे म्हणजे अनंतामध्ये जीवन जगणे आणि सांत गोष्टींवर (finite) ताबा मिळवणे. अतिमानव बनणे म्हणजे ईश्वरामध्ये जीवन जगणे आणि त्याच्या अस्तित्वामध्ये राहून त्याच्याशी एकत्व अनुभवणे. हे सर्व बनणे आणि त्यापासून प्रवाहित होणाऱ्या साऱ्या गोष्टी बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150-151)

विचार शलाका – २१

आपण असे म्हणू शकतो की, मनुष्य हा त्याच्या प्रकृतीच्या अस्तित्वाच्या सर्व अवस्थांचा सर्वशक्तिशाली स्वामी आहे. पण ते तो विसरला आहे.

सर्वसामर्थ्यवान अशी ही त्याची स्वाभाविक अवस्था आहे पण त्याचे त्याला विस्मरण झाले आहे…

उत्क्रांतीच्या वळणावर, माणसाने त्याची सर्वशक्तिमानता विसरणेच आवश्यक होते, कारण या सर्वशक्तिमानतेमुळे त्याची छाती गर्व आणि अभिमान याने फुलली होती आणि तो पूर्णत: विकृत बनला होता. म्हणून त्यासाठी इतर कितीतरी गोष्टी त्याच्यापेक्षा अधिक बलवान आणि शक्तिशाली आहेत याची त्याला जाणीव करून देणे भागच होते; पण मूलत: ते तसे नव्हते. ती प्रगतीच्या वळणाची आवश्यकता होती इतकेच!

मनुष्य हा संभाव्यतेच्या दृष्टीने देव आहे. मात्र तो स्वत:ला प्रत्यक्षातच देव समजू लागला होता. पण एखाद्या किड्यामुंगीपेक्षा आपण अधिक सरस नाही हे त्याने शिकण्याची गरज होती. आणि त्यामुळे जीवनाने त्याला इतके आणि अशा तऱ्हेने पिळवटून काढले की, जेणेकरून त्याला ते उमगावे… अगदीच काहीनाही तर, त्याला निदान त्या गोष्टीची थोडी जाणीव तरी व्हावी. माणूस जेव्हा अगदी योग्य दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा त्याला लगेचच समजून येते की, संभाव्यतेच्या दृष्टीने तो देवच आहे. मात्र त्याने तसे बनले पाहिजे, म्हणजे, जे जे तसे (दैवी) नाही त्यावर त्याने मात केली पाहिजे.

देवांबरोबरचे हे नाते खूपच स्वारस्यपूर्ण असते… दिव्य जिवांच्या शक्तिमानतेमुळे, त्यांच्या सौंदर्यामुळे, दिव्य जिवांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या सिद्धींमुळे जोवर मनुष्य स्तंभित होत असतो, जोवर तो त्यांच्या स्तुतीमध्ये हरवून जात असतो, तोवर तो त्यांचा गुलाम असतो. पण ते दिव्य जीव म्हणजे परमेश्वरी अस्तित्वाची विविध रूपं असल्याचे जेव्हा त्याला उमगते आणि तो स्वत:सुद्धा, त्या परमेश्वरी अस्तित्वाचेच आणखी एक वेगळे रूप आहे, हे त्याला जाणवते – जे रूप त्याने बनले मात्र पाहिजे – तेव्हा मग, दिव्य जीव आणि मनुष्य यांच्यातील नाते बदलते. तेव्हा तो त्यांचा गुलाम राहात नाही. – तो मग त्यांचा गुलाम असत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 38-39)

जोवर स्त्रिया स्वत:ला मुक्त करत नाहीत तोवर,
कोणताही कायदा त्यांना मुक्त करू शकणार नाही.

पुढील गोष्टी स्त्रियांना गुलाम बनवतात –
१) पुरुष आणि त्याच्या सामर्थ्याविषयीचे आकर्षण
२) सांसारिक जीवन आणि त्याची सुरक्षा यांविषयीची इच्छा
३) मातृत्वाविषयीची आसक्ती

पुढील तीन गोष्टींमुळे पुरुष गुलाम होतात –
१) स्वामित्वाची भावना आणि सत्ता व प्रभुत्व यांबद्दलची आसक्ती
२) स्त्रीबरोबर लैंगिक संबंधाची इच्छा
३) वैवाहिक जीवनातील छोट्या छोट्या सुखांविषयीची आसक्ती

– श्रीमाताजी
(CWM 14 : 289)