Tag Archive for: खुलेपणा

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प आणि अभीप्सेला स्थान आहे, मात्र इच्छेला थारा नाही. जर इच्छा असेल तर तेथे आसक्ती, अपेक्षा, लालसा, समत्वाचा अभाव, ईश्वरप्राप्ती झाली नाही तर होणारे दुःख यासारख्या, योगाशी विसंगत असणाऱ्या सर्व गोष्टी आढळून येतील.

*

व्यक्तीला जे काही प्राप्त होते त्याबाबत तिने समाधानी असले पाहिजे आणि तरीही सर्वत्व (all) साध्य होत नाही तोपर्यंत व्यक्तीने, अधिकासाठी कोणताही संघर्ष न करता, शांतपणे आस बाळगली पाहिजे. तेथे इच्छा असता कामा नये, संघर्षसुद्धा असता कामा नये तर अभीप्सा, श्रद्धा, खुलेपणा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) ईश्वरी कृपा असली पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 61, 60)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६

साधकाची योगमार्गावर जी वाटचाल चालू असते त्या वाटचालीमध्ये अशी एक अवस्था येते की, ज्या अवस्थेमध्ये साधक त्याच्या अंतरंगामध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्य शक्तीविषयी सचेत असतो किंवा किमानपक्षी, तो त्या कार्याच्या परिणामाविषयी तरी नक्कीच सचेत असतो. (आणि अशा रितीने सचेत झाल्यामुळे) तो आता तिच्या अवतरणामध्ये किंवा तिच्या कार्यामध्ये, स्वतःच्या मानसिक गतिविधींमुळे किंवा स्वतःच्या प्राणिक अस्वस्थतेमुळे किंवा शारीरिक जडतेमुळे व तमोमयतेमुळे अडथळे निर्माण करत नाही. यालाच ‘ईश्वराप्रति खुले असणे’ (openness to the Divine) असे म्हणतात.

ईश्वराप्रति खुले होण्याचा समर्पण (Surrender) हा सवोत्तम मार्ग आहे. पण साधकामध्ये जोपर्यंत समर्पण भाव निर्माण होत नाही तोपर्यंत, अभीप्सा आणि अविचलतेच्या साहाय्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे खुलेपण येऊ शकते.

स्वतःकडे असलेले सर्वकाही ईश्वराच्या स्वाधीन करणे; तसेच स्वतःकडे जे आहे ते सर्व आणि एवढेच नव्हे तर, स्वत:ला सुद्धा ईश्वराप्रति अर्पण करणे म्हणजे ‘समर्पण’. समर्पण करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह धरता कामा नये तर, त्या प्रत्येकाची जागा दिव्य सत्याच्या ज्ञानाने, संकल्पाने आणि कार्याने घ्यावी यासाठी, त्या दिव्य सत्याला मोकळीक देणे म्हणजे ‘समर्पण’.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३४

श्रीमाताजींचे नित्य स्मरण केल्यामुळे व्यक्तीची पूर्ण उन्मुखतेच्या, खुलेपणाच्या (opening) दृष्टीने तयारी होते. हृदय खुले होण्याने श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव व्हायला सुरुवात होते आणि ऊर्ध्वस्थित असलेल्या त्यांच्या शक्तिप्रत उन्मुख झाल्याने, उच्चतर चेतनेचे सामर्थ्य देहामध्ये खाली उतरते आणि तेथे राहून ते, (व्यक्तीची) संपूर्ण प्रकृती बदलण्याचे कार्य करते.
*
श्रीमाताजींची प्रार्थना करणे, त्यांचा धावा करणे या गोष्टी मनाच्या क्रिया आहेत; तर उन्मुखता ही चेतनेची एक अशी स्थिती आहे की, जी चेतनेची इतर सर्व गतिविधींपासून मुक्तता करून, तिला श्रीमाताजींकडे अभिमुख ठेवते. अशी चेतना ईश्वराकडून जे काही येईल केवळ त्याचीच आस बाळगून असते आणि ते ग्रहण करण्यास ती सक्षम असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 167), (CWSA 29 : 105)

जीवन जगण्याचे शास्त्र – १५

सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे; श्रीमाताजींच्या शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करू देणे; तुम्हाला मार्गदर्शन करू देणे; तुम्हाला ज्ञान, शांती आणि आनंद प्रदान करू देणे म्हणजे श्रीमाताजींप्रति उन्मुख, खुले असणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले (open) राखू शकत नसाल तर, त्यासाठी सातत्याने पण शांतपणे अभीप्सा बाळगा.
*
चेतना ईश्वराप्रति खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151), (CWSA 29 : 208)

वैश्विक ‘ईश्वरी प्रेम’ सर्वांसाठी समानच असते. त्याचबरोबर व्यक्तिगत असणारा असा एक आंतरात्मिक अनुबंधदेखील (psychic connection) असतो. मूलतः तोदेखील सर्वांसाठी समानच असतो, पण त्यामध्ये प्रत्येकाशी असलेल्या विशेष नात्याला मुभा असते, आणि हे नाते मात्र सर्वांसाठी समान नसते, तर ते प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असते. आणि त्याचे त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र स्वरूप असते, ते त्याच्याच पद्धतीचे असते आणि त्याची इतरांशी तुलना करता येत नाही. इतर नात्यांशी तुलना करता ते तसेच असावे किंवा तोलूनमापून, संतुलित असावे अशी अपेक्षा इथे बाळगता येत नाही कारण ते प्रत्येक नाते अगदी स्वतंत्र असते.

…श्रीमाताजींचे प्रेम व्यक्तीला जाणवेल किंवा नाही हे ती व्यक्ती त्यांच्याप्रति खुली आहे किंवा नाही यावर अवलंबून असते, ती व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्यापासून किती जवळ वा दूर आहे यावर ते अवलंबून नसते. आंतरिक नात्याबद्दल व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी अचेत, जाणीवरहित (unconscious) बनवितात त्या गोष्टी तिने स्वतःमधून काढून टाकणे म्हणजे खुलेपणा (Openness). व्यक्तीला अंतरंगामध्ये जे नाते जाणवते त्याऐवजी त्या नात्याच्या बाह्याविष्करणाद्वारे त्याचे मोजमाप करणे, या संकल्पनेइतकी अन्य कोणतीच संकल्पना व्यक्तीला अचेत बनवीत नाही; (इतकेच नव्हे तर) या संकल्पनेमुळे, आंतरिक नात्याचे जे काही बाह्य आविष्करण दिसून येत असते त्याबद्दलही व्यक्ती अंध किंवा असंवेदनशील बनते. व्यक्ती श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या दूर अंतरावर असली किंवा ती त्यांना क्वचितच भेटत असली तरीही व्यक्तीला ते नाते जाणवते; उलट व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्याजवळ असूनही किंवा ती नेहमी श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये वावरत असली तरीदेखील, म्हणजे असे नाते असूनसुद्धा ते त्या व्यक्तीला न जाणवण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 507-508)

श्रीमाताजी आणि समीपता – ३०

‘क्ष’ हा साधक बहुधा पुढील दोन चुका करत आहे. तो श्रीमाताजींकडून प्रेमाच्या बाह्य अभिव्यक्तीची अपेक्षा करत आहे आणि दुसरी चूक म्हणजे, खुलेपणा आणि समर्पण यांवर निरपेक्षपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी तो प्रगती करण्याच्या मागे लागला आहे. साधक नेहमीच या दोन चुका करत असतात.

जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वराप्रत खुली होते, उन्मुख होते, जेव्हा ती समर्पित होते, तेव्हा तिच्या प्रकृतीची तयारी झाल्याक्षणीच आपसूकपणे त्या व्यक्तीची प्रगती होते. मात्र (त्याऐवजी) तिने फक्त प्रगतीवरच लक्ष केंद्रित केले तर त्यातून अडचणी, विरोध आणि निराशा या गोष्टी उद्भवतात कारण मन गोष्टींकडे योग्य दृष्टिकोनातून पाहत नसते.

खरंतर, श्रीमाताजी ‘क्ष’बाबत विशेष कृपावंत आहेत आणि या मार्गावर टिकून राहण्यासाठी त्याला मदत व्हावी यासाठी त्या दररोज ‘दर्शना’च्या वेळी त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती ओतण्याचा प्रयत्न करत असतात. ‘क्ष’ने मन आणि प्राण यांमध्ये अतिशय शांत राहायला आणि आत्मनिवेदित व्हायला शिकले पाहिजे त्यामुळे तो सजग होईल आणि तो ती शक्ती ग्रहणही करू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481-482)

श्रीमाताजी आणि समीपता – ०६

(एका साधकाला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…)

“श्रीमाताजींपासून लपवावीशी वाटेल अशी कोणतीही गोष्ट करू नका, अशी कोणतीही गोष्ट बोलू नका अथवा अशा कोणत्या गोष्टीचा विचारही करू नका.” आणि येथेच, तुमच्याकडून म्हणजे तुमच्या प्राणाकडून जी शंका उपस्थित करण्यात आली आहे त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अशा ‘किरकोळ गोष्टी’ श्रीमाताजींच्या नजरेस कशा आणून द्यायच्या ही तुमची शंका आहे. श्रीमाताजींना या गोष्टींचा त्रास होईल किंवा त्या या गोष्टींना क्षुल्लक मानतील असे तुम्हाला का वाटते? सर्व जीवन योगमय करायचे असेल तर, येथे क्षुल्लक किंवा बिनमहत्त्वाचे असे काही कसे काय असू शकेल?

तुमच्या कृतीची आणि स्वयं-विकासाची कोणतीही गोष्ट सुयोग्य वृत्तीने त्यांच्यासमोर मांडणे म्हणजे ती गोष्ट श्रीमाताजींच्या संरक्षणछत्राखाली नेण्यासारखी आहे; रूपांतरणासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्या शक्तीकिरणांमध्ये, ‘सत्या’च्या प्रकाशात नेण्यासारखी आहे. कारण श्रीमाताजींच्या नजरेला जे आणून देण्यात आलेले असते त्या गोष्टीवर त्यांचे शक्तीकिरण लगेचच कार्य करू लागतात. तुमचा अंतरात्मा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करत असेल आणि तेव्हा तुमच्यामधीलच कोणीतरी, तुम्हाला ती गोष्ट तुम्ही करू नये असे सुचवत असेल तर ते म्हणजे, तो ‘प्रकाश’किरण आणि त्या ‘शक्ती’चे कार्य टाळण्यासाठी तुमच्या प्राणाने वापरलेले ते एक हत्यार असण्याची खूपच शक्यता असते.

आणखी एक गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि ती अशी की, तुम्ही जर तुमच्या कोणत्याही भागाच्या वृत्ती-प्रवृत्ती श्रीमाताजींनी पाहाव्यात म्हणून त्यांच्या नजरेसमोर ठेवून, श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले केलेत तर, त्यातूनच स्वयमेव त्यांच्याबरोबरचे तुमचे एक नाते तयार होते आणि त्यातून एक वैयक्तिक जवळीक निर्माण होते. त्यांचे सर्व साधकांबरोबर जे एक सर्वसाधारण, मूक नाते असते किंवा श्रीमाताजींनी आपल्यामध्ये कार्य करावे अशी कोणतीही विनवणी व्यक्तीने केलेली नसतानाचे त्या व्यक्तीचे श्रीमाताजींशी जे नाते असते (not directly invited action) त्यापेक्षा हे जवळीकीचे नाते काहीसे निराळे असते.

अर्थातच, हे सारे केव्हा घडून येऊ शकते? अशा प्रकारच्या खुलेपणासाठी तुम्ही तयार झाले आहात, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते जसेच्या तसे अगदी उघडपणे श्रीमाताजींसमोर ठेवण्यासाठी तुमचा अंतरात्मा तुम्हाला प्रेरित करत असेल तेव्हाच हे घडून येऊ शकते. जेव्हा ही गोष्ट अंतरंगातून उमलून येते आणि जेव्हा ती उत्स्फूर्त, खरीखुरी असते तेव्हाच ती फलदायी ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 449)

साधना, योग आणि रूपांतरण – २४९

मानसिक रूपांतरण

व्यक्तीकडे श्रद्धा आणि खुलेपणा, उन्मुखता (openness) असणे पुरेसे असते. याशिवाय, दोन प्रकारचे आकलन असते. एक प्रकार म्हणजे बुद्धीद्वारे होणारे आकलन आणि दुसरा प्रकार म्हणजे चेतनेद्वारे होणारे आकलन. बुद्धीद्वारे होणारे आकलन जर अचूक असेल तर ते आकलन असणे चांगले, परंतु असे आकलन अनिवार्यच असते, असे मात्र नाही. श्रद्धा आणि खुलेपणा असेल तर चेतनेमधून आकलन होऊ लागते. अर्थात, असे आकलन क्रमशः आणि अनुभवांच्या पायऱ्या ओलांडल्यानंतरच होण्याची शक्यता असते. मी काही अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत की, ज्या फारशा शिकलेल्या नव्हत्या किंवा ज्यांच्यापाशी फारशी बौद्धिकता नव्हती मात्र तरीही त्यांनी चेतनेच्या साहाय्याने, योगमार्गाचे परिपूर्ण आकलन करून घेतले होते. पण बुद्धिवादी माणसं मात्र मोठ्या चुका करतात. उदाहरणार्थ, अशी माणसं विरक्त मानसिक अविचलतेलाच (quietude) आध्यात्मिक शांती समजतात आणि मार्गावर अजून प्रगत होण्यासाठी, त्या अविचल अवस्थेतून बाहेर पडण्यास नकार देतात.
*
मनाद्वारे मिळालेली माहिती (जी नेहमीच अनुभवविरहित असते त्यामुळे तिचे योग्य रीतीने आकलन होत नाही.) ही साहाय्यक ठरण्याऐवजी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. वास्तविक, या गोष्टींबाबत कोणतेही निश्चित असे मानसिक ज्ञान नसते, त्यामध्ये अगणित प्रकारचे वैविध्य असते. मानसिक माहितीच्या उत्कंठेच्या पलीकडे जायला आणि ज्ञानाच्या खऱ्या मार्गाप्रत खुले व्हायला तुम्ही शिकलेच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 53, 10)

साधना, योग आणि रूपांतरण – १८५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया खुलासेवार उलगडवून दाखविली आहे. हे पत्र महत्त्वाचे पण बरेच विस्तृत आहे. त्यामुळे आपण ते क्रमश: विचारात घेणार आहोत.)

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०१

‘शांति’ (Peace) किंवा ‘नीरवता’ (Silence) लाभण्यासाठी वरून होणारे अवतरण हा निर्णायक मार्ग असतो. वास्तविक, दृश्यरूपात नेहमीच तसे दिसले नाही तरी, प्रत्यक्षात मात्र या गोष्टी नेहमीच अशा रीतीने घडून येतात. ‘दृश्यरूपात नेहमीच तसे दिसत नसले’, असे म्हणण्याचे कारण की साधकाला या प्रक्रियेची नेहमीच जाणीव असते असे नाही. त्याच्यामध्ये शांती स्थिरावते आहे किंवा किमान आविष्कृत तरी होत आहे असे त्याला जाणवते, पण ती कशी आणि केव्हा येते याची त्याला जाणीव नसते. तरीही हे सत्य आहे की, जे जे काही उच्चतर चेतनेशी संबंधित असते ते वरून येते; केवळ आध्यात्मिक शांती, नीरवता याच गोष्टी नव्हेत तर ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘ज्ञान’, उच्चतर दृष्टी आणि विचार, ‘आनंद’ या सर्वच गोष्टी वरून येतात.

एका विशिष्ट टप्प्यापर्यंत या गोष्टी अंतरंगातून सुद्धा येऊ शकतात; परंतु ते यामुळे शक्य होते कारण ‘चैत्य पुरुष’ (psychic being) त्यांच्याप्रत थेटपणे खुला झालेला असतो आणि त्यामुळे उपरोक्त गोष्टी आधी तेथे येतात आणि चैत्य पुरुषाद्वारे, किंवा त्याच्या पुढे येण्यामुळे, या गोष्टी स्वतःला, अस्तित्वाच्या इतर अंगांमध्येदेखील प्रकट करतात.

अंतरंगातून होणारे प्रकटीकरण किंवा वरून होणारे अवतरण हे ‘योगसिद्धी’चे दोन सार्वभौम मार्ग आहेत. बाह्य पृष्ठवर्ती मनाचा प्रयत्न किंवा भावना, एखाद्या प्रकारची तपस्या या सगळ्यांमधून या गोष्टींची काहीशी घडण होते असे वाटते, पण त्यांचे परिणाम हे, या दोन मूलगामी मार्गांच्या तुलनेत, बहुतेक वेळा अनिश्चित आणि आंशिक असतात. आणि म्हणूनच आम्ही या ‘पूर्णयोगा’मध्ये ‘उन्मुखते’वर, खुलेपणावर (opening) नेहमीच एवढा भर देत असतो. आपल्या आंतरिक मनाचे, प्राणाचे, शरीराचे आपल्या आंतरतम भागाप्रत, चैत्य पुरुषाप्रत असलेले खुलेपण आणि मनाच्या ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुखता, या गोष्टी साधनेच्या फलप्राप्तीसाठी अपरिहार्य असतात. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 323-324)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०६

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या मस्तकाच्या वरती असतो आणि एकदा का तुम्हाला त्याची जाणीव झाली की, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरते; आनंदरूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते दिव्य अस्तित्व अवतरते. जोपर्यंत तुमच्याकडे ही चेतना असत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना ह्या सर्व गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या सर्वच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जे कोणते रूप येते वा जे तुम्हाला अगदी सहजसोपे, स्वाभाविक वाटते ते तुम्ही अवलंबावे. दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करा (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करा आणि तेथे त्यांना आवाहन करा. तुम्ही यांपैकी कोणतीही एक गोष्ट करू शकता किंवा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेळी करू शकता – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: प्रथम एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल (quiet) करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा निश्चल मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही अधीर बनता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो; तुमची चेतना सिद्ध होईपर्यंत तुम्हाला प्रयत्न चालू ठेवावे लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)