Tag Archive for: क्षमता

 

(मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो चिंतामुक्त होऊ शकतो, ती क्षमता कोणती ते श्रीमाताजी येथे सांगत आहेत…)

मनुष्यामध्ये उच्चतर स्तरावर आरोहण करण्याची आध्यात्मिक क्षमता आहे; त्यामुळे तो त्याच्यामध्ये असलेल्या प्राण्याच्या अचेतनेच्या जागी आध्यात्मिक अतिचेतना (super-consciousness) स्थापित करू शकतो. आणि या क्षमतेमुळे, स्वतःच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय आहे आणि त्याने केलेल्या प्रयत्नांची परिणती कशामध्ये होणार आहे हे भविष्यवेधी दृष्टीने पाहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली आहे.

एवढेच नव्हे तर, त्याच्यामध्ये उच्चतर आध्यात्मिक शक्तीवर विचक्षण, स्वच्छ दृष्टीने (clear-sighted) विश्वास ठेवण्याची क्षमतादेखील निर्माण झाली आहे. त्या आध्यात्मिक शक्तीप्रत तो स्वतःच्या समग्र अस्तित्वानिशी समर्पित होऊ शकतो. तो स्वतःच्या जीवनाची आणि भविष्याची सर्व जबाबदारी त्या शक्तीवर सोपवून सर्व प्रकारच्या काळज्या, चिंता यांपासून मुक्त होऊ शकतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303-304)

 

(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट करत आहेत. हा भाग काहीसा विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत.)

मनुष्याकडे जीवन जगत असतानाच स्वतःचे निरीक्षण करण्याची मानसिक क्षमता असल्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, हे अगदी उघड आहे. प्राणी सहजस्वाभाविकपणे, आपोआप जीवन जगत असतात. एखाद्या प्राण्याला अपघातामुळे किंवा आजारपणामुळे जरी वेदना सहन कराव्या लागल्या तरी, त्या वेदना तुलनेने कमी असतात. कारण तो प्राणी त्या दुःखाचे निरीक्षण करू शकत नाही किंवा तो स्वतःच्या चेतनेमध्ये त्या वेदनांचे प्रक्षेपण करू शकत नाही किंवा त्यामुळे पुढे काय होईल याची चिंता तो करत बसत नाही. झालेल्या अपघाताविषयी किंवा आलेल्या आजारपणाविषयी तो कोणतेही तर्कवितर्क करत नाही. क्वचित एखाद्या प्राण्याने जीवन जगत असताना समजा स्वतःचे निरीक्षण केलेच तरी, ते नक्कीच अगदी एखाद-दुसरा क्षण इतके किंवा अगदी नगण्य प्रमाणात असणार. म्हणूनच प्राण्यांना कोणतीही चिंता भेडसावत नाही आणि ते शांतपणे जीवन जगू शकतात.

पण मनुष्याच्या जन्माबरोबरच ‘उद्या काय होणार आहे,’ याची एक अखंड चिंता उदयास आली आहे. ही चिंता हे त्याच्या दुःखकष्टाचे एकमेव कारण नसले तरी ते एक मुख्य कारण आहे. स्वतःकडे वेगळे होऊन पाहता येण्याच्या या चेतनेमुळे मनुष्यामध्ये हुरहुर, दुःखदायक कल्पना, चिंता, त्रास, भविष्यातील संकटांची चाहूल या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून बहुतांशी माणसं, – म्हणजे कमी सचेत, सजग (conscious) असणारी माणसंच नव्हेत तर अतिशय सचेत, सजग असणारी माणसंदेखील – कायमच चिंताग्रस्त होऊन जीवन जगत असतात.

मनुष्य एकीकडे इतका सचेत आहे की, तो या सगळ्यापासून अलिप्त राहू शकत नाही आणि दुसरीकडे, उद्या काय घडून येणार आहे हे त्याला निश्चितपणे ज्ञात होईल, एवढाही तो सचेत नाही. खरोखर, पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्य हा सर्वात दुःखीकष्टी प्राणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनुष्याला त्याच्या अशा असण्याची सवय झाली आहे; कारण त्याची ही जी अवस्था आहे ती त्याला त्याच्या पूर्वजांकडूनच वारसारूपाने मिळालेली आहे. खरोखरच ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. (परंतु मनुष्याला आणखी एक क्षमता प्रदान करण्यात आलेली आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या भागात करू.) (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०२

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक दुस्तर आहे. आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची क्षमता, इच्छाशक्ती आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीदेखील ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे निःस्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे अशा व्यक्तींसाठीच पूर्णयोग आहे.

*

(योगमार्गासाठी एखाद्या व्यक्तीची) तयारी असणे, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल, तर या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

अमृतवर्षा १३

 

(आपल्याला ज्या शक्ती, क्षमता लाभलेल्या असतात त्यांचा यथोचित उपयोग कसा करावा, यासंबंधी श्रीमाताजी येथे सांगत आहेत. आपण जेवढे प्रदान करतो तेवढ्या प्रमाणातच आपण ग्रहण करू शकतो, हे तत्त्व बौद्धिक क्षमता, प्रेम आणि यांसारख्या गोष्टींबाबतही लागू पडते असे त्या सांगत आहेत.)

आपण जलवाहिन्यांप्रमाणे (channels) असतो. मुक्तपणे प्रवाहित करण्यासाठी, त्या जलवाहिन्यांपाशी जे पाणी आलेले असते ते प्रवाहित करण्यास आपण वाव दिला नाही तर ते साचून राहते व अवरुद्ध (block) होते; आणि पुढेपुढे तर त्यांच्यापाशी ते पाणीच येईनासे होते. एवढेच नव्हे, तर ते जमा झालेले पाणीही खराब होऊन जाते. (जलप्रवाहाप्रमाणे असणारा) प्राणिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तींचा ओघ जर आपण मुक्तपणे वाहू दिला; स्वत:ला व्यक्तिनिरपेक्ष बनवीत, आपले छोटेसे व्यक्तित्व त्या महान वैश्विक प्रवाहाशी कसे जोडून घ्यायचे हे जर आपल्याला माहीत झाले तर, आपण जे काही देतो ते आपल्याकडे हजारपटीने परत येते.

– श्रीमाताजी [CWM 02 : 102]