Tag Archive for: कर्म

कर्म आराधना – ०७

‘ईश्वरी इच्छा’ आपल्याकडून कार्य करवून घेत आहे, हे आम्हाला कसे आणि केव्हा कळेल, असा प्रश्न तुम्ही विचाराल. ‘ईश्वरी इच्छा’ ओळखणे अवघड नसते. ती सुस्पष्ट असते. तुम्ही योगमार्गावर फारसे प्रगत झालेला नसलात तरीही ती तुम्हाला ओळखता येते. तुम्हाला केवळ त्या इच्छेचा आवाज ऐकता आला पाहिजे, एक सूक्ष्मसा आवाज, जो इथे हृदयामध्ये असतो. एकदा का तुम्हाला हा आवाज ऐकण्याची सवय लागली की, ‘ईश्वरी इच्छे’च्या विरोधी असे जे काही तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला लगेचच अस्वस्थ वाटू लागेल. तुम्ही अयोग्य मार्गावरून तसेच चालत राहिलात तर तुम्हाला अधिकच अस्वस्थ वाटू लागेल. तरीसुद्धा तुमच्या अस्वस्थतेचे कारण म्हणून तुम्ही काही भौतिक समर्थन करू पाहाल आणि त्या वाटेवरून तुम्ही तसेच चालत राहाल तर, मग ही अंत:संवेदन-क्षमता तुम्ही हळूहळू गमावून बसता आणि अंतिमतः सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करूनही, तुम्हाला अस्वस्थता जाणवत नाही. परंतु तुम्हाला किंचितशी जरी अस्वस्थता जाणवली आणि थोडेसे थांबून, तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला विचारलेत की, ”याचे कारण काय असेल?” तर तेव्हा तुम्हाला खरेखुरे उत्तर मिळते आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वच्छपणे कळून येतात. जेव्हा तुम्हाला काहीसे नैराश्य किंवा थोडीशी अस्वस्थता जाणवते तेव्हा तुम्ही त्याला भौतिक समर्थन देण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही थांबून त्या अस्वस्थतेचे कारण शोधू पाहता, तेव्हा तुम्ही अगदी सरळ आणि प्रामाणिक असले पाहिजे. सुरुवातीला तुमचे मन एक अगदी समर्थनीय आणि चांगलेसे स्पष्टीकरण रचेल. ते स्वीकारू नका, तर त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा आणि विचारा की, “हे जे काही चालले आहे, त्यापाठीमागे नेमके काय आहे? मी हे का करत आहे?” शेवटी, मनाच्या एका कोपऱ्यात, एक छोटासा तरंग दडून बसलेला आहे असे तुम्हाला आढळेल – तुमच्या दृष्टिकोनामध्ये असलेले एखादे छोटेसे चुकीचे वळण किंवा तिढा, जो या साऱ्या अडचणींचे किंवा अस्वस्थतेचे कारण असतो, असा शोध अंतिमत: तुम्हाला लागेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 08-09)

कर्म आराधना – ०६

प्रश्न : ईश्वराची ‘इच्छा’ काय आहे, हे आम्हाला कसे कळू शकेल?

श्रीमाताजी : व्यक्तीला ईश्वराची ‘इच्छा’ काय आहे हे कळत नाही, तर तिला ती जाणवते. आणि ती जाणवण्यासाठी व्यक्तीने तेवढ्याच उत्कटतेने, अगदी प्रामाणिकपणे तशी इच्छा बाळगली पाहिजे म्हणजे मग प्रत्येक अडथळा नाहीसा होऊन जातो. जोपर्यंत तुम्हाला पसंती-नापसंती आहे, इच्छा आहेत, आकर्षणं आहेत, आवडी-निवडी आहेत तोवर या गोष्टी तुमच्यापासून ‘सत्य’ दडवून ठेवतात. त्यामुळे, पहिली गोष्ट करायची ती अशी की, तुमच्या चेतनेच्या सर्व गतिविधी सुधारण्याचा, त्यांच्यावर शासन करण्याचा, प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करायचा आणि सर्व गतिविधी या जोवर ‘सत्या’ची परिपूर्ण आणि चिरस्थायी अभिव्यक्ती बनत नाहीत तोपर्यंत तरी ज्यांच्यात परिवर्तन घडविणे शक्यच नाही अशा सर्व गोष्टी काढून टाकायच्या.

आणि नुसती इच्छा बाळगणेही पुरेसे नसते कारण व्यक्ती बरेचदा तशी इच्छा बाळगण्याचेच विसरून जाते.

आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अभीप्सा, जी व्यक्तित्वामध्ये एखाद्या अग्निहोत्राप्रमाणे तेवत असते. ज्या ज्या वेळी तुमच्यामध्ये एखादी इच्छा, पसंती-नापसंती, एखादे आकर्षण डोके वर काढते तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचे या अग्नीमध्ये तुम्ही हवन केले पाहिजे. तुम्ही हे चिकाटीने करत राहिलात तर, तुमच्या सामान्य चेतनेमध्ये सत्य-चेतनेचा एक छोटासा किरण उदय पावू लागला असल्याचे तुमचे तुम्हाला दिसून येईल. सुरुवातीला तो किरण अगदी अस्पष्ट असेल; तो इच्छावासना, पसंतीनापसंती, आकर्षण-प्रतिकर्षण, आवड-निवड या साऱ्या कोलाहलापासून खूप मागे, दूर असेल. परंतु तुम्ही या साऱ्याच्या पलीकडे गेलेच पाहिजे आणि मग तेथे तुम्हाला अगदी स्थिर, निश्चल, जवळजवळ शांत अशी सत्य चेतना आढळून येईल.

सत्य चेतनेच्या संपर्कात जे कोणी असतात त्यांना, एकाच वेळी सर्व शक्यता दृष्टिक्षेपात येतात आणि आवश्यकता असेल तर ते सर्वात जास्त प्रतिकूल शक्यतासुद्धा जाणीवपूर्वक निवडतात. परंतु या टप्प्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला बराच मोठा पल्ला गाठावाच लागतो

– श्रीमाताजी
(CWM 04 : 02-03)

कर्म आराधना – ०५

शक्ती मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्याची गरज नाही; तिच्या प्राप्तीची आकांक्षा बाळगता कामा नये. अथवा ती शक्ती प्राप्त झाल्याचा अहंकारदेखील असता कामा नये. व्यक्तीला एखादी शक्ती वा अनेक शक्ती प्राप्त झाल्या तरी, तिने त्या स्वतःच्या आहेत असे समजता कामा नये तर, त्या ‘ईश्वरी’ कार्यासाठी ‘ईश्वरा’ने दिलेल्या देणग्या आहेत, असे समजले पाहिजे. …(ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या गोष्टींचा) स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी किंवा स्वार्थासाठी दुरूपयोग होऊ नये; त्यांचा अभिमान, प्रौढी निर्माण होऊ नये, श्रेष्ठतेची भावना निर्माण होऊ नये, ईश्वराचे साधन (instrument) बनल्याचा कोणता दावा किंवा अहंकारदेखील होऊ नये; याची व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे. ईश्वराच्या सेवेसाठी सुपात्र बनेल अशा रीतीने प्रकृतीचे सहज, शुद्ध आंतरात्मिक साधन कसे बनता येईल याचीच केवळ व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 245)

कर्म आराधना – ०४

सर्व प्रकारच्या अहंभावात्मक हेतुंपासून मुक्त असणे, वाणी व कृतीतील सत्यत्वाविषयी सतर्क असणे, स्वतःची इच्छा आणि स्वमताग्रह नसणे तसेच सर्व गोष्टींविषयी सावध असणे ही (ईश्वराचा) निर्दोष सेवक बनण्यासाठीची आवश्यक अट आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 245)

साधनेची मुळाक्षरे – २९

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा तत्सम नैतिक वा आदर्शवादी अशा ज्या ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी असल्याचे मानवी मन मानते, त्या गोष्टीसुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाही.

जी कृती ‘ईश्वरा’ साठी केली जाते, जी ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट प्रारंभी तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि प्रदीप्त ज्ञान यांच्यापेक्षा ते काही कमी सोपे नसते, किंबहुना खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. पण इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची सुरुवातदेखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य इच्छेनिशी ही गोष्ट करण्यास तुम्ही प्रारंभ केला पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील.

या वृत्तीने केलेले कर्म हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये शब्दातीत ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी इच्छे’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’ पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; व्यक्तीचे कार्य ‘विश्वशक्ती’च करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहत असल्याची किंवा तो साक्षीदार असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्वमाता किंवा परम-‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने ‘ईश्वरा’प्रत सतत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदित केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत खुले होत असल्याची जाणीव आपल्याला होऊ शकते. अंतिमतः कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते – त्यालाच आपण ‘प्रकृतीचे रूपांतरण’ (Transformation of the nature) असे संबोधतो.

अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात. ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही राजमार्ग नाही.

सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीही निश्चितच वगळण्यात आलेली नाही, कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, त्याच गोष्टी म्हणजे अनिवार्यपणे भक्तीचीही एक प्रक्रिया आहे…

एवढेच की, जीवनापासून पलायनवादी एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र योगाची संपूर्ण प्रक्रिया म्हणून येथे स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती विशुद्ध ध्यानमग्न अशा रीतीने तासन् तास बसत असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र ‘पूर्णयोग’ नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 216-218)

साधनेची मुळाक्षरे – १८

कोणत्याही वैयक्तिक प्रेरणांशिवाय, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना जे कर्म केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणत्याही बढाईविना किंवा असंस्कृत स्व-मताग्रहाविना किंवा पद वा प्रतिष्ठेसाठी कोणताही दावा न करता केले जाते; जे केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’ साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’ने केले जाते, केवळ असेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धिकरण करणारे असते. सर्व कर्मं जी अहंभावात्मक वृत्तीने केली जातात ती, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भलेही चांगली असू देत, पण ‘योगसाधना’ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 232)

साधनेची मुळाक्षरे – १३

काम करत असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने काम करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआपपणे होऊ लागेल.

*

समर्पणाचा नुसता दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘श्रीमाताजीं’ना अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जीवित राहील. काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कर्मामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीया’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असू शकेल, किंवा ‘श्रीमाताजीं’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योगसाक्षात्कार’ स्वतःहूनच नित्य घडू लागेल तसेच कर्म करत असताना ईश्वराशी ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 258-259), (CWSA 32 : 247)

साधनेची मुळाक्षरे – ०६

सारे काही शांतपणे अंतरंगातूनच केले पाहिजे – कर्म करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या साऱ्या गोष्टी वास्तव (real) चेतनेचा एक भाग म्हणूनच केल्या पाहिजेत – सामान्य चेतनेच्या विखुरलेल्या आणि अशांत हालचालींनिशी त्या करता कामा नयेत.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, अंतरंगातूनच कृती करायला तुम्ही नेहमी शिकले पाहिजे. बाह्य अस्तित्व हे केवळ एक साधन असले पाहिजे आणि त्याला तुमच्या वाणीवर, विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 254)

साधनेची मुळाक्षरे – ०५

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे – म्हणजेच इच्छा किंवा अहंकारविरहित असलेले कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि कार्य हाती घ्यावे म्हणून केलेली तिची प्रार्थना, की ज्यामुळे केवळ आंतरिक शांततेतच तुम्हाला तिची (दिव्य मातेची) उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल असे नव्हे तर, कर्मामध्येदेखील ते तुम्हाला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226)

साधनेची मुळाक्षरे – ०४

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला तुमच्या कर्मव्यवहारामध्ये सदा सर्वकाळ जरी अजून ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका, त्याने फारसा फरक पडत नाही. कोणतेही कर्म करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे व ते कर्म त्याला अर्पण करणे आणि कर्म संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे हे सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा जर कामाच्या मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही त्याचे स्मरण ठेवणे पुरेसे आहे. तुमची पद्धत मात्र मला काहीशी वेदनादायी आणि अवघड असल्याचे दिसते, – कारण तुम्ही मनाच्या ज्या भागाने कर्म करता, त्याच भागाने, त्याचवेळी स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करता असे दिसते. तसे करणे शक्य आहे किंवा नाही, याची मला कल्पना नाही. जेव्हा लोक कर्म करताना सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते त्यांच्या मनाच्या पार्श्वभागी असते किंवा त्यांच्यामध्ये हळूहळू दुहेरी विचारांची किंवा दुहेरी चेतनेची एक क्षमता निर्माण झालेली असते – एक चेतना पृष्ठभागी कार्यरत असते आणि दुसरी चेतना ही साक्षी असते आणि स्मरण राखत असते.

आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग होता – अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआपपणे घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्या सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही. अभीप्सा आणि कर्म करण्यासाठी महत्तर शक्तीला आवाहन करत, आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की ज्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही जणांना या गोष्टीसाठी जरी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयासांनीच करण्यापेक्षा, पाठीशी असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या शक्तीद्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे, हे साधनेचे महान रहस्य आहे.

मानसिक प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही – एवढेच की साऱ्या गोष्टी एखाद्याने स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला तर अध्यात्मात पारंगत असणाऱ्या व्यक्तींखेरीज (spiritual athletes) इतरांसाठी मात्र त्या गोष्टी कष्टदायक प्रयत्न ठरतात. अन्य पद्धत ही जवळच्या मार्गाचा हव्यास बाळगणारी आहे, असेही मला म्हणायचे नाही. एवढेच की, मी म्हणालो त्याप्रमाणे, त्या पद्धतीचे परिणाम दिसण्यास अधिक वेळ लागतो. धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्ये आवश्यक असतात. बालावानांसाठी सामर्थ्य असणे ठीक आहे पण – अभीप्सा आणि तिला ईश्वरी ‘कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे काही सर्वस्वी आख्यायिका आहेत, असे नाही; या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 214-215)