Tag Archive for: उन्मुखता

साधनेची मुळाक्षरे – १४

संकल्प आणि अभीप्सेच्या प्रामाणिकपणामुळे स्वतःहून घडून येणारी गोष्ट म्हणजे उन्मुखता. ‘श्रीमाताजीं’कडून येणाऱ्या दिव्य शक्तींचे ग्रहण करण्यास सक्षम होणे असा त्याचा अर्थ आहे.

*

‘श्रीमाताजीं’प्रत उन्मुख असणे म्हणजे सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे, त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये करू देणे, त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करू देणे, तुम्हाला ज्ञान, शांती आणि ‘आनंद’ प्रदान करू देणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले राखू शकत नसाल तर, उन्मुख होण्यासाठी तुम्ही सातत्याने पण शांतपणे अभीप्सा बाळगा.

*

उन्मुखतेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समर्पण; पण जोपर्यंत समर्पण झालेले नाही तोवर, अभीप्सा आणि स्थिरता यांद्वारे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत उन्मुखता येऊ शकते.

*

तुमच्या चेतनेची जेव्हा तयारी होईल तेव्हा ‘श्रीमाताजीं’प्रति असलेल्या विश्वासामुळे, आवश्यक असणारे खुलेपण येईल. ध्यान करण्यासाठी पुरेसा वेळ आणि ऊर्जा मिळावी यासाठी तुम्ही तुमच्या सध्याच्या कामाचे नियोजन करण्यास काहीच हरकत नाही, पण जे आवश्यक आहे ते प्राप्त होण्यासाठी केवळ ध्यान पुरेसे नाही. तर तेथे ‘श्रीमाताजीं’प्रति असणारी उन्मुखता आणि श्रद्धा आवश्यक आहे; त्यामुळेच ती गोष्ट प्राप्त होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 105), (CWSA 32 : 151), (CWSA 29 : 106), (CWSA 29 : 109)

साधनेची मुळाक्षरे – १३

तुमच्यामध्ये ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीचे कार्य कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे यासाठी श्रीमाताजींकडे वळलेले असणे म्हणजे उन्मुख असणे, खुले असणे. मन जर त्याच्या स्वतःच्या कल्पनांमध्येच बंदिस्त राहिले आणि जर का त्याने ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ आणण्यास श्रीमाताजींना नकार दिला; जर प्राण त्याच्या इच्छावासनांनाच चिकटून राहिला आणि श्रीमाताजींची शक्ती – जी खरी प्रेरणा आणि आवेग घेऊन येत असते – तिला प्राणाने प्रवेश करू दिला नाही; जर शरीर त्याच्या स्वतःच्या इच्छा, सवयी आणि जडत्वामध्येच बंदिस्त राहिले आणि त्यामध्ये ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’चा प्रवेश होऊ देण्यास आणि कार्य करू देण्यास शरीराने संमती दिली नाही, तर ती व्यक्ती उन्मुख असत नाही. एकाच वेळी सर्व गतिविधींमध्ये संपूर्णतया उन्मुखता आढळणे शक्य नाही, परंतु प्रत्येक भागामध्ये एक मध्यवर्ती उन्मुखता असली पाहिजे आणि केवळ श्रीमाताजींच्या कार्यालाच प्रवेश करू देईल अशी प्रभावशाली अभीप्सा किंवा संकल्पशक्ती असली पाहिजे, उरलेल्या साऱ्या गोष्टी क्रमशः होत राहतील.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151)