Tag Archive for: उन्मुखता

साधना, योग आणि रूपांतरण – १८९

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०५

ऊर्ध्वगामी उन्मुखता (upward opening) ही अपरिहार्यपणे फक्त शांती, नीरवता आणि ‘निर्वाणा’कडेच घेऊन जाते असे नाही. साधकाला आपल्या वरच्या दिशेस, जणूकाही आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या व्यापकतेची आणि सर्व भौतिक व अतिभौतिक प्रदेश व्यापून टाकणाऱ्या एका महान, अंतिमत: एक प्रकारच्या अनंत शांतीची, नीरवतेचीच जाणीव होते असे नाही तर, त्याला इतर गोष्टींचीही जाणीव होते. सर्व ऊर्जा ज्यामध्ये सामावलेली असते अशा एका महान ‘शक्ती’ची, सर्व ज्ञान ज्यामध्ये सामावलेले असते अशा एका महा‘प्रकाशा’ची, सर्व आनंद आणि हर्ष ज्यामध्ये सामावलेला असतो अशा एका अपार ‘आनंदा’ची साधकाला जाणीव होते. सुरूवातीला या गोष्टी अनिवार्य आवश्यक, अनिश्चित, निरपवाद, साध्या, केवल अशा स्वरूपात त्याच्या समोर येतात. निर्वाणामध्ये उपरोक्त साऱ्या गोष्टी शक्य असल्याचे त्याला वाटते.

परंतु पुढे त्याला हेही आढळते की, या ‘दिव्य शक्ती’मध्ये अन्य शक्ती सामावलेल्या आहेत, या ‘दिव्य प्रकाशा’मध्ये अन्य सारे प्रकाश, या ‘दिव्य आनंदा’मध्ये शक्य असणारे सारे हर्ष आणि आनंद सामावलेले आहेत. आणि या साऱ्या गोष्टी आपल्यामध्येही अवतरित होऊ शकतात, हेही त्याला उमगू लागते. फक्त शांतीच नव्हे तर यांपैकी कोणतीही एक किंवा सर्व गोष्टी अवतरित होऊ शकतात. एवढेच की परिपूर्ण स्थिरता आणि शांती यांचे अवतरण घडवणे हे सर्वाधिक सुरक्षित असते कारण त्यामुळे इतर सर्व गोष्टींचे अवतरण हे अधिक निर्धोक होते. अन्यथा, बाह्य प्रकृतीला एवढी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’ किंवा ‘आनंद’ धारण करणे किंवा तो पेलणे अवघड जाऊ शकते. आपण जिला ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे म्हणतो, तिच्यामध्ये वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.

हृदय-चक्राच्या माध्यमातून येणारा आंतरात्मिक खुलेपणा (Psychic opening) आपल्याला मूलतः व्यक्तिगत ‘ईश्वरा’च्या, आपल्याशी असलेल्या ‘ईश्वरा’च्या आंतरिक नात्याच्या संपर्कात आणतो. हा विशेषतः प्रेम आणि भक्तीचा मूलस्रोत असतो. ऊर्ध्वमुखी उन्मुखता (Upward opening) थेटपणे आपले नाते समग्र ‘ईश्वरा’शी जोडून देते आणि ती उन्मुखता आपल्यामध्ये दिव्य चेतना निर्माण करू शकते, ती आपल्या आत्म्याचे एक किंवा अनेक नवजन्म घडवून आणू शकते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 326-327)

साधना, योग आणि रूपांतरण – १८७

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०३

खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो तर तो खोल अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित असतो. अंतरंगामध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीराला आधार देणारा आत्मा असतो, आणि त्या आत्म्यामध्ये विश्वव्यापक होण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या ‘सत्या’शी थेट संपर्क साधण्याची क्षमता असते. त्याच्याकडे वैश्विक आनंदाची चव चाखण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्थूल भौतिक शरीराच्या दुःखभोगापासून आणि बंदिवान झाल्यामुळे आलेल्या क्षुद्रतेपासून मुक्ती मिळविण्याची क्षमता असते.

आजकाल अगदी युरोपमध्येसुद्धा, पृष्ठवर्ती भागाच्या मागे असणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व वारंवार मान्य केले जात आहे, परंतु त्याचे स्वरूप समजावून घेण्यात त्यांची चूक होत आहे, त्याला ते ‘अवचेतन’ (subconscient) किंवा ‘प्रच्छन्न चेतना’ (subliminal) असे संबोधतात. वस्तुतः ते अस्तित्व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खूप सचेत असते; ते प्रच्छन्न नसते, फक्त ते पडद्याआड दडलेले असते इतकेच.

आमच्या मनोविज्ञानानुसार, ते अस्तित्व हे या छोट्या पृष्ठवर्ती व्यक्तिमत्त्वाशी, चेतनेच्या काही विशिष्ट चक्रांद्वारे जोडलेले असते, ‘योगा’मुळे आपल्याला त्यांची जाणीव होते. आपल्या आंतरिक अस्तित्वाचा काही अंशभाग या चक्रांच्या माध्यमातून बाह्य जीवनामध्ये पाझरतो, हा अंशभागच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग असतो आणि तो अंशभागच आपल्या कला, काव्य, तत्त्वज्ञान, आदर्श, धार्मिक आकांक्षा, ज्ञान आणि पूर्णत्वप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या गोष्टींना कारणीभूत ठरतो. परंतु ही आंतरिक चक्रं बहुतांशी, मिटलेली किंवा सुप्त असतात. ती खुली करणे आणि त्यांना जागृत व सक्रिय करणे हे ‘योगा’चे एक ध्येय असते.

ही चक्रं जसजशी खुली होतात, तशतशा आपल्यामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती आणि शक्यता उदयाला येऊ लागतात. प्रथमतः आपल्याला एका विशाल चेतनेची आणि नंतर वैश्विक चेतनेची जाणीव होते. त्यानंतर मात्र आपण मर्यादित जीवनं असणारी छोटीछोटी विलग व्यक्तिमत्त्वं म्हणून उरत नाही, तर आता आपण वैश्विक कृतीची केंद्र बनतो आणि त्यानंतर आपला वैश्विक शक्तींशी थेट संपर्क येतो. पृष्ठवर्ती व्यक्तित्व ज्याप्रमाणे वैश्विक शक्तींच्या हातचे अनिच्छुक बाहुले असते त्याप्रमाणे आपण बाहुले बनून राहण्याऐवजी, आता आपण विशिष्ट प्रमाणात सचेत बनू शकतो आणि प्रकृतीच्या लीलेचे ‘स्वामी’ बनू शकतो. मात्र हे किती प्रमाणात घडून येऊ शकते हे आंतरिक अस्तित्वाच्या विकासावर आणि त्याच्या उच्चतर आध्यात्मिक स्तरांप्रत असलेल्या ऊर्ध्वमुखी उन्मुखतेवर अवलंबून असते. त्याचवेळी हृदयचक्र खुले झाल्यामुळे, चैत्य पुरुषाची (psychic being) मुक्तता होते, आणि मग तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर ‘सत्या’ची आपल्याला जाणीव करून देण्याच्या दिशेने प्रगत होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325)

साधना, योग आणि रूपांतरण – ११२

चेतनेमधील उन्मुखतेप्रमाणेच कर्मामध्येही उन्मुखता असते. ध्यानाच्या वेळी तुमच्या चेतनेमध्ये जी ‘शक्ती’ कार्य करत असते आणि तुम्ही जेव्हा तिच्याप्रत उन्मुख, खुले होता तेव्हा ती ज्याप्रमाणे शंकांचे आणि गोंधळाचे ढग दूर पळवून लावते अगदी त्याचप्रमाणे ती ‘शक्ती’ तुमच्या कृतीदेखील हाती घेऊ शकते. आणि त्याद्वारे ती तुम्हाला तुमच्यामधील दोषांची जाणीवच करून देऊ शकते असे नाही तर, काय केले पाहिजे यासंबंधी तुम्हाला ती सतर्क बनवू शकते आणि ते करण्यासाठी तुमच्या मनाला आणि हातांना ती मार्गदर्शन करू शकते. तुम्ही कर्म करत असताना तिच्याप्रत उन्मुख, खुले राहाल तर तुम्हाला या मार्गदर्शनाची अधिकाधिक जाणीव होऊ लागेल. आणि एवढेच नव्हे तर नंतर तुम्हाला, तुमच्या सर्व कृतींच्याच पाठीमागे कार्यरत असलेल्या ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ची जाणीव होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 262)

विचारशलाका ०८

‘ईश्वरी प्रभावा’प्रत स्वत:ला खुले करणे, उन्मुख करणे हे ‘पूर्णयोगा’चे समग्रतत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या उर्ध्वस्थित असतो आणि तुम्ही जर त्याबाबत सचेत झालात तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही त्यास आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या रूपाने, ‘प्रकाशा’च्या रूपाने, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरतो; ‘आनंद’रूपाने अवतरतो; तो साकार किंवा निराकार रूपातील ‘ईश्वरी उपस्थिती’ म्हणून अवतरतो.

व्यक्तीला जोपर्यंत ही चेतना लाभत नाही तोपर्यंत तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाचीच विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते – जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतीशील तयारी चालू होते. परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 106]

विचारशलाका ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे, या दोन गोष्टी (साधनेमध्ये) सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. कारण हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं उच्चतर चेतनेप्रत (higher consciousness) खुली होतात. चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते.

‘ईश्वरा’ने आमच्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आमच्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्याला हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिली उन्मुखता (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची आस बाळगत असतो, त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते.

मस्तकामध्ये (आणि नंतर मस्तकाच्या वर) चेतनेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. (प्रथम फक्त शांती, किंवा शक्ती व शांती एकत्रितपणे) अशा ईश्वरी ‘शांती’चे, आणि ईश्वरी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे व्यक्तित्वामध्ये अवतरण घडून यावे यासाठी आवाहन केल्याने, आणि तशी आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने दुसरी उन्मुखता (opening) घडून येते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 327-328]

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च स्वत:च्या ‘शक्ति’द्वारे विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’द्वारे झाकलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारे करत असतो. ‘योगा’मध्येही ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला वैयक्तिक प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 06]

एकदा का एखाद्याने योगमार्गामध्ये प्रवेश केला की, मग अगदी काहीही झाले, किंवा कोणत्याही अडचणी उद्भवल्या तरी ध्येयापर्यंत जाण्याचा निश्चय दृढ ठेवायचा, एवढी एकच गोष्ट त्याने करायची असते. खरेतर, योगाची परिपूर्ती कोणीही स्वतःच्या क्षमतेद्वारे करू शकत नाही – तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या महत्तर ‘शक्ती’द्वारेच ही परिपूर्ती होऊ शकते – सर्व प्रकारच्या चढउतारांमध्ये, त्या ‘शक्ती’ला नेटाने केलेल्या आवाहनामुळे ही परिपूर्ती होऊ शकते. तुम्ही अगदी सक्रियपणे ‘अभीप्सा’ बाळगू शकत नसलात तरीदेखील, साहाय्य लाभावे म्हणून श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख राहा – ही एकच गोष्ट अशी आहे की, जी नित्य केली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 294]

साधनेची मुळाक्षरे – ०३

दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत : हृदय-चक्राने (heart centre) त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी (mind centres) त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे. हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते. ईश्वराने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिलीवहिली उन्मुखता (opening) घडून येते. ‘साधने’च्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे ‘अभीप्सा’, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण ह्या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते. सुरुवातीला मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, जाणिवेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. ईश्वरी शांती, (आधी केवळ ‘शांती’, किंवा ‘शांती व सामर्थ्य’ एकत्रितपणे) ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केल्याने, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने ही दुसरी उन्मुखता घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 204-205)

साधनेची मुळाक्षरे – ०२

मनुष्य हा बहुतांशी त्याच्या पृष्ठवर्ती (surface) मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्या पातळीवर जीवन जगत असतो पण त्याच्या अंतरंगामध्ये महत्तर शक्यता सामावलेला एक आंतरिक पुरुष असतो, त्या पुरुषाविषयी मनुष्याने जागे झाले पाहिजे; कारण आज त्याला या पुरुषाकडून अगदी मर्यादित, थोडासाच प्रभाव प्राप्त होत असतो आणि तो प्रभावच त्याला महान सौंदर्य, सुसंवाद, शक्ती आणि ज्ञान यांच्या नित्य शोधासाठी प्रवृत्त करत असतो. त्यामुळे, या आंतरिक पुरुषाच्या श्रेणींप्रत खुले होणे आणि तेथून बाह्य जीवन जगणे, तसेच या आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने बाह्यवर्ती जीवनाचे शासन करणे, ही योगाची पहिली प्रक्रिया असते. हे करत असताना त्याला स्वतःमध्येच त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो; तो आत्मा म्हणजे त्याच्या मन, प्राण आणि शारीरिक घटकांचे बाह्यवर्ती मिश्रण नसते तर, त्या सर्वांच्या पाठीशी असणारी ती सद्वस्तू (Reality) असते, ‘दिव्य अग्नी’ची ती ठिणगी असते. मनुष्याने स्वतःच्या आत्म्यामध्ये जगण्यास, शुद्धिकरण करण्यास तसेच उर्वरित प्रकृती ‘सत्या’भिमुख करण्यास शिकले पाहिजे. त्यानंतर, त्यापाठोपाठ ऊर्ध्वमुखी खुलेपण (opening) येईल आणि अस्तित्वामध्ये उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548)

साधनेची मुळाक्षरे – १५

तुमच्या बाजूने कोणतेही प्रयत्न नसतानादेखील दिव्य ‘शक्ती’ प्रभावीरित्या कार्य करू शकते, हे खरे आहे. तिच्या कार्यासाठी तिला तुमच्या प्रयत्नांची नव्हे तर, तुमच्या अस्तित्वाने दिलेल्या सहमतीची आवश्यकता असते.

*

‘श्रीमाताजीं’प्रत स्वत:ला उन्मुख ठेवा, त्यांचे नित्य स्मरण ठेवा आणि अन्य सर्व प्रभावांना नकार देत, श्रीमाताजींच्या ‘शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या – हा या (पूर्ण)योगाचा नियम आहे.

*

‘श्रीमाताजीं’समोर आंतरात्मिकरित्या उन्मुख राहिल्याने, कार्यासाठी वा साधनेसाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व क्रमश: विकसित होत जाते, महत्त्वाच्या रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे, साधनेचे ते केंद्रवर्ती रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 721), (CWSA 29 : 109), (CWSA 32 : 154)