Tag Archive for: ईश्वरी शक्ती

 

(अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा दाब (pressure) पेलायचा असेल तर तुम्ही खूप सुदृढ, शक्तिशाली असले पाहिजे, नाहीतर तुम्ही विखरून जाल. काही लोकांनी मला असे विचारले, “ईश्वर अजून अवतरित का होत नाही?” तर त्याचे कारण, “अजून तुम्ही (त्याच्या अवतरणासाठी) तयार नाही,” हे आहे. ईश्वराच्या अवतरणाचा एखादा अल्पांश जर तुम्हाला गायला, नाचायला आणि आनंदातिशयाने आरडाओरड करायला लावत असेल तर, तो पूर्णत: अवतरला तर काय होईल?

म्हणूनच आम्ही सांगत असतो की, ज्या लोकांकडे शरीर, प्राण आणि मन यांच्यामध्ये एक भक्कम, सुस्थिर आणि विशाल पाया नसेल त्यांनी ईश्वरी शक्ती खेचू नये. याचे कारण अशा व्यक्ती ते अवतरण पेलू शकणार नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ”ईश्वरी शक्ती खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी, शांती आणि स्थिरता धारण करून त्या शक्तीच्या अवतरणाची प्रतीक्षा करा.”

परंतु ज्यांच्याकडे आवश्यक असा पाया आहे, अधिष्ठान आहे त्यांना आम्ही सांगतो की, ”अभीप्सा बाळगा आणि ईश्वरी शक्ती शक्य तितकी अधिकाधिक मिळविण्याचा प्रयत्न करा.” कारण अशा व्यक्तीच विचलित न होता, ईश्वराकडून अवतरित होणाऱ्या शक्ती ग्रहण करू शकतील.

– श्रीमाताजी (CWM 03 : 11)

 

 

“तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तुम्हाला असेसुद्धा सांगण्यात आले आहे की, “श्रद्धा आणि सद्भावना बाळगा म्हणजे मग तुम्ही सुरक्षित राहाल.” खरोखरच तुम्ही दिव्य चेतनेमध्ये, दिव्य शक्तीमध्ये, दिव्य संरक्षणामध्ये न्हाऊन निघत आहात आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्या ठायी श्रद्धा असेल आणि जेवढे तुम्ही स्वतःला खुले करू शकाल तेवढ्या प्रमाणात वरील गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. छोट्याछोट्या आंतरिक क्षोभाच्या गोष्टींना नकार देण्यासाठी आणि या गोष्टी उद्भवल्याच तर पुन्हा एक सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते. तुमच्याबाबतीत ज्या कोणत्या दुर्घटना घडू शकल्या असत्या किंवा जे बारीकसारीक हल्ले होऊ शकले असते त्या सगळ्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठीसुद्धा त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते.

पण जर तुमच्या अस्तित्वामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, किंवा तुमच्या प्राणामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये, अनेक घटकांमध्ये किंवा अगदी एखाद्या भागामध्येदेखील जर अवतरित होणाऱ्या शक्तीस ग्रहण करण्याची क्षमता नसेल तर, यंत्रामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण अडकला तर तो चालत्या कामात जशी खीळ घालू शकतो, तसे घडून येते. म्हणजे एखादे चांगले यंत्र अतिशय सुरळीतपणे चालू असते, सारे काही सुरळीत चालू असते आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण टाकलात (फार मोठा नाही, अगदी एखादा छोटासा कण) तर, अचानक त्यामध्ये काहीतरी बिघाड होतो आणि यंत्र एकाएकी बंद पडते. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये कोठेतरी ग्रहणशीलतेचा थोडासा जरी अभाव असेल, तुमच्यामधील कोणता तरी एखादा घटक ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्यास अक्षम असेल तर, म्हणजे तो पूर्णपणे मिटलेला असेल तर, त्यातून ताबडतोब एक प्रकारचा मोठा असमतोल निर्माण होतो. म्हणजे तो भाग कोठेतरी एखाद्या छोट्याशा काळ्या डागासारखा झालेला असतो. तो अगदी छोटासा असला तरी दगडासारखा कठीण असतो. ईश्वरी शक्ती ग्रहण करण्यास तो नकार देतो; म्हणजे एकतर ती शक्ती त्याला ग्रहण करता येत नाही किंवा ती त्याला ग्रहण करायची इच्छा नसते. कारण काहीही असो पण त्यामुळे ईश्वरी शक्ती त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि जी गोष्ट ऊर्ध्वदिशेने प्रगत होत होती, जी अतिशय उत्कृष्ट रितीने बहरून येत होती, ती एकाएकी कोमेजून जाते. कधीकधी तर तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे संतुलित स्थितीत असता, तुमची तब्येत उत्तम असते, सारे काही सुरळीत चालू असते, तक्रार करण्यास कोठे जागाच नसते अशा वेळीसुद्धा कधीकधी असे घडून येऊ शकते.

एखाद्या दिवशी तुम्हाला एखादी अभिनव कल्पना सुचलेली असते, एक नवीन उर्मी आलेली असते, तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची उत्कट आस असते आणि त्यासाठी तुम्हाला महान शक्ती लाभलेली असते, एखादा उत्कृष्ट अनुभव तुम्हाला आलेला असतो, त्या सुंदर अनुभवाने तुमची आंतरिक द्वारं खुली केलेली असतात, पूर्वी नसलेले असे काही नवीनच ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले असते, जेव्हा तुम्हाला अशी खात्री असते की सारे काही व्यवस्थित चालू आहे…

मात्र अगदी पुढच्याच दिवशी, तुम्ही आजारी पडता. आणि मग तुम्ही म्हणता, “हे काय? पुन्हा तेच? अशक्य आहे हे! हे असे घडता कामा नये.” पण हे असे घडलेले असते याचे कारण मी आत्ता तुम्हाला सांगितले तेच असते – वाळूचा एक बारीकसा कण! तुमच्यामध्ये असे काहीतरी होते की जे ग्रहण करण्यास अक्षम ठरले. त्यातूनच ताबडतोब असंतुलन निर्माण झाले. ती गोष्ट अगदी आंशिक असली तरी तेवढीदेखील पुरेशी असते. परिणामतः तुम्ही आजारी पडता.

– श्रीमाताजी (CWM 05 : 176)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत फक्त स्व-बळावर विसंबून राहायचे ठरविले तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, हे अगदी खरे आहे. आणि म्हणूनच, तुम्ही स्वतःसाठी जे करू शकत नाही ते तुमच्यासाठी केले जावे यासाठी, तुम्ही ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या संपर्कात आले पाहिजे. तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे त्या ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करण्यास वाव दिला पाहिजे तसेच तुम्ही (विरोधी शक्तीची बाजू न घेता) ईश्वरी शक्तीच्या पक्षात राहिले पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमची तिच्यावर श्रद्धा असली पाहिजे, तुम्ही तिच्यावर विसंबून राहिले पाहिजे. स्वतःला उगाचच कष्टविता कामा नये. तिचे अविचलपणे स्मरण करत राहिले पाहिजे, अविचलपणे तिला आवाहन केले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे विचलित न होता, तिला तुमच्यामध्ये तिचे कार्य करू दिले पाहिजे. तुम्ही जर असे केलेत तर, बाकी साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या जातील. अर्थात सर्व गोष्टी एकदमच केल्या जातील असे नाही, कारण त्यापूर्वी मार्गातील बऱ्याच अडचणी दूर करणे आवश्यक असते; पण तरीही आवश्यक ते सारे काही सुस्थिरपणाने आणि चढत्या वाढत्या प्रमाणात केले जाईल, (याची खात्री बाळगा.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 188)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २९

‘ईश्वरी शक्ती’ नेहमीच अस्तित्वात असते, तुम्हाला तिची जाणीवही झाली होती आणि तुमच्या चेतनेतून जरी ती तुम्हाला काही काळ हरवल्यासारखी किंवा दूरस्थ झाल्यासारखी भासली तरीदेखील, ती तिथेच आहे आणि तीच प्रबळ ठरणार हे निश्चित, याची तुम्ही स्वतःला सतत आठवण करून देत जा. कारण ती ‘ईश्वरी शक्ती’ ज्या कोणाला स्पर्श करते आणि जवळ घेते, ते सारे जण तेव्हापासून त्या ‘ईश्वरी शक्ती’चेच होऊन जातात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)

नैराश्यापासून सुटका – २६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

निराशेला कवटाळून बसू नका, जे जे योग मार्गाचे अनुसरण करतात त्यांना त्यांच्या अहंचे अडथळे जाणवतातच. परंतु जर खरीखुरी अभीप्सा असेल तर, उच्चतर चेतनेचा नेहमीच विजय होतो.

*

सातत्याने ईश-स्मरण ठेवावे आणि शांती व स्थिरतेमध्ये जीवन जगावे; जेणेकरून ‘ईश्वरी शक्ती‌’ तुमच्यामध्ये कार्य करू शकेल आणि ‘ईश्वरी प्रकाश’ तुमच्यामध्ये येऊ शकेल. दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी फक्त पृष्ठस्तरीय चेतनेमध्येच (surface consciousness) चालू राहिल्या पाहिजेत; पण त्यांनी पृष्ठस्तरीय चेतनेची फार मोठी जागादेखील व्यापता कामा नये. ‘ईश्वरी शक्ती‌’ आणि ‘ईश्वरी प्रकाश’ यांच्या द्वारे जोपर्यंत पृष्ठस्तरीय चेतनेचा ताबा घेतला जात नाही आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी जोपर्यंत त्यांच्या थेट नियंत्रणाखाली येत नाहीत तोपर्यंत, त्या पृष्ठस्तरीय चेतनेपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत.

अहंकार या किरकोळ गोष्टींना अति महत्त्व देतो. त्या अहंकारालाच नाउमेद केले पाहिजे. “माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,” हाच तुमच्या समग्र चेतनेचा, विचारांचा आणि कृतींचा मूलमंत्र म्हणून विकसित झाला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टी एकाच वेळी पूर्ण करता येतील असे नाही, पण शक्य तितक्या लवकर मनामध्ये (“माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,”) हा मूलमंत्र सातत्याने निनादत राहिला पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 187, 219)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३५

सदासर्वदा ‘ईश्वरी शक्ती’च्या संपर्कात राहा आणि तिला तिचे कार्य करू द्या, ही तुमच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. आवश्यकता असेल तेव्हा ती शक्ती तुमच्यातील कनिष्ठ ऊर्जांचा ताबा घेईल आणि त्यांचे शुद्धिकरण करेल. इतर वेळी ती तुमच्यामधून त्या कनिष्ठ ऊर्जा काढून टाकेल आणि त्या जागी ती स्वतःला स्थापित करेल.

मात्र तुम्ही जर तुमच्या मनाला प्राधान्य दिलेत आणि काय केले पाहिजे किंवा काय नाही याचे (मानसिक निकषांच्या आधारे) चर्वितचर्वण करत बसलात आणि त्याआधारे निर्णय घेतलात, तर तुम्ही तुमचा ‘ईश्वरी शक्ती’शी असलेला संपर्क गमावून बसाल. आणि मग (ईश्वरी शक्तीच्या ऐवजी) त्या कनिष्ठ ऊर्जा कृतिप्रवण होतील आणि मग साऱ्याच गोष्टी गोंधळाच्या होऊन बसतील आणि त्यांना चुकीचे वळण लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)

साधना, योग आणि रूपांतरण – १२२

(स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या एका लोकप्रिय नेत्याने, जे गीताप्रणीत योगाचे आचरण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी श्रीअरविंदांना विनंती केली होती की, आपल्याला मार्गदर्शन करावे. राजकीय जीवनाचा मार्ग सोडून नवीन कार्य हाती घ्यावे का असा प्रश्न त्यांनी श्रीअरविंदांना विचारला आहे. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही तुमच्या कार्याची आणि जीवनाची जी दिशा निवडली आहे त्यामध्ये बदल करण्याची कोणतीच गरज नाही. जोपर्यंत ते कार्य म्हणजे तुमचा स्वभावधर्म आहे असे तुम्हाला वाटते किंवा तुमच्या आंतरिक अस्तित्वाने ते कार्य करण्यास तुम्हाला प्रवृत्त केले असेल तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने, ते कार्य म्हणजे तुमचा विहीत धर्म आहे, असे तुम्हाला वाटते तोपर्यंत त्यात बदल करण्याची गरज नाही. हे तीन निकष आहेत. या व्यतिरिक्त गीताप्रणीत योगाने, आचरणाची कोणती एखादी निश्चित दिशा किंवा कर्माचा किंवा जीवनाचा कोणता मार्ग नेमून दिला आहे किंवा कसे ते मला माहीत नाही.

कार्य कोणत्या वृत्तीने वा कोणत्या चेतनेने केले जाते ते सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्याचे बाह्य रूप हे विविध स्वभावधर्मानुरूप बदलू शकते. ‘ईश्वरी शक्ती’ ने आपले कार्य हाती घेतले आहे आणि ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असा सुस्थिर स्वरूपाचा अनुभव व्यक्तीला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असे चालू राहते; त्यानंतर कोणते कार्य करायचे किंवा कोणते कार्य करायचे नाही हे ती ‘शक्ती’च निर्धारित करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 236)

साधना, योग आणि रूपांतरण – ११९

(श्री अरविंद एका साधकाला पत्रामध्ये लिहीत आहेत….)

तुम्ही कार्यासाठी (ईश्वरी) ‘शक्ती’चा उपयोग करून घेतलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या ‘शक्ती’चे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब तितकीशी महत्त्वाची नसते; तर ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले गेले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक नसेल आणि प्राणिक असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’चे ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 271)

साधना, योग आणि रूपांतरण – ५२

आंतरिक आधार शोधण्यासाठी तुम्ही, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत विशाल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; तुम्ही आत, अधिक आत, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अविचल, प्रसन्न शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे.

अस्तित्वाच्या या अतीव अविचलतेमध्ये, साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःख यातनांपासून दूर, विचार व कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांच्या ऊर्मीपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ‘ईश्वराची उपस्थिती’ अनुभवण्यासाठी तुम्ही अगदी काळजीपूर्वक अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते. जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ‘ईश्वरी शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अंतर्मुख करणे आवश्यक असते.

जिथे कोणतीही कृती शिल्लक नसते, कोणताही प्रभाव शिल्लक नसतो, अहंकार नसतो, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नसते, अन्य काहीही नसते तर फक्त आनंदलहरी असतात, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत तुम्ही खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ऐक्य अनुभवले पाहिजे…

– श्रीमाताजी (The Supreme : Dialogue with The Mother by Mona Sarkar)

विचारशलाका १७

साधक : ज्याला स्वत:ची शारीरिक अवस्था सुधारण्याची इच्छा आहे, ज्याला उपचाराचा परिणाम दिसून यावा असे वाटते किंवा जो स्वत:च्या शारीरिक कमतरतेवर उपाय करू पाहतो त्याने काय केले पाहिजे? जो बदल घडून येणे अपेक्षित आहे त्याच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करून, त्याने स्वत:ची इच्छाशक्ती उपयोगात आणावी की, केवळ ते घडून येईलच अशा खात्रीने जगत राहावे की, ‘ईश्वरी शक्ती’ योग्य वेळ आली की, योग्य मार्गाने अपेक्षित तो परिणाम घडवून आणेलच असा विश्वास बाळगावा?

श्रीमाताजी : एकच गोष्ट करण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत आणि त्यातील प्रत्येक मार्ग हे भिन्नभिन्न परिस्थितीमध्ये परिणामकारक ठरतात. यापैकी कोणती पद्धत तुम्हाला लागू पडेल, हे तुमच्यामध्ये विकसित झालेल्या चेतनेवर आणि कोणत्या स्वरूपाच्या शक्ती तुम्ही कार्यरत करू शकता यावर अवलंबून आहे.

तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात किंवा तुमच्यामध्ये अपेक्षित बदल घडून आला आहे अशा चेतनेमध्ये तुम्ही राहू शकता आणि तुमच्या आंतरिक रचनाशक्तीद्वारे बाह्य अवस्थेमध्ये देखील हळूहळू तो बदल घडवून आणू शकता. किंवा त्या गोष्टींवर परिणाम करू शकतील अशा शक्ती कोणत्या याची दृष्टी जर तुम्हाला असेल, तुम्ही जर ते जाणून घेऊ शकलात आणि त्या हाताळण्याचे कौशल्य जर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही त्यांना खाली बोलावू शकता आणि ज्या भागांमध्ये कार्य होणे आवश्यक आहे तेथे त्या शक्ती उपयोगात आणू शकता; असे केलेत तर त्या शक्तीद्वारे तो बदल घडवून आणला जाईल. किंवा तुम्ही तुमची समस्या ‘ईश्वरा’समोर मांडलीत आणि त्यावर उपाय करावा म्हणून ‘ईश्वरी शक्ती’वर पूर्णपणे भरवसा ठेवून विनवणी केलीत तर, तेव्हाही तो बदल घडवून आणला जाईल.

पण जरी तुम्ही यांपैकी काहीही केलेत, कोणतीही प्रक्रिया अवलंबलीत आणि त्याबाबतचे आत्यंतिक कौशल्य व शक्तीदेखील तुम्हाला प्राप्त झालेली असली तरीदेखील, त्याचे फळ मात्र तुम्ही त्या ‘ईश्वरा’च्या हाती सोपविले पाहिजे. तुम्ही नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत परंतु तुमचे ते प्रयत्न सफल होणार का निष्फळ होणार हे ‘ईश्वरा’च्या हाती असते. तेथे तुमची वैयक्तिक शक्ती खुंटलेली असते; जर परिणाम दिसून आला तर तो परिणाम तुमच्यामुळे नसून, ‘ईश्वरी शक्ती’मुळे घडून आलेला असतो.

तुम्ही असे विचारले आहे की, ‘ईश्वरा’कडे अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी करणे योग्य आहे का? नैतिक दोषांचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’ची विनवणी करण्याच्या तुलनेत, शारीरिक अपूर्णतेचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे अधिक बरे. अर्थात, तुम्ही कशाचीही मागणी करत असाल, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी, अगदी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करत असतानादेखील, किंवा तुमचे ज्ञान उपयोगात आणतानादेखील किंवा शक्तीचा वापर करत असतानादेखील तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की, त्याचा परिणाम दिसून येणे ही गोष्ट ‘ईश्वरी कृपे’वर अवलंबून असते.

एकदा तुम्ही ‘योगमार्ग’ स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे. “मी माझ्यामधील अपूर्णता घालविण्याचे यथाशक्य सर्व प्रयत्न करत आहे, मी माझ्यापरीने सर्वाधिक प्रयत्न करत आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आस बाळगत आहे पण त्याच्या फलनिष्पत्तीसाठी मी स्वत:ला पूर्णत: त्या ईश्वराच्या हाती सोपवत आहे;” असा तुमचा भाव असला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 96-97]