Tag Archive for: ईश्वरी प्रकाश

नैराश्यापासून सुटका – २६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

निराशेला कवटाळून बसू नका, जे जे योग मार्गाचे अनुसरण करतात त्यांना त्यांच्या अहंचे अडथळे जाणवतातच. परंतु जर खरीखुरी अभीप्सा असेल तर, उच्चतर चेतनेचा नेहमीच विजय होतो.

*

सातत्याने ईश-स्मरण ठेवावे आणि शांती व स्थिरतेमध्ये जीवन जगावे; जेणेकरून ‘ईश्वरी शक्ती‌’ तुमच्यामध्ये कार्य करू शकेल आणि ‘ईश्वरी प्रकाश’ तुमच्यामध्ये येऊ शकेल. दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी फक्त पृष्ठस्तरीय चेतनेमध्येच (surface consciousness) चालू राहिल्या पाहिजेत; पण त्यांनी पृष्ठस्तरीय चेतनेची फार मोठी जागादेखील व्यापता कामा नये. ‘ईश्वरी शक्ती‌’ आणि ‘ईश्वरी प्रकाश’ यांच्या द्वारे जोपर्यंत पृष्ठस्तरीय चेतनेचा ताबा घेतला जात नाही आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी जोपर्यंत त्यांच्या थेट नियंत्रणाखाली येत नाहीत तोपर्यंत, त्या पृष्ठस्तरीय चेतनेपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत.

अहंकार या किरकोळ गोष्टींना अति महत्त्व देतो. त्या अहंकारालाच नाउमेद केले पाहिजे. “माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,” हाच तुमच्या समग्र चेतनेचा, विचारांचा आणि कृतींचा मूलमंत्र म्हणून विकसित झाला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टी एकाच वेळी पूर्ण करता येतील असे नाही, पण शक्य तितक्या लवकर मनामध्ये (“माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,”) हा मूलमंत्र सातत्याने निनादत राहिला पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 187, 219)

विचारशलाका ०६

श्रीअरविंद यांनी एके ठिकाणी असे सांगितले आहे की, “प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. ‘अतिमानस’ ही अट्टाहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.”

साधक : “एखाद्या गोष्टीला खाली खेचून आणणे’’ ही अनेकांची प्रवृत्ती असते का?

श्रीमाताजी : माणसांना घाई असते आणि त्यांना ताबडतोब फळ हवे असते. आणि मग, त्यांना असे वाटायला लागते की, ते जणूकाही ‘अतिमानस’ खाली उतरवीत आहेत – वास्तविक, त्यांनी एखादे छोटे प्राणिक अस्तित्व (vital individuality) खाली खेचलेले असते, जे त्यांना वाकुल्या दाखवत असते आणि अंतत: ते त्यांना मूर्ख बनविते. बहुतेक वेळा म्हणजे, शंभरपैकी नव्व्याण्णव वेळा हे असेच घडते. एखादे छोटेसे व्यक्तित्व, एखादे प्राणिक अस्तित्व मोठा खेळ खेळते; प्रकाशाचा चकचकीत, दिखाऊ असा खेळ उभा करते. मग तो बिचारा, ज्याने त्या अस्तित्वाला ‘खाली खेचले’ होते तो त्या चकचकीत प्रकाशाने दिपून जातो आणि म्हणतो, “अरे, हे काय, हेच ते अतिमानस!” आणि तो खड्ड्यात जाऊन पडतो.

तुम्हाला जेव्हा खरोखरच खऱ्या ‘ईश्वरी प्रकाशा’चा स्पर्श झालेला असतो, त्याचे थोडेसे जरी दर्शन झालेले असते, त्याच्याशी जेव्हा तुमचा संपर्क निर्माण झालेला असतो, तेव्हाच तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ आणि प्राणिक प्रकाश यामधील फरक ओळखू शकता आणि तेव्हाच तुम्हाला तो जणू काही रंगमंचावरील प्रकाशाचा कृत्रिम खेळ आहे हे कळू शकते. परंतु तसे नसेल, तर मात्र, इतरजण त्याने दिपून जातात, कारण तो प्रकाश तसा दिपवणाराच असतो, ‘अद्भुत’ असतो आणि मग त्या प्रकाशामुळे ते फसतात. पण, जेव्हा तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ पाहिलेला असतो, त्या ‘सत्या’शी तुमचा संबंध प्रस्थापित झालेला असतो, तेव्हा तुम्ही त्या कृत्रिम प्रकाशाकडे फक्त पाहता आणि हसता. (तो कृत्रिम प्रकाश) ही फसवणूक असते, पण ती फसवणूक आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा, तुम्हाला सत्य काय आहे ते ज्ञात असावे लागते.

मूलत: प्रत्येक गोष्टीबाबत हे असेच असते. अशा प्रकारचे खेळ ज्याच्यावर चालू असतात, असा ‘प्राण’ हा जणू काही महा-रंगमंच असतो — तो खूप आकर्षक, डोळे दिपवणारा, फसवा असतो. परंतु, जेव्हा तुम्हाला ‘सद्वस्तु’ म्हणजे काय हे माहीत असते, तेव्हाच तुम्हाला चटकन ते जाणवते, कोणत्याही तर्काविना, उत्स्फूर्तपणे जाणवते आणि तेव्हा तुम्ही म्हणता, “नाही, मला हे नको आहे.” जेव्हा तुम्ही ‘खेचून आणता’, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी हेच घडते… लाखातूनच एखाद्या वेळीच असे घडते की, एखाद्याने खरोखरच ‘सद्वस्तु’ खाली आणलेली असते – पण तेव्हा हे सिद्ध होते की, त्याची तयारी झालेली होती. अन्यथा नेहमीच, तुम्ही जे खेचून आणता ते प्राणिक अस्तित्व असते, वरवरचे काहीतरी असे, ते त्या सद्वस्तुचे रंगमंचीय रूप असते, ती ‘सद्वस्तु’ नसते.

एखादी गोष्ट खाली खेचून आणणे ही नेहमीच अहंमन्य प्रक्रिया असते. ते आकांक्षेचे विकृत रूप असते. खऱ्या अभीप्सेमध्ये देणे अथवा आत्म-दान समाविष्ट असते तर खेचून आणण्यामध्ये स्वत:साठी काहीतरी मागणी असते. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही विशाल अशी आकांक्षा का असेना, ती अगदी पृथ्वीएवढी, ब्रह्मांडाएवढी का असेना, तिचा काहीच उपयोग नसतो, कारण अशी आकांक्षा म्हणजे केवळ मानसिक क्रियाव्यवहार असतो.

– श्रीमाताजी [CWM 11 : 23]