Tag Archive for: ईश्वरी कार्य

 

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात तिच्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. कधीकधी त्या व्यक्तीच्या स्वभावाची एक बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच बाजू व्यक्त होते किंवा अमुक एका संदर्भात व्यक्ती जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांच्या बाबतीत वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीच्या आत्म-परीक्षणात्मक दृष्टीमध्ये निर्मम-वस्तुनिष्ठता असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ‘ईश्वरी-कृपे‌’मुळेच, साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या उणिवा असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ‘ईश्वरी-कृपे‌’मध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

साधनेची मुळाक्षरे – ०४

प्रश्न : माताजी, इथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “ही मुक्ती, हे पूर्णत्व, ही समग्रतासुद्धा आपण आपल्यासाठी मिळविता कामा नये तर ती आपण ईश्वरासाठी मिळविली पाहिजे.” पण आपण जी साधना करतो ती तर आपल्या स्वतःसाठीच करत असतो ना?

श्रीमाताजी : पण श्रीअरविंद येथे नेमकेपणाने तेच तर सांगत आहेत. त्या मुद्द्यावर भर देण्यासाठीच त्यांनी असे लिहिले आहे. म्हणजे, आपण जे पूर्णत्व संपादन करणार आहोत ते आपल्या वैयक्तिक आणि स्वार्थी हेतुसाठी उपयोगात आणायचे नसून, ईश्वराचे आविष्करण शक्य व्हावे म्हणून, ते ईश्वराच्या सेवेत समर्पित करायचे आहे. वैयक्तिक पूर्णत्वाच्या स्वार्थी हेतुने आपण या विकासासाठी प्रयत्नशील नसून, ‘ईश्वरी कार्य’ सिद्धीस जावे म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.

प्रश्न : पण आपण हे दिव्य ‘कार्य’ का करतो?

श्रीमाताजी : ईश्वराची तशी ‘इच्छा’ आहे, म्हणून आपण ते करतो. ते आपण आपल्या कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी करत नाही, आणि ते तसे करता कामा नये. आपण ते करतो कारण ती ईश्वरी इच्छा आहे आणि ते ईश्वरी कार्य आहे.

जोपर्यंत कोणतीही वैयक्तिक आकांक्षा किंवा इच्छाआकांक्षा, किंवा एखादी स्वार्थी इच्छा त्यामध्ये मिसळलेली असते, तेव्हा त्यातून एक प्रकारची भेसळ निर्माण होते आणि मग ती ‘ईश्वरी इच्छे’ची तंतोतंत अभिव्यक्ती राहात नाही. केवळ एकच एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे ‘ईश्वर’ ‘त्याचा संकल्प’, ‘त्याचे आविष्करण’ आणि ‘त्याची अभिव्यक्ती’! आणि त्यासाठीच व्यक्ती इथे आहे, व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ती ईश्वरच आहे. पण जोपर्यंत ‘मी’ पणाची भावना आहे, अहंभावना आहे; जोपर्यंत स्व-व्यक्तित्वाची भावना डोकावत असते, तेव्हा त्यातून असे सिद्ध होते की, व्यक्ती जशी असणे आवश्यक आहे तशी ती अजूनपर्यंत झालेली नाही. हे एका रात्रीत करणे शक्य आहे, असे मला म्हणायचे नाही पण तरीही खरंतर हेच सत्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 189-190)