Tag Archive for: ईश्वराचे साधन

आत्मसाक्षात्कार – १४

(अहंची आवश्यकता का असते ते कालच्या भागात आपण पाहिले. आता व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व निर्माण झाल्यावर काय होते त्याबद्दल आणि अहंच्या विलीनीकरणाबद्दल त्या येथे सांगत आहेत.
या मालिकेतील भाग ०८ ते १४ सलग वाचल्यास हा विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, असे वाटते.)

तुम्ही व्यक्ती म्हणून स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाला आहात आणि आता योग्य वेळ आली आहे, असे ईश्वराला जेव्हा वाटते, तेव्हा मग ईश्वर तुमचा अहं त्याच्यामध्ये विलीन करण्याची आणि इथून पुढचे तुमचे सर्व जीवन केवळ ईश्वरासाठी व्यतीत करण्याची तुम्हाला अनुमती देतो. हा निर्णय ईश्वर घेत असतो. मात्र त्याआधी तुम्ही हे सगळे काम पूर्ण केले पाहिजे, तुम्ही स्वतः आधी एक सचेत व्यक्ती बनले पाहिजे. तुमच्या अस्तित्वाचे तुम्ही पूर्णपणे, अगदी अनन्यपणे केवळ ईश्वराभोवतीच केंद्रीकरण केले पाहिजे आणि ईश्वर हाच तुमचा चालविता धनी असला पाहिजे. पण एवढे सगळे झाल्यावरही, अहं शिल्लक असतोच. कारण त्या अहंनेच तर आजवर तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवण्यामध्ये योगदान दिलेले असते.

परंतु एकदा का (स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण होण्याचे) ते काम पूर्ण झाले, ते निर्दोष, परिपूर्ण झाले की मग, त्या क्षणी तुम्ही ईश्वराला म्हणू शकता की, “हा मी इथे उभा आहे, मी तयार आहे. माझा तू स्वीकार करशील का?” आणि तेव्हा ईश्वर बहुधा नेहमीच ‘हो’ म्हणतो. तेव्हा सारे काही पूर्ण झालेले असते, सारे काही सिद्धीस गेलेले असते. आणि अशा वेळी मग तुम्ही ईश्वरी कार्य करण्यासाठी ‘खरे साधन’ बनलेले असता.

(सारांश : सरमिसळ अशा सामूहिक अस्तित्वामधून, अहंच्या सहाय्याने व्यक्तीची स्वतंत्र, पृथगात्म अशी घडण – व्यक्तीच्या सर्व घटकांचे ईश्वराभोवती केंद्रीकरण – ईश्वराप्रत आत्मदान – अहंचा विलय करण्यास ईश्वराची अनुमती – अहंचा विलय – आणि व्यक्ती ईश्वरी कार्याचे साधन बनते.)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260-261)

साधना, योग आणि रूपांतरण – २८१

शरीराचे रूपांतरण

तुमच्या साधनेसाठी पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या शारीरिक अस्तित्वामध्ये (physical being) तुम्ही संपूर्ण खुलेपणा प्रस्थापित केला पाहिजे. आणि त्यामध्ये शांत-स्थिरता, सामर्थ्य, विशुद्धता आणि हर्ष यांचे अवतरण स्थिर केले पाहिजे. तसेच त्याबरोबरच तुमच्यामधील श्रीमाताजींच्या ‘शक्ती’च्या उपस्थितीची आणि कार्याची जाणीवसुद्धा स्थिर केली पाहिजे. या खात्रीशीर आधारावरच व्यक्ती ‘ईश्वरी’ कार्यासाठीचे संपूर्णतया प्रभावी असे साधन (instrument) बनू शकते.

व्यक्ती असे साधन झाली तरीदेखील अजून या साधनभूत व्यक्तीचे गतिमान रूपांतरण (dynamic transformation) साध्य करून घेणे शिल्लक असते. आणि ते रूपांतरण मन, प्राण आणि शरीरामध्ये होणाऱ्या उच्चतर आणि अधिक उच्चतर अशा चेतनाशक्तीच्या अवतरणावर अवलंबून असते. अतिमानसिक ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ यांच्या जे अधिकाधिक समीप आहे, त्याचा अर्थबोध येथे ‘उच्चतर’ अस्तित्व या शब्दाने होतो.

मी ज्याचा उल्लेख केला त्याच्या आधारावरच या उच्चतर शक्तीचे अवतरण करणे शक्य असते. त्यासाठी चैत्य पुरुष (psychic being) सातत्याने अग्रभागी राहणे तसेच साधनभूत झालेल्या मन, प्राण व शरीर आणि अस्तित्वाच्या या उच्चतर स्तरांच्या दरम्यान त्याने मध्यस्थ म्हणून कार्य करणे आवश्यक असते. म्हणून प्रथम हे पायाभूत स्थिरीकरण (stabilisation) पूर्ण झाले पाहिजे.

*

शारीर-चेतनेमध्ये उच्चतर स्तरावरील समग्र ऊर्जा किंवा अनुभूती खाली उतरविणे शक्य नसते. रूपांतरणकार्यासाठी साहाय्य करण्यासाठी म्हणून त्यांचा फक्त प्रभाव खाली येतो. एकदा का हे रूपांतरण घडून आले की मग, शरीर अधिक सक्षम होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 362-363)