Tag Archive for: आस

(जीवनाच्या रूपांतरणासाठी खुलेपणा कसा आवश्यक आहे ते कालच्या भागात आपण पाहिले. आणि या रूपांतरणासाठी खुलेपणाबरोबरच अभीप्सा आणि नकार या दोन गोष्टी किती मोलाच्या आहेत, हे येथे श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्ही जे जाणता असे तुम्हाला वाटते त्या गोष्टींवर अडून राहणे; तुम्हाला जे संवेदित होते, तुम्हाला जे आवडते त्यालाच चिकटून राहणे; तुमच्या सवयींना आणि तथाकथित गरजांना धरून राहणे; हे जग आत्ता जसे आहे तशा त्या जगाशीच संबंधित राहणे; हे चिकटून राहणेच (to cling) तुमचे हातपाय जखडून टाकते. या सर्व गोष्टींचे बंध तुम्ही एकेक करून सोडून दिले पाहिजेत. सर्व बंधने तुम्ही मोकळी केली पाहिजेत. हे आत्तापर्यंत अनेकदा सांगितले गेले आहे पण लोकं त्याच त्याच गोष्टी कुरवाळत राहतात.

…अगदी अशी माणसे असतात की जी अतिशय वाक्चतुर असतात, जी इतरांना शिकवण देतात, अशी माणसेदेखील कशाला ना कशाला तरी चिकटून असतात. ती त्यांच्या दृष्टिकोनाला, त्यांच्या भावनापद्धतींना चिकटून असतात. त्यांना ज्या पद्धतीने प्रगती करण्याची सवय लागलेली असते त्या पद्धतीला ती माणसे चिकटून राहतात. त्यांच्या दृष्टीने प्रगती करण्याची त्यांची सवय हीच जणू काही एकमेव पद्धत असते.

तुमच्यावर कोणतेही बंध असता कामा नयेत. तुम्ही अगदी मुक्त असले पाहिजे…अगदी मुक्त! अभीप्सेव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टीत परिवर्तन करण्यासाठी तुम्ही नेहमीच सज्ज असले पाहिजे.

आपल्याला परिपूर्णते‌ची, दिव्य प्रकाशा‌ची, दिव्य प्रेमा‌ची, सत्याची आवश्यकता असली पाहिजे. आपल्याला परम परिपूर्णत्व‌ मिळवायचे आहे. तुम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे, आस लागली पाहिजे…

फक्त परमेश्वरच तुमची ही आस पूर्ण करू शकतो.

पुढे चालत राहा, वाटचाल करत राहा.

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

 

(पूर्वार्ध)

(व्यक्तीच्या मनात जे पूर्वग्रह, पूर्वकल्पना असतात त्यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा अडथळा येतो, हे श्रीमाताजींनी सांगितले आणि आता त्या पुढे सांगत आहेत…)

व्यक्ती जर अगदी सहजस्वाभाविक रितीने खुली होऊ शकली… (श्रीमाताजी हातांची ओंजळ खुली करून दाखवितात.) अशा साधेपणाने खुली होऊ शकली आणि अशा रितीने, येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी व्यक्ती तयार झाली तर, कदाचित काहीतरी (प्रगती) घडून येईल. अर्थातच, तुमच्यापाशी प्रगतीची तृष्णा असली पाहिजे. काही जाणून घेण्याची, स्वतःचे रूपांतरण करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य प्रेम व सत्या‌विषयीची आस तुमच्यामध्ये असेल आणि ती आस जर तुम्ही तशीच कायम ठेवू शकलात तर तुम्ही वेगाने प्रगती करता. खरोखर, ही आस, ही गरजच महत्त्वाची असते. इतर गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. जर कशाची जरुरी असेल तर ती असते आस बाळगण्याची! (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा लागला, तरी न थकता, निराश न होता, नाउमेद न होता किंवा अधीर न होता प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता म्हणजे तितिक्षा (endurance). थकवा, निराशा इत्यादी गोष्टी आल्या तरी व्यक्तीने आपले उद्दिष्ट किंवा आपला निर्धार ढासळू देता कामा नये किंवा प्रयत्न करणे सोडून देता कामा नये, हे देखील तितिक्षेमध्ये अभिप्रेत असते.

*

“मी पुन्हा प्रयत्न करीन”, असे नुसते म्हणणे पुरेसे नाही. आवश्यकता आहे ती सतत, अविचलपणे, निराश न होता प्रयत्न करत राहण्याची. गीतेमध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे ‘अनिर्विण्णचेतसा‌’ प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच्यासाठी साडेपाच वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे, असे तुमचे म्हणणे आहे. पण तुम्ही म्हणताय तेवढ्या कालावधीत, जर एखाद्या योग्याला, स्वतःच्या प्रकृतीमध्ये पूर्णपणे परिवर्तन करता आले आणि त्याला ईश्वराचा अगदी निर्णायक सघन असा अनुभव आला तर, तो योगी आध्यात्मिक मार्गावर वेगाने घोडदौड करणारा आहे, असेच म्हटले पाहिजे. आध्यात्मिक परिवर्तन ही अगदी सोपी गोष्ट आहे, असे आत्तापर्यंत कोणीच कधीही म्हटलेले नाही. सर्व आध्यात्मिक साधक हेच सांगतील की, ती अतिशय अवघड गोष्ट असते पण ती खरोखरच प्रयत्न करण्याजोगी गोष्ट आहे.

ईश्वरप्राप्ती व्हावी अशी एकमेव आस जर एखाद्या व्यक्तीला लागली असेल तर ती व्यक्ती निश्चितच, कोणतीही काचकूच न करता किंवा त्यासाठी किती काळ लागतोय किंवा त्यामध्ये किती अडचणी येत आहेत किंवा त्यासाठी किती कष्ट उपसावे लागत आहेत, याची कोणतीही तक्रार न करता, स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यासाठी देऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 117) & (CWSA 30 : 18)

साधना, योग आणि रूपांतरण – १२५

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पण-भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला, एखादी व्यक्ती जर कर्म करताना श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट प्रकारच्या एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची तिला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती हे कार्य करत आहे, हे कार्य सांभाळत आहे, याची जर व्यक्तीला जाण असेल तर त्यामुळे आध्यात्मिक परिणामकारकता अधिकच वाढीला लागते. पण मनावर मळभ आलेले असताना, नैराश्य आलेले असताना किंवा संघर्षाच्या प्रसंगी व्यक्ती जरी या गोष्टी करू शकली नाही तरी, त्या कर्माची प्रारंभिक प्रेरकशक्ती असणारे प्रेम वा भक्ती या साऱ्याच्या पाठीमागे तशीच टिकून राहू शकते; ही शक्ती त्या मळभाच्या मागे उपस्थित राहू शकते आणि अंधकारानंतर पुन्हा सूर्यासारखी पूर्ववत उदय पावू शकते.

सर्व साधना ही अशीच असते आणि म्हणूनच या अंधकारमय क्षणांमुळे व्यक्तीने नाउमेद होता कामा नये, तर (ईश्वरविषयक) मूळ उत्कट आस (urge) आपल्या अंतरंगामध्ये तशीच टिकून आहे आणि हे अंधकारमय क्षण हा प्रवासामधील केवळ एक टप्पा आहे, तो टप्पा ओलांडल्यानंतर तो स्वतःच आपल्याला एका महत्तर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, याची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242)

सद्भावना – २१

व्यक्तीने अगदी दक्ष आणि पूर्णपणे स्व-नियंत्रित असले पाहिजे, पूर्ण धीरयुक्त असले पाहिजे आणि कधीही अपयशी न होणारी सद्भावना तिच्याकडे असली पाहिजे. व्यक्तीकडे विनम्रतेची अगदी छोटीशी मात्रा का असेना, पण व्यक्तीने तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि स्वतःकडे असलेल्या प्रामाणिकतेवर कधीच संतुष्ट असता कामा नये. व्यक्तीला नेहमीच अधिकाची आस असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 440)