Tag Archive for: आरोग्य

प्रश्न : कोणत्या गोष्टीला तुम्ही, ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असे म्हणत आहात?

श्रीमाताजी : उत्तम आरोग्य, सुदृढ आणि संतुलित देह हा ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असतो; एवढेसे काही झाले की एखादी लहानगी मुलगी जशी घाबरून जाते तशी व्यक्तीची मनोवस्था नसेल; एखादी व्यक्ती जेव्हा व्यवस्थित झोप घेते, व्यवस्थित अन्नसेवन करते… जेव्हा व्यक्ती शांत असते, संतुलित असते, अगदी शांत असते, तेव्हा व्यक्तीचा पाया मजबूत असतो आणि मग अशी व्यक्ती मोठ्या संख्येने शक्तींचा स्वीकार करू शकते.

तुमच्यापैकी कोणी आजवर जर आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली असेल तर, उदाहरणार्थ दिव्य आनंदाची शक्ती ग्रहण केली असेल तर, त्याच्या हे अनुभवास आले असेल की, त्याचे आरोग्य जर उत्तम नसेल तर तो ते अनुभव साठवून ठेवू शकत नाही, टिकवून ठेवू शकत नाही. तो रडू लागतो, ओरडू लागतो, जे काही त्याला प्राप्त झाले आहे ते खर्च करण्यासाठी तो अगदी उतावीळ होऊन जातो. ते करण्यासाठी त्याला हसावे लागते, बोलावे लागते, त्याला हावभाव, हातवारे करावे लागतात अन्यथा तो ती शक्ती राखू शकत नाही, त्याचा कोंडमारा झाल्यासारखे त्याला वाटते. आणि अशा रीतीने हसत राहिल्यामुळे, रडत राहिल्यामुळे, इकडे तिकडे हिंडत राहिल्यामुळे त्याने जे काही प्राप्त केले असते ते, त्या साऱ्या गोष्टी तो गमावून बसतो.

उत्तम संतुलित स्थितीत राहण्यासाठी, जे प्राप्त होत आहे ते आत्मसात करता येण्यासाठी, व्यक्तीने अगदी शांत, अचंचल आणि स्थिर असले पाहिजे. व्यक्तीचा पाया मजबूत असला पाहिजे, आरोग्य उत्तम असले पाहिजे. पाया अत्यंत मजबूत असणे आवश्यक आहे. ती गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)

तुम्हाला जर बरे व्हायचे असेल तर दोन अटी आहेत. पहिली अट अशी की, तुम्ही भीती बाळगता कामा नये, अगदी निर्भय राहायला हवे. आणि दुसरी अट अशी की, तुमच्यामध्ये ईश्वरी संरक्षणाबद्दल पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 15: 141)

आजारपणाचे शारीरिक किंवा मानसिक, बाह्य वा आंतरिक, कोणतेही कारण असू दे, परंतु त्याचा परिणाम शारीरिक देहावर होण्यापूर्वी, व्यक्तीभोवती असणाऱ्या आणि तिचे संरक्षण करणाऱ्या अजून एका स्तराला त्या आजाराने स्पर्श करणे आवश्यक असते. या सूक्ष्म स्तराला वेगवेगळ्या शिकवणीमध्ये विविध नावे असतात. कोणी त्याला आकाशदेह म्हणतात तर कोणी त्याला नाडीगत आवरण किंवा प्राणमय कोश (Nervous Envelope) म्हणतात. एखादी खूप गरम आणि उकळती वस्तू असली तर तिच्या भोवती जशी धग जाणवणारी, सूक्ष्म संवेदना असते, तशीच काहीशी त्याची घनता असते, ती त्याच्या शरीरातून बाहेर उत्सर्जित होत असते आणि ती शरीरावर अगदी निकट आवरण घालून असते.

या स्तराच्या माध्यमातूनच बाह्य जगताशी व्यक्तीचे सर्व व्यवहार होत असतात आणि शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होण्यापूर्वी या प्राणमय कोशावर हल्ला होणे आणि त्यातून आत शिरकाव होणे हे प्रथम आवश्यक असते. हे आवरण जर पूर्णपणे बलवान आणि अभेद्य असेल, तर मग प्लेग किंवा कॉलरासारख्या महाभयंकर आजाराने ग्रस्त असलेल्या ठिकाणी जरी तुम्ही गेलात, तरी तुम्ही निरोगी राहू शकता. जोपर्यंत हे आवरण पूर्ण आणि समग्र आहे, एकसंध आहे, त्याचे घटक हे निर्दोष समतोल राखून आहेत, तोपर्यंत आजारांच्या सर्व संभाव्य हल्ल्यांपासून हे एक परिपूर्ण संरक्षण असते.

एका बाजूने शरीर हे जडतत्त्वाने बनलेले असते, जडद्रव्याने म्हणण्यापेक्षा भौतिक परिस्थितीने बनलेले आहे, असे म्हटले पाहिजे तर दुसऱ्या बाजूने ते आपल्या मानसिक स्थितीच्या स्पंदनांनी बनलेले असते. शांती, समता, आरोग्याबद्दल खात्री आणि श्रद्धा, स्वस्थ विश्रांती, प्रसन्नता आणि उजळ आनंदीपणा या तत्त्वांपासून हे आवरण बनलेले असते. आणि या आवरणाला ही तत्त्वे बळ आणि द्रव्य पुरवितात. अगदी सूक्ष्म आणि त्वरित प्रतिक्रिया देणारे असे हे संवेदनशील माध्यम असते; ते अगदी त्वरेने सर्व प्रकारच्या सूचनांचा स्वीकार करते आणि स्वतःमध्ये त्वरेने बदल घडवून आणू शकते आणि त्याची परिस्थितीही जवळजवळ पूर्णपणे बदलून टाकू शकते.

वाईट सूचनेचा त्याच्यावर खूपच जोरकसपणे परिणाम होतो; तसेच उलट, तितक्याच जोरदारपणे चांगल्या सूचनेचाही त्याच्यावर परिणाम होतो. नैराश्य आणि नाउमेद यांचा त्याच्यावर खूपच प्रतिकूल परिणाम होतो; या गोष्टी त्या आवरणाला छिद्रे पाडतात, जणू त्याच्या द्रव्यामध्ये छेद करून त्याला कमकुवत, अप्रतिकारक्षम बनवितात आणि विरोधी हल्ल्यांना सुकर असा मार्ग खुला करून देतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 89)

विकृती हा मानवी रोग आहे, विकृती प्राण्यांमध्ये क्वचितच आढळून येते आणि ती सुद्धा त्याच प्राण्यांमध्ये आढळते जे प्राणी माणसाच्या निकट आलेले असतात आणि त्यांना त्या माणसांच्या विकृतीचा संसर्ग झालेला असतो.

उत्तर आफ्रिकेमधील – अल्जेरियातील काही अधिकाऱ्यांची ही गोष्ट आहे. त्यांनी एक माकड दत्तक घेतले होते. ते माकड त्यांच्याबरोबर राहत असे. एके दिवशी रात्री जेवणाच्या वेळी त्या अधिकाऱ्यांच्या मनात एक विचित्र कल्पना आली आणि त्यांनी त्या माकडाला मद्य प्यायला दिले. इतर लोक पित आहेत असे सुरुवातीला त्या माकडाने पाहिले, त्याला ते काहीतरी चांगले असेल असे वाटले आणि मग त्याने आख्खा पेलाभर वाईन प्यायली. आणि नंतर ते आजारी पडले, ते इतके आजारी पडले की, ते टेबलाखाली वेदनेने गडबडा लोळू लागले. शारीरिक प्रकृती ही विकृत झालेली नसते तेव्हा, अल्कोहोलचा शरीरावर कसा त्वरित परिणाम होतो याचे उदाहरण माणसांनी लक्षात घेण्याजोगे आहे. ते माकड त्या विषामुळे जवळजवळ मृतवतच झाले होते पण नंतर त्याची प्रकृती सुधारली.

आणि ते बरे झाल्यामुळे, त्याला परत कालांतराने जेवणाच्या टेबलावर रात्रीच्या वेळी बसविण्यात आले आणि कोणीतरी त्याच्या समोर परत वाईनचा पेला ठेवला. त्याने तो इतक्या प्रचंड रागाने उचलला आणि ज्या माणसाने तो पेला देऊ केला होता त्या माणसाच्या डोक्यावर हाणला. यातून असे दिसून येते की, त्या माणसांपेक्षा ते माकड जास्त शहाणे होते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 101)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

पहिली कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, सर्वत्र पूर्ण समता राखणे आणि अस्वस्थ चिंताजनक विचारांना किंवा निराशेला तुमच्यामध्ये प्रवेश न करू देणे. एन्फ्लुएंझाच्या या तीव्र हल्ल्यानंतर, अशक्तपणा येणे किंवा बरे होण्याच्या प्रगतीमध्ये चढउतार असणे हे अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही काय केले पाहिजे, तर शांत आणि विश्वासाने राहिले पाहिजे, कोणतीही काळजी करता कामा नये किंवा अस्वस्थ होता कामा नये. अगदी पूर्णपणे शांत राहिले पाहिजे आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेण्यास तयार असले पाहिजे. चिंता करण्यासारखे काही नाही; विश्रांती घ्या म्हणजे आरोग्य आणि सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 587)

आजारपणाचे हल्ले हे कनिष्ठ प्रकृतीचे किंवा विरोधी शक्तींचे हल्ले असतात, ते प्रकृतीमधील एखाद्या उघड्या भागाचा किंवा प्रकृतीकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा किंवा कोणत्यातरी दुर्बलतेचा फायदा घेऊ पाहातात – इतर सगळ्या बाहेरून आत येणाऱ्या गोष्टींप्रमाणेच हे हल्लेही बाहेरून होतात आणि ते परतवूनच लावावे लागतात. जर व्यक्तीला त्यांच्या येण्याची संवेदना होऊ शकली आणि ते शरीरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच व्यक्तीने त्यांना बाहेर फेकून द्यायची सवय लावून घेतली असेल आणि सामर्थ्य प्राप्त करून घेतले असेल तर, अशी व्यक्ती आजारपणापासून मुक्त राहू शकते.

कधी हा हल्ला आतून उद्भवल्यासारखाही जाणवतो, त्याचा अर्थ एवढाच की, त्याची जाणीव तुम्हाला तो अवचेतनेमध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी झालेली नव्हती; एकदा का तो अवचेतनेपर्यंत गेला की, त्याने स्वतःसोबत जी शक्ती आणली होती, ती शक्ती आज ना उद्या तेथून उद्भवतेच आणि तुमच्या शारीर प्रणालीवर आक्रमण करतेच. त्या आजाराने आत प्रवेश केल्यानंतरच तुम्हाला त्याची जाणीव झाली; याचे कारण असे की, तो आजार अवचेतनाद्वारे न उद्भवता, त्याने थेटपणे आत प्रवेश केला होता, कारण तो तुमच्या बाहेर असताना तुम्ही त्याला ओळखू शकला नव्हतात.

बऱ्याचदा आजारपण असेच येते, समोरून, किंवा बऱ्याचदा बाजूने, अगदी जाणवेल असे थेटपणे, आपल्या संरक्षणाच्या मुख्य चिलखतामधून म्हणजे आपल्या सूक्ष्म प्राणिक आवरणाला भेदून ते आजारपण आत प्रवेश करते; परंतु ते जडभौतिक शरीरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच या सूक्ष्म प्राणिक आवरणामध्येच त्याला थोपविता येणे शक्य असते. अशा वेळी तुम्हाला त्याचा काहीसा परिणाम जाणवू शकतो, म्हणजे उदा. तापाची कणकण किंवा थंडी वाजून आल्यासारखे होऊ शकते, परंतु, तरीही अशा वेळी त्या आजाराचे पूर्ण आक्रमण होत नाही. जर ते आजारपण आधीच रोखता आले किंवा व्यक्तीच्या प्राणिक आवरणानेच त्याला प्रतिकार केला आणि ते आवरण स्वतः सुदृढ, दमदार, अखंड, क्षतिहीन राहिले तर आजारपण येत नाही ; हल्ल्याचा कोणताही भौतिक परिणाम होऊ शकत नाही किंवा हल्ल्याचा मागमूसही ते शिल्लक ठेवत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 553-554)

निरोगी आयुष्य पुन्हा प्राप्त करून घेणे – अशा प्रकारच्या स्वयंसूचना म्हणजे मानसिक रूपांवरील खरीखुरी श्रद्धा होय. त्याचा परिणाम अबोध मनावर आणि अवचेतन मनावर देखील होतो. अबोध मनामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती कार्यरत होतात, त्याच्या गूढ शक्ती, ज्यांचे शरीरावर चांगला परिणाम होतील असे विचार, अशा इच्छा निर्माण करतात किंवा जागृत शक्तीदेखील उदयास आणतात. अवचेतनेमध्ये स्वयंसूचनांचा परिणाम होतो आणि आरोग्याच्या पुन:प्राप्तीला रोखणाऱ्या आजारपणाच्या आणि मृत्युच्या (प्रकट वा अप्रकट) सूचनांना त्या अटकाव करतात किंवा त्यांना शांत करतात. मन, प्राण आणि शारीर चेतनेमधील विरोधी सूचनांशी दोन हात करण्यासाठी सुद्धा अशा स्वयंसूचनांची मदत होते. हे सारे जेव्हा पूर्णपणाने केले जाते किंवा समग्रतेने केले जाते तेव्हा लक्षणीय परिणाम दिसून येतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31:559)

आजारपणाची भावना ही सुरुवातीला फक्त एक सूचना या स्वरूपाची असते; तुमच्या शारीर जाणिवेने तिचा स्वीकार केल्यामुळे ती वास्तविकता बनते. मनात उठणाऱ्या चुकीच्या सूचनेसारखीच ही गोष्ट असते. जर मनाने तिचा स्वीकार केला तर, मनावर मळभ येते आणि ते गोंधळून जाते आणि प्रसन्नता व सुसंवाद परत लाभावा म्हणून त्याला झगडावे लागते. तीच गोष्ट शारीरिक जाणीव आणि आजारपणालाही लागू पडते.

तुम्ही आजारपणाची सूचना स्वीकारता कामा नये; एवढेच नव्हे तर, तिला तुमच्या शारीरिक मनामधून नकार दिला पाहिजे आणि ती सूचना धुडकावून देण्यास शारीरिक जाणिवेला मदत केली पाहिजे. आवश्यकता असेल तर, ”मी पूर्णपणे निरोगी राहीन, मी स्वस्थ, सुरक्षितच आहे आणि सुरक्षितच राहीन,” अशी प्रति-सूचना करा. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजारपणाची सूचना आणि त्या सूचनेमुळे येणारे आजारपण, फेकून देण्यासाठी श्रीमाताजींच्या शक्तीचा धावा करा.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 555)

(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून)

शरीर हे काही वस्त्रासारखे नाही; किंवा आजारी शरीर हे देखील फाटक्या वस्त्राप्रमाणे नाही. शरीर जरी दुर्बल किंवा आजारी पडले तरी ते स्वतःला परत पुनरुज्जीवित करू शकते, त्याची प्राणिक शक्ती ते परत मिळवू शकते, हे असे हजारो लोकांच्या बाबतीत घडत असते. पण कापडामध्ये मात्र पुनरुज्जीवन करणारी जीवनशक्ती नसते. व्यक्ती जेव्हा पंचावन्न किंवा साठ वर्षे वयाच्या पलीकडे जाते तेव्हा हे पुनरुज्जीवन अवघड होऊन बसते; परंतु अगदी तेव्हासुद्धा आरोग्य आणि शक्ती कायम राखता येते किंवा शरीर सुस्थितीत राखण्यासाठी ते पुन्हा होते तसे होऊ शकते.

तुम्हाला आंतरिक अस्तित्व या शब्दांनी नेमके काय म्हणावयाचे आहे ते मला उमगले नाही. जर तुम्हाला ‘विकास’ या शब्दांनी साधनेचा विकास अभिप्रेत असेल तर, त्यासाठी आरोग्याची पुन्हा प्राप्ती आणि सामर्थ्य आवश्यक आहे. मन आणि प्राणाप्रमाणेच शरीर हे पण साधनेसाठी आवश्यक असे साधन आहे आणि होता होईल तितके ते सुस्थितीत राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंतरिक अवस्थेच्या तुलनेत त्याला काही फारसे महत्त्व नाही असे समजून, त्याची हेळसांड करणे, हा काही या (पूर्ण)योगाचा नियम नाही.

(CWSA 31 : 558)