Tag Archive for: आनंद

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, त्या मनुष्यामध्ये स्वामित्व-भावना नसते. म्हणजे वस्तू जेव्हा त्याच्यापाशी येतील तेव्हा तो त्यांचा उपयोग करेल, पण तेव्हासुद्धा त्याला ही जाण असेल की, त्या (माझ्या मालकीच्या नसून) त्या परमेश्वराच्या मालकीच्या आहेत आणि म्हणूनच, अगदी त्या त्याच्यापासून दूर झाल्या तरीही त्याबद्दल तो खंत बाळगणार नाही. ज्या ईश्वराने त्याला त्या वस्तू दिल्या होत्या, त्यांचा इतरांना उपभोग घेता यावा म्हणून त्याच ईश्वराने त्या त्याच्याकडून काढून घेतल्या, ही गोष्ट त्याला अगदी सहजस्वाभाविक वाटते. अशा मनुष्याला वस्तुंचा वापर करत असताना आणि त्यांचा अभाव असतानाही सारखाच हर्ष अनुभवास येतो.

जेव्हा त्या वस्तू तुमच्यापाशी असतात तेव्हा ईश्वरी कृपे‌ची देणगी म्हणून तुम्ही त्या स्वीकारता आणि जेव्हा त्या तुम्हाला सोडून जातात किंवा जेव्हा त्या तुमच्याकडून काढून घेण्यात येतात, तेव्हा तुम्ही अपरिग्रहाचा (destitution) हर्ष अनुभवत जीवन जगता. स्वामित्व-भावनेमुळेच तुम्ही गोष्टींना चिकटून राहता, ती भावनाच तुम्हाला गुलाम बनविते. तसे नसते तर या येणाऱ्या-जाणाऱ्या गोष्टींच्या निरंतर घडामोडींमध्येही तुम्ही नेहमीच हर्षभरित जीवन जगू शकला असतात. त्या गोष्टी त्यांच्यासोबत (कृतार्थतेचा आनंद‌ आणि निर्लिप्ततेचा आनंद‌) दोन्हीही घेऊन येतात म्हणजे, जेव्हा त्या गोष्टी तुमच्यापाशी असतात तेव्हा तुम्ही ‘कृतार्थतेचा आनंद‌’ अनुभवू शकता आणि जेव्हा तुमच्यापाशी त्या नसतात तेव्हा तुम्ही ‘निर्लिप्ततेचा आनंद‌’ अनुभवू शकता. (दोन्हीवेळी तुम्ही आनंदच अनुभवू शकता.)

सत्यामध्ये जीवन जगणे; शाश्वता‌शी, खऱ्याखुऱ्या जीवनाशी सायुज्य पावून जीवन जगणे; जो प्रकाश कधीच मावळत नाही अशा प्रकाशात जीवन जगणे म्हणजे आनदं! मुक्त असणे खऱ्या स्वातंत्र्यासहित मुक्त असणे, ईश्वरी संकल्पा‌शी असलेल्या अविचल, नित्य ऐक्याचे स्वातंत्र्य अनुभवणे म्हणजे आनंद!

…जेव्हा स्वतःच्या मालकीचे असे तुमच्याजवळ काहीच नसते तेव्हा तुम्ही विश्वाएवढे विशाल होऊ शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 253-254)

(पूर्वार्ध)

‘सुजाण व्हा’ असे सांगण्यासाठी सर्वसाधारणपणे जी कारणे सुचविली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात, असे मला नेहमी वाटत आले आहे. उदाहरणार्थ, “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” …परंतु यामुळे चेतना अधिकाधिक शुष्क बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदनेला घाबरत असते.

(म्हणून तसे सांगण्याऐवजी) असे सांगितले गेले पाहिजे की, चेतनेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये निर्भेळ आनंद असतो, छायाविरहित प्रकाश असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात. अशी स्थिती अभीप्सेद्वारे आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, तर व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात. या अवस्थेमध्ये स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वरावर सोपविलेले असते. (परमेश्वरावर सारे काही सोपविले असल्यामुळे) स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, (परमेश्वराखेरीज अन्य कशाचाही विशेषत:) स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक अवर्णनीय आनंद असतो.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 256)

(कामात गुंतलेले असताना, शांती, स्थिरता टिकून राहत नाही याबाबतची खंत एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी व्यक्त केली आहे, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

ज्ञान, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी येण्यासाठी स्थिरतेचे, शांतीचे आणि समर्पणाचे पोषक वातावरण आवश्य क असते. तुम्ही कामामध्ये गुंतलेले असताना ते वातावरण टिकून राहत नाही कारण तुमच्या मनाला ही निश्चल-निरवतेची (silence) देणगी अलीकडेच प्राप्त झाली आहे; आणि ती देणगी अजूनपर्यंत तरी फक्त मनापुरतीच सीमित आहे. (आत्ता तुमच्या प्राणाला त्या निश्चल-निरवतेचा फक्त स्पर्श झाला आहे किंवा तिचा प्रभाव जाणवू लागला आहे पण त्या निरवतेने प्राणाचा अजूनपर्यंत ताबा घेतलेला नाही.) जेव्हा नवीन चेतना पूर्णतः तयार झालेली असेल आणि ती जेव्हा तुमच्या प्राणिक प्रकृतीचा आणि शारीरिक अस्तित्वाचा संपूर्ण ताबा घेईल तेव्हा (तुम्ही म्हणत आहात) तो दोष निघून जाईल.

तुमच्या मनाला लाभलेली ही शांतीची अविचल चेतना केवळ स्थिर होणे पुरेसे नाही, तर ती व्यापकही झाली पाहिजे. तुम्हाला ती सर्वत्र जाणवली पाहिजे. म्हणजे, तुम्ही स्वतः आणि इतर सर्वकाही त्या चेतनेमध्येच आहे, असे तुम्हाला जाणवले पाहिजे. तुमच्या कर्मामध्ये स्थिरतेचा पाया निर्माण करण्यासाठीसुद्धा तुम्हाला त्या चेतनेची मदत होईल. तुमची चेतना जेवढी अधिक व्यापक होईल तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही वरून येणाऱ्या गोष्टी (ज्ञान, प्रकाश, प्रेम इ.) ग्रहण करू शकाल. (आणि तसे झाल्यावर मग) दिव्य शक्ती तुमच्या अस्तित्वामध्ये अवतरू शकेल आणि ती त्यामध्ये सामर्थ्य, प्रकाश आणि शांती ओतू शकेल.

तुम्हाला कोंडल्यासारखे, मर्यादित असे जे काही जाणवत आहे ते तुमचे शारीरिक मन (physical mind) आहे; उपरोक्त व्यापक चेतना आणि हा प्रकाश खाली अवतरला आणि त्याने तुमच्या प्रकृतीचा ताबा घेतला तरच, हे मन व्यापक होऊ शकते. तुमच्या देहप्रणालीमध्ये जेव्हा वरून सामर्थ्य अवतरेल तेव्हाच, तुम्हाला ज्याचा त्रास होत आहे ते शारीरिक जडत्व कमी होऊन नाहीसे होण्याची शक्यता आहे.

अविचल राहा, स्वतःला खुले करा आणि स्थिरता व शांती दृढ करण्यासाठी, चेतना व्यापक करण्यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. सद्यस्थितीत जेवढे ग्रहण करण्याची तसेच आत्मसात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे तेवढा प्रकाश व तेवढी शक्ती लाभावी यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. तुम्ही उतावीळ होणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यामुळे, तुमच्या प्राणिक प्रकृतीमध्ये अगोदरच प्रस्थापित झालेल्या अविचलता आणि समतोल या गोष्टींना पुन्हा धक्का लागण्याची शक्यता आहे. अंतिम परिणामाबाबत विश्वातस बाळगा आणि त्या दिव्य शक्तीला तिचे कार्य करू देण्यास पुरेसा अवधी द्या.

श्रीअरविंद (CWSA 29 : 124-125)

सर्व परिस्थितीमध्ये, अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये समता आणि शांती असणे हा योगस्थितीचा पहिला मुख्य आधार आहे. (तो दृढ झाला की मग) व्यक्तीचा कल जसा असेल त्यानुसार मग एकतर (ज्ञानासहित) प्रकाश येईल किंवा (सामर्थ्य आणि अनेक प्रकारची गतिमानता घेऊन) शक्ती अवतरेल किंवा (प्रेम आणि अस्तित्वाचा मोद घेऊन) आनंद येईल. परंतु पहिली आवश्यक स्थिती म्हणजे शांती! तिच्याविना (उपरोक्त) कोणतीच गोष्ट स्थिर होऊ शकत नाही.

श्रीअरविंद (CWSA 29 : 123)

नैराश्यापासून सुटका – १२

 

दुःख किंवा आनंद किंवा इतर कोणतीही भावना असण्या-नसण्याचा हा प्रश्न नाही. ज्याने कोणी सामान्य ‘प्रकृती‌’वर मात केलेली नाही अशा प्रत्येकामध्ये या भावना असतातच. या गोष्टी असणे म्हणजे ‘भावविवशता‌’ नाही, तर या गोष्टी असणे म्हणजे ‘भावनिक‌’ असणे होय.

जेव्हा तुम्हाला या भावभावनांमध्ये रममाण होण्यात किंवा भावनांचे प्रदर्शन करण्यात मजा वाटते तेव्हा त्यातून किंवा कोणतेही कारण नसताना किंवा पुरेसे कारण नसतानासुद्धा जेव्हा तुम्ही भावनांमध्ये गुंतून पडता तेव्हा त्यातून ‘भावविवशता’ (sentimentalism) येते.

*

प्राणिक प्रकृतीमधील (vital nature) भावुकतेच्या अधीन असलेल्या घटकामुळे व्यक्ती इतर लोकांबरोबर भांडणे करण्यास प्रवृत्त होते आणि त्यांच्याशी अबोला धरते. व्यक्तीच्या ज्या भावस्थितीला (mood), इतरांशी गप्पागोष्टी करण्याचे सुख आणि नातेसंबंधांमधून मिळणारे सुख हवेहवेसे वाटत असते त्या भावस्थितीद्वारेच दिलेली ही प्रतिक्रिया असते. यांपैकी कोणतीही एक प्रवृत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत दुसरी प्रवृत्तीही तेथे असण्याची शक्यता असते. या भावुकतेपासून जेव्हा तुम्ही स्वतःची सुटका करून घेता आणि तुमच्या सर्व शुद्ध झालेल्या भावना ईश्वराकडे वळविता, तेव्हा हे भावनांचे चढउतार नाहीसे होतात आणि त्यांची जागा सर्वांविषयीची एक स्थिर सद्भावना घेते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 210)

जीवन जगण्याचे शास्त्र – १३

माधुर्य आणि आनंदी भावना वाढीस लागू दिली पाहिजे; कारण या गोष्टी म्हणजे तुम्ही आत्म्याप्रत, चैत्य पुरुषाप्रत जागृत झाला आहात आणि तो तुमच्या संपर्कात आहे, याची सर्वात ठळक खूण असते. विचार किंवा उच्चार किंवा आचारामधील चुकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका; त्या बाह्य गोष्टी असल्याप्रमाणे त्यांना तुमच्यापासून दूर लोटा. ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी प्रकाश यांचे कार्य त्यांच्यावर होईल आणि त्या चुका दूर करण्यात येतील. केंद्रवर्ती सद्वस्तु म्हणजे, तुमचा आत्मा आणि त्याच्यासोबत येणाऱ्या सर्व उच्चतर वास्तविकता यांच्यावर लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 344)

*

आनंदी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग तुम्ही त्वरेने ईश्वरी प्रकाशाच्या जवळ जाऊन पोहोचाल.

*

ईश्वराप्रति एक प्रगाढ, उत्कट आणि सातत्यपूर्ण संपूर्ण कृतज्ञता जाणवणे हा आनंदी आणि शांत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 193), (CWM 16 : 314)

जीवन जगण्याचे शास्त्र – ११

(आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीला आनंदाचा अनुभव कसा येतो, हे आपण अगोदरच्या भागात पाहिले. श्रीमाताजी पुढे म्हणतात…)

मात्र या आनंदाचा अनुभव मनुष्यमात्रांमध्ये येणे हे काहीसे अधिक कठीण असते. कारण या आनंदाचा बोध घेण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मानसिक आणि प्राणिक रचना आडव्या येतात आणि त्या हे क्षेत्र बिघडवून टाकतात. तेथे त्यांच्यामध्ये असलेला तीव्र अहंकार वस्तुंमध्ये मिसळतो आणि त्यामुळे मनुष्याच्या माध्यमातून या आनंदाशी संपर्क होणे काहीसे अधिक कठीण असते.

वनस्पती आणि प्राण्यांमध्येसुद्धा तुम्हाला या आनंदाची जाणीव होऊ शकते. पण वनस्पतींपेक्षा प्राण्यांमध्ये हा अनुभव घेणे मुळातच काहीसे अधिक कठीण असते. पानाफुलांमध्ये, झाडांमध्ये ही गोष्ट अगदी मनोरम असते. पानेफुले त्यांचा आनंद बोलून दाखवितात, व्यक्त करतात. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व परिचित वस्तुंमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या तुमच्या अवतीभोवतीच्या वस्तुंमध्ये, चेतनेची अशी एक स्थिती असते, की त्यामध्ये प्रत्येक वस्तू जशी, जिथे असते तशी ती त्या स्थितीमध्ये आनंदात असते. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवते की, तुम्ही खऱ्या आनंदाला स्पर्श केला आहे.

आणि ही गोष्ट सापेक्ष नसते. म्हणजे ती गोष्ट इतर कशावरही अवलंबून नसते. हा आनंद बाह्य परिस्थितीवर, कमीअधिक अनुकूल स्थितीवर किंवा अन्य कशावरही अवलंबून नसतो. तर येथे तुम्ही या विश्व-अस्तित्वाच्या मूलकारणाशीच सायुज्य पावलेले असता. आणि असा आनंद जेव्हा तुमच्या अनुभवास येतो तेव्हा तुमच्या शरीरातील पेशी न्‌ पेशी त्या आनंदाने भरून जाते.

ही गोष्ट विचार करून समजावून घेण्याची नाही. येथे तुम्ही तर्क करत नाही, विश्लेषण करत नाही. ही अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये तुम्ही ती अवस्था जगत असता. आणि जेव्हा शरीराला हा अनुभव येत असतो तेव्हा तो अनुभव इतका टवटवीत असतो, तो इतका ताजा, इतका उत्स्फूर्त असतो… तो तुमच्याकडे कधीच पाठ फिरवत नाही. तेथे आत्म-निरीक्षणाची, आत्म-विश्लेषणाची किंवा वस्तुंचे विश्लेषण करत असल्याची कोणतीही जाणीवच शिल्लक राहात नाही.

हे सारे एखाद्या आनंदलहरींच्या गाण्यासारखे असते, परंतु त्यामध्ये कोणताही उथळपणा नसतो, कोणताही आवेग नसतो; सारे काही शांत, अगदी शांत असते. ते अतिशय सूक्ष्मही असते आणि तेवढेच उत्कटदेखील असते. जेव्हा हा आनंदाचा अनुभव येतो तेव्हा जणू अखिल विश्व हे अद्भुत रितीने सुसंवादी असल्यासारखे वाटू लागते. इतकेच काय पण सामान्य मानवी चेतनेला जे कुरूप, असुखद वाटत असते, तेसुद्धा आता अद्भुत वाटू लागते. …हा खरा आनंद, सत्य आनंद, खरा परमानंद असतो. परंतु तो अनुभवण्यासाठी आधी काही प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. आणि त्यासाठी मी सांगितले तसे प्रयत्न व्यक्तीने केले पाहिजेत.

परंतु आनंद मिळवणे हा हेतू ठेवून जर ते प्रयत्न केले तर, त्याचे फळ मिळण्यास वेळ लागेल; कारण त्यामध्ये अहंभावात्मक घटकाची भेसळ झालेली असेल. एखादा हेतू मनात ठेवून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर मग ते अर्पण असणार नाही, त्यामध्ये एक अपेक्षा असेल, मागणी असेल आणि मग… त्याचे फळ मिळेल पण त्याला काहीसा अधिक काळ लागेल. परंतु जेव्हा तुम्ही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, मागणी करत नाही, काही मिळावे अशी अपेक्षा बाळगत नाही, म्हणजे जेव्हा तिथे केवळ आत्म-दान व अभीप्सा असते, जेव्हा तिथे देवाणघेवाण-विरहित एक उत्स्फूर्त आवश्यकता असते, दिव्यता प्राप्त करून घ्यावी अशी निकड जेव्हा तुम्हाला जाणवते, तेव्हा तो आनंद तुम्हाला प्राप्त होतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 22)

जीवन जगण्याचे शास्त्र – १०

(मागील भागापासून पुढे…)

वासनांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ लागल्यावर, मग एक वेळ अशी येते की, व्यक्ती परिपक्व होऊ लागलेली असते. तेव्हा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, प्रत्येक स्पंदनामध्ये, अवतीभोवतीच्या प्रत्येक वस्तुमध्ये एक प्रकारचा आनंद, अस्तित्वाचा आनंद अनुभवायला मिळतो. केवळ माणसांमध्ये आणि सचेत जिवांमध्येच नव्हे तर, वस्तुंमध्ये, गोष्टींमध्येसुद्धा तो अनुभवायला येतो. केवळ झाडाफुलांपानांमध्ये आणि सजीवांमध्ये नव्हे तर, व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तुमध्ये, तिच्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तुंमध्येसुद्धा व्यक्तीला त्या आनंदाचा अनुभव येतो. आणि तिला असे जाणवते की, प्रत्येक गोष्टच या आनंदाने स्पंदित होत आहे. व्यक्ती एखाद्या गोष्टीला स्पर्श करते आणि तिला हा आनंद अनुभवास येतो.

परंतु अर्थातच त्यासाठी, मी सुरुवातीला सांगितले तसा अभ्यास करावा लागतो. अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये इच्छावासना असतात, आवडीनिवडी असतात, आसक्ती आणि आकर्षण किंवा प्रतिकर्षण आणि त्यासारख्या इतर गोष्टी असतात तोपर्यंत तिला या आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. व्यक्तीला एखाद्या गोष्टीमध्ये जोपर्यंत शारीरिक किंवा प्राणिक सुख अनुभवास येते तोपर्यंत तिला हा आनंद जाणवणार नाही.

हा आनंद सर्वत्र असतो. हा आनंद अतिशय सूक्ष्म असतो. तुम्ही वस्तुंमधून वावरत असता आणि जणू काही त्या वस्तू तुमच्याजवळ गाणे गुणगुणून तो आनंद व्यक्त करत असतात. आणि मग एक वेळ अशी येते की, जेव्हा तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीच्या जीवनामधील हा आनंद अगदी चिरपरिचित होऊन जातो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 22)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०९

मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि समावेश तसेच मनुष्याचा दिव्यत्वामध्ये आत्मोदय असा होतो. परंतु हा उदय विलयनाच्या स्वरूपाचा नसतो. (या जगामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत असतात) त्या शोधाची, धडपडीची, दुःखभोगाची, परमानंदाची परिपूर्ती निर्वाण ही असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर या लीलेचा आरंभच कधी झाला नसता. परमानंद हे रहस्य आहे. विशुद्ध आनंद अनुभवण्यास शिका म्हणजे तुम्ही ईश्वर जाणून घ्याल.” – श्रीअरविंद (CWSA 13 : 203-204)

*

(श्रीअरविंद लिखित वरील उताऱ्यावर एका साधकाने प्रश्न विचारला आहे.)

साधक : काय केल्यास व्यक्ती ‘विशुद्ध आनंद घेण्यास’ शिकू शकेल?

श्रीमाताजी : सर्वप्रथम, सुरुवात करायची झाली तर, तुम्ही सतर्कपणे निरीक्षण करून जाणिवसंपन्न झाले पाहिजे. इच्छावासना आणि त्यांच्या उपभोगातून जे सुख मिळते ते अस्पष्ट, अनिश्चित, मिश्रित, क्षणभंगुर आणि पूर्णपणे असमाधानकारक असे सुख असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. सहसा ही जाणीव हा आरंभबिंदू असतो.

तुम्ही जर बुद्धिनिष्ठ असाल तर, इच्छावासना काय असतात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि तुमच्या इच्छावासनांची पूर्ती करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे. त्यांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही त्यांना नकार दिला पाहिजे.

…‘इच्छावासनांची तृप्ती करण्यामधील आनंदापेक्षा, त्यांचा निरास करण्यामध्ये आणि त्यांच्यावर विजय संपादन करण्यात अनंतपटीने अधिक आनंद सामावलेला असतो.’ आणि हे निरपवाद सत्य आहे, असे प्रत्येक प्रामाणिक आणि निष्ठावान साधकाला आज ना उद्या, कधी कधी अगदी त्वरेने तर कधी कालांतराने, अनुभवास येते. जे सुख अगदीच चंचल आणि भेसळयुक्त असते, त्या वासनापूर्तीच्या सुखापेक्षा, इच्छावासनांवर मात करण्याचा आनंद हा अतुलनीय उच्चकोटीचा असतो. ही दुसरी पायरी असते.

आणि मग स्वाभाविकपणे, अशा प्रकारे सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे, अगदी थोड्या अवधीतच तुमच्या वासना तुमच्यापासून दूर जातील आणि नंतर त्या तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये थोडे अधिक खोलवर जाण्यासाठी मोकळे होऊ शकाल आणि आनंदाचे निधान असणाऱ्या, ईश्वराप्रति, ईश्वरी तत्त्वाप्रति, ईश्वरी कृपेप्रति अभीप्सा बाळगत खुले होऊ शकाल. आणि तुम्ही जर हे अगदी प्रामाणिकपणे आत्मदानाच्या (self-giving) भूमिकेतून केलेत, म्हणजे जणू काही तुम्ही स्वतःला पूर्णपणे देऊ केलेत, स्वतःला अर्पण केलेत आणि त्या अर्पणाच्या मोबदल्यात कोणत्याच गोष्टीची अपेक्षा बाळगली नाहीत तर, तुम्हाला एक प्रकारची आल्हाददायक ऊब जाणवेल; आणि ज्याने तुमचे हृदय भरून जाईल असे, संतोषजनक, आत्मीय, प्रकाशमान असे काहीतरी तुम्हाला जाणवेल, आणि ती गोष्ट आनंदाची अग्रदूत असेल. यानंतरचा मार्ग सोपा असतो… (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 21)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०८

सामान्य आनंदाचा उगम प्राणामध्ये असतो; तो आनंद अशुद्ध असतो आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. (मात्र) खऱ्या आनंदाचा उगम ईश्वरत्वामध्ये असतो; तो विशुद्ध आणि परिपूर्ण असतो.

*

साधेपणाने राहायचे, साधी सदिच्छा बाळगायची; फार लक्षणीय असे काही करण्याची गरज नसते मात्र सर्वोत्तम असे जे करता येणे शक्य असेल ते ते करायचे आणि ते उत्तमातील उत्तम रितीने करायचे; प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची आणि तुम्ही काय केले पाहिजे व कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या जगातील सारेकाही जो जाणतो त्या ईश्वराला घेऊ द्यायचा, हे उचित असते. तेव्हा व्यक्ती चिंतामुक्त असते आणि ती पूर्णपणे आनंदी राहू शकते.

– श्रीमाताजी (CWM 17 : 18) & (CWM 06 : 248)