Tag Archive for: आनंद

नैराश्यापासून सुटका – १२

 

दुःख किंवा आनंद किंवा इतर कोणतीही भावना असण्या-नसण्याचा हा प्रश्न नाही. ज्याने कोणी सामान्य ‘प्रकृती‌’वर मात केलेली नाही अशा प्रत्येकामध्ये या भावना असतातच. या गोष्टी असणे म्हणजे ‘भावविवशता‌’ नाही, तर या गोष्टी असणे म्हणजे ‘भावनिक‌’ असणे होय.

जेव्हा तुम्हाला या भावभावनांमध्ये रममाण होण्यात किंवा भावनांचे प्रदर्शन करण्यात मजा वाटते तेव्हा त्यातून किंवा कोणतेही कारण नसताना किंवा पुरेसे कारण नसतानासुद्धा जेव्हा तुम्ही भावनांमध्ये गुंतून पडता तेव्हा त्यातून ‘भावविवशता’ (sentimentalism) येते.

*

प्राणिक प्रकृतीमधील (vital nature) भावुकतेच्या अधीन असलेल्या घटकामुळे व्यक्ती इतर लोकांबरोबर भांडणे करण्यास प्रवृत्त होते आणि त्यांच्याशी अबोला धरते. व्यक्तीच्या ज्या भावस्थितीला (mood), इतरांशी गप्पागोष्टी करण्याचे सुख आणि नातेसंबंधांमधून मिळणारे सुख हवेहवेसे वाटत असते त्या भावस्थितीद्वारेच दिलेली ही प्रतिक्रिया असते. यांपैकी कोणतीही एक प्रवृत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत दुसरी प्रवृत्तीही तेथे असण्याची शक्यता असते. या भावुकतेपासून जेव्हा तुम्ही स्वतःची सुटका करून घेता आणि तुमच्या सर्व शुद्ध झालेल्या भावना ईश्वराकडे वळविता, तेव्हा हे भावनांचे चढउतार नाहीसे होतात आणि त्यांची जागा सर्वांविषयीची एक स्थिर सद्भावना घेते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 210)

जीवन जगण्याचे शास्त्र – १३

माधुर्य आणि आनंदी भावना वाढीस लागू दिली पाहिजे; कारण या गोष्टी म्हणजे तुम्ही आत्म्याप्रत, चैत्य पुरुषाप्रत जागृत झाला आहात आणि तो तुमच्या संपर्कात आहे, याची सर्वात ठळक खूण असते. विचार किंवा उच्चार किंवा आचारामधील चुकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका; त्या बाह्य गोष्टी असल्याप्रमाणे त्यांना तुमच्यापासून दूर लोटा. ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी प्रकाश यांचे कार्य त्यांच्यावर होईल आणि त्या चुका दूर करण्यात येतील. केंद्रवर्ती सद्वस्तु म्हणजे, तुमचा आत्मा आणि त्याच्यासोबत येणाऱ्या सर्व उच्चतर वास्तविकता यांच्यावर लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 344)

*

आनंदी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग तुम्ही त्वरेने ईश्वरी प्रकाशाच्या जवळ जाऊन पोहोचाल.

*

ईश्वराप्रति एक प्रगाढ, उत्कट आणि सातत्यपूर्ण संपूर्ण कृतज्ञता जाणवणे हा आनंदी आणि शांत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 193), (CWM 16 : 314)

जीवन जगण्याचे शास्त्र – ११

(आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीला आनंदाचा अनुभव कसा येतो, हे आपण अगोदरच्या भागात पाहिले. श्रीमाताजी पुढे म्हणतात…)

मात्र या आनंदाचा अनुभव मनुष्यमात्रांमध्ये येणे हे काहीसे अधिक कठीण असते. कारण या आनंदाचा बोध घेण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मानसिक आणि प्राणिक रचना आडव्या येतात आणि त्या हे क्षेत्र बिघडवून टाकतात. तेथे त्यांच्यामध्ये असलेला तीव्र अहंकार वस्तुंमध्ये मिसळतो आणि त्यामुळे मनुष्याच्या माध्यमातून या आनंदाशी संपर्क होणे काहीसे अधिक कठीण असते.

वनस्पती आणि प्राण्यांमध्येसुद्धा तुम्हाला या आनंदाची जाणीव होऊ शकते. पण वनस्पतींपेक्षा प्राण्यांमध्ये हा अनुभव घेणे मुळातच काहीसे अधिक कठीण असते. पानाफुलांमध्ये, झाडांमध्ये ही गोष्ट अगदी मनोरम असते. पानेफुले त्यांचा आनंद बोलून दाखवितात, व्यक्त करतात. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व परिचित वस्तुंमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या तुमच्या अवतीभोवतीच्या वस्तुंमध्ये, चेतनेची अशी एक स्थिती असते, की त्यामध्ये प्रत्येक वस्तू जशी, जिथे असते तशी ती त्या स्थितीमध्ये आनंदात असते. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवते की, तुम्ही खऱ्या आनंदाला स्पर्श केला आहे.

आणि ही गोष्ट सापेक्ष नसते. म्हणजे ती गोष्ट इतर कशावरही अवलंबून नसते. हा आनंद बाह्य परिस्थितीवर, कमीअधिक अनुकूल स्थितीवर किंवा अन्य कशावरही अवलंबून नसतो. तर येथे तुम्ही या विश्व-अस्तित्वाच्या मूलकारणाशीच सायुज्य पावलेले असता. आणि असा आनंद जेव्हा तुमच्या अनुभवास येतो तेव्हा तुमच्या शरीरातील पेशी न्‌ पेशी त्या आनंदाने भरून जाते.

ही गोष्ट विचार करून समजावून घेण्याची नाही. येथे तुम्ही तर्क करत नाही, विश्लेषण करत नाही. ही अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये तुम्ही ती अवस्था जगत असता. आणि जेव्हा शरीराला हा अनुभव येत असतो तेव्हा तो अनुभव इतका टवटवीत असतो, तो इतका ताजा, इतका उत्स्फूर्त असतो… तो तुमच्याकडे कधीच पाठ फिरवत नाही. तेथे आत्म-निरीक्षणाची, आत्म-विश्लेषणाची किंवा वस्तुंचे विश्लेषण करत असल्याची कोणतीही जाणीवच शिल्लक राहात नाही.

हे सारे एखाद्या आनंदलहरींच्या गाण्यासारखे असते, परंतु त्यामध्ये कोणताही उथळपणा नसतो, कोणताही आवेग नसतो; सारे काही शांत, अगदी शांत असते. ते अतिशय सूक्ष्मही असते आणि तेवढेच उत्कटदेखील असते. जेव्हा हा आनंदाचा अनुभव येतो तेव्हा जणू अखिल विश्व हे अद्भुत रितीने सुसंवादी असल्यासारखे वाटू लागते. इतकेच काय पण सामान्य मानवी चेतनेला जे कुरूप, असुखद वाटत असते, तेसुद्धा आता अद्भुत वाटू लागते. …हा खरा आनंद, सत्य आनंद, खरा परमानंद असतो. परंतु तो अनुभवण्यासाठी आधी काही प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. आणि त्यासाठी मी सांगितले तसे प्रयत्न व्यक्तीने केले पाहिजेत.

परंतु आनंद मिळवणे हा हेतू ठेवून जर ते प्रयत्न केले तर, त्याचे फळ मिळण्यास वेळ लागेल; कारण त्यामध्ये अहंभावात्मक घटकाची भेसळ झालेली असेल. एखादा हेतू मनात ठेवून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर मग ते अर्पण असणार नाही, त्यामध्ये एक अपेक्षा असेल, मागणी असेल आणि मग… त्याचे फळ मिळेल पण त्याला काहीसा अधिक काळ लागेल. परंतु जेव्हा तुम्ही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, मागणी करत नाही, काही मिळावे अशी अपेक्षा बाळगत नाही, म्हणजे जेव्हा तिथे केवळ आत्म-दान व अभीप्सा असते, जेव्हा तिथे देवाणघेवाण-विरहित एक उत्स्फूर्त आवश्यकता असते, दिव्यता प्राप्त करून घ्यावी अशी निकड जेव्हा तुम्हाला जाणवते, तेव्हा तो आनंद तुम्हाला प्राप्त होतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 22)

जीवन जगण्याचे शास्त्र – १०

(मागील भागापासून पुढे…)

वासनांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ लागल्यावर, मग एक वेळ अशी येते की, व्यक्ती परिपक्व होऊ लागलेली असते. तेव्हा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, प्रत्येक स्पंदनामध्ये, अवतीभोवतीच्या प्रत्येक वस्तुमध्ये एक प्रकारचा आनंद, अस्तित्वाचा आनंद अनुभवायला मिळतो. केवळ माणसांमध्ये आणि सचेत जिवांमध्येच नव्हे तर, वस्तुंमध्ये, गोष्टींमध्येसुद्धा तो अनुभवायला येतो. केवळ झाडाफुलांपानांमध्ये आणि सजीवांमध्ये नव्हे तर, व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तुमध्ये, तिच्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तुंमध्येसुद्धा व्यक्तीला त्या आनंदाचा अनुभव येतो. आणि तिला असे जाणवते की, प्रत्येक गोष्टच या आनंदाने स्पंदित होत आहे. व्यक्ती एखाद्या गोष्टीला स्पर्श करते आणि तिला हा आनंद अनुभवास येतो.

परंतु अर्थातच त्यासाठी, मी सुरुवातीला सांगितले तसा अभ्यास करावा लागतो. अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये इच्छावासना असतात, आवडीनिवडी असतात, आसक्ती आणि आकर्षण किंवा प्रतिकर्षण आणि त्यासारख्या इतर गोष्टी असतात तोपर्यंत तिला या आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. व्यक्तीला एखाद्या गोष्टीमध्ये जोपर्यंत शारीरिक किंवा प्राणिक सुख अनुभवास येते तोपर्यंत तिला हा आनंद जाणवणार नाही.

हा आनंद सर्वत्र असतो. हा आनंद अतिशय सूक्ष्म असतो. तुम्ही वस्तुंमधून वावरत असता आणि जणू काही त्या वस्तू तुमच्याजवळ गाणे गुणगुणून तो आनंद व्यक्त करत असतात. आणि मग एक वेळ अशी येते की, जेव्हा तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीच्या जीवनामधील हा आनंद अगदी चिरपरिचित होऊन जातो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 22)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०९

मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि समावेश तसेच मनुष्याचा दिव्यत्वामध्ये आत्मोदय असा होतो. परंतु हा उदय विलयनाच्या स्वरूपाचा नसतो. (या जगामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत असतात) त्या शोधाची, धडपडीची, दुःखभोगाची, परमानंदाची परिपूर्ती निर्वाण ही असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर या लीलेचा आरंभच कधी झाला नसता. परमानंद हे रहस्य आहे. विशुद्ध आनंद अनुभवण्यास शिका म्हणजे तुम्ही ईश्वर जाणून घ्याल.” – श्रीअरविंद (CWSA 13 : 203-204)

*

(श्रीअरविंद लिखित वरील उताऱ्यावर एका साधकाने प्रश्न विचारला आहे.)

साधक : काय केल्यास व्यक्ती ‘विशुद्ध आनंद घेण्यास’ शिकू शकेल?

श्रीमाताजी : सर्वप्रथम, सुरुवात करायची झाली तर, तुम्ही सतर्कपणे निरीक्षण करून जाणिवसंपन्न झाले पाहिजे. इच्छावासना आणि त्यांच्या उपभोगातून जे सुख मिळते ते अस्पष्ट, अनिश्चित, मिश्रित, क्षणभंगुर आणि पूर्णपणे असमाधानकारक असे सुख असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. सहसा ही जाणीव हा आरंभबिंदू असतो.

तुम्ही जर बुद्धिनिष्ठ असाल तर, इच्छावासना काय असतात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि तुमच्या इच्छावासनांची पूर्ती करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे. त्यांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही त्यांना नकार दिला पाहिजे.

…‘इच्छावासनांची तृप्ती करण्यामधील आनंदापेक्षा, त्यांचा निरास करण्यामध्ये आणि त्यांच्यावर विजय संपादन करण्यात अनंतपटीने अधिक आनंद सामावलेला असतो.’ आणि हे निरपवाद सत्य आहे, असे प्रत्येक प्रामाणिक आणि निष्ठावान साधकाला आज ना उद्या, कधी कधी अगदी त्वरेने तर कधी कालांतराने, अनुभवास येते. जे सुख अगदीच चंचल आणि भेसळयुक्त असते, त्या वासनापूर्तीच्या सुखापेक्षा, इच्छावासनांवर मात करण्याचा आनंद हा अतुलनीय उच्चकोटीचा असतो. ही दुसरी पायरी असते.

आणि मग स्वाभाविकपणे, अशा प्रकारे सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे, अगदी थोड्या अवधीतच तुमच्या वासना तुमच्यापासून दूर जातील आणि नंतर त्या तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये थोडे अधिक खोलवर जाण्यासाठी मोकळे होऊ शकाल आणि आनंदाचे निधान असणाऱ्या, ईश्वराप्रति, ईश्वरी तत्त्वाप्रति, ईश्वरी कृपेप्रति अभीप्सा बाळगत खुले होऊ शकाल. आणि तुम्ही जर हे अगदी प्रामाणिकपणे आत्मदानाच्या (self-giving) भूमिकेतून केलेत, म्हणजे जणू काही तुम्ही स्वतःला पूर्णपणे देऊ केलेत, स्वतःला अर्पण केलेत आणि त्या अर्पणाच्या मोबदल्यात कोणत्याच गोष्टीची अपेक्षा बाळगली नाहीत तर, तुम्हाला एक प्रकारची आल्हाददायक ऊब जाणवेल; आणि ज्याने तुमचे हृदय भरून जाईल असे, संतोषजनक, आत्मीय, प्रकाशमान असे काहीतरी तुम्हाला जाणवेल, आणि ती गोष्ट आनंदाची अग्रदूत असेल. यानंतरचा मार्ग सोपा असतो… (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 21)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०८

सामान्य आनंदाचा उगम प्राणामध्ये असतो; तो आनंद अशुद्ध असतो आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. (मात्र) खऱ्या आनंदाचा उगम ईश्वरत्वामध्ये असतो; तो विशुद्ध आणि परिपूर्ण असतो.

*

साधेपणाने राहायचे, साधी सदिच्छा बाळगायची; फार लक्षणीय असे काही करण्याची गरज नसते मात्र सर्वोत्तम असे जे करता येणे शक्य असेल ते ते करायचे आणि ते उत्तमातील उत्तम रितीने करायचे; प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची आणि तुम्ही काय केले पाहिजे व कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या जगातील सारेकाही जो जाणतो त्या ईश्वराला घेऊ द्यायचा, हे उचित असते. तेव्हा व्यक्ती चिंतामुक्त असते आणि ती पूर्णपणे आनंदी राहू शकते.

– श्रीमाताजी (CWM 17 : 18) & (CWM 06 : 248)

आत्मसाक्षात्कार – २४

(‘अतिमानव होणे म्हणजे काय’, ही संकल्पना श्रीअरविंदांनी येथे सुस्पष्ट करून सांगितली आहे. हा मजकूर दीर्घ असल्याने क्रमश: देत आहोत…)

परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि त्याचसाठी तुम्ही इथे आहात. या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते म्हणजे एकतर तुमची तयारी करून घेणे आहे किंवा तो मार्गावरील आनंद आहे; अन्यथा ते म्हणजे उद्देशापासून स्खलन, ध्येयच्युती आहे. या मार्गाच्या आधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, (परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे) हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे; त्या ध्येयपूर्तीच्या आनंदामध्ये तुमच्या अस्तित्वाची महानता आणि आनंद सामावलेला आहे. तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तो (ईश्वर) देखील या मार्गावर तुमच्यासोबत आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत यासाठीच आरोहणाची शक्ती तुम्हाला प्रदान करण्यात आली आहे.

तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच आहे! तुमचे ध्येय काय असावे असे जर तुम्ही विचारत असाल, तर ते ध्येय हेच असावे. तुम्ही जर सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर उपरोक्त गोष्टीइतका आनंद तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत लाभणार नाही. कारण स्वप्नांचा आनंद असो, झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे आनंद खंडित वा मर्यादित असतात. पण उपरोक्त आनंद मात्र तुमच्या समग्र अस्तित्वाचा आनंद असतो. तुम्ही जर असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय आहे, तर ‘ईश्वर’ हेच तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ खंडित वा विपर्यस्त रूपे आहेत. तुम्ही जर ‘सत्य’ शोधू पाहात असाल, तर ते ‘सत्य’ हेच आहे. सातत्याने तेच तुमच्या दृष्टीसमोर असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150)

श्रीमाताजी आणि समीपता – १०

व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल अशा स्वरूपाचा आनंद मिळणे शक्य नाही. आपले कर्म, आपल्या कृती या श्रीमाताजींना अर्पण केल्याच पाहिजेत, त्या त्यांच्यासाठी म्हणूनच केल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये तुमचा स्वतःसाठीचा विचार, तुमच्या स्वतःच्या कल्पना, तुमचे अग्रक्रम, तुमच्या भावना, पसंती-नापसंती या गोष्टी असता कामा नयेत. आणि जर अशा गोष्टींवर व्यक्तीची नजर असेल तर तिला प्रत्येक पावलागणिक मन किंवा प्राणामध्ये संघर्षाचा सामना करावा लागतो. तसेच समजा जरी व्यक्तीचे मन व प्राण तुलनेने शांत झालेले असले तरीही शरीरामधील आणि मज्जातंतूमधील संघर्षाला तिने सामोरे जाणे अजून बाकी असते. व्यक्ती जेव्हा अंतरंगातून श्रीमाताजींपाशी राहते तेव्हाच फक्त शांती आणि आनंद स्थिर राहू शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२७)

(उत्तरार्ध)

(‘ईश्वरा’प्रति आत्मदान करण्याची प्रेरणा) ही प्रेरणा प्राणिक इच्छा नसते तर ती आत्म्याची प्रेरणा असते; (त्या पाठीमागे) एक तर्कही असतो पण तो मनाचा तर्क नसतो, तर तो आत्म्याचा आणि जीवात्म्याचा तर्क असतो. तेथेही एक मागणी असते, पण ती मागणी म्हणजे प्राणिक लालसा नसते तर ती आत्म्याची अंगभूत अभीप्सा असते. जेव्हा, “मी तुझा अमुक कारणासाठी शोध घेत आहे, मी तुझा त्या करणासाठी शोध घेत आहे,” अशी भाषा जाऊन तेथे, “मी तुझा शोध केवळ तुझ्यासाठीच घेत आहे,” असा बदल घडून येतो; म्हणजे जेव्हा निव्वळ आत्मदान घडून येते तेव्हा अशा प्रकारची अभीप्सा उदयाला येते. कृष्णप्रेम (रोनाल्ड हेनरी निक्सन नावाचे एक ब्रिटिश साधक, यांनी वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला.) जेव्हा म्हणतात, ‘ज्ञान नको, हेही नको आणि तेही नको, तर फक्त कृष्णच हवा,” तेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या या अदभुत आणि अनिर्वचनीय केवलाविषयी बोलायचे असते.

‘ईश्वरा’ची ओढ ही खरोखरच एक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आपल्यामधील जीवात्मा ‘ईश्वरा’कडे ओढला जातो कारण त्याला त्या महत्तर ‘आत्म्या’ची अनिवार्य हाक आलेली असते. जीवात्मा आपल्या आराध्य दैवताकडे अनिवार्यपणे ओढला जातो, कारण ‘ईश्वरा’शिवाय त्याचे अस्तित्वच असू शकत नाही. कारण जीवात्मा हा जीवात्मा असतो आणि ‘ईश्वर’ हा ‘ईश्वर’ असतो. ‘ईश्वरा’साठीच ईश्वराचा शोध, अन्य कशासाठीही नाही, असे आम्ही जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे स्पष्ट व्हावे म्हणून, (अर्थात जेवढे स्पष्ट करण्याजोगे होते तेवढे) मी हे सर्व लिहिले आहे. स्पष्टीकरण करण्याजोगे असू देत वा नसू देत, आध्यात्मिक अनुभूतीची ही एक सर्वात प्रभावी वास्तविकता असते. ‘आत्मदानाची प्रेरणा’ ही या वास्तविकतेची केवळ एक अभिव्यक्ती असते.

परंतु याचा अर्थ असा होत नाही की, मी तुमच्या ‘आनंदा’च्या मागणीवर आक्षेप घेत आहे. जोपर्यंत तुमच्या व्यक्तित्वाच्या कोणत्याही एखाद्या भागाला तशी गरज असते, तोपर्यंत तुम्ही खुशाल त्याची मागणी करू शकता, कारण जोपर्यंत आपल्यामध्ये सदोदित असलेली निरपवाद आंतरिक हाक, स्वतःला पृष्ठस्तरावर नेण्यासाठी जोर लावत नाही तोपर्यंत (आनंद, प्रकाश, शक्ती, ज्ञान, शांती इत्यादी) याच गोष्टी व्यक्तीला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाणाऱ्या असतात. आणि ही आंतरिक हाक खरोखरच अगदी आरंभापासूनच असते आणि पाठीशी असते – ती आध्यात्मिक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आत्म्याची ‘ईश्वरा’प्रति असलेली ही निखालस (absolute) गरज असते.

त्या ठिकाणी ‘आनंद’ असताच कामा नये, असे काही माझे म्हणणे नाही. आत्मदान म्हणजेच स्वयमेव एक अपार ‘आनंद’ असतो, आणि जेव्हा ते आत्मदान स्वत:सोबत ‘आनंद’ घेऊन येते, तेव्हा ते एक अनिर्वचनीय ‘आनंद’ जागृत करते आणि इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा, (निःस्वार्थी आत्मदान करणे) या पद्धतीद्वारे हा ‘आनंद’ लवकर गवसतो, म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकते की, “निःस्वार्थी आत्मदान ही सर्वोत्तम नीती आहे.” अर्थातच केवळ एक ‘नीती’ म्हणून ती व्यक्ती ते आत्मदान आचरणात आणत नाही. ‘आनंद’ हे फल असते, पण या फलासाठी आत्मदान केले जात नाही, तर ते स्वयमेव आत्मदानासाठी आणि साक्षात ‘ईश्वरा’साठीच केले जाते – यामध्ये अगदी सूक्ष्मसा फरक आहे; तो मानसिक आहे असे वाटेल, पण त्यामध्ये खरोखरच फरक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 12-13)

(श्रीमाताजींनी ‘विश्वात्मक’ प्राणाशी किंवा ‘ईश्वरी’ आनंदाशी एकात्म पावलेल्या व्यक्तिगत प्राणासंबंधी विवेचन केले आहे. एकदा का ही एकात्मता साधली की मग प्राणाचे व्यक्तिगत अस्तित्व शिल्लक राहत नाही, असे त्या म्हणतात.)

उदाहरणार्थ, क्वचितच एखाद्या मानवी वातावरणाने दूषित न झालेल्या गावाकडील निर्जन रस्त्यावरून, जेथे निसर्ग एखाद्या अभीप्सेसारखा, एखाद्या पवित्र प्रार्थनेसारखा अगदी शांत, विशाल, विशुद्ध असतो अशा ठिकाणी किंवा पर्वतराजीमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, शेजारून खळाळणारे पाण्याचे प्रवाह जिथे वाहत आहेत अशा भटक्या वाटांवरून, किंवा अथांग सागरकिनाऱ्यावरून व्यक्ती जेव्हा एकटीच आपल्या नादात फिरत असते, किंवा ज्याच्याबरोबर त्या व्यक्तीचा पूर्ण सुसंवाद असतो अशा जोडीदाराच्या सहवासात विहार करत असते, तेव्हा तेथे तिला जी संवदेना जाणवत असते ती म्हणजे एक सूक्ष्मसा आनंद असतो, तो मधुर आणि अगाध असतो. जोपर्यंत प्राण व्यक्तिगत असतो, तोपर्यंत हा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा (व्यक्तीचा) ‘प्राण’ खऱ्या अर्थाने अवैयक्तिक, विश्वात्मक झालेला असतो, तेव्हा ‘ज्यांना ज्यांना त्याची जाणीव असते त्या सर्वांमध्ये असलेला, आल्हाददायक आनंदच’ ती व्यक्ती होऊन जाते; अशा वेळी व्यक्तीला त्या गोष्टीचा आनंदोपभोग घेण्यासाठी, आजूबाजूला कोणतीही विशिष्ट भौतिक परिस्थिती असण्याची आवश्यकता नसते. नाडीगत स्तराबाबत (Nervous plane) सांगायचे तर, अशावेळी व्यक्ती सर्व प्रकारच्या परिस्थितींपासून पूर्णतः मुक्त असते. त्यावेळी व्यक्तीला मुक्ती प्राप्त झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 119-120)