Tag Archive for: आत्मनिरीक्षण

(तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही, या नियमाबद्दल श्रीमाताजींनी काही सांगितले आहे. आपण कालच्या भागात त्याचा विचार केला.)

काही व्यक्ती वर नमूद केलेल्या नियमाला अपवाद असतात, असे समजू नका. कारण (जडत्व, आळस, अज्ञान, नैराश्य, नकारात्मक विचार इ.) प्राकृतिक स्वभावधर्माचा भाग वाट्यालाच आला नाही, अशा रितीने कोणीही या भौतिक जगात राहू शकत नाही. आणि प्राकृतिक स्वभाव हा नेहमीच संमिश्र असतो; त्यात खऱ्याखोट्याची सरमिसळ झालेली असते. जेव्हा तुम्ही पूर्णत: प्रामाणिकपणा अंगी बाणवाल तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या ठिकाणी संपूर्णतः निर्भेळ असे काहीही नाही. पण तुम्ही तुमच्यातील सर्वोच्च चेतनेच्या प्रकाशात, स्वतःच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत तर मग, तुमच्या प्रकृतीमधील जे काही काढून टाकायची तुमची इच्छा आहे ते नाहीसे होईल. अशा संपूर्ण प्रामाणिकपणासाठी तुम्ही प्रयत्न केला नाहीत तर एखादा दोष किंवा त्याची लहानशी पडछाया पुन्हा डोकं वर काढण्याच्या संधीची वाट पाहत एका कोपऱ्यात दडून बसेल.

मी येथे मी प्राणाविषयी बोलत नाहीये तर, मी फक्त मनाविषयी बोलत आहे. (तुमच्या हातून घडलेल्या चुकीविषयी अंतरंगातून कोणीतरी सांगते की, तुम्ही चुकीचे वागलात. आणि तेव्हा बघा तुमच्यामध्ये कशी अस्वस्थता निर्माण होते.) तुमच्या ठिकाणी एखादी लहानशी अप्रिय संवेदना, थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली तर पाहा, तुमचे मन किती पटकन तुमच्या त्या तशा वागण्याचे समर्थन करते. ते दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडते किंवा परिस्थितीला दोष देते. ते म्हणते की, “मी जे काही केले ते बरोबरच होते; आणि अमुक एक गोष्ट चुकीची झाली त्याला मी जबाबदार नाही.” तुम्ही जर स्वत:कडे काळजीपूर्वक पाहिलेत तर तुम्हाला असे दिसून येईल की हो, खरंच की, ते तसंच आहे आणि त्याची तुम्हाला खूप गंमतही वाटेल.

स्वत:ची किंवा दुसऱ्यांची फसवणूक न व्हावी म्हणून जर एखादे मूल अगदी लहानपणापासून स्वत:चे काळजीपूर्वक परीक्षण करू लागले, प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करू लागले, तर ते त्याच्या अंगवळणी पडेल आणि त्यामुळे त्याच्या नंतरच्या जीवनातील (प्रामाणिक होण्यासाठी करावे लागणारे) बरेचसे कष्ट कमी होतील. (क्रमश:)

अमृतवर्षा १७

(स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वत:चे निरीक्षण कसे करावे याबद्दल श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

सबंध दिवसातील तुमच्या गतीविधी, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यायची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्या प्रकाशयुक्त भागासमोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजे अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

….या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे की नाही? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही असे केल्यानंतर हा खेळ संपलेला असतो.

मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यायच्या राहिलेल्या असतात. मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. (इतकी सुधारणा आता तुमच्यामध्ये झालेली असते.)

– श्रीमाताजी [CWM 04 : 38-39]