Tag Archive for: आंतरिक शक्ती

 

(साधकाला जर जादुटोणा वगैरे गोष्टींचा धोका असेल तर काय करावे, अशा आशयाचा प्रश्न एका साधकाने विचारलेला दिसतो. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही जोवर शक्तिशाली असता, अगदी विशुद्ध स्थितीत असता, जेव्हा तुम्ही अजेय स्थितीत असता, अशा स्थितीत असताना तुमच्या विरोधात जर कोणी काही केले तर, ती गोष्ट आपोआप त्यांच्यावरच जाऊन आदळते. टेनिसचा चेंडू भिंतीवर फेकला तर, तो जसा तुमच्याकडेच परत येतो; अगदी त्याचप्रमाणे ती गोष्ट त्यांच्याकडे परत जाते, कधीकधी तर जास्तच शक्तीनिशी त्यांच्यावर जाऊन आदळते आणि अशा रितीने त्यांना त्यांच्या स्वतःच्याच दुष्टपणाची शिक्षा मिळालेली असते. पण अर्थातच ज्या व्यक्तीविरुद्ध जादुटोणा करण्यात आला होता, त्या व्यक्तीच्या आंतरिक शक्तीवर आणि शुद्धतेवर हे सारे काही अवलंबून असते. मी अशी अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत.

अशा उदाहरणात, या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करायचा तर, मी म्हटले त्याप्रमाणे व्यक्ती ही प्राणिकदृष्ट्या योद्धा असली पाहिजे, म्हणजे ती प्राणाच्या स्तरावर आध्यात्मिक योद्धा असली पाहिजे. जे कोणी अगदी प्रामाणिकपणे योगसाधना करतात त्यांनी अशा प्रकारचा योद्धा बनलेच पाहिजे. आणि जेव्हा ते तसे होतात, तेव्हा ते अगदी पूर्णपणे संरक्षित, सुरक्षित झालेले असतात.

पण त्यासाठी एक पूर्वअट असते ती म्हणजे व्यक्तीमध्ये कधीही दुरिच्छा असता कामा नये किंवा तिच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असता कामा नयेत. कारण जेव्हा तुम्ही अशी वाईट भावना किंवा वाईट इच्छा किंवा वाईट विचार बाळगता, तेव्हा तुम्ही त्यांच्या पातळीवर उतरता आणि जेव्हा अशा रितीने तुम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन पडता तेव्हा, तुमच्यावर त्यांच्याकडून आघात होण्याची शक्यता असते.

• श्रीमाताजी (CWM 05 : 179)

व्यक्ती निश्चितपणे आजारपणावर आतून कार्य करू शकते आणि तो आजार बरा करू शकते. फक्त एवढेच की, हे नेहमीच सोपे असते असे नाही. कारण जडभौतिकामध्ये खूप प्रतिरोध असतो, तो जडत्वाचा विरोध असतो. येथे अथक असे प्रयत्नसातत्य आवश्यक असते. प्रथमतः व्यक्तीला त्यात कदाचित सपशेल अपयश येईल किंवा आजाराची लक्षणे वाढतील; पण हळूहळू शरीरावरील किंवा एखाद्या विशिष्ट आजारावरील नियंत्रण दृढ होत जाईल. त्यातही, आजारपणाचा कधीतरी झालेला हल्ला असतो, तो आंतरिक साधनांनी बरा करणे तुलनेने अधिक सोपे असते; पण भविष्यातही त्या आजारापासून शरीर सुरक्षित ठेवणे हे अधिक अवघड असते.

दीर्घकालीन आजार असेल, तर तो बरा करण्यास अधिकच कठीण असतो, शरीराच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या तक्रारींपेक्षा, असे जुनाट आजार शरीरातून पूर्णपणे नाहीसे होण्यास अधिक नाखूष असतात. जोवर शरीरावरील नियंत्रण हे सदोष असते, तोपर्यंत आंतरिक शक्तीच्या वापरामध्ये या सर्व व इतर अपूर्णता आणि अडचणी राहणारच. आंतरिक कार्याच्या आधारे, जरी तुम्ही आजारपण वाढू देण्यापासून रोखू शकलात, तरी पुष्कळ झाले; जोपर्यंत तुम्ही तो आजार पूर्ण बरा करण्याच्या क्षमतेचे होत नाही तोपर्यंत, ‘अभ्यासा’ने तुम्हाला ती आंतरिक शक्ती अधिक बळकट करत नेली पाहिजे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, जोपर्यंत ती आंतरिक शक्ती संपूर्णतया तिथे कार्यरत नसेल तोपर्यंत, भौतिक उपचारांची मदत घेणे सोडता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579-580)