Tag Archive for: अविचलता

आंतरिक आध्यात्मिक प्रगती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर बाह्य परिस्थितीला आपण अंतरंगातून कशी प्रतिक्रिया देतो यावर ती अवलंबून असते. आध्यात्मिक अनुभवाचा तो नेहमीच अंतिम निष्कर्ष राहिलेला आहे. आणि म्हणूनच योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही इतका भर देत असतो; बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणाऱ्या आंतरिक स्थितीवर म्हणजे समतेच्या आणि स्थिरतेच्या स्थितीवर आम्ही भर देत असतो. आंतरिक आनंदाची स्थिती एकाएकी येऊ शकणार नाही पण, जीवनातील धक्के व आघात यांच्या नेहमीच अधीन असणाऱ्या पृष्ठवर्ती मनामध्ये राहण्यापेक्षा, अंतरंगात अधिकाधिक प्रवेश करून, तेथून जीवनाकडे पाहण्यावर आमचा भर असतो. या आंतरिक स्थितीमुळेच व्यक्ती जीवन आणि त्याच्या अस्वस्थकारी शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली बनू शकते आणि विजय प्राप्त करण्याची थोडीफार तरी आशा बाळगू शकते.

अंतरंगामध्ये अविचल (quiet) राहणे, अडीअडचणी किंवा चढउतार यांमुळे अस्वस्थ किंवा नाउमेद होण्यास नकार देऊन, त्यामधून सहीसलामत पार होण्याचा दृढ संकल्प बाळगणे, या योगमार्गावरील शिकण्यायोग्य गोष्टींपैकी काही प्रारंभिक गोष्टी आहेत.

या व्यतिरिक्त अन्य काही करणे म्हणजे चेतनेच्या अस्थिरतेस प्रोत्साहन देण्यासारखे आहे, परंतु तुम्ही अंतरंगामध्ये स्थिर आणि अविचल राहू शकलात तर मग, अनुभवांचा प्रवाह काहीशा स्थिरपणाने वाहू लागेल. अर्थात या वाटचालीमध्ये व्यत्यय आणि चढउतार येणारच नाहीत, असे नाही. परंतु या गोष्टी योग्य रितीने हाताळल्या गेल्या तर, या कालावधीमध्ये साधनाच झाली नाही, असे होत नाही. तर हाच कालावधी अडचणी संपुष्टात येऊन, आधी आलेले अनुभव पचवण्यासाठीचा कालावधी ठरू शकतो.

बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण हे नेहमीच अधिक महत्त्वाचे असते. साधकाला जर ते प्राप्त होऊ शकले आणि तो स्वतः ज्यामध्ये श्वास घेऊ शकेल व ज्यामध्ये जीवन जगू शकेल असे स्वतःचे आध्यात्मिक वातावरण साधक स्वत: तयार करू शकेल तर, ती परिस्थिती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 140)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे, हर्ष किंवा शोक यामुळे, किंवा सुख-दु:खामुळे विचलित न होणे, तसेच लोकं काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे विचलित न होणे, याला योगमार्गामध्ये समतेची अवस्था म्हणतात किंवा व्यक्तीमध्ये सर्व गोष्टींबाबत समभाव आहे, असे म्हटले जाते. या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचणे हे साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे मन तसेच प्राणामध्ये, अविचलता (quietude) आणि निश्चल-निरवता (silence) येण्यास मदत होते. याचा अर्थ असा की, आता खरोखरच प्राण व प्राणिक मन स्वयमेव अविचल आणि निश्चल-निरव होऊ लागले आहे. त्या पाठोपाठ बुद्धीदेखील अविचल आणि निश्चल-निरव होणार हे निश्चित.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

अविचलता (quietude) कायम ठेवा आणि ती काही काळासाठी रिक्त असली तरी काळजी करू नका. चेतना ही बरेचदा एखाद्या पात्रासारखी असते, त्यामधील मिश्रित आणि अनिष्ट गोष्टी काढून ते पात्र रिकामे करावे लागते; योग्य आणि विशुद्ध गोष्टींनी ते पात्र भरले जाईपर्यंत, काही काळासाठी ते पात्र तसेच रिकामे ठेवावे लागते. ते पात्र जुन्याच गढूळ गोष्टींमुळे पुन्हा भरले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

त्या दरम्यानच्या कालावधीत थोडे थांबा, वाट पाहा, ऊर्ध्व दिशेस स्वतःला खुले करा. शांती (peace) ही निश्चल-निरवतेमध्ये (silence) परिणत व्हावी म्हणून, अतिशय अविचलपणे आणि स्थिरपणे आवाहन करा, त्यामध्ये अस्वस्थ आतुरता असता कामा नये. आणि शांती निश्चल-निरवतेमध्ये परिणत झाली की मग, आनंद आणि ईश्वरी उपस्थितीसाठी आवाहन करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ६२

उत्स्फूर्त निश्चल-निरव (silent) स्थिती ही (साधनेच्या सुरुवातीच्या काळात) नेहमी एकदमच टिकून राहणे शक्य नसते, पण आंतरिक निश्चल-निरवता नित्य स्वरूपात टिकून राहीपर्यंत ही स्थिती वृद्धिंगत झाली पाहिजे. ही अशी निरवता असते की जी कोणत्याही बाह्य कृतीने विचलित होऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर, (कोणत्याही अनिष्ट वृत्तींनी किंवा शक्तींनी) गडबड-गोंधळ करण्याचा किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरीदेखील ती विचलित होऊ शकत नाही… सरतेशेवटी हीच स्थिती, सर्व आध्यात्मिक अनुभूतींचा आणि कृतींचा आधार म्हणून स्थिर करण्याची आवश्यकता असते. या निश्चल-निरवतेच्या पाठीमागे अंतरंगामध्ये काय चालू आहे हे व्यक्तीला ज्ञात झाले नाही तरी त्यामुळे फारसे काही बिघडत नाही.

कारण योगामध्ये दोन स्थिती असतात. एक स्थिती अशी असते की, जिच्यामध्ये सारे काही निश्चल-निरव असते आणि व्यक्ती बाह्यतः इतरांप्रमाणेच वावरताना दिसत असली, कृती करताना दिसत असली तरी, तिच्यामध्ये कोणताही विचार, भावना, गतीविधी नसते. आणि दुसऱ्या स्थितीमध्ये एक नवीनच चेतना (consciousness) सक्रिय झालेली असते. ती स्वतःसोबत ज्ञान, मोद, प्रेम आणि तत्सम इतर आध्यात्मिक भावना आणि आंतरिक कृती घेऊन येते, परंतु असे असून देखील, त्याचवेळी तेथे एक मूलभूत निश्चल-निरवता (silence) किंवा अविचलता (quietude) असते.

आंतरिक अस्तित्वाच्या विकसनासाठी या दोन्हींची आवश्यकता असते. परिपूर्ण निश्चल-निरवतेची म्हणजे तरलता, रिक्तता आणि मुक्ती यांची जी स्थिती असते, ती दुसऱ्या स्थितीची तयारी करून देत असते आणि जेव्हा दुसरी स्थिती येते तेव्हा निश्चल-निरवतेची स्थिती तिला आधार पुरवीत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 162-163)

मन किंवा प्राण हे जेव्हा विचारांमुळे आणि भावनांमुळे त्रस्त झालेले नसतात, अस्वस्थ नसतात किंवा ते विचार व भावनांमध्ये गुंतून पडलेले नसतात, तसेच जेव्हा त्यांच्यामध्ये विचार व भावनांचा कल्लोळ नसतो, तेव्हा तेथे ‘अविचलता’ (Quietness) असते. प्रामुख्याने मन जर अलिप्त असेल आणि विचार व भावनांकडे ते पृष्ठवर्तीय गतीविधी म्हणून पाहत असेल तर, ‘मन अविचल आहे’ असे आपण म्हणतो. तसेच प्राणाबाबतही म्हणता येते.

अस्वस्थतेचा तसेच अस्वस्थपणे केलेल्या हालचालींचा किंवा अशांततेचा अभाव असणे म्हणजेच स्थिरता (Calmness) नव्हे, तर स्थिरता ही त्याहूनही एक अधिक सकारात्मक अवस्था असते.

कोणतीही गोष्ट जिला अशांत करत नाही किंवा करू शकत नाही अशी महान आणि सघन प्रशांतता असल्याची सुस्पष्ट जाणीव जेव्हा मनाला किंवा प्राणाला असते; तेव्हा आपण म्हणतो की, तेथे ‘स्थिरता‌’ प्रस्थापित झालेली आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137-138)

अचंचलता किंवा अविचलता, स्थिरता, शांती आणि निश्चल-निरवता या प्रत्येक शब्दांना अर्थांच्या त्यांच्यात्यांच्या अशा खास छटा आहेत आणि त्यांची व्याख्या करणे तितकेसे सोपे नाही.

Quiet म्हणजे अचंचलता, अविचलता – ही अशी एक अवस्था असते की, जेथे कोणतीही अस्वस्थता किंवा चलबिचल नसते.

Calm म्हणजे स्थिरता – ही एक अक्षुब्ध, अचल अशी अवस्था असते की, जिच्यावर कोणत्याही क्षोभाचा परिणाम होऊ शकत नाही. अविचलतेच्या तुलनेत स्थिरता ही अधिक सकारात्मक अवस्था असते.

Peace म्हणजे शांती – ही त्याहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते; शांतीसोबतच एक सुस्थिर व सुसंवादी विश्रामाची आणि मुक्ततेची भावनासुद्धा येते.

Silence म्हणजे निश्चल-निरवता – (ही शांतीहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते.) ही अशी एक अवस्था असते की, जेथे प्राणाचे किंवा मनाचे कोणतेही तरंग उमटत नाहीत. किंवा तसे नसेल तर, मग तेथे एक प्रगाढ अविचलता असते आणि त्या अविचलतेला कोणतीही पृष्ठवर्ती हालचाल भेदू शकत नाही किंवा त्यात बदल घडवू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

तुम्हाला योगाभ्यासातून काय अपेक्षित आहे यासंबंधी तुम्हीच तुमच्या स्वतःच्या कल्पनांची एक उभारणी केली आहे आणि तुम्हाला जे अनुभव येऊ लागले आहेत त्याचे मूल्यमापन तुम्ही त्या आधारावरच नेहमी करत आहात आणि ते अनुभव तुमच्या अपेक्षेला धरून नसल्यामुळे किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या तोलामोलाचे ते नसल्याने, तुम्ही एका क्षणानंतर म्हणू लागता की, “ते अनुभव अगदीच किरकोळ स्वरूपाचे आहेत.” आणि या असमाधानामुळेच तुम्ही प्रत्येक पावलागणिक (नकारार्थी) प्रतिक्रिया किंवा अंगचोरपणाकडे (recoil) वळत आहात आणि त्यामुळे सातत्यपूर्ण प्रगतीला खीळ बसत आहे.

ज्या योग्यांना अनुभूती येत असते त्यांना हे माहीत असते की, भलेही सुरुवातीस आलेले अनुभव अगदी किरकोळ असतील पण त्याला खूप महत्त्व असते आणि म्हणून सुरुवातीच्या त्या छोट्या-छोट्या अनुभवांची जोपासना केली पाहिजे आणि त्यांच्या विकसनासाठी पुष्कळ धीर धरला पाहिजे.

उदाहरणार्थ, तटस्थ अविचलता (neutral quiet) ही साधकाच्या प्राणिक अधीरतेला असमाधानकारक वाटू शकते पण तीच अवचिलता ही, सर्व आकलनाच्या अतीत असणाऱ्या शांतीकडे नेणारे पहिले पाऊल असू शकते. आंतरिक आनंदाची एखादी बारीकशी झुळूक किंवा चित्तथरार हा आनंदसागरामधील पहिलावहिला तुषार असू शकतो. (मिटल्या डोळ्यांपुढे चालणारा) प्रकाशाचा किंवा रंगांचा खेळ ही अंतर्दृष्टी आणि आंतरिक अनुभूतींची दालनं खुली करणारी गुरुकिल्ली असू शकते. दिव्य शक्तीच्या अवतरणांमुळे, शरीराचे होणारे स्तंभन आणि त्यातून शरीराचे स्थिरपणाने एकाग्र होणे, म्हणजे ज्याच्या अखेरीस ईश्वराची उपस्थिती आहे, अशा कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा पहिला स्पर्श असू शकतो; हे त्या योग्यांना माहीत असते. तो योगी अधीर नसतो. तर सुरू झालेल्या प्रगतीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये याची तो काळजी घेत असतो.

निश्चितपणे, काही साधकांना साधनेच्या आरंभिक काळात निर्णायक आणि ठोस अनुभव आलेले असतात पण त्यानंतर दीर्घ परिश्रम करावेच लागतात आणि त्यामध्ये काही कालावधी अनुभवविरहित किंवा संघर्षाचे असतात.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 14-15)

जीवन जगण्याचे शास्त्र – २२

अविचलता (quietness) म्हणजे तामसिकता नव्हे. वास्तविक अविचल स्थितीमध्येच योग्य गोष्टी केल्या जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करणे आणि कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, कर्म करणे याला मी ‘अविचलता’ म्हणते.

*

अविचलतेमध्ये एक स्थिरशांत (calm) आणि एकाग्र एकवटलेली अशी ताकद असते, ती इतकी अविचल असते की, तिला कोणीही धक्का लावू शकत नाही. पूर्ण साक्षात्कारासाठीचा हा अनिवार्य पाया आहे.

*

तुम्ही जेव्हा अविचल असाल तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होईल की, दिव्य शक्ती, तिचे साहाय्य आणि तिचे संरक्षण हे सदोदित तुमच्या सोबत आहे.

*

तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे शांत, अविचल राहायचे आणि पूर्णतः केवळ ईश्वराभिमुख व्हायचे, मग बाकी सारे ‘त्या’च्या हाती असते.

*

अविचलता, शांती आणि निश्चल-नीरवतेच्या (silence) स्थितीमध्ये आध्यात्मिक शक्ती कार्य करते. व्यक्ती विरोधी शक्तींच्या अंमलाखाली आली की, क्षुब्ध होणे आणि उत्तेजित होणे अशा सर्व गोष्टी होतात.

*

तुम्ही अविचलतेचा शोध बाह्य परिस्थितीमध्ये घेता कामा नये, तर त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या अंतरंगापासून केली पाहिजे. तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर शांती असते आणि त्या शांतीमधूनच तुमच्या समग्र अस्तित्वामध्ये एक प्रकारची स्थिरता, अविचलता येते; ती अगदी तुमच्या शरीरापर्यंत जाऊन पोहोचते. अर्थात त्यासाठी तुम्ही तिला वाव दिला पाहिजे. तुम्ही ती शांती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे; म्हणजे मग तुम्हाला हवी असलेली अविचलता, स्थिरता तुम्हाला लाभेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 135, 135, 135, 111, 137, 138)

जीवन जगण्याचे शास्त्र – १७

तुमच्या साधनेच्या दृष्टीने कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे तुमच्या मनाला कसे काय कळू शकेल किंवा मन ते कसे ठरवू शकेल बरे? अशा प्रकारच्या विचारांमध्येच जर तुमचे मन गुंतून राहिले तर आणखीनच गोंधळ उडेल. साधनेमध्ये मन हे स्थिरशांत असले पाहिजे आणि ते ईश्वराविषयीच्या अभीप्सेवर दृढ असले पाहिजे. मन स्थिरशांत असताना, खरी अनुभूती आणि खरे परिवर्तन या गोष्टी अंतरंगातून आणि वरून घडून येतील.
*
व्यक्ती आत्म्यामध्ये धीर-स्थिर असावी यासाठी, मनाची अविचलता आणि बाह्यवर्ती प्रकृतीपासून आंतरिक पुरुषाची विलगता या गोष्टी अतिशय साहाय्यकारी, किंबहुना अत्यावश्यक असतात. जोपर्यंत व्यक्ती ही विचार-वावटळीच्या अधीन असते किंवा प्राणिक गतिविधींच्या गोंधळाच्या अधीन असते तोपर्यंत ती आत्म्यामध्ये धीर-स्थिर राहू शकत नाही. स्वतःला त्यापासून निर्लिप्त करणे, त्यापासून मागे होणे आणि आपण या वैचारिक किंवा प्राणिक वादळांपासून स्वतंत्र, निराळे आहोत असे व्यक्तीला जाणवणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 28), (CWSA 29 : 160)

साधना, योग आणि रूपांतरण – ५७

(कालच्या भागामध्ये आपण मन निश्चल-नीरव करण्याच्या विविध पद्धती समजावून घेतल्या. विचारांना अनुमती न देणे, विचारांकडे साक्षी पुरुषाप्रमाणे अलिप्तपणे पाहणे आणि मनात येणाऱ्या विचारांना ते आत प्रवेश करण्यापूर्वीच अडविणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करूनही, जर मन निश्चल-नीरव झाले नाही तर काय करावे, असा प्रश्न येथे साधकाने विचारला असावा असे दिसते. त्यास श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

यापैकी कोणतीच गोष्ट घडली नाही तर अशा वेळी (विचारांना) नकार देण्याची सातत्यपूर्ण सवय ही आवश्यक ठरते. येथे तुम्ही त्या विचारांशी दोन हात करता कामा नयेत किंवा त्यांच्याशी संघर्षही करता कामा नये. फक्त एक अविचल आत्म-विलगीकरण (self-separation) आणि विचारांना नकार देत राहणे आवश्यक असते. सुरुवातीला लगेच यश येते असे नाही, पण तुम्ही त्या विचारांना अनुमती देणे सातत्याने रोखून ठेवलेत, तर अखेरीस विचारांचे हे यंत्रवत गरगर फिरणे कमीकमी होत जाईल आणि नंतर ते बंद होईल. तेव्हा मग तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आंतरिक अविचलता (quietude) किंवा निश्चल-नीरवता (silence) प्राप्त होईल.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काही अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता, योगिक प्रक्रियांचे परिणाम हे त्वरित दिसून येत नाहीत आणि म्हणून, परिणाम दिसून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही या प्रक्रिया अगदी धीराने अवलंबल्या पाहिजेत. व्यक्तीची बाह्य प्रकृती (मन, प्राण आणि शरीर) खूप विरोध करत असेल तर, हे परिणाम दिसून येण्यास कधीकधी बराच कालावधी लागू शकतो.

जोपर्यंत तुम्हाला उच्चतर ‘आत्म्या’ची चेतना गवसलेली नाही किंवा तिचा अनुभवच जर तुम्हाला आलेला नाही, तर तुम्ही तुमचे मन त्या उच्चतर आत्म्यावर कसे काय स्थिर करू शकता? तुम्ही ‘आत्म्या’च्या संकल्पनेवरच लक्ष एकाग्र करू शकता किंवा मग तुम्ही ‘ईश्वरा’च्या किंवा ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू शकता किंवा त्यांच्या मूर्तीवर, चित्रावर किंवा भक्तीच्या भावनेवर लक्ष एकाग्र करू शकता; ‘ईश्वरा’ने किंवा ‘दिव्य माते’ने तुमच्या हृदयात प्रविष्ट व्हावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला तुम्ही आवाहन करू शकता किंवा तुमच्या शरीर, हृदय आणि मनामध्ये ‘दिव्य शक्ती’ने कार्य करावे म्हणून, तसेच तुमची चेतना मुक्त करून, तुम्हाला तिने आत्म-साक्षात्कार प्रदान करावा म्हणून, तुम्ही ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करू शकता.

तुम्ही जर ‘आत्म्या’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू इच्छित असाल तर ती संकल्पना मन आणि त्याचे विचार, प्राण आणि त्याची भावभावना, शरीर आणि त्याच्या कृती यांपासून काहीशी भिन्न असलीच पाहिजे; या सर्वापासून अलिप्त असली पाहिजे, ‘आत्मा’ म्हणजे एक ‘अस्तित्व’ किंवा ‘चेतना’ आहे अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजेत. म्हणजे आजवर मन, प्राण, शरीर यांच्या गतिविधींमध्ये मुक्तपणे समाविष्ट असूनही त्यांच्यापासून अलिप्त असणारा ‘आत्मा’ अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 303-304)