Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ३०२

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनाला (subconscient) प्रकाशाने भेदले पाहिजे आणि अवचेतन हे सत्याची आधारशिला तसेच योग्य संस्कारांचे आणि ‘सत्या’ला दिलेल्या योग्य शारीरिक प्रतिसादांचे भांडार झाले पाहिजे. नेमकेपणाने सांगायचे तर, असे झाल्यास ते अवचेतन म्हणून शिल्लकच राहणार नाही, तर अवचेतन हे उपयोगात आणता येईल अशा खऱ्या मूल्यांची एक प्रकारची पेढीच (bank) तयार झालेली असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 612)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०१

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

साधक : व्यक्ती ज्याप्रमाणे स्वतःचे सचेत (conscious) विचार नियंत्रित करू शकते त्याप्रमाणे ती स्वतःच्या अवचेतनावर (subconscient) नियंत्रण मिळविण्यास शिकू शकते का?

श्रीमाताजी : विशेषतः शरीर जेव्हा निद्रिस्त असते तेव्हा व्यक्ती अवचेतनाच्या संपर्कात येते. स्वतःच्या रात्रींविषयी सचेत झाल्यामुळे अवचेतनावर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे होते. पेशी जेव्हा त्यांच्यामधील ‘ईश्वरा’विषयी सचेत होतात आणि त्या स्वेच्छेने ‘त्याच्या’ प्रभावाप्रत खुल्या होतात तेव्हा हे नियंत्रण सर्वांगीण होऊ शकते. गेल्या वर्षी (१९६९) या पृथ्वीवर जी चेतना अवतरित झाली होती ती चेतना या गोष्टीसाठीच कार्य करत आहे. हळूहळू शरीराच्या अवचेतनाच्या यांत्रिकतेची जागा ‘ईश्वरी उपस्थिती’च्या चेतनेने घेतली जात आहे आणि ती चेतना आता शरीराच्या संपूर्ण क्रियाकलापांवर शासन करू लागली आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 365)

साधना, योग आणि रूपांतरण – २९८

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनामध्ये (subconscient) प्रवेश करणाऱ्या आणि परिवर्तन करणाऱ्या प्रकाशाचे काही पहिलेवहिले परिणाम पुढीलप्रमाणे असतात –

१) अवचेतनामध्ये काय दडलेले आहे ते आता अधिक सहजतेने अवचेतनाकडून दाखविले जाते.

२) अवचेतनामधून पृष्ठभागावर येणाऱ्या गोष्टींचा स्पर्श चेतनेला होण्यापूर्वी किंवा त्यांचा परिणाम चेतनेवर होण्यापूर्वीच त्या गोष्टींची मनाला जाणीव होते.

३) आता अवचेतन हे अज्ञानी व अंधकारमय गतिप्रवृत्तींचे आश्रयस्थान राहत नाही तर, आता उच्चतर चेतनेला जडभौतिकाकडून अधिक आपसूकपणे प्रतिसाद मिळू लागतो.

४) विरोधी शक्तींच्या सूचनांना अवचेतन आता अधिक उघडपणे सामोरे जाते आणि त्या सूचनांना वाव देण्याचे प्रमाणही कमी होते.

५) निद्रेमध्ये सचेत राहणे आता अधिक सहजसोपे होते आणि स्वप्नांमध्ये अधिक उच्च प्रकारचे अनुभव येऊ शकतात. विरोधी स्वप्नं पडली तर, म्हणजे उदाहरणार्थ, स्वप्नांमध्ये कामुक सूचना आल्या तर त्यांचा तिथेच सामना करता येतो आणि अशी स्वप्नं थांबविता येतात आणि स्वप्नदोषासारखा परिणामदेखील थांबविता येतो.

६) झोपण्यापूर्वी स्वप्नावस्थेवर एक जागृत संकल्प केंद्रित करणे अधिकाधिक परिणामकारक ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 612)

साधना, योग आणि रूपांतरण – २९७

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही जे वर्णन केले आहे त्यावरून तुमच्यामध्ये अवचेतन (subconscient) अनियंत्रितपणे उफाळून वर आले आहे आणि सहसा शारीर-मन (physical mind) ज्या गोष्टींनी व्याप्त असते त्या गोष्टींचे म्हणजे जुने विचार, जुन्या आवडीनिवडी किंवा इच्छावासना यांच्या यांत्रिक पुनरावृत्तीचे रूप अवचेतनाने धारण केले आहे, असे दिसते. हे जर का एवढेच असते तर त्या गोष्टींना नकार देणे, तुम्ही त्यापासून निर्लिप्त होणे आणि त्या गोष्टी जाऊ देणे आणि त्या शांत होतील असे पाहणे, एवढे करणे पुरेसे होते. परंतु तुम्ही जे लिहिले आहे त्यावरून मला असे समजले की, तो एक हल्ला आहे आणि तुमच्या मनावर व शरीरावर आक्रमण करून, त्यांना त्रास देण्यासाठी अंधकारमय शक्तीने या पुनरावृत्तीचा वापर केला आहे.

ते काहीही असो, एक गोष्ट करा आणि ती म्हणजे तुमच्या अभीप्सेच्या (aspiration) साहाय्याने, श्रीमाताजींचे स्मरण करून किंवा अन्य मार्गाने, स्वतःला श्रीमाताजींच्या शक्तीप्रत खुले करा आणि श्रीमाताजींच्या शक्तीला हा हल्ला परतवून लावून दे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 605)

साधना, योग आणि रूपांतरण – २९६

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतन (subconscient) हे शरीराला प्रभावीत करते कारण शरीरातील सर्व गोष्टींची घडण ही अवचेतनामधूनच झालेली असते आणि खुद्द त्या अवचेतनामधील सर्व गोष्टी अजून अर्ध-सचेतच (half conscious) असतात आणि (म्हणूनच) त्यातील बहुतांशी कार्य हे अवचेतन म्हणावे असेच असते. आणि म्हणूनच शरीरावर सचेत मन किंवा सचेत संकल्पाचा किंवा अगदी प्राणिक मन व प्राणिक इच्छेचा प्रभाव पडण्याऐवजी, त्यावर अधिक सहजतेने अवचेतनेचा प्रभाव पडतो. मात्र ज्या गोष्टींवर सचेत मनाचे व प्राणाचे नियंत्रण स्थापित झालेले असते आणि स्वयमेव अवचेतनेने ते स्वीकारलेले असते, त्यांचा येथे अपवाद करावा लागेल.

असे नसते तर, (अवचेतनाचा प्रभाव पडत नसता तर) मनुष्याचे स्वतःच्या कृतींवर आणि शारीर-स्थितींवर पूर्णपणे नियंत्रण राहिले असते आणि मग आजारपणाची शक्यताच उरली नसती किंवा जरी आजारपण आले असतेच तरी ते मनाच्या कृतीद्वारे त्वरित बरे करता आले असते. परंतु (सद्यस्थितीत) ते तसे नाही. आणि म्हणूनच उच्चतर चेतना खाली उतरवली पाहिजे, तिच्याद्वारे शरीरास व अवचेतनास प्रकाशित केले पाहिजे आणि शरीराने व अवचेतनाने उच्चतर चेतनेचे आधिपत्य मान्य करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 599)

साधना, योग आणि रूपांतरण – २९५

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

बहुधा जुन्या स्मृती या अवचेतनामधून (Subconscient) पृष्ठभागावर येतात. जेव्हा अशा स्मृती जाग्या होतात तेव्हा, त्यांचे विलयन (dissolve) करण्यासाठी व त्या काढून टाकण्यासाठीच पृष्ठभागावर आल्या आहेत हे ओळखून त्यांची (योग्य रीतीने) हाताळणी केली पाहिजे. (अवचेतनाच्या प्रभावामुळे व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहात असते. ही कर्माची यंत्रणा असते.) अवचेतनामधून आलेल्या स्मृतींचे सातत्याने विलयन केल्यामुळे, व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहणार नाही तर, व्यक्ती जिवाच्या भावी बंधमुक्त प्रवासासाठी मुक्त होईल. तुम्हाला जेव्हा यासंबंधी खरे ज्ञान होते, म्हणजे अमुक एक गोष्ट का घडली, त्याचे काय प्रयोजन होते, याचे जेव्हा तुम्हाला ज्ञान होते तेव्हा त्यासंबंधीच्या स्मृती सहजपणे निघून जातात, आणि हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 610)

साधना, योग आणि रूपांतरण – २९२

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये अश्लील दृष्य दिसत असत, तसेच त्याला साधनेमध्ये कामवासनेच्या विकाराचादेखील बराच अडथळा जाणवत असे. त्याच्या या समस्येवर श्रीअरविंदांनी पत्राद्वारे दिलेले उत्तर…)

अश्लील दृष्य वगैरेच्या बाबतीत सांगायचे तर, ज्यामध्ये अशा प्रकारच्या अनेकानेक विचित्र गोष्टी असतात अशा अवचेतन (subconscient) प्रांतामधूनच या गोष्टी तुमच्या पृष्ठभागावर येत असल्या पाहिजेत. किंवा मग तुमच्या कनिष्ठ प्राणिक चेतनेवर त्या चेतनेशी संबंधित असणाऱ्या वैश्विक प्रकृतीमधील प्रतलावरून अशा प्रकारच्या रचनांचा भडिमार होत असेल. या प्रतलावर घाणेरड्या, अश्लील व कुरुप गोष्टींमध्ये आणि सर्व प्रकारच्या विकृतीमध्ये मजा घेणाऱ्या शक्ती असतात. मात्र कारण कोणतेही असले तरी अशा वेळी साधकाने स्थिर, निर्लिप्त नकार हीच प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे.

*

एखादा साधक जेव्हा लैंगिक वासनात्मक कृतींचे शमन करू लागतो आणि सचेत मनामधून व प्राणामधून त्या कृतीस नकार देऊ लागतो तेव्हा त्या साधकाला कामवासना छळू लागतात. आणि ही एक अगदी सर्वसाधारणपणे आढळून येणारी गोष्ट आहे. (अशा परिस्थितीत) कामवासना ही जेथे मनाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसते अशा अवचेतनामध्ये आश्रय घेते आणि ती स्वप्न-रूपाने पृष्ठभागी येऊन, स्वप्नदोष (वीर्यपतन) घडवून आणते. जोपर्यंत अवचेतन स्वतः शुद्ध होत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडतच राहते.

ही गोष्ट घडू नये यासाठी झोपण्यापूर्वी काम-चक्रावर, जे नाभीच्या खाली असते (sex-centre) त्यावर प्रबळ इच्छाशक्तीचा वापर केल्याने किंवा शक्य झाल्यास, त्यावर सघन असा ‘शक्ती’प्रवाह केंद्रित केल्यामुळे कधीकधी उपयोग होऊ शकतो. यामध्ये लगेचच यश येईल असे नाही, परंतु प्रभावीपणे असे करत राहिल्यास, सुरुवातीला त्या गोष्टीच्या पुनरावृत्तीचे प्रमाण कमी होते आणि सरतेशेवटी ती शमते.

अतिमसालेदार, चमचमीत पदार्थांचे सेवन किंवा लघवी रोखून धरणे यासारख्या गोष्टी स्वप्नदोषांसारख्या गोष्टी घडण्यासाठी कारणीभूत ठरतात. अवचेतनाच्या या प्रेरणेमध्ये बरेचदा एक कालबद्धता असते. म्हणजे ही गोष्ट महिन्यातील एका विशिष्ट वेळी किंवा आठवड्याने, पंधरवड्याने, महिन्याने किंवा सहा महिन्याने एकदा अशा ठरावीक कालावधीनंतर घडताना दिसते.

– श्रीअरविंद (SABCL 24 : 1604)

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनामधील (subconscient) जडत्व दूर करण्यासाठी शरीराचे साहाय्य होऊ शकते याचे कारण असे की, अवचेतन हे शरीराच्या लगेच खाली असते. त्यामुळे प्रकाशित, प्रबुद्ध शरीर हे अवचेतनावर थेटपणे आणि संपूर्णपणे कार्य करू शकते आणि मन व प्राणदेखील करू शकणार नाहीत अशा रीतीने ते कार्य करू शकते. तसेच या थेट कार्यामुळे मन व प्राण मुक्त होण्यासदेखील साहाय्य होऊ शकते.
*
जेव्हा मन, प्राण व शरीर हे संपूर्णपणे दिव्य होतील आणि त्यांचे अतिमानसिकीकरण (supramentalised) घडून येईल तेव्हा ते ‘परिपूर्ण रूपांतरण’ असेल आणि त्या दिशेने घेऊन जाणारी प्रक्रिया हीच रूपांतरणाची खरी प्रक्रिया होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 598) (CWSA 28 : 297)

*

केवळ मन आणि प्राणानेच नव्हे तर, शरीराने सुद्धा त्याच्या सर्व पेशींसहित दिव्य रूपांतरणाची आस बाळगली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 15 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – २९०

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते.

जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा ज्याला ‘परिसरीय चेतना’ (environmental consciousness) असे म्हणता येईल, त्यामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेथून त्या काही काळपर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतात किंवा तेथून ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत, चेतनेवर दबाव टाकतात.

त्या (इच्छावासना) परिसरीय चेतनेमधून येत असतील तर त्या विचार-सूचनांचे किंवा आवेगांचे रूप घेतात किंवा मग त्यांचा अस्वस्थ करणारा एक अंधुकसा दबाव व्यक्तीला जाणवतो. त्या जर अवचेतनामध्ये गेल्या असतील तर तेथून त्या बरेचदा स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात, परंतु त्या जागृतावस्थेत सुद्धा पृष्ठभागावर येऊ शकतात.

जेव्हा शरीर नव-चेतनामय झालेले असते आणि त्याच वेळी त्याच्या ठायी ‘दिव्य शांती’ आणि ‘दिव्य शक्ती’ असते तेव्हा, व्यक्तीला बाह्यवर्ती दबावाची जाणीव होते परंतु त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होत नाही आणि मग (शारीर-मनावर किंवा शरीरावर तत्काळ दबाव न टाकता) तो दबाव सरतेशेवटी (व्यक्तीपासून) दूर निघून जातो किंवा मग तो हळूहळू किंवा त्वरेने नाहीसा होतो.

मी ज्याला ‘परिसरीय चेतना’ असे संबोधतो ती चेतना प्रत्येक मनुष्य, त्याच्या नकळत, स्वतःच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूस, सभोवार वागवत असतो आणि या परिसरीय चेतनेच्या माध्यमातून तो इतरांच्या आणि वैश्विक शक्तींच्या संपर्कात असतो. या चेतनेद्वारेच इतरांच्या भावना, विचार इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. याच चेतनेद्वारे वैश्विक शक्तींच्या लहरी म्हणजे इच्छावासना, लैंगिकता इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. आणि व्यक्तीच्या मन, प्राण व शरीराचा ताबा घेतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 601)

साधना, योग आणि रूपांतरण – २८९

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते म्हणजे खरंतर, तुमच्या (subconscient) अवचेतनामधून वर आलेल्या गतकालीन रचना होत्या किंवा त्यांचे ठसे होते. आपण जीवनामध्ये जे जे काही करतो, आपल्याला जे जाणवते किंवा ज्याचा आपण अनुभव घेतो, त्या सगळ्यांचा काही एक ठसा, एक प्रकारची मूलभूत स्मृती अवचेतनामध्ये जाऊन बसते आणि आपल्या सचेत अस्तित्वामधून त्या (जुन्या) भावना, वृत्तीप्रवृत्ती किंवा ते अनुभव पुसले गेले तरी त्यानंतरही दीर्घ काळपर्यंत ते स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात. अनुभव जेव्हा नुकतेच घडून गेलेले असतात किंवा मन वा प्राणामधून ते अगदी नुकतेच फेकले गेलेले असतात, त्यांच्यापेक्षाही या जुन्या गोष्टी आधिक्याने पृष्ठभागावर येतात.

आपण आपल्या जुन्या परिचितांविषयी किंवा नातेवाईकांविषयी विचार करणे थांबविल्यानंतरसुद्धा दीर्घ काळ त्यांच्याबद्दलची स्वप्नं ही अवचेतनामधून पृष्ठभागावर येत राहतात. त्याचप्रमाणे, सचेत प्राणाला जरी आता, लैंगिकतेचा किंवा रागाचा त्रास होत नसला तरीसुद्धा लैंगिकतेबद्दलची किंवा राग आणि भांडणतंट्यांची स्वप्नं पडू शकतात.

अवचेतन शुद्ध झाल्यानंतरच ती स्वप्नं पडायची थांबतात. परंतु तोपर्यंत म्हणजे व्यक्ती त्या जुन्या गतिप्रवृत्ती जागृतावस्थेमध्ये टिकून राहण्यास किंवा जागृतावस्थेमध्ये पुन्हापुन्हा घडण्यास संमती देत नसेल (त्या स्वप्नांचे स्वरूप काय हे व्यक्तीला समजत असेल आणि त्यामुळे तिच्यावर त्यांचा परिणाम होत नसेल तर) ती स्वप्नं तितकीशी महत्त्वाची ठरत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 606)