Tag Archive for: अमर्त्यता

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती चेतनेपासून मागे होऊन, अंतरंगात खोलवर शिरले पाहिजे. मग आत… आत… आत… खोलवर, खूप खोल, एका अतिशय खोल, अचल आणि शांत विवरामध्ये प्रवेश केला पाहिजे. तिथे गेल्यावर तुम्हाला अतिशय अचल व परिपूर्ण, माधुर्यपूर्ण असे आणि एक प्रकारच्या ऊबदार, स्थिरशांत तत्त्वामुळे समृद्ध झालेले असे काहीतरी आढळेल. तो अंतरात्मा असतो.

व्यक्ती जर तसाच प्रयत्न करत राहिली आणि सचेत राहिली तर, तिला एक प्रकारची परिपूर्णता अनुभवास येते आणि त्यामध्ये काहीतरी परिपूर्ण, अगाध खोली असल्याची तिला जाणीव होते. व्यक्तीला असे जाणवते की, तिने जर त्यामध्ये प्रवेश केला तर तिच्यासमोर अनेक रहस्यं प्रकट होतील. काहीतरी शाश्वत असावे आणि त्याचे अतिशय शांत, नितळ पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेले असावे तसे हे असते. येथे व्यक्तीला काळाच्या मर्यादेचे बंधन राहात नाही. व्यक्तीने जेव्हा अंतरात्म्याच्या गाभ्याला स्पर्श केलेला असतो तेव्हा, ‘आपण कायमच अस्तित्वात होतो आणि अनंत काळपर्यंत अस्तित्वात राहणार आहोत,’ अशी जाणीव व्यक्तीला होते. आणि हा संपर्क सचेत आणि पुरेसा परिपूर्ण असेल तर, तो तुम्हाला तुमच्या बाह्य रूपाकाराच्या बंधनांतून मुक्त करतो. तुमच्याकडे शरीर आहे म्हणूनच केवळ तुम्ही जिवंत आहात, असे आता तुम्हाला वाटेनासे होते.
(उत्तरार्ध उद्या…)

-श्रीमाताजी (CWM 09 : 310)

सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो आंतरात्मिक चेतनेचा (psychic consciousness) प्रकाश असतो. त्या प्रकाशाचा शोध घ्या, त्यावर लक्ष एकाग्र करा, तो तुमच्या अंतरंगातच असतो.

तुमच्या संकल्प दृढ असेल तर तो प्रकाश तुम्हाला निश्चितपणे गवसेल. ज्या क्षणी तुम्ही त्यामध्ये प्रवेश कराल, त्याच क्षणी तुमच्यामध्ये अमर्त्यतेची जाणीव जागृत होईल. तुम्ही कायमच जीवित होतात, तुम्ही कायम जीवित असणार आहात, हे तुम्हाला जाणवेल. तेव्हा मग तुम्ही शरीरापासून पूर्णपणे स्वतंत्र व्हाल. आत्ता तुम्ही ज्या शरीरामधून आविष्कृत झाला आहात ते शरीर म्हणजे, अनेकानेक क्षणभंगुर आकारांपैकी केवळ एक आकार आहे; आणि तुमचे जागृत अस्तित्व हे आता शरीरावर अवलंबून नाही; हे तुम्हाला जाणवू लागते. आता मृत्यू हा शेवट असत नाही तर, ते केवळ एक संक्रमण असते. मग सगळी भीती क्षणार्धात नाहीशी होते आणि तुम्ही जीवनामध्ये एखाद्या मुक्त मनुष्याप्रमाणे शांतपणे खात्रीपूर्वक मार्गक्रमण करू लागता.

– श्रीमाताजी (CWM 12 : 83-84)

 

पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण

मानव प्रथमतः जेव्हा निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा अतिमानवतेच्या (superhumanity) जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (Psychic Being) वाट करून देणे आवश्यक आहे ; मानवामध्ये दिव्यत्वाचे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

ईश्वराचे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते.

चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण होऊ शकते.

तेव्हा महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल नाहीतर नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 434)