Tag Archive for: अभीप्सा

विचार शलाका – १४

सूर्याच्या ओढीने शेकडो प्रकारची वळणे घेत घेत, फक्त सूर्यप्रकाश मिळावा म्हणून झगडणाऱ्या अगणित वृक्षवेली असलेले जंगल तुम्ही कधी पाहिले नाहीयेत का? भौतिकातील अभीप्सेची भावना, ती आस, ती स्पंदनं, सूर्यप्रकाशाबद्दल असलेली ओढ ती हीच होय. माणसांपेक्षा वनस्पतींच्या शारीर-अस्तित्वामध्ये ती अभीप्सा अधिक असते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे प्रकाशपूजाच असते. अर्थातच येथे ‘प्रकाश’ हे ‘ईश्वरा’चे भौतिक प्रतीक आहे आणि भौतिक परिस्थितीमध्ये, सूर्याद्वारे, ‘परम-चेतना’ दर्शविली जाते. वनस्पतींना दृष्टी नसूनसुद्धा, त्यांच्या स्वत:च्या अगदी सहजस्वाभाविक पद्धतीने ती भावना अगदी स्पष्टपणाने जाणवून जाते. तुम्हाला त्यांच्या भावनांविषयी सजग कसे व्हायचे हे जर माहीत असेल तर तुम्हाला कळेल की, त्यांची अभीप्सा किती उत्कट असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 132)

साधनेची मुळाक्षरे – १२

‘ईश्वरी’ प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. ईश्वर तुमच्या उर्ध्वदिशेस विद्यमान असतो आणि जर तुम्हाला त्याची जाणीव झाली तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरते; ‘आनंद’रूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते ‘दिव्य अस्तित्व’ अवतरते. व्यक्तीला जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत, तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, धावा, प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे आहेत आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी आहेत. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते वा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण डोक्यामध्ये वा डोक्याच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी दोन्ही गोष्टी करू शकते – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही उतावीळ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच वेळ लागतो; तुमची चेतना सज्ज होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)

साधनेची मुळाक्षरे – ०८

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च त्याच्या ‘शक्ति’द्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’ने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

‘योगा’मध्ये ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’देखील असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांच्यावर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच.

हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, त्याग आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिवृत्तींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांचा त्याग, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांचा त्याग, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात प्रकाश, शक्ती आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपल्याजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक स्पंदनाचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)

ईश्वरी कृपा – २६

‘ईश्वर’ आणि तुमच्यामध्ये तुम्ही इतर कोणाही व्यक्तिला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला का येऊ देता? तुम्ही जेव्हा पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. एखाद्या व्यक्तिला जर ‘ईश्वर’ त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीची मनोभूमिका संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवी. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असायला हवा आणि त्यामध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा हस्तक्षेप असता कामा नये.

‘ईश्वर’ कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, या संबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ‘ईश्वर’च केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ‘ईश्वरा’ला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘ईश्वर’ काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती ‘त्याला’ पाहते, ‘त्याला’ भेटते; त्याचा ‘प्रकाश’, त्याची ‘उपस्थिती’, त्याचे ‘प्रेम’, त्याचा ‘आनंद’ हाच काय तो तिच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 56)

ईश्वरी कृपा – २४

‘ईश्वरी कृपा’ सदोदित तुमच्यासोबत असते; शांत मनाने तुम्ही तुमच्या हृदयात लक्ष एकाग्र करा, म्हणजे मग तुम्हाला खात्रीपूर्वक, तुम्ही ज्याची आस बाळगून आहात ते साहाय्य आणि इतकेच नव्हे तर, मार्गदर्शनसुद्धा मिळेल.

*

‘ईश्वरी कृपा’ ही सदोदित असतेच, ती शाश्वतपणे अस्तित्वात असते, सक्रिय असते पण श्रीअरविंद म्हणतात की, ‘ईश्वरी कृपा’ स्वीकारण्यासाठी आपण ग्रहणशील स्थितिमध्ये असणे, तिला सांभाळून ठेवणे आणि आपल्याला जे काही प्रदान करण्यात आले आहे त्याचा उपयोग करणे, हे आपल्यालाच अवघड जाते… ‘ईश्वरी कृपा’ ग्रहण करण्यासाठी व्यक्तिपाशी नुसती उत्कट अभीप्सा असणेच पुरेसे नाही तर, तिच्याकडे प्रामाणिक विनम्रता आणि परिपूर्ण विश्वासदेखील असला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 87), (CWM 16 : 250)

ईश्वरी कृपा – २०

एखाद्या व्यक्तीने जेव्हा ‘ईश्वर’प्राप्तीच्या साधनेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याबाबतीत ती व्यक्ती प्रामाणिक असते; म्हणजे असे की, तिचा संकल्प तळमळीचा, प्रामाणिक असून, तो प्रांजळपणे प्रत्यक्षात उतरविला जातो, तेव्हा त्या व्यक्तीने कशाचेच भय बाळगण्याचे कारण नाही; कारण तिच्याबाबतीत जे सारे घडते किंवा जे घडणार आहे ते तिला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत सर्वात जवळच्या मार्गाने घेऊन जाईल.

हाच असतो ‘ईश्वरी कृपे’चा प्रतिसाद! जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी सहज, सुरळीत होणे म्हणजे ‘ईश्वरी कृपा’ असा लोकांचा समज असतो, पण हे खरे नाही.

‘ईश्वरी कृपा’ तुमच्या अभीप्सेची पूर्तता व्हावी यासाठी कार्य करते. आणि तुमच्या अभीप्सेची त्वरेने व वेगाने परिपूर्ती व्हावी म्हणून त्याला अनुरूप अशी प्रत्येक गोष्ट तिच्याकडून घडविली जाते. असे असल्यामुळे घाबरण्यासारखे काहीच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 180-181)

ईश्वरी कृपा – १७

प्रश्न : तुम्ही असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो”, पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते…

श्रीमाताजी : हो अगदी पूर्णपणे, ‘ईश्वरी कृपा’ कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते जसे वितळून जाईल, तसे होते.

…तुमच्याकडे जर पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना असेल, तर तुम्ही तुमच्यामध्ये असे काहीतरी खाली उतरवू शकता की, ज्यामुळे प्रत्येक गोष्टच, अगदी प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. खरोखर, प्रत्येक गोष्ट बदलून जाते. एक अगदी मर्यादित असे छोटेसे उदाहरण देता येईल की, ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजून येतील. दगड अगदी यांत्रिकपणे खाली पडतो; समजा एखादी फरशी सैल झालेली आहे तर ती खाली पडेल, हो ना? पण जर समजा, प्राणिक वा मानसिक निर्धार असणारी एखादी व्यक्ती तिथून जात असेल; आणि तिला असे वाटले की, ती फरशी खाली पडू नये, आणि त्या व्यक्तिने जर हात पसरले तर ती फरशी त्या व्यक्तिच्या हातावर पडेल; पण ती खाली जमिनीवर पडणार नाही. तेव्हा, त्या दगडाची वा फरशीची नियती त्या व्यक्तिने बदललेली असते. येथे वेगळ्या प्रकारच्या नियतिवादाचा प्रवेश झालेला आहे. तो दगड आता कोणाच्यातरी डोक्यात पडण्याऐवजी, तो त्या व्यक्तिच्या हातावर पडतो आणि त्यामुळे कोणी दगावत नाही. येथे कमीअधिक अचेतन अशा यंत्रणेमध्ये एका वेगळ्या प्रतलावरील सचेतन इच्छाशक्तिचा हस्तक्षेप घडून आलेला असतो.

…मी आत्ता म्हणाले त्याप्रमाणे, पुरेशी प्रामाणिक अभीप्सा किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना हा तो उपाय होय. मी “किंवा’’ असे म्हटले आहे, परंतु मला “किंवा” असे अभिप्रेत नाही. …दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. कर्मामध्ये बदल घडवून आणण्यासाठी फार मोठी विनम्रता आणि प्रचंड इच्छाशक्ती हवी.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 90-91)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३०

…येथे धैर्याचा अर्थ ‘परम साहसाविषयीची आवड असणे’ असा आहे. आणि परम साहसाची ही आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान साहसासाठी आणि त्याहूनही अधिक महान अशा ‘ईश्वरी साक्षात्काराच्या साहसा’साठी तुम्हाला झोकून देण्यास प्रवृत्त करते.

‘पुढे काय होईल?’ याविषयी एक क्षणभरही शंका उपस्थित न करता, मागे वळून न पाहता या साहसामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता.

…धैर्य आणि अभीप्सा या गोष्टी हातात हात घालून नांदतात. खरीखुरी अभीप्सा ही धैर्ययुक्त असते.

– श्रीमाताजी

(CWM 08 : 40-41)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २९

(अभीप्सा, नकार आणि समर्पण या त्रयीला पूर्णयोगामध्ये योगसूत्राचे स्थान आहे.)

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

योगामध्येदेखील ईश्वर हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने ‘आधारा’वर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत साधकाच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिविधींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांना नकार, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, दुर्बोधता, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांना नकार, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपणाजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक वृत्तींचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०४

येथे योगाचा जो मार्ग आचरला जातो त्या मार्गाचे (पूर्णयोगाचे) इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानी विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हे केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे, इहलोकामध्ये ईश्वराचे आविष्करण घडविणे आणि या जडभौतिकामध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे या योगमार्गाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना बहुतेकांना तर तो अशक्यच भासतो. सर्वसामान्य अज्ञ विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या योगमार्गाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती या मार्गाला नाकारतात आणि त्या शक्ती या योगमार्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरले आहेत. जर तुम्ही हे ध्येय अगदी पूर्ण अंतःकरणाने स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच केवळ तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभवाच्या द्वारे सापडण्याची काही आशा असते.

या योगाची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबद्ध अशा मानसिक शिक्षणाने किंवा ध्यानधारणेच्या नेमून दिलेल्या प्रकारांच्या द्वारे, कोणत्याही मंत्रांनी किंवा तत्सम गोष्टींनी, प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या दिव्य प्रभावाप्रत स्वतःला खुले केल्याने, आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या दिव्य शक्तीप्रत आणि तिच्या कार्याप्रत स्वतःला खुले केल्याने, हृदयामध्ये असणाऱ्या दिव्य अस्तित्वाला खुले होत, आणि या साऱ्यांना ज्या ज्या गोष्टी परक्या असतील त्या साऱ्या गोष्टींना नकार दिल्याने ही साधना प्रगत होते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांच्या द्वारेच हे आत्मउन्मीलन (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19-20)