Tag Archive for: अप्रामाणिकपणा

 

(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे. त्याने तसे श्रीअरविंदांना कळविले आहे. त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

अपूर्णता असल्या आणि अगदी कितीही अपूर्णता असल्या किंवा त्या कितीही गंभीर स्वरूपाच्या असल्या तरीही, योगमार्गातील प्रगतीसाठी अपूर्णता या कधीही कायमचा अडथळा ठरू शकत नाहीत. एकच अडथळा हा कायमस्वरूपी अडथळा ठरू शकतो आणि तो म्हणजे अप्रामाणिकपणा. अर्थात हा अडथळासुद्धा कायम राहण्याची गरज नाही कारण त्यामध्येसुद्धा परिवर्तन करता येते. अपूर्णता हा जर योगमार्गातील अडथळा असता तर कोणताही मनुष्य योगमार्गामध्ये यशस्वी होऊ शकला नसता; कारण प्रत्येक जणच अपूर्ण असतो…

योगसाधनेमध्ये एकच गोष्ट अंतिमतः महत्त्वाची असते आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. आणि त्याबरोबर आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे मार्गावर टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारा धीर. अर्थात बरेच जण धीर नसतानासुद्धा ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. कारण, साधकामध्ये बंडखोरीची भावना असली किंवा अधीरता, नैराश्य, विषाद, थकवा या गोष्टी असल्या किंवा काही काळासाठी त्याची श्रद्धा गमावल्यासारखी झाली तरी किंवा, साधकाच्या मनावर त्या गोष्टींचे मळभ आणि धुके आलेले असतानादेखील, साधकाच्या बाह्यवर्ती ‘स्व‌’पेक्षा अधिक सामर्थ्यशाली असणारी शक्ती, आत्मशक्ती किंवा जिवाला ईश्वरप्राप्तीची जी निकड वाटते ती प्रेरणा या गोष्टी ते मळभ बाजूला सारून, त्याला त्याच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातात.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 661)

 

साधक : मला अगदी प्रामाणिकपणे असे वाटते की, मला दुसरेतिसरे काही नकोय, फक्त ईश्वरच हवा आहे. पण मी जेव्हा इतरांच्या संपर्कात येतो किंवा साध्या किरकोळ गोष्टी करण्यामध्ये मी गुंतलेला असतो, तेव्हा साहजिकच मला माझ्या ध्येयाची म्हणजे ईश्वराची आठवण राहत नाही. हा ‘अप्रामाणिकपणा‌’ आहे का?

श्रीमाताजी : होय. हा अप्रामाणिकपणा आहे. ज्यावेळी व्यक्तीच्या एका घटकाला ईश्वर हवा असतो आणि दुसऱ्या घटकाला मात्र निराळेच काहीतरी हवे असते त्यावेळी तो त्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणाच असतो. अज्ञान आणि मूढता यांमुळे व्यक्ती अप्रामाणिक बनते. परंतु इच्छाशक्ती दृढ असेल आणि ईश्वरी कृपेवर संपूर्ण विश्वास असेल तर, हा अप्रामाणिकपणा नाहीसा करता येतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 68)

 

तुम्ही जर अप्रामाणिक असाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य आणि मिथ्यत्व यातील फरकच कळेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांना तो सत्य मानतो. दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य स्वतःची अभीप्सा गमावून बसतो, तो साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. ज्ञान, संवेदना आणि साक्षात्‌‍ अनुभूतीच्या सर्व क्षमता तो गमावून बसतो. ही त्याला मिळालेली शिक्षा असते. तो स्वत:मध्ये आणि ईश्वरामध्ये आवरणे निर्माण करतो, अडथळे निर्माण करतो आणि अशा प्रकारे तो स्वतःच स्वत:ला शिक्षा करून घेतो. ईश्वर त्याच्यापासून दूर जात नाही तर, तो मनुष्य ईश्वराचे स्वागत करण्यास स्वत:ला अक्षम बनवितो. म्हणजे, ईश्वर हा काही कोणाला बक्षिसाचे वितरण करत बसत नाही किंवा शिक्षाही देत नाही; शिक्षा, बक्षिस हे असे मुळातच काही नसते.

जी व्यक्ती अप्रामाणिक असते, जी दुरिच्छा बाळगत असते, जी विश्वासघातकी असते ती व्यक्ती स्वत:हून स्वत:वर शिक्षा ओढवून घेत असते. अप्रामाणिक माणसांकडे जी थोडीफार चेतना शिल्लक असते आणि जिच्यामुळे त्यांना ते दुष्ट आहेत, हे कळू शकले असते, ती चेतनादेखील ते गमावून बसतात. इतके की जणू काही ते अचेतन असल्यासारखेच होऊन जातात. शेवटी त्यांना (सत्य-मिथ्या, खरे-खोटे इ.) काहीच समजेनासे होते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 21-22)

 

व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

*

आंतरिक संघर्ष ही प्रामाणिकपणाच्या अभावाची खूण असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 68, 69)

 

(एका विभागामध्ये काम करणाऱ्या ‘क्ष’ व्यक्तीबाबत तेथील व्यवस्थापकांनी श्रीमाताजींकडे तक्रार केली आहे आणि त्या व्यक्तीच्या कामचुकारपणाबाबत व अप्रामाणिकपणाबाबत त्याला काही समजावून सांगावे अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…)

अप्रामाणिकपणा हा एक असाध्य दोष आहे असे दिसते आणि त्या दोषामुळे व्यक्तीमधील ईश्वरी कृपेचे कार्यसुद्धा नामशेष झाल्यासारखे होते. या अप्रामाणिकपणामुळेच कालीमातेला या जगामध्ये तिच्या रौद्ररूपाद्वारे हस्तक्षेप करणे भाग पडते.

मी ‘क्ष’सारख्या अप्रामाणिक माणसाला काहीही सूचना करणार नाही कारण तो त्याला ढोंगीपणाने प्रतिसाद देईल आणि तो आत्ता ज्या अंधकारामध्ये बुडालेला आहे, तो अंधकार त्याच्या ढोंगीपणामुळे अधिकच वाढेल.

– श्रीमाताजी (CWM 17 : 343)

नैराश्यापासून सुटका – १६

 

प्राणाच्या असमाधानावर एकच उपाय असतो. प्राण म्हणजेच तुम्ही आहात, असे समजायचे नाही; हाच तो उपाय. जडत्वाबद्दलच्या विचारांमध्ये व्यग्र राहायचे नाही, तर ऊर्ध्वमुख व्हायचे तसेच ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शक्ती‌’ने प्राणामध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांना आवाहन करायचे; हा जडत्वावरील उपाय आहे.

*

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याची विकृत अढी असे करतो. प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध ओरडत राहतो आणि ईश्वर, जीवन व इतर सारेजण ‘मला छळत आहेत’ असा आरोप तो करत राहतो. पण बहुतेक वेळा दुःख-संकटे येतात आणि ती टिकून राहतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या भागापासून तुम्ही स्वत:ची पूर्णपणे सुटका करून घेतलीच पाहिजे.

*

प्राण जर अविचल राहिला आणि त्याने मनाला गोष्टींकडे योग्य रितीने पाहू दिले तर ही निराशा येणारच नाही, हे स्वाभाविक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139-140, 178, 186-187)

ईश्वरी कृपा – १३

अज्ञानमूलक चुकांची दुरुस्ती करणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो, पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा लावलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा… असे करणे म्हणजे, अंधाराला हेतुत: परत बोलावण्यासारखेच आहे.

…ज्यांनी स्वतःला सुधारण्याचा निश्चय केलेला असतो त्यांना साहाय्य करण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ नेहमीच उपस्थित असते आणि त्यामुळे, “स्वतःला सुधारण्यासाठी आम्ही खूप कमकुवत आहोत,’ असे ते म्हणू शकत नाहीत. ते फार फार तर असे म्हणू शकतात की, त्यांनी स्वतःला सुधारण्याचा संकल्पच अजून केलेला नाही, म्हणजे त्यांच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी असे काहीतरी असते की, ज्याने तो संकल्प केलेला नसतो, आणि हे मात्र अधिक गंभीर असते.

कमकुवत असल्याचा युक्तिवाद हे एक निमित्त असते. ज्यांनी संकल्प केलेला असतो त्यांना परमोच्च सामर्थ्य देण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ असतेच.

याचा अर्थ असा की, कमकुवतपणाचा युक्तिवाद हा युक्तिवाद नसतो तर तो अप्रामाणिकपणा असतो. आणि अप्रामाणिकपणा म्हणजे शत्रुसाठी नेहमीच मुक्तद्वार असते; म्हणजे तेथे विपरित गोष्टींबाबतची एक सुप्त सहानुभूती असते आणि ती गोष्ट अधिक गंभीर असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306-307)