Tag Archive for: अन्नग्रहण

शरीर आरोग्यपूर्ण ठेवण्यसाठी आणि सामर्थ्य संपादन करण्यासाठी आपण अन्नग्रहण करतो; आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही, हे व्यक्तीला अगदी लहानपणापासूनच माहीत असले पाहिजे. लहान मुलांना त्यांच्या प्रकृतीस मानवेल असे अन्न दिले पाहिजे. अन्न आरोग्यदायी असेल याची खात्री केली पाहिजे आणि स्वच्छतेची खबरदारी घेऊन ते तयार केलेले असावे. तसेच ते रुचकर असूनही अतिशय साधे, सात्त्विक असले पाहिजे. मुलांचे वय आणि त्यांच्या रोजच्या कृती पाहून, त्यानुसार आणि त्या प्रमाणात आहाराची निवड केली पाहिजे. मुलांच्या शरीराच्या प्रत्येक घटकाच्या संतुलित वाढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पोषक द्रव्यांचा समावेश त्यांच्या आहारात केला पाहिजे.

मुलं निरोगी राहण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा पुरविण्यासाठी साहाय्य व्हावे यासाठी आहार द्यायचा असल्यामुळे, आहाराबाबत त्यांच्यावर सक्ती करता कामा नये किंवा त्या अन्नाचा उपयोग शिक्षा म्हणूनही कधी करता कामा नये. “तू नीट वागला नाहीस त्यामुळे तुला आता मी हा खाऊ देणार नाही,” असे मुलांना कधीही म्हणू नये. ही पालकांची सवय अतिशय घातक असते. असे जर तुम्ही त्याला सांगितलेत तर, शरीर योग्य रितीने कार्यरत राहावे म्हणून अन्न आवश्यक नसून, ते मुख्यत: त्याचे लाड पुरविण्यासाठी त्याला दिले जाते, अशी त्याची समजूत होण्याची शक्यता असते आणि त्याच्या चेतनेमध्ये तीच धारणा पक्की होण्याची शक्यता असते.

• श्रीमाताजी (CWM 12 : 14)

ऑरोविलमधील अन्नाविषयीची संकल्पना स्पष्ट करताना श्रीमाताजी म्हणतात : काही गोष्टी खरोखरच रोचक असतात; सर्वप्रथम, उदाहरणादाखल, मला असे वाटते की, ऑरोविलमध्ये प्रत्येक देशाचा त्याचा त्याचा एक मंडप असेल, आणि त्या मंडपात त्या त्या देशाचे खाद्यपदार्थ असतील – जसे की, जपानी लोकांना वाटले तर ते त्यांच्या मंडपात जपानी पद्धतीचे खाणे खाऊ शकतील. तसेच तेथे भविष्यकालीन अन्नाविषयी संशोधन करण्याचाही काही प्रयत्न केला जाईल.

पचनाची संपूर्ण प्रक्रियाच तुमच्यामध्ये एक प्रकारचे जडत्व आणते – त्यामध्ये व्यक्तीचा खूप वेळ व अधिक शक्ती खर्ची पडते – तुम्हाला असे काही द्यावयास हवे की जे त्वरित पचेल, पचायला हलके असेल. ज्याप्रमाणे सध्या काही गोष्टी तयार केल्या जात आहेत. उदाहरणार्थ, विविध पदार्थांमध्ये कमी अधिक प्रमाणांत पोषक द्रव्ये आढळतात, आणि ती थोडीशी पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी खूप जास्त प्रमाणांत अन्नाचे सेवन करावे लागते. पण आता रसायनशास्त्र खूप प्रगत झाले असल्याने तीच गोष्ट साध्यासोप्या रीतीने बनू शकते. ते आता जीवनसत्वांच्या (Vitamins) आणि प्रथिनांच्या (Proteins) गोळ्या तयार करत आहेत की ज्या थेटपणे पचू शकतात. खरंतर हे आधीच घडावयास हवे होते.

पण लोकांना हे आवडत नाही कारण त्यांना खाण्यामध्येच जास्त आनंद मिळतो. परंतु जेव्हा तुम्ही खाण्यात आनंद घेईनासे होता, तेव्हाही तुम्हाला पोषकद्रव्यांची गरज असतेच व तुम्हाला वेळही दवडायचा नसतो. खाण्यात, पचविण्यात आणि अशा इतरही अनेक गोष्टीत प्रचंड वेळ खर्च होतो. म्हणून ऑरोविलमध्ये मला एक प्रायोगिक स्वयंपाकघर हवे आहे, संशोधन करण्यासाठी एक प्रकारची पाकशास्त्राची प्रयोगशाळा !

– श्रीमाताजी
(CWM 13 : 263)