Tag Archive for: अनुभव

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते, असे श्रीअरविंदांनी येथे म्हटले आहे. त्या साधकाला उद्देशून पत्रामध्ये काय मजकूर लिहावा ते श्रीअरविंद साहाय्यकाला सांगत आहेत.)

तुम्ही ‘क्ष’ ला असे सांगू शकता की, योगसाधनेमध्ये मुख्यत्वे करून दोन पायऱ्या असतात. एक असते पूर्वतयारीची पायरी आणि दुसरी पायरी म्हणजे प्रत्यक्ष तीव्र, उत्कट साधना. त्याने पहिल्या पायरीपासून सुरुवात करण्यास हरकत नाही असे त्याला कळवावे.

पहिल्या पायरीवर असताना, हृदयामध्ये प्रार्थनेसह अभीप्सा, भक्ती, ध्यान, जीवन ईश्वरार्पण करण्याचा संकल्प या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रकृतीचे शुद्धीकरण हे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. आध्यात्मिक अनुभव यावेत यासाठी अति-आतुरता, उतावीळपणा असता कामा नये. मात्र जे अनुभव येतील त्यांचे निरीक्षण केले पाहिजे. योग्य दृष्टिकोनासाठी आणि खऱ्या उन्नतीसाठी जर ते अनुभव उपयोगी पडणारे असतील तर त्यांचा स्वीकार केला पाहिजे. पण ज्यामुळे अहंकार कुरवाळला जाईल किंवा पोसला जाईला अशा सर्व गोष्टींना (जाणीवपूर्वक) नकार दिला पाहिजे.

प्रगती संथगतीने होत असली किंवा मार्गामध्ये अनेक अडचणी आल्या तरीसुद्धा (साधकामध्ये) अधीरता असता कामा नये. त्याने सर्व गोष्टी ‘दिव्य मातेवर’ पूर्ण भरवसा ठेवून आणि स्थिरचित्ताने व धीराने केल्या पाहिजेत. हा कालावधी साधकाच्या क्षमतेची आणि ईश्वराप्रति असलेल्या त्याच्या अभीप्सेच्या प्रामाणिकपणाची कसोटी घेणारा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 551)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला झाला आहे आणि त्यामुळे त्याच्यातील शक्ती खर्च होत आहे. व्यक्तीने फक्त ईश्वरी शक्तीप्रत अक्रिय (passive) राहिले पाहिजे. (म्हणजे व्यक्तीने ईश्वरी शक्तीच्या तिच्यामध्ये चालू असलेल्या कार्यास कोणताही विरोध करता कामा नये.) परंतु हे करत असताना, आपण (नकळतपणाने बऱ्यावाईट अशा) सर्वच शक्तींच्या दयेवर तर विसंबून राहत नाही ना, याबाबतही तिने दक्ष राहिले पाहिजे.

दुसऱ्या व्यक्तीमध्ये ईश्वर पाहण्याचा प्रयत्न करत असताना जेव्हा ‘क्ष’ अक्रिय होतो तेव्हा, त्या व्यक्तीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या कोणत्यातरी अन्य (निम्न) शक्तीच्या तो अधीन झाला असण्याची आणि परिणामतः त्याची स्वतःची शक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये खर्ची पडली असण्याची शक्यता आहे. ‘क्ष’ ने असा प्रयत्न करू नये हे अधिक बरे! त्याने वरून येणाऱ्या दिव्य शांतीसाठी व दिव्य सामर्थ्यासाठी तसेच संपूर्ण विशुद्धतेसाठी आस बाळगावी आणि स्वतःला केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले करावे. मग, कोणत्यातरी अमुक एखाद्या व्यक्तीमध्येच नव्हे तर, सर्वत्रच ईश्वराची जाणीव होत आहे, अशा प्रकारचे अनुभव त्याला आपोआप येऊ लागतील.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 492-493)

व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण प्रामाणिक नसतात. ते (मनाने) अद्भुत अनुभव रचतात आणि त्यांना तसे अनुभव खरोखरच आले आहेत, अशी कल्पना ते करू लागतात. परंतु जी माणसं प्रामाणिक असतात, ज्यांना खरेखुरे अनुभव आलेले असतात (त्यांच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) तर जेव्हा त्यांना ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्षानुभूती येते, तेव्हा ‘तो अनुभव खरा नाही,’ असे सर्व जगाने जरी त्यांना सांगितले तरी, त्यामुळे ते यत्किंचितही विचलित होत नाहीत.

– श्रीमाताजी (CWM 04 : 135)

 

साधना करत असताना सुरुवातीला एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे, शक्य तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे. दररोज काही वेळ हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करावे. शक्य तितका, त्या ‘दिव्य माता’ आहेत या भूमिकेतून त्यांचा विचार करावा. त्या तुमच्या अंतरंगामध्येच आहेत ही जाणीव तुम्हाला व्हावी अशी अभीप्सा बाळगावी, तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करावे आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे व तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्यापाशी प्रार्थना करावी. हा प्राथमिक टप्पा आहे पण बहुतेक वेळा हा टप्पा ओलांडण्यासाठीच बराच वेळ लागतो.

परंतु एखाद्या व्यक्तीने जर प्रामाणिकपणे आणि चिकाटीने हा टप्पा ओलांडला तर मग हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, ज्यामुळे साधकाला अंतरंगामधून श्रीमाताजींच्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. प्रकृतीमधील आणि जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला अन्य काही आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात आणि त्यामधून साक्षात्काराच्या दिशेने द्वारं खुली होऊ लागतात.

*

तुम्ही तुमचे कर्म ईश्वराच्या चरणी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर ध्यानामधून जेवढे तुमचे कल्याण होईल तेवढेच कर्मामधूनही होऊ शकेल.

– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 186), (CWM 16 : 178)

तुम्हाला योगाभ्यासातून काय अपेक्षित आहे यासंबंधी तुम्हीच तुमच्या स्वतःच्या कल्पनांची एक उभारणी केली आहे आणि तुम्हाला जे अनुभव येऊ लागले आहेत त्याचे मूल्यमापन तुम्ही त्या आधारावरच नेहमी करत आहात आणि ते अनुभव तुमच्या अपेक्षेला धरून नसल्यामुळे किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या तोलामोलाचे ते नसल्याने, तुम्ही एका क्षणानंतर म्हणू लागता की, “ते अनुभव अगदीच किरकोळ स्वरूपाचे आहेत.” आणि या असमाधानामुळेच तुम्ही प्रत्येक पावलागणिक (नकारार्थी) प्रतिक्रिया किंवा अंगचोरपणाकडे (recoil) वळत आहात आणि त्यामुळे सातत्यपूर्ण प्रगतीला खीळ बसत आहे.

ज्या योग्यांना अनुभूती येत असते त्यांना हे माहीत असते की, भलेही सुरुवातीस आलेले अनुभव अगदी किरकोळ असतील पण त्याला खूप महत्त्व असते आणि म्हणून सुरुवातीच्या त्या छोट्या-छोट्या अनुभवांची जोपासना केली पाहिजे आणि त्यांच्या विकसनासाठी पुष्कळ धीर धरला पाहिजे.

उदाहरणार्थ, तटस्थ अविचलता (neutral quiet) ही साधकाच्या प्राणिक अधीरतेला असमाधानकारक वाटू शकते पण तीच अवचिलता ही, सर्व आकलनाच्या अतीत असणाऱ्या शांतीकडे नेणारे पहिले पाऊल असू शकते. आंतरिक आनंदाची एखादी बारीकशी झुळूक किंवा चित्तथरार हा आनंदसागरामधील पहिलावहिला तुषार असू शकतो. (मिटल्या डोळ्यांपुढे चालणारा) प्रकाशाचा किंवा रंगांचा खेळ ही अंतर्दृष्टी आणि आंतरिक अनुभूतींची दालनं खुली करणारी गुरुकिल्ली असू शकते. दिव्य शक्तीच्या अवतरणांमुळे, शरीराचे होणारे स्तंभन आणि त्यातून शरीराचे स्थिरपणाने एकाग्र होणे, म्हणजे ज्याच्या अखेरीस ईश्वराची उपस्थिती आहे, अशा कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा पहिला स्पर्श असू शकतो; हे त्या योग्यांना माहीत असते. तो योगी अधीर नसतो. तर सुरू झालेल्या प्रगतीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये याची तो काळजी घेत असतो.

निश्चितपणे, काही साधकांना साधनेच्या आरंभिक काळात निर्णायक आणि ठोस अनुभव आलेले असतात पण त्यानंतर दीर्घ परिश्रम करावेच लागतात आणि त्यामध्ये काही कालावधी अनुभवविरहित किंवा संघर्षाचे असतात.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 14-15)

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ (concrete realisation) म्हणतात.

अशा प्रकारे सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच असा साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे, तसेच युगा-युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात देखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनायुक्त परिश्रम करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे पुढे अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसंच खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकूर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०४

(सहजस्फूर्त असणे म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, यासंबंधीचा विचार कालच्या भागात आपण केला. मनोकल्पित रचनांच्या पलीकडे जात, अंत:प्रेरणेवर विसंबून कार्य कसे करायचे याचाही निर्देश त्यामध्ये देण्यात आला होता. आता योगसाधनेमधील त्याची आवश्यकता व त्यामधील धोके श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही योगसाधना करू इच्छित असाल आणि तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात तर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनोरचनांच्या हातचे बाहुले बनता कामा नये, ही गोष्ट अतिशय आवश्यक असते. तुम्हाला जर तुमच्या अनुभवांवर विश्वास ठेवायचा असेल तर, जे अनुभव यावेत असे तुम्हाला वाटते किंवा त्याविषयी तुमची जी कल्पना असते, जे रूप पाहण्याची तुम्हाला इच्छा किंवा अपेक्षा असते, तशा मनोमय रचना तुमच्या मनामध्ये निर्माण न करण्याची अतिशय काटेकोर काळजी तुम्ही घेतली पाहिजे.

कारण मनोमय रचना या बऱ्याचदा एक प्रकारच्या वास्तव रचना (real formation) असतात, ती एक खरी निर्मिती असते. आणि तुम्ही तुमच्या कल्पनेच्या साहाय्याने अशी रूपं तयार करता की, जी काही ठरावीक प्रमाणात तुमच्यापासून स्व-तंत्र असतात आणि ती रूपं जणू बाहेरून आल्यासारखी तुमच्यापाशी परत येतात आणि ती रूपं तुम्हाला ‘अनुभव आल्याचा’ भास निर्माण करतात. परंतु हे ईप्सित असलेले अनुभव किंवा ज्याच्या मागे तुम्ही धावत असता ते किंवा तुम्हाला अपेक्षित असणारे अनुभव सहजस्फूर्त नसतात आणि ते आभासी असल्याने त्यामध्ये जोखीम असते. कधीकधी तर ते अतिशय धोकादायक असे भ्रम असतात.

म्हणून जेव्हा तुम्ही मानसिक साधनेचे (mental discipline) अनुसरण करत असता तेव्हा, तुम्ही विशिष्ट अनुभवांविषयी कोणतीही पूर्वकल्पना न करण्याची किंवा ते प्राप्त व्हावेत अशी अभिलाषा न बाळगण्याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. कारण तसे केलेत तर, तुम्हीच तुमच्यासाठी या अनुभवांचा एक भ्रम तयार करता. योगाच्या क्षेत्रामध्ये, ही अगदी काटेकोर आणि कठोर सहजस्फूर्तता अगदी अपरिहार्य असते. या मार्गावर खात्रीने आणि निर्भयपणे पुढे जायचे असेल तर, त्यासाठी, तुमच्यामध्ये कोणतीही आकांक्षा किंवा इच्छा किंवा बेसुमार कल्पना असता कामा नयेत; किंवा ज्याला मी ‘आध्यात्मिक स्वप्नरंजन’ (spiritual romanticism) म्हणते ते असता कामा नये किंवा चमत्कारसदृश गोष्टींची आवडदेखील असता कामा नये; या सर्व गोष्टी तुम्ही अगदी काळजीपूर्वक दूर सारल्या पाहिजेत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 282-283)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०३

अचेतनाचे रूपांतरण

सद्यस्थितीत साधकांना भेडसावणारी गोष्ट म्हणजे परिवर्तनाची सार्वत्रिक अक्षमता! त्याचे कारण असे आहे की, साधना ही आता एक सार्वत्रिक तथ्य या दृष्टीने अचेतनापर्यंत (Inconscient) आलेली आहे. प्रकृतीचा जो भाग अचेतनावर थेटपणे अवलंबून असतो अशा भागामध्ये परिवर्तन करण्याचा आता दबाव आहे, आणि तशी हाक आलेली आहे. म्हणजे दृढमूल झालेल्या सवयी, आपोआप घडणाऱ्या हालचाली, प्रकृतीची यांत्रिक पुनरावृत्ती, जीवनाला दिलेल्या अनैच्छिक, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, या साऱ्या गोष्टी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक स्थायी, अपरिवर्तनीय भाग असल्यासारख्या दिसतात. समग्र आध्यात्मिक परिवर्तनाची शक्यता निर्माण होण्यापूर्वी या गोष्टींमध्ये परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. आणि ही गोष्ट शक्य व्हावी म्हणून ‘दिव्य शक्ती’ (व्यक्तिगत स्तरावर नव्हे तर, सार्वत्रिक स्तरावर) कार्यरत आहे. आणि हा दबाव त्याचसाठी आहे. कारण इतर स्तरांवर, हे परिवर्तन यापूर्वीच शक्य झालेले आहे. (आणि हे लक्षात ठेवा की या परिवर्तनाचे आश्वासन प्रत्येकाला देण्यात आलेले नाही.)

परंतु अचेतनास प्रकाशाप्रत खुले करणे हे भगीरथ-कार्य आहे; त्या मानाने इतर स्तरांवरील परिवर्तन हे अधिक सोपे होते. आणि अचेतनावरील हे कार्य आत्ताआत्ता कुठे सुरू झाले आहे आणि त्यामुळे वस्तुमात्रांमध्ये किंवा माणसांमध्ये कोणतेही कोणताही बदल दिसून येत नाहीये यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हा बदल घाईने नाही, पण योग्य वेळी (निश्चितपणे) घडून येईल.

अनुभवादी गोष्टी ठीक आहेत पण मूळ प्रश्न असा की, अनुभवादींमुळे केवळ चेतना समृद्ध होते, त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनाच्या स्तरावर, जरी अगदी ब्रह्माचा साक्षात्कार झाला तरी तो अनुभवसुद्धा, काही अपवाद वगळता प्रकृतीस, ती जवळजवळ जिथे जशी आहे तशीच सोडून देतो. आणि म्हणूनच पहिली आवश्यकता म्हणून आम्ही चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणावर (psychic transformation) भर देत असतो. कारण त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन घडते आणि त्याचे मुख्य साधन भक्ती, समर्पण इत्यादी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 617)

साधना, योग आणि रूपांतरण – ८८

(ध्यानावस्थेत प्रकाश दिसल्याचे एका साधकाने श्रीअरविंद यांना कळविले तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर….)

प्रकाश अनेक प्रकारचे असतात. अतिमानसिक, मानसिक, प्राणिक, शारीरिक, दिव्य किंवा असुरी असे सर्व प्रकारचे प्रकाश असतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, अनुभवांच्या आधारे प्रगल्भ होत गेले पाहिजे आणि त्या प्रत्येकामधील फरक ओळखायला शिकले पाहिजे. खऱ्या प्रकाशांच्या ठायी स्पष्टता आणि सौंदर्य असते आणि त्यामुळे ते ओळखणे हे तितकेसे कठीण नसते.

*

(ध्यानावस्थेमध्ये एका साधकाला काही ध्वनी ऐकू येत असल्याचे त्याने श्रीअरविंदांना पत्राने लिहून कळविले असावे, तेव्हा त्या साधकाला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर… )

शारीरिक दृष्टीशिवाय जशी आणखी एक वेगळी अंतर्दृष्टी असते, त्याप्रमाणेच बाह्य श्रवणाप्रमाणेच आंतरिक श्रवणही (inner hearing) असते. आणि ते आंतरिक श्रवण इतर जगतांमधील, इतर स्थळकाळातील किंवा अतिभौतिक जिवांकडून येणारे आवाज, ध्वनी आणि शब्द ऐकू शकते. पण इथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

काय करावे आणि काय करू नये, यासंबंधी परस्परविरोधी आवाजात जर तुम्हाला कोणी काही सांगायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकता कामा नये किंवा त्यांना प्रत्युत्तरदेखील देता कामा नये. तुम्ही काय करावे किंवा काय करू नये यासंबंधी केवळ मी आणि श्रीमाताजीच तुम्हाला सांगू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो किंवा तुम्हाला सल्ला देऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 304-305, 112)

साधना, योग आणि रूपांतरण – ७९

साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ?

श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची आस असलेल्या) लोकांबाबत नेहमीच असे घडत असते. बाह्य प्रकृती, तिचे स्वरूप आणि तिच्या सवयी या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीने गुंतून पडता कामा नये अशा काहीतरी पूर्णपणे तिरस्करणीय गोष्टी आहेत, असे समजून ते त्या गोष्टी नाकारतात. त्यांच्या सर्व ऊर्जा, चेतनेच्या सर्व शक्ती (बाह्यवर्ती प्रकृतीमधून) काढून घेतात आणि उच्चतेप्रत वळवितात. आणि त्यांना हे जर पुरेशा पूर्णत्वाने साध्य करता आले तर सहसा ते कायमसाठी स्वतःच्या देहाचा त्याग करतात.

परंतु अशा उदाहरणांमध्ये, पुष्कळ वेळा असे आढळते की, ही गोष्ट ते आंशिकरितीनेच करतात आणि जेव्हा ते त्यांच्या ध्यानामधून, त्यांच्या निदिध्यासनामधून किंवा त्यांच्या समाधी अवस्थेमधून बाहेर येतात तेव्हा ते बहुधा इतरांपेक्षाही अधिक वाईट ठरतात कारण त्यांनी त्यांच्या बाह्यवर्ती प्रकृतीवर (परिवर्तनाचे) कोणतेही परिश्रम न घेता तिला आहे त्याच परिस्थितीत बाजूला सारलेले असते.

अगदी सामान्य माणसांच्या बाबतीत सुद्धा असे आढळते की, जर त्यांच्यातील दोष, दुर्गुण अगदी ठळकपणे नजरेत भरत असतील तर, जीवनामध्ये त्यामुळे फार त्रास होऊ नये म्हणून, ती माणसं त्या दोषांमध्ये सुधारणा करण्याचा किंवा त्यांच्यावर थोडे का होईना पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. (आणि या मुमुक्षू मंडळींच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) व्यक्तीने आपले शरीर आणि आपली बाह्यवर्ती चेतना ही पूर्णपणे सोडली पाहिजे आणि संपूर्णपणे ”आध्यात्मिक उंची”प्रत स्वतःला नेले पाहिजे, हाच योग्य दृष्टिकोन आहे, अशी ज्यांची समजूत असते अशी माणसं शरीराला आणि बाह्यवर्ती प्रकृतीला एखादा जुना कपडा असावा त्याप्रमाणे टाकून देतात आणि त्यामध्ये सुधारणा करत नाहीत आणि मग जेव्हा तो कपडा पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो वापरण्याजोगा राहिलेला नसतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु परिवर्तन घडवावे अशी तुमच्यापाशी जर प्रामाणिक इच्छा असेल तरच आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य होते.

तुमच्यापाशी परिवर्तन करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मग मात्र त्याचे खूप साहाय्य होते कारण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्यातून तुम्हाला मिळते, परिवर्तनासाठी आवश्यक असा आधार त्यातून तुम्हाला मिळतो. परंतु तुम्हाला परिवर्तन करण्याची खरोखरच प्रामाणिक इच्छा असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 348-349)