Tag Archive for: अनुभव

जीवन जगण्याचे शास्त्र – ०४

(सहजस्फूर्त असणे म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, यासंबंधीचा विचार कालच्या भागात आपण केला. मनोकल्पित रचनांच्या पलीकडे जात, अंत:प्रेरणेवर विसंबून कार्य कसे करायचे याचाही निर्देश त्यामध्ये देण्यात आला होता. आता योगसाधनेमधील त्याची आवश्यकता व त्यामधील धोके श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही योगसाधना करू इच्छित असाल आणि तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात तर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनोरचनांच्या हातचे बाहुले बनता कामा नये, ही गोष्ट अतिशय आवश्यक असते. तुम्हाला जर तुमच्या अनुभवांवर विश्वास ठेवायचा असेल तर, जे अनुभव यावेत असे तुम्हाला वाटते किंवा त्याविषयी तुमची जी कल्पना असते, जे रूप पाहण्याची तुम्हाला इच्छा किंवा अपेक्षा असते, तशा मनोमय रचना तुमच्या मनामध्ये निर्माण न करण्याची अतिशय काटेकोर काळजी तुम्ही घेतली पाहिजे.

कारण मनोमय रचना या बऱ्याचदा एक प्रकारच्या वास्तव रचना (real formation) असतात, ती एक खरी निर्मिती असते. आणि तुम्ही तुमच्या कल्पनेच्या साहाय्याने अशी रूपं तयार करता की, जी काही ठरावीक प्रमाणात तुमच्यापासून स्व-तंत्र असतात आणि ती रूपं जणू बाहेरून आल्यासारखी तुमच्यापाशी परत येतात आणि ती रूपं तुम्हाला ‘अनुभव आल्याचा’ भास निर्माण करतात. परंतु हे ईप्सित असलेले अनुभव किंवा ज्याच्या मागे तुम्ही धावत असता ते किंवा तुम्हाला अपेक्षित असणारे अनुभव सहजस्फूर्त नसतात आणि ते आभासी असल्याने त्यामध्ये जोखीम असते. कधीकधी तर ते अतिशय धोकादायक असे भ्रम असतात.

म्हणून जेव्हा तुम्ही मानसिक साधनेचे (mental discipline) अनुसरण करत असता तेव्हा, तुम्ही विशिष्ट अनुभवांविषयी कोणतीही पूर्वकल्पना न करण्याची किंवा ते प्राप्त व्हावेत अशी अभिलाषा न बाळगण्याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. कारण तसे केलेत तर, तुम्हीच तुमच्यासाठी या अनुभवांचा एक भ्रम तयार करता. योगाच्या क्षेत्रामध्ये, ही अगदी काटेकोर आणि कठोर सहजस्फूर्तता अगदी अपरिहार्य असते. या मार्गावर खात्रीने आणि निर्भयपणे पुढे जायचे असेल तर, त्यासाठी, तुमच्यामध्ये कोणतीही आकांक्षा किंवा इच्छा किंवा बेसुमार कल्पना असता कामा नयेत; किंवा ज्याला मी ‘आध्यात्मिक स्वप्नरंजन’ (spiritual romanticism) म्हणते ते असता कामा नये किंवा चमत्कारसदृश गोष्टींची आवडदेखील असता कामा नये; या सर्व गोष्टी तुम्ही अगदी काळजीपूर्वक दूर सारल्या पाहिजेत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 282-283)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०३

अचेतनाचे रूपांतरण

सद्यस्थितीत साधकांना भेडसावणारी गोष्ट म्हणजे परिवर्तनाची सार्वत्रिक अक्षमता! त्याचे कारण असे आहे की, साधना ही आता एक सार्वत्रिक तथ्य या दृष्टीने अचेतनापर्यंत (Inconscient) आलेली आहे. प्रकृतीचा जो भाग अचेतनावर थेटपणे अवलंबून असतो अशा भागामध्ये परिवर्तन करण्याचा आता दबाव आहे, आणि तशी हाक आलेली आहे. म्हणजे दृढमूल झालेल्या सवयी, आपोआप घडणाऱ्या हालचाली, प्रकृतीची यांत्रिक पुनरावृत्ती, जीवनाला दिलेल्या अनैच्छिक, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, या साऱ्या गोष्टी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक स्थायी, अपरिवर्तनीय भाग असल्यासारख्या दिसतात. समग्र आध्यात्मिक परिवर्तनाची शक्यता निर्माण होण्यापूर्वी या गोष्टींमध्ये परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. आणि ही गोष्ट शक्य व्हावी म्हणून ‘दिव्य शक्ती’ (व्यक्तिगत स्तरावर नव्हे तर, सार्वत्रिक स्तरावर) कार्यरत आहे. आणि हा दबाव त्याचसाठी आहे. कारण इतर स्तरांवर, हे परिवर्तन यापूर्वीच शक्य झालेले आहे. (आणि हे लक्षात ठेवा की या परिवर्तनाचे आश्वासन प्रत्येकाला देण्यात आलेले नाही.)

परंतु अचेतनास प्रकाशाप्रत खुले करणे हे भगीरथ-कार्य आहे; त्या मानाने इतर स्तरांवरील परिवर्तन हे अधिक सोपे होते. आणि अचेतनावरील हे कार्य आत्ताआत्ता कुठे सुरू झाले आहे आणि त्यामुळे वस्तुमात्रांमध्ये किंवा माणसांमध्ये कोणतेही कोणताही बदल दिसून येत नाहीये यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हा बदल घाईने नाही, पण योग्य वेळी (निश्चितपणे) घडून येईल.

अनुभवादी गोष्टी ठीक आहेत पण मूळ प्रश्न असा की, अनुभवादींमुळे केवळ चेतना समृद्ध होते, त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनाच्या स्तरावर, जरी अगदी ब्रह्माचा साक्षात्कार झाला तरी तो अनुभवसुद्धा, काही अपवाद वगळता प्रकृतीस, ती जवळजवळ जिथे जशी आहे तशीच सोडून देतो. आणि म्हणूनच पहिली आवश्यकता म्हणून आम्ही चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणावर (psychic transformation) भर देत असतो. कारण त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन घडते आणि त्याचे मुख्य साधन भक्ती, समर्पण इत्यादी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 617)

साधना, योग आणि रूपांतरण – ८८

(ध्यानावस्थेत प्रकाश दिसल्याचे एका साधकाने श्रीअरविंद यांना कळविले तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर….)

प्रकाश अनेक प्रकारचे असतात. अतिमानसिक, मानसिक, प्राणिक, शारीरिक, दिव्य किंवा असुरी असे सर्व प्रकारचे प्रकाश असतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, अनुभवांच्या आधारे प्रगल्भ होत गेले पाहिजे आणि त्या प्रत्येकामधील फरक ओळखायला शिकले पाहिजे. खऱ्या प्रकाशांच्या ठायी स्पष्टता आणि सौंदर्य असते आणि त्यामुळे ते ओळखणे हे तितकेसे कठीण नसते.

*

(ध्यानावस्थेमध्ये एका साधकाला काही ध्वनी ऐकू येत असल्याचे त्याने श्रीअरविंदांना पत्राने लिहून कळविले असावे, तेव्हा त्या साधकाला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर… )

शारीरिक दृष्टीशिवाय जशी आणखी एक वेगळी अंतर्दृष्टी असते, त्याप्रमाणेच बाह्य श्रवणाप्रमाणेच आंतरिक श्रवणही (inner hearing) असते. आणि ते आंतरिक श्रवण इतर जगतांमधील, इतर स्थळकाळातील किंवा अतिभौतिक जिवांकडून येणारे आवाज, ध्वनी आणि शब्द ऐकू शकते. पण इथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

काय करावे आणि काय करू नये, यासंबंधी परस्परविरोधी आवाजात जर तुम्हाला कोणी काही सांगायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकता कामा नये किंवा त्यांना प्रत्युत्तरदेखील देता कामा नये. तुम्ही काय करावे किंवा काय करू नये यासंबंधी केवळ मी आणि श्रीमाताजीच तुम्हाला सांगू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो किंवा तुम्हाला सल्ला देऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 304-305, 112)

साधना, योग आणि रूपांतरण – ७९

साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ?

श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची आस असलेल्या) लोकांबाबत नेहमीच असे घडत असते. बाह्य प्रकृती, तिचे स्वरूप आणि तिच्या सवयी या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीने गुंतून पडता कामा नये अशा काहीतरी पूर्णपणे तिरस्करणीय गोष्टी आहेत, असे समजून ते त्या गोष्टी नाकारतात. त्यांच्या सर्व ऊर्जा, चेतनेच्या सर्व शक्ती (बाह्यवर्ती प्रकृतीमधून) काढून घेतात आणि उच्चतेप्रत वळवितात. आणि त्यांना हे जर पुरेशा पूर्णत्वाने साध्य करता आले तर सहसा ते कायमसाठी स्वतःच्या देहाचा त्याग करतात.

परंतु अशा उदाहरणांमध्ये, पुष्कळ वेळा असे आढळते की, ही गोष्ट ते आंशिकरितीनेच करतात आणि जेव्हा ते त्यांच्या ध्यानामधून, त्यांच्या निदिध्यासनामधून किंवा त्यांच्या समाधी अवस्थेमधून बाहेर येतात तेव्हा ते बहुधा इतरांपेक्षाही अधिक वाईट ठरतात कारण त्यांनी त्यांच्या बाह्यवर्ती प्रकृतीवर (परिवर्तनाचे) कोणतेही परिश्रम न घेता तिला आहे त्याच परिस्थितीत बाजूला सारलेले असते.

अगदी सामान्य माणसांच्या बाबतीत सुद्धा असे आढळते की, जर त्यांच्यातील दोष, दुर्गुण अगदी ठळकपणे नजरेत भरत असतील तर, जीवनामध्ये त्यामुळे फार त्रास होऊ नये म्हणून, ती माणसं त्या दोषांमध्ये सुधारणा करण्याचा किंवा त्यांच्यावर थोडे का होईना पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. (आणि या मुमुक्षू मंडळींच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) व्यक्तीने आपले शरीर आणि आपली बाह्यवर्ती चेतना ही पूर्णपणे सोडली पाहिजे आणि संपूर्णपणे ”आध्यात्मिक उंची”प्रत स्वतःला नेले पाहिजे, हाच योग्य दृष्टिकोन आहे, अशी ज्यांची समजूत असते अशी माणसं शरीराला आणि बाह्यवर्ती प्रकृतीला एखादा जुना कपडा असावा त्याप्रमाणे टाकून देतात आणि त्यामध्ये सुधारणा करत नाहीत आणि मग जेव्हा तो कपडा पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो वापरण्याजोगा राहिलेला नसतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु परिवर्तन घडवावे अशी तुमच्यापाशी जर प्रामाणिक इच्छा असेल तरच आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य होते.

तुमच्यापाशी परिवर्तन करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मग मात्र त्याचे खूप साहाय्य होते कारण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्यातून तुम्हाला मिळते, परिवर्तनासाठी आवश्यक असा आधार त्यातून तुम्हाला मिळतो. परंतु तुम्हाला परिवर्तन करण्याची खरोखरच प्रामाणिक इच्छा असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 348-349)

विचारशलाका २६

 

कधीकधी असे होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पाऊलदेखील तिची प्रगती होत नाही. कधी असेही घडते की, एखादी व्यक्ती अतिशय धर्मनिष्ठ असूनही, तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आहे आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झालेले नाही. (आणि दुसरीकडे) जुन्या चप्पलबूट शिवण्यासारखी अगदी साधी कामे करणारीसुद्धा काही माणसं आहेत की ज्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला आहे. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा असे अनुभव या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी असते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ‘ईश्वरा’शी एकत्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ‘ईश्वरा’मध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एखादे वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही धर्मग्रंथ किंवा तत्त्वज्ञानाची पुस्तकेच्या पुस्तके वाचूनही काही उपयोग होत नाही. हो, पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची असते : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण (प्रगती, अनुभव इत्यादी) गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे.

एखाद्याला जेव्हा असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे या गोष्टींना विरोध करत आहे ते त्याने शोधून काढले पाहिजे; आणि मग त्याने आवश्यक ती प्रगती केली पाहिजे. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जण तर अगदी जडवादी असतात पण ते सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो ‘सत्य’ असतो – तो खरा असतो, कारण ते एकमेव वास्तव असते. एखादा त्याबद्दल काय बोलतो ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी [CWM 06 : 26-27]

तासन् तास ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला अनुभव येतात की नाही, हे तितकेसे महत्त्वाचे नाही. मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आत्ता अनुभव नव्हे तर चैत्याची वृद्धी हाच तुमचा मार्ग असावयास हवा.

याचा अर्थ म्हणजे, तीन गोष्टी पाहिजेत – पहिली गोष्ट म्हणजे, प्राणिक अहंकार आणि त्याचे गोंधळ, अस्वस्थता, अशांती यांपासून मागे होऊन, श्रद्धा व समर्पणाचा शांत दृष्टिकोन स्वीकारणे.

दुसरी गोष्ट म्हणजे, अंतरंगामध्ये अशा कोणत्यातरी गोष्टीचा उदय की जी गोष्ट, तुमच्या प्रकृतीमधील काय बदलायला हवे हे पाहते आणि तो बदल घडविण्याचा जोशही देते.

तिसरी गोष्ट म्हणजे, साधनेमधील चैत्य भावना की जी, भक्तीमध्ये वाढ करेल. अशी भावना की जी, ईश्वराचे स्मरण करण्यात, त्याच्या विषयीच्या बोलण्यामध्ये, त्याच्याविषयी लिहिण्यामध्ये, अनुभवण्यामध्ये, ईश्वराचा सतत विचार करण्यामध्ये सहजपणाने आनंद अनुभवेल; अशी भावना ही, बाह्यवर्ती गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा अधिकाधिक अगदी शांतपणे ईश्वराभिमुख होऊन, आत्म-उन्नतीमध्ये परिपूर्णपणे वृद्धिंगत होत राहील.

जेव्हा जाणीव ही वरील गोष्टींनी ओतप्रोत भरून जाईल म्हणजे, जेव्हा अशा प्रकारे पूर्ण चैत्य स्थिती असेल, चैत्य खुले झालेले असेल, तेव्हा आपोआप अनुभव यायला लागतील. प्रथम चैत्य खुलेपण आणि त्यानंतर उच्चतर जाणीव व तिचे अनुभव !

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 347-348)

प्रश्न : आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे येऊ शकतात?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव ही एक अशी गोष्ट असते की, ज्यामुळे तुम्ही नेहमी ज्या चेतनावस्थेत वावरत असता त्यापेक्षा अधिकउच्च अशा चेतनावस्थेशी तुमचा संपर्क येतो. तुम्हाला स्वत:विषयी काहीतरी एक भावना असते, भले तुम्ही त्याविषयी जागृतही नसाल, ती तुमची सामान्य स्थिती असते, ती तुम्हाला माहीत असते. पण जर तुम्हाला तुमच्या अंतरंगातील काही वेगळ्या आणि अधिक उच्च अशा चेतनेची एकाएकी जाणीव झाली तर ती काही का असेना, तरीही तो एक आध्यात्मिक अनुभव असेल.

तुम्ही मानसिक कल्पनेद्वारे त्याची मांडणी कराल किंवा करणार नाही; तुम्ही ते स्वत:लाच स्पष्ट करून सांगाल किंवा सांगणारही नाही, ते उत्स्फूर्त असू शकते. पण जेव्हा हा जाणिवेमधील अनिवार्य असा फरक तुम्हाला जाणवतो, त्याचा परिणाम म्हणून, काही अधिक उच्च, अधिक स्पष्ट, अधिक शुद्ध असे काही जाणवते तेव्हा त्याला आध्यात्मिक अनुभव म्हणता येते. म्हणजेच असे की, अशा हजारो वेगवेगळ्या गोष्टी आहेत की, ज्याला आध्यात्मिक अनुभव असे म्हणता येते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 432)