Tag Archive for: अतिमानव

आत्मसाक्षात्कार – २८

(मागील भागावरून पुढे…)

(आत्मसाक्षात्कार २४ ते २८ हे भाग एकत्रित वाचल्यास श्रीअरविंद प्रणीत ‘दिव्य अतिमानव’ ही संकल्पना अधिक चांगल्या रितीने समजेल, असा विश्वास वाटतो.)

अतिमानस (Supermind) म्हणजे अतिमानव; त्यासाठी मनाच्या अतीत होणे ही अनिवार्य अट आहे.

अतिमानव होणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव-देवता या ईश्वराच्या शक्ती असतात. तुम्ही मानववंशामधील ईश्वराची शक्ती बनून राहा.

दिव्य अस्तित्वामध्ये वसती करून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेला व परमानंदाला, आत्म्याच्या संकल्पशक्तीला व ज्ञानाला तुमचा ताबा घेऊ देणे आणि त्यांना तुमच्या समवेत व तुमच्या माध्यमातून लीला करू देणे, हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण असते. स्वत:मध्ये ईश्वराचा शोध घेणे आणि स्वत:च्या सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रकट करणे हे सर्वोच्च रूपांतरण असते. त्याच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीसहित कृती करा, त्याच्या परमानंदामध्ये न्हाऊन निघा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

यांपैकी अंशभाग जरी तुम्ही प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या (supermanhood) पहिल्या काही पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 152)

‘आत्मसाक्षात्कार’ ही मालिका येथे समाप्त होत आहे. धन्यवाद!!

आत्मसाक्षात्कार – २७

(मागील भागावरून पुढे…)

उठा, (जागे व्हा आणि) स्वतःच्या अतीत जा, तुमचे स्वत:चे मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची समग्र प्रकृतीच अशी असते की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मानवामधील पशु-मानव (animal man) होता, तो आता त्याहूनही वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण त्याने आता विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनले पाहिजे; तो आता ज्ञानद्रष्टा झाला पाहिजे. त्याने आता कारागीरापेक्षा अधिक काही बनले पाहिजे; तो निर्माणकर्ता आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी झाला पाहिजे. त्याने आता केवळ सौंदर्योपासक न राहता, अधिक काही बनले पाहिजे; कारण तो सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा आस्वाद घेऊ शकतो.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य सत्त्व (substance) मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे आणि त्याच्याकडील ज्ञान आंशिक असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि शुद्ध दृष्टी यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

हे सर्व प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे; कारण तसे बनणे म्हणजे मनामधून अतिमानसाकडे उन्नत होणे. त्याला ‘दिव्य मन’ किंवा ‘दिव्य ज्ञान’ किंवा ‘अतिमानस’ काहीही नाव द्या; ते दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती व प्रकाश असतात. चैतन्याने (Spirit) अतिमानसाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने या जगतांमध्ये (worlds) स्वत:ची निर्मिती केली, अतिमानसाच्याद्वारे ते चैतन्य त्या जगतांमध्ये निवास करते आणि त्यांचे शासन करते. त्याच्यामुळेच ते स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 151-152)

आत्मसाक्षात्कार – २५

(मागील भागावरून पुढे…)

इथे तुम्ही कोणतीही चूक करता कामा नये. कारण ही चूक म्हणजे स्वतःला न जाणणे. तीच तुमच्या सर्व दुःखांचे उगमस्थान असते आणि तुमच्या सर्व अध:पतनाचे कारण असते.

तुम्हाला जो ‘मी’ आहे असे वाटते, त्या ‘मी’च्या अतीत तुम्ही गेलेच पाहिजे आणि तुम्ही ज्याला मनुष्य म्हणून ओळखता तो मनुष्य म्हणजे प्रकट ‘पुरुष’ असतो. आणि हा मनुष्य म्हणजे कोण? मनुष्य म्हणजे प्राण आणि जडभौतिक शरीर यांचा गुलाम असलेला मनोमय पुरुष असतो. आणि जेथे तो प्राण व शरीर यांचा गुलाम झालेला नसतो, तेथे तो त्याच्या मनाचा गुलाम असतो. पण ही फार मोठी गुलामी असते, कारण मनाचे गुलाम असणे म्हणजे मिथ्यत्वाचे, मर्यादिततेचे आणि व्यक्ताचे, दृश्याचे (apparent) गुलाम असणे होय. जो ‘स्व’ हा मन, प्राण आणि शरीर यांच्या पडद्याआड अंतरंगामध्ये असतो, तो ‘स्व’ तुम्ही बनले पाहिजे. आध्यात्मिक बनणे, दिव्य बनणे, अतिमानव, खरा ‘पुरुष’ बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. कारण मनोमय पुरुषाच्या ऊर्ध्वस्थित जर कोणी असेल तर तो ‘अतिमानव’ (superman) असतो.

अतिमानव बनणे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे, तुमच्या प्राणाचे आणि तुमच्या शरीराचे स्वामी बनणे; आत्ता तुम्ही ज्या प्रकृतीच्या हातचे साधन आहात, त्या प्रकृतीचे तुम्ही सम्राट बनणे. आत्ता तुम्ही तिच्या पायाखाली आहात, तेच तुम्ही तिच्याही वर जाण्यासाठी उचलले जाणे म्हणजे अतिमानव बनणे. अतिमानव बनणे म्हणजे गुलाम नव्हे तर, मुक्त होणे; विभक्त असणे नव्हे तर एकत्व पावणे; मृत्युने झाकोळलेले नसणे तर अमर्त्य असणे, अंधकारमय नव्हे तर संपूर्ण प्रकाशमान असणे; दुःखशोक यांच्या खेळामध्ये नसणे तर पूर्णतया आनंदमय असणे; दुर्बलतेच्या गर्तेत जाऊन पडणे नव्हे तर शक्तिसामर्थ्यामध्ये उन्नत होणे. अतिमानव बनणे म्हणजे अनंतामध्ये जीवन जगणे आणि सांत गोष्टींवर (finite) ताबा मिळवणे. अतिमानव बनणे म्हणजे ईश्वरामध्ये जीवन जगणे आणि त्याच्या अस्तित्वामध्ये राहून त्याच्याशी एकत्व अनुभवणे. हे सर्व बनणे आणि त्यापासून प्रवाहित होणाऱ्या साऱ्या गोष्टी बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150-151)

आत्मसाक्षात्कार – २४

(‘अतिमानव होणे म्हणजे काय’, ही संकल्पना श्रीअरविंदांनी येथे सुस्पष्ट करून सांगितली आहे. हा मजकूर दीर्घ असल्याने क्रमश: देत आहोत…)

परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि त्याचसाठी तुम्ही इथे आहात. या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते म्हणजे एकतर तुमची तयारी करून घेणे आहे किंवा तो मार्गावरील आनंद आहे; अन्यथा ते म्हणजे उद्देशापासून स्खलन, ध्येयच्युती आहे. या मार्गाच्या आधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, (परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे) हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे; त्या ध्येयपूर्तीच्या आनंदामध्ये तुमच्या अस्तित्वाची महानता आणि आनंद सामावलेला आहे. तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तो (ईश्वर) देखील या मार्गावर तुमच्यासोबत आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत यासाठीच आरोहणाची शक्ती तुम्हाला प्रदान करण्यात आली आहे.

तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच आहे! तुमचे ध्येय काय असावे असे जर तुम्ही विचारत असाल, तर ते ध्येय हेच असावे. तुम्ही जर सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर उपरोक्त गोष्टीइतका आनंद तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत लाभणार नाही. कारण स्वप्नांचा आनंद असो, झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे आनंद खंडित वा मर्यादित असतात. पण उपरोक्त आनंद मात्र तुमच्या समग्र अस्तित्वाचा आनंद असतो. तुम्ही जर असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय आहे, तर ‘ईश्वर’ हेच तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ खंडित वा विपर्यस्त रूपे आहेत. तुम्ही जर ‘सत्य’ शोधू पाहात असाल, तर ते ‘सत्य’ हेच आहे. सातत्याने तेच तुमच्या दृष्टीसमोर असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०)

केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या ‘योगा’चे ध्येय आहे. (अहंकार दिव्य चेतनेमध्ये विलीन करत असताना, त्या अनुषंगाने, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या जीवात्म्याचा (individual self) शोध लागतो; हा जीवात्मा म्हणजे मर्यादित, व्यर्थ आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर तो ‘ईश्वरा’चा अंश असतो.) बाकी सर्व गोष्टी म्हणजे या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या ‘योगा’चे प्राथमिक उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०९)

‘ईश्वरी उपस्थिती’ आणि ‘दिव्य चेतने’मध्ये प्रवेश करणे आणि त्याने परिव्याप्त होणे हे या योगाचे (पूर्णयोगाचे) उद्दिष्ट आहे; ‘ईश्वरा’वर केवळ ‘ईश्वरा’साठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी मिळतीजुळती करणे, मेळविणे आणि आपली इच्छा, आपली कर्मे, आपले जीवन हे सारे ‘ईश्वरा’चे साधन बनवणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव (Superman) बनणे (काळाच्या ओघात तसे घडेलही) किंवा अहंकाराच्या शक्तीसाठी, अभिमानासाठी किंवा सुखासाठी ‘ईश्वरा’ला आपलेसे करणे, हे काही या योगाचे उद्दिष्ट नाही. या योगाद्वारे मुक्ती मिळत असली तरीही हा योग ‘मोक्षा’साठी नाही, किंवा यामधून इतरही साऱ्या गोष्टी साध्य होत असल्या तरीपण, त्या गोष्टी हे आपले उद्दिष्ट असता कामा नये. एकमेव ‘ईश्वर’ हेच आपले उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

विचारशलाका १२

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये अतिमानव (superman) घडविण्याचे कार्य करण्याचा प्रकृतीचा संकल्प आहे. दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याचा व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याचा तिचा संकल्प आहे.

– श्रीअरविंद [CWSA 13 : 502]

विचार शलाका – १६

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामधील आपल्या जन्माचे गुप्त सत्य असेल तर, आजचा मनुष्य हा त्या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे आणि ते केवळ साधनभूत आहे. मन हे चेतनेचा केवळ एक मधला टप्पा आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि मनुष्य जर का अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

पण मनाच्या अतीत असणाऱ्या गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनुष्याच्याच मनाची क्षमता असेल तर मग त्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानव तत्त्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्याच्या उत्क्रांतीसाठी आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २२

केवळ अतिमानव बनण्याच्या कल्पनेने या योगाकडे वळणे ही प्राणिक अहंकाराची कृती ठरेल आणि त्यामुळे या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ ठरेल. जी माणसे त्यांच्या सर्व क्रियाकलापांसमोर हे उद्दिष्ट ठेवतात त्यांना अपरिहार्यपणे आध्यात्मिक आणि अन्य दु:खं सहन करावी लागतात. विभक्तकारी अहंकाराचे दिव्य चेतनेमध्ये विलयन करून, त्या द्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रथम प्रवेश करणे (त्या अनुषंगाने, म्हणजे असे करत असताना, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या व्यक्तिगत ‘स्व’चा शोध लागतो; हा ‘स्व’ म्हणजे मर्यादित, निरर्थक आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर, तो ईश्वराचा अंश असतो.) आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी म्हणून अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या योगाचे ध्येय आहे. बाकी सर्व गोष्टी या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या योगाचे मुख्य उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 21)