Tag Archive for: अंतरंग

तुमच्या प्राणिक प्रकृतीची जुनी सवय तुम्हाला पुन्हापुन्हा (तुमच्या अस्तित्वाच्या) बाह्यवर्ती भागात जायला भाग पाडते; परंतु त्या उलट तुम्ही चिकाटीने, तुमच्या खऱ्या अस्तित्वामध्ये म्हणजे तुमच्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहण्याची आणि तेथूनच सर्व गोष्टींकडे पाहण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तेथूनच तुम्हाला खऱ्या विचारांची, खऱ्या दृष्टीची प्राप्ती होते, तेथूनच तुम्हाला सर्व गोष्टींचे आणि तुमच्या प्रकृतीचे आणि तुमच्या ‘स्व’चे योग्य आकलन होते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 228]

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये स्वतःचे एकत्रीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखरत (disperse) राहिलात आणि आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्या गोष्टींप्रति खुली आहे अशाच गोष्टींच्या प्रभावाखाली राहाल. तुम्ही सतत वावरत राहाल.

अंतरंगामध्ये राहून जीवन जगायला शिका, तसेच नेहमी अंतरंगात राहून, श्रीमाताजींशी नित्य आंतरिक संपर्क ठेवून कृती करायला शिका. सुरुवातीला ही गोष्ट नेहमी आणि समग्रपणे करणे कठीण वाटू शकेल, परंतु व्यक्ती जर नेटाने तसे करत राहिली तर तसे करता येणे शक्य असते, आणि असे करायला शिकणे ही किंमत चुकती करूनच, व्यक्तीला ‘योगा’मध्ये सिद्धी प्राप्त होऊ शकते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 227]

आंतरिक आधार शोधण्यासाठी व्यक्तीने, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत सखोल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; व्यक्तीने आत अधिक आत, खोल, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अक्षुब्ध, अविचल शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे. अस्तित्वाच्या या अतीव अचंचलतेमध्ये (quietude), साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःखयातनांपासून दूर, विचार, कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ईश्वराचे ‘अस्तित्व’ अनुभवण्यासाठी व्यक्तीने अगदी काळजीपूर्वकपणे अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते, जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ईश्वरी ‘शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अभिमुख करणे आवश्यक असते. जिथे कोणतीही कृती शिल्लक राहात नाही, कोणताही ठसा उमटलेला नाही, अहंकार नाही, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नाही, अन्य काहीही नाही तर फक्त आनंदलहरी आहेत, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत व्यक्तीने खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ते ऐक्य अनुभवले पाहिजे…

-श्रीमाताजी [The Supreme by Mona Sarkar]