Tag Archive for: स्वभाव

 

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात तिच्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. कधीकधी त्या व्यक्तीच्या स्वभावाची एक बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच बाजू व्यक्त होते किंवा अमुक एका संदर्भात व्यक्ती जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांच्या बाबतीत वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीच्या आत्म-परीक्षणात्मक दृष्टीमध्ये निर्मम-वस्तुनिष्ठता असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ‘ईश्वरी-कृपे‌’मुळेच, साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या उणिवा असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ‘ईश्वरी-कृपे‌’मध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

विचारशलाका १९

नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; तत्त्वज्ञानाच्या सर्व पुस्तकांमधून, अगदी योगामध्येसुद्धा तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण तुमच्या जन्माबरोबरच तो आलेला असतो, तुम्ही तसेच आहात.”

पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी अत्यंत अवघड असे काही तुम्हाला करावे लागते. (कारण) तुम्हाला केवळ तुमचीच प्रवृत्ती बदलायची नसते तर, (तुमच्यामध्ये असलेली तुमच्या) पूर्वजांची प्रवृत्तीदेखील तुम्हाला बदलायची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही (कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो), पण तुम्हाला मात्र  तुमच्यामधील ती प्रवृत्ती बदलणे आवश्यक असते.

त्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात – तुमच्या जन्माबरोबर जणू या सुंदर भेटवस्तू तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या तुम्हाला बदलायच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही जर त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर, एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त झालेले असाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.

तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती झालेले असाल; नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल.

– श्रीमाताजी [CWM 04 : 262]